समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय,
या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव
अथवा एखादा शांत, एकांत आश्रम...
विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह
वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी
तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने
सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये
ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष
किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी
स्मरणात असेल तुझ्या आजही एखाद्या राधेसाठी
कुण्या श्रीहरीने तुझ्याच काठावर बसून वाजवलेली अलगुज
तुझ्या निळ्याशार पाण्यातुन आपल्या सख्यासोबत नौका विहार करताना
लाजेने चूर झालेला नवयौवनेचा साज
पाहिली आहेत तु या काळाची अगणीत स्थित्यंतरे
बदलणारा समाज आणि बदलणारी मने
आपल्या पापांचा भार तुझ्या माथी मारून नव्याने उभे ठाकलेले चेहरे
कधीतरी असह्य होऊन धारण केलेल्या तुझ्या रौद्र रुपाला पाहुन
तुलाच दोष देत पांगली असेल इथली वसाहत
वा मिळाली असेल त्या तपस्व्याला त्याची सायुज्यता
आणि पुन्हा झालीस तु एकाकी पण तरीही तशीच स्थितप्रज्ञ, शांत...
आता मी बसुन आहे इथेच तुझ्या काठावर, तुझ्याकडेच पाहत
तुझ्यासारखाच संथ, शांत आणि एकाकी...
शोधत आलोय तुझ्या जुन्या खुणा,
शोधयचाय तुझ्या अमृतरुपी प्रवाहाने आजही भुल पडलेला एखादा राजहंस
पहायचंय एखाद्या डोहात शिल्लक असलेलं तुझं स्फटीकरुपी अस्तित्व
भरून घ्यायचाय पाण्याबरोबर वाहणारा तुझा अवीट गंध
ऐकायचा आहे वाळूच्या कणात साठलेला, समोरच्या भग्न राऊळातील घंटानाद
आणि अनुभवाचायं जनीच्या गोवर्यांगत, तुझ्या थेंबाथेंबातून मुरलेला, तो पहाटेचा वेदघोष
ऐकवशील ना......
-मुक्त कलंदर (प्रदिप काळे )
__________________________________________________________
माझा ब्लॉग : मुक्त कलंदर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ari Ari Ari... :- Bombay Rockers