Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पिंजऱ्यातली अंबा

ज
ज्योति अळवणी
Fri, 05/08/2020 - 19:33
💬 7 प्रतिसाद
महाभारतातली अंबा! श्रीखंडीच्या शरीरातील स्त्रीमन अंबा! माझ्या कल्पनेतील तिच्या मनाची ही कथा. पिंजऱ्यातली अंबा हो! मी अडकले आहे या पिंजऱ्यात. तुम्हाला नाही कळणार ते... कारण तुम्हाला अंबा म्हणजे पितामह भीष्मांच्या मृत्यूचे कारण होणारी स्त्री! इतकेच माहीत आहे. अर्थात त्या अनुषंगाने माझ्याबद्दल महाभारतात जे सांगितलं आहे; ते देखील माहीत असेलच. मी काशी राजाची ज्येष्ठ मुलगी. माझ्या दोन भगिनी अंबिका आणि अंबालिका. ज्यांनी काहीही न बोलता हस्तिनापूरचे महाराज विचित्रविर्य यांच्याशी विवाह केला. आम्हाला जिंकून आणलं होतं हस्तिनापुराचे रक्षणकर्ते पितामह भीष्मांनी... मात्र विवाह झाला महाराज विचित्रविर्यांशी. मी नाकारला हा प्रस्ताव. कारण मी आणि शाल्व नरेश विवाह करणार होतो. प्रेम होतं आमचं एकमेकांवर. मी हे सांगताच माझी आदरपूर्वक पाठवणी देखील केली महाराज विचित्रविर्यांनी. पण शाल्व नरेशने नकार दिला मला; 'भीष्मांनी तुला जिंकून नेलं आहे. आता मी तुझा स्वीकार करणे म्हणजे भीक स्वीकारण्या प्रमाणे आहे. ते मला कदापि मान्य नाही.' अस म्हणाला तो. त्यावेळी 'आता कुठे जाऊ? या त्रिकाल खंडात कोण आहे माझं?' असा प्रश्न मला पडला. त्यावर 'जा भीष्मांकडे आणि त्यांनाच तुझा स्वीकार करण्यास सांग'; असे शाल्व नरेश म्हणाले आणि मला ते शब्दशः पटले. मी तशीच मागे फिरले आणि सरळ भीष्मांसमोर जाऊन उभी राहिले आणि म्हणाले 'शाल्व नरेशाने माझ्याशी विवाह करणे नाकारले कारण तुम्ही माझे विवाह मंडपातून अपहरण केलेत. त्यामुळे आता माझ्याशी विवाह करणे ही तुमची जवाबदारी ठरते.' मात्र 'मी कायम अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली आहे;' असे म्हणून त्यांनी माझ्याशी विवाह करण्यास नकार दिला. विवाह वेदीपासून सतत होत असणाऱ्या या अपमानांनी मी वेडीपिशी झाले. माझ्या या अपमानांचे कारण केवळ आणि केवळ भीष्म होते.... आणि म्हणूनच मी देखील तिथेच भर सभेत एक प्रतिज्ञा केली.... 'मी भीष्मांच्या मृत्यूचे कारण बानेन'; आणि तात्काळ तेथून निघाले. अगोदर मी परशुरामांकडे गेले आणि माझ्या अपमानाची काहाणी त्यांना सांगितली. त्यांनी मला वचन दिले की ते मला न्याय देतील. भीष्म परशुरामांचे शिष्य होते; त्यामुळे परशुरामांनी बोलावून घेताच ते ताबडतोप तेथे आले. मात्र माझ्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला. गुरू असूनही भीष्मांनी आपली आज्ञा अमान्य केलेली ऐकून परशुरामांनी त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. दोघांचे तेवीस दिवस घनगोर युद्ध झाले; परंतु निर्णय होत नव्हता. शेवटी ते युद्ध थांबले. मला इथे न्याय मिळणार नाही; हे लक्षात येऊन मी तेथून देखील निघाले. मी घोर अरण्यात प्रवेश केला आणि श्री शंकर भगवनांना मनात ठेऊन तप केले; असा किती काळ लोटला माहीत नाही पण माझ्या हट्टाला यश आले आणि श्री शंकर भगवान माझ्यासमोर अवतीर्ण