भाग ५ - हजारोंच्या सेनेचे संचलन कसे कसे जात असे? मराठ्यांच्या लढायांचा इतिहास...
भाग ५ - हजारोंच्या सेनेचे संचलन कसे कसे जात असे?
कै. शि. म. परांजपेंच्या लेखणीतून हे वर्णन पान २४५ वर आले आहे...
त्यावेळच्या शिंद्याच्या अशा प्रकारच्या एका छावणीचे एक चित्र पुढे दिले आहे,
त्यावरून वाचकांना त्या वेळच्या लष्करी परिस्थितीची काही अंशी कल्पना येण्यासारखी आहे, व अशाच प्रकारची बहुतेक व्यवस्था इंग्रजांच्या हाताखालील लष्करामध्ये असे.
(या चित्रातील मला समजलेल्या, भावलेल्या बाबी:- )
१. वेळ साधारण सायं ४ नंतर. ९ तंबूंची रांग. मराठा सरदारांच्या सैन्याचे केशरी ध्वज फडफडत आहेत.
२. ५ स्त्रिया ९वारी लुगड्यात. एक बाई पाण्याचे दोन घडे डोईवरून नेत आहे.
३. कोणत्याही पुरुषांचे डोके बोडके नाही.
४. मधोमध बसायची जागा, दोन सुखवस्तू जोड्या
५. एका बाजूला तंबूतील दुकाने थाटून विक्रेते...
६. दुसऱ्याबाजूला घोडदळाच्या रस्त्याची बाजू.
७. पांढऱ्या कपड्यातील पुरुषांच्या हातात शस्त्रे नाहीत. एक वृद्ध भिकारी
८. एक पालखीतून जात आहे. त्याने आपला नोकराला पाठवून तंबूतील विक्रेत्याकडून सामान मागवले आहे.
९. एक छप्परबंद कारागीर छपराची दुरुस्ती करताना
१०. बैलावरून सामानाची वाहतूक
......
जेव्हा एखादे मोठे सैन्य अशा रीतीