कला शाखा विज्ञान शाखेला वरचढ ?
यंदाचे वर्ष सुरू होताहोताच न भूतो न भविष्यती अशी कोविडची महासाथ संपूर्ण जगावर धडकली. त्यातून आपल्या अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या. कित्येक वर्षे आपण कल्पनाही केली नव्हती असे काही बदल वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर घडले.
संपूर्ण देशातील रेल्वे आणि अन्य सरकारी वाहतूक व्यवस्था काही काळासाठी पूर्ण बंद होती. यासारख्या अन्य काही अभूतपूर्व घटना देखील घडल्या. त्यापैकी एक ताजी म्हणजे नुकताच अत्यंत शांततेत संपलेला सार्वजनिक गणेशोत्सव. आपणा सर्वांच्या आयुष्यात कदाचित एकदाच पाहायला मिळालेली ही यावर्षीची अपवादात्मक घटना असावी. अगदी 1975 च्या आणीबाणीत देखील आवाज करणारी विसर्जन मिरवणूक अल्प काळासाठी का होईना रस्त्यावर होती.
तर मंडळी, असे अनेक धक्के गेल्या नऊ महिन्यात आपल्याला बसलेले आहेत. आता मी तुमच्यासमोर शैक्षणिक क्षेत्रातील अजून एक हलकासा धक्का मांडतोय. नुकतीच मी ही बातमी इथे वाचली आहे :
विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेचा कट ऑफ जास्त, कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पसंती
(https://marathi.abplive.com/news/pune/arts-cut-off-list-is-higher-than-science-cut-off-11th-admission-803819).
इयत्ता अकरावीच्या महाविद्यालय प्रवेशासंबंधीची ही बातमी आहे. त्यात पुण्यातील काही नामवंत महाविद्यालयांचा उल्लेख आहे. तसेच त्यावर प्राचार्यांचीही मते दिलेली आहेत. त्यावरून बातमी खरी असण्याची दाट शक्यता वाटते. अन्यत्र अजून संदर्भ मला सापडला नाही. तूर्त ती खरी आहे असे धरून काही चर्चा करूया.
अकरावी प्रवेशाच्या बाबतीत आपण जर गेल्या पन्नास वर्षांवर नजर टाकली, तर एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दिसायची. ती म्हणजे अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी काही अपवाद वगळता आधी विज्ञान शाखेची निवड करतात. मग तिथली यादी संपल्यावर पुढे वाणिज्य आणि कला यांना पसंती दिली जाते. आपल्या समाजात काही समीकरणे जरी बरोबर नसली तरी रूढ होऊन बसली होती. ती म्हणजे उत्तम गुण( ८५ - १०० टक्के हा टप्पा ) म्हणजे हुशार विद्यार्थी आणि अशा विद्यार्थ्यांनी प्रथम विज्ञान शाखेला जायचे. विशेषतः १९७०-२००० या काळात तर ते खूप दिसायचे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थी विज्ञान शाखा डावलून कला शाखेला गेल्याची उदाहरणे अल्प असायची. वरील बातमीने या पारंपरिक दीर्घकालीन समीकरणांना जोरदार छेद दिलेला दिसतो. उत्तम गुण असणारे विद्यार्थी यंदा चक्क कला शाखेला पसंती देत आहेत. बातमीतील हा भाग पाहा:
फर्ग्युसन महाविद्यालय - ( सायन्स कट ऑफ) 484 , (आर्ट्स कट ऑफ) 487
एस . पी . महाविद्यालय - (सायन्स कट ऑफ) 476 , (आर्ट्स कट ऑफ ) 479
मॉडर्न महाविद्यालय - ( सायन्स कट ऑफ) 474 , (आर्ट्स कट ऑफ)- 475
सेंट मीराज ज्युनियर कॉलेज - (सायन्स कट ऑफ) -459 , (आर्ट्स कट ऑफ) 460
हा आपल्या सर्वांनाच बसलेला सुखद धक्का आहे. माझ्या आठवणींत तरी हे अभूतपूर्व आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये काय परिस्थिती आहे याची अद्याप मला कल्पना नाही. कोणी कुठे वाचले असल्यास जरूर लिहा.
आता हा बदल या वर्षापुरता दिसतोय की भविष्यातही कल त्या दिशेने जाईल, हे पाहणे रंजक ठरेल. संबंधित बातमीत काही प्राचार्यांनी असे मत व्यक्त केले आहे, की जर हा कल असाच इथून पुढे राहिला तर मग कला शाखेच्या तुकड्या देखील वाढवाव्या लागतील.
हे सर्व वाचल्यावर माझ्या मनात काही विचार आले ते असे :
१. निव्वळ एका शहरातील काही मोजक्या महाविद्यालयांच्या यादीवरून संपूर्ण विद्यार्थी जगताचा हा कल मानता येईल का ?
२. सध्या सर्वत्र विज्ञान शाखेच्या तुकड्या जास्त असतात आणि कला शाखेच्या कमी. त्यामुळे हे जे चित्र दिसते आहे ते आभासी आहे की खरे ?
३. विज्ञान शाखेला जाऊन पुढे ज्या व्यावसायिक शाखांमध्ये शिक्षण मिळते, त्यांना असणारी तथाकथित प्रतिष्ठा आता पुढची पिढी झुगारुन देउ इच्छिते का ? ?
४. कला शाखेतून पुढे अर्थार्जनाच्या उत्तम संधी मिळणार असतील तर ते स्वागतार्हच आहे. सनदी अधिकारी व्हायचे स्वप्न असल्यास अलीकडे कला शाखा घेण्याचा कल दिसतो.
विषय तसा गुंतागुंतीचा आहे. इतक्यात कुठलाही दूरगामी निष्कर्ष काढणे योग्य नाही. तरी पण आपल्या सर्वांच्या समोर चर्चेसाठी ठेवत आहे.
………………………………………………….
* वैद्यकीय करियर वेळखाऊ , कष्टप्रद आणि तरीही तितके रिटर्न्स न देणारे * तेव्हा अशा सर्वांचा परिणामही असावा, वेगवेगळे प्रयोगही होतांना दिसत असावेत.>>> +१११