झाले. माझ्या मनातील भीष्मांबद्दलचा राग अजूनही तेवढाच उग्र होता. त्यामुळे मी श्री शंकर भागवानांकडे एकच मागणी केली;'भीष्मांच्या मृत्यूचे कारण मला व्हायचे आहे.' ते 'तथास्तु' म्हणून अंतर्धान पावले..... आणि माझा पुनर्जन्म झाला; द्रुपद देशाचे नरेश द्रुपदराज यांच्या कांपिल्य नगरीमध्ये. मला मिळालेल्या वरामुळे मी माझा मागील जन्म विसरले नव्हते. मात्र एका मुलीच्या जन्मामुळे महाराज द्रुपद मात्र दुःखी झाले होते; कारण त्यांना देखील कौरव-पांडवांचे गुरू द्रोण यांनी त्यांच्या केलेल्या अपमानचा बदला घेण्यासाठी पुत्र हवा होता. त्यामुळेच की काय त्यांनी मला एका मुलाप्रमाणे वाढवण्यास सुरवात केली. शस्त्र-शास्त्र विद्या, घोडेस्वारी, पिसाळलेल्या हत्तीला काबूत आणणे.... एका राजकुमाराप्रमाणे माझे शिक्षण चालू होते. मी वयात आले होते... मात्र नगरवासीयांसाठी मी राजकुमार होते आणि म्हणूनच आता माझा विवाह होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे माझा विवाह दशार्णराज हिरण्यवर्मा यांच्या कन्येशी झाला. मात्र विवाहाच्या पहिल्याच रात्री माझ्या पत्नीस सत्य समजले आणि ती परत तिच्या पित्याकडे निघून गेली. आता हिरण्यवर्मा आक्रमण करणार याची मला कल्पना आली. माझ्या स्त्री असण्यामुळे माझ्या पित्याला मान खाली घालण्याची नामुष्की सहन करावी लागेल या विचाराने मी त्यारात्रीच कांपिल्य नगरी सोडून वनात निघून गेले. मात्र तेथे माझी भेट स्थुणाकर्ण यक्षाशी झाली. माझी कथा ऐकून त्याने एका रात्रीपुरते त्याचे पौरुष्य मला बहाल केले आणि मी कांपिल्य नगरीत परतले. मला पुरुष रुपात पाहून महाराज द्रुपद आणि दशार्णराज हिरण्यवर्मा समाधान पावले आणि येणारे अरिष्ट टळले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी एका दिवसासाठी मिळालेले पौरुष्य परत करण्यास परत एकदा यक्ष स्थुणाकर्णला भेटण्यास गेले. तेथे यक्ष स्थुणाकर्ण दुःखी कष्टी होऊन बसला होता. मी कारण विचारले असता तो म्हणाला मी निघाले आणि त्याच्या वनात यक्षराज कुबेर आले होते. यक्षराजांना न विचारता स्थुणाकर्णने पौरुष्य दानाचा घेतलेला निर्णय यक्षराजांना आवडला नव्हता आणि त्यांनी त्याला शाप दिला की 'आता श्रीखंडी मरेपर्यंत तुला स्त्रीरूपातच राहावे लागेल;' खरं तर मला मदत करायला गेलेल्या स्थुणाकर्ण यक्षाला शाप मिळाला हे ऐकून मला वाईट वाटले; पण क्षणभरच! याचा अर्थ आता मी माझ्या मृत्यूपर्यंत हे पुरुषाचे शरीर घेऊन वावरणार होते; याचा मला मनात कुठेतरी आनंद झाला होता. अर्थात हा आनंद पुढे जाऊन किती दुःख देणार होता याची मला त्याक्षणी कल्पना नव्हती. पुढे माझ्या पित्याने महाराज द्रुपदनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला आणि या यज्ञातून माझी शामवर्णी कोमलांगी अत्यंत सुंदर आणि त्याहूनही जास्त हुशार अशी भगिनी द्रौपदी आणि माझा शूर आणि सर्व शस्त्र-शास्त्र पारांगत भाऊ दृष्टदृमन्य प्रगटले. हळूहळू सभोवतालची परिस्थिती बदलत गेली. कौरव-पांडवांमधील वाद वाढत होता. कौरवांनी पांडवांना जाळून मारल्याची खबर पसरली; काही दिवसात माझ्या भगिनीच्या विवाहाची तयारी आम्ही सुरू केली. विवाहदिनी एका ब्राम्हण कुमाराने तिला जिंकले... त्यावेळी मी तिथेच होते. माझे रूप पुरुषाचे असले तरी मी मनाने स्त्रीच होते न! माझ्या भगिनीच्या विवाहासाठी ठरवलेला पण सोपा नव्हता. तो जिंकण्यासाठी ज्यावेळी तो ब्राम्हणकुमार उभा राहिला त्याचवेळी माझ्या स्त्री नजरेने त्याला ओळखले होते. अत्यंत सुदृढ आणि बलदंड पिळदार बाहू, उत्तरियामध्ये लपवायचा प्रयत्न केला तरी लक्षात येणाऱ्या युद्धभूमीवर झालेल्या जखमांच्या खुणा... ते कणखर पौरुष्य.... मी भान हरपून अनामिष नेत्रांनी न्याहाळत होते त्याला. 'कोणत्याही स्त्रीला हवासा वाटशील असा आहेस तू;' माझ्या स्त्रीमनाने त्याला साद घालून म्हंटले..... आणि... आणि त्याक्षणी मला सत्याची जाणीव झाली. मी एक पुरुष होते आणि दुसऱ्या एका पुरुषाला असे आसक्तीपूर्ण नेत्रांनी पाहाणे योग्य नव्हते. मी कष्टाने माझी नजर त्याच्यावरून बाजूला वळवली आणि त्या काही क्षणात त्याने पण जिंकला. माझ्या भगिनीने त्याला वरले आणि पुढे माझ्या स्त्री मनाने मला जे सांगितले तेच खरे ठरले. तो ब्राम्हणकुमार अर्जुन होता. माझ्या भगिनीला पांडवांच्या मातेच्या आज्ञेवरून पाचही भावांना वरावे लागले. पुढे कधीतरी श्रीकृष्णाशी मी सहज बोलत होते त्यावेळी त्याने सांगितले की यज्ञासेनी सुरवातीस पाचही जणांना वरण्यास तयार नव्हती.... आणि एका क्षणासाठी मला तिचा हेवा वाटून गेला..... हो! मला.... हेवा वाटला.... कारण इतरांसाठी हा श्रीखंडी पुरुष असला तरी त्याचं मन तर एका स्त्रीचं आहे न.... माझं... या अंबेचं! द्रौपदी विवाहानंतर पांडव परत हस्तिनापुराला परतले होते आणि त्यांचा हक्क असूनही महाराज धृतराष्ट्रांनी त्यांना खांडववन हा घोर अरण्याचा भाग देऊन त्यांच्यावर अन्याय केला. तरीही ते शूरवीर पुरुष मागे हटले नाहीत. त्यांनी तेथेच इंद्रप्रस्थ उभे केले. मयसभा तर शब्दातीत होती. यज्ञ संपन्न होताना पांडवांनी सर्वांनाच आमंत्रण केले; तसे ते कौरावांना देखील केले. कौरवांसोबत आलेले इतर रथी, महारथी, योध्ये, वीर सर्वच मयसभा पाहण्यासाठी आले होते. दुर्योधनासोबत अंगराज कर्ण होता. मी काही अतिथींना मयसभेतील खास रचना सांगत त्यांच्या सोबत फिरत होते. समोरूनच दुर्योधन आणि अंगराज येत होते. कर्णाचे ते दमदार पावले टाकीत चालणे, त्याची ती लखाखती अंगभूत कुंडले, सोनपिवळी तकाकणारी कवचधारी कांती, त्याचे ते पौरुष्यपूर्ण शरीर.... खरं सांगू? अंगराज कर्णाला पाहून मी सोबतच्या अतिथींना विसरून गेले. मोहून गेले माझे स्त्रीमन त्याच्यावर. माझ्या नजरेत झालेला बदल कोणाच्याही लक्षात येण्याअगोदर मी तिथून निघून गेले. नंतर माझ्या कानावर तेथे घडलेला प्रसंग आला; परंतु त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येण्याइतकी मी भानावर आलेच नव्हते. दिवस जात होते..... माझ्या भगिनीचा हस्तिनापूरच्या सभेत झालेला दुर्दम्य अपमान... त्यानंतर वीर भीमाने केलेल्या प्रतिज्ञा, पांडवांचे आणि माझ्या सुकुमार भगिनीचे बारा वर्षांचे वनातील गमन त्यापुढील एक वर्षाचा अज्ञातवास... सर्व वार्ता कानी येत होत्या. अज्ञातवास संपला आणि पांडव माझ्या बहिणी सोबत कांपिल्य नगरीमध्ये आले. श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने शिष्ठाई करण्यासाठी हस्तिनापुराला गेला. ते दिवस फारच तणावपूर्ण होते. द्रौपदी कायम अस्वस्थ असायची. एकदिवस मी आणि द्रौपदी संध्यासमयी सौंधावर उभे होतो. ती मला अज्ञातवासातील घडामोडी सांगत होती. बल्लवाचार्य झालेल्या भीमाने द्रौपदीसाठी किचकाचा वध केला. त्याप्रसंगाचे वर्णन पांचाली मनापासून करत होती. तिने पिळदार शरीराच्या त्या अफाट शक्तीधारी भिमाबद्दल सांगण्यास सुरवात केली आणि.... आणि पुरुषरुपधारी या श्रीखंडीला त्याच्या भगिनीचा क्षणभरासाठी हेवा वाटला.... हो! या पुरुषाला.... कारण मन तर माझे होते न एका स्त्रीचेच!!! दिवस जात होते.... अज्ञातवासानंतर देखील पांडवांचा हक्क देण्यास दुर्योधनाने नकार दिला आणि मी हस्तिनापुरीतील राजसभेमध्ये झालेल्या अपमानापासून आजवर ज्यासाठी थांबले होते तो अपमान धुवून काढण्यासाठी जे आवश्यक होते ते कौरव-पांडवांमधील युद्ध ठरले. मी अत्यंत आनंदी झाले होते. युद्ध सुरू झाले. एक एक दिवस जात होता... माझी उत्कंठा शिगेस पोहोचली होती. श्रीखंडीचा जन्मच मुळी अंबेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला होता. हे सत्य जसे पितामह भीष्मांना माहीत होते तसेच ते सर्वज्ञानी श्रीकृष्णाला देखील माहीत होते. त्यामुळे मी केवळ वाट पाहात होते... आणि तो दिवस उगवला. आज माझ्या शिबिरामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन आले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत... मात्र अर्जुनाने श्रीखंडीच्या वीरतेचे खूपच गुणगान केले. मी शांत चेहेऱ्याने सर्व ऐकून घेत होते... माझे कौतुक ऐकण्यात मला जराही रस नव्हता. काही वेळ गेल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला नेत्रपल्लवी करून खुणावले आणि तो वीर आजानुबाहु मदन माझ्या दिशेने आला आणि माझ्या मंचकावर माझ्या शेजारी बसला. प्रसंग कोणता आहे हे समजत असूनही माझे स्त्री मन त्या मोहक पुरुष सोबतीने हलले. डोळे समोरील अंधारामध्ये स्थिर ठेवत मी चेहेरा गंभीर केला. अर्जुनाने मला काहीसे आर्जवी स्वरात विचारले;"श्रीखंडी, बंधू मी आपले मागील जन्माचे रहस्य समजून चुकलो आहे आणि म्हणूनच आपणास एक विनंती करण्यास आलो आहे. पितामह भीष्मांना पराजित करणारा वीर या पृथ्वीतलावर नाही; आणि जोपर्यंत ते परास्त होत नाहीत तोपर्यंत पांडवांचा विजय शक्य नाही. आपण या जन्मी एक शूरवीर म्हणून प्रसिद्ध पावले आहात... आणि तरीही मी आपणास विनंती करीत आहे की उद्या युद्धाच्या दशम दिनी आपण माझ्या रथावरून माझ्या सोबत युद्धभूमीवर याल का?" अखेर... तो दिन आला होता.... अंबेचा अपमान धुवून काढण्याचा तो सुदिन!!! मी अर्जुनाचा प्रस्ताव स्वीकारला आणि महाभारताच्या दशम दिनी अर्जुनाच्या रथावरील श्रीखंडीला पाहून पितामहांनी आपले धनुष्य खाली केले... ते स्त्रीवर शरसंधान करणार नव्हते... आणि श्रीखंडीच्या मनाचा थांग भीष्मांइतका कोणाला लागला असता? भीष्म शरपंजरी पडले आणि एका अपूर्व समाधानाने माझे मन भरून आले..... माझ्या जन्माची इतिकर्तव्यता झाली होती. मन शांत झाले होते. अंबा आता समाधानी होती..... आणि म्हणूनच श्रीखंडीच्या शरीरातील माझे मन माझ्याशी बोलू लागले आहे.... हो! अडकले आहे मी या पिंजऱ्यात. या श्रीखंडी नामक पुरुषाच्या शरीररूपी पिंजऱ्यात! युद्ध अजूनही सुरू आहे; पुरुषरूपी श्रीखंडी वीरतेचे दर्शन देत युद्ध करतो आहे. मात्र त्याच्या शरीरातील स्त्रीमन धारण करणारी ही अंबा आता सुटकेचा मार्ग शोधते आहे. एका उद्दिष्टाने जन्म घेतलेली मी... पुरुष शरीरातील स्त्री... बाह्य रूप जे दिसते तेच जनमानसात स्वीकारले जाते... आणि म्हणूनच पुरुष शरीरात अडकलेली मी एक स्त्री आहे हे आत्ता तरी कोणाच्याही लक्षात येत नाही आहे. उद्धिष्ट पूर्ण झाले आहे आणि आता हे शरीर माझ्यासाठी पिंजरा आहे माझ्यासाठी!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2706 views

💬 प्रतिसाद (7)
P
Prajakta२१ Fri, 05/08/2020 - 19:59 नवीन
यक्षाची माहिती नव्यानेच कळली धन्यवाद ह्यावर एपिक चॅनेल वरील 'धर्मक्षेत्र 'सिरीयल मध्ये पण चांगले दाखवलेय चित्रगुप्ताच्या दरबारात सगळी महाभारतातील पात्रे आणि त्यांचा न्यायनिवाडा ( ज्यांच्यावर अन्याय केला त्यांच्याकडून आरोप ,त्याचे खंडन इ.शेवटी चित्रगुप्ताचे फायनल verdict )अशी थिम आहे सिरिअलची त्यात भीष्मांच्या न्यायनिवाड्या च्या वेळेस अंबेला बोलावण्यात येते आणि तिचे आरोप ते मान्य करतात त्या एपिसोड च्या शेवटी अंबा त्यांना वचन नसते तर विवाह केला असता का असे विचारते आणि भीष्म ह्यावर हो म्हणतात असा शेवट केला होता
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 05/09/2020 - 08:27 नवीन
छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/09/2020 - 09:09 नवीन
इतक्या भन्नाट आयडिया त्या वेळी लोकांना कशा सुचल्या असतील याचं कुतूहल वाटतं !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/09/2020 - 19:22 नवीन
अद्भूत आहे महाभारत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/09/2020 - 19:21 नवीन
खूपच सुरेख लिहिलंय. अप्रतिम. एकच दुरुस्ती- श्रीखंडी असे नाव नसून शिखंडी हेच नाव आहे. बाकी अंबेची ह्या पिंजऱ्यातून केवळ आठच दिवसात मुक्तता झाली. १८ व्या दिवसानंतर अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा ह्यांनी मिळून केलेल्या रात्रीच्या नरसंहारात शिखंडी मारला गेला.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 05/09/2020 - 21:20 नवीन
शीखंडीचा शेवट कसा झाला माहित नव्हतं. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 05/10/2020 - 05:42 नवीन
श्रीखंडी नाही शिखंडी! अगदी बरोबर. मला लक्षातच आली नाही ही चूक. त्याबद्दल क्षमस्व! आणि शिखंडी शेवटच्या दिवशी मारला गेला हे देखील खरे! धन्यवाद प्रचेतसजी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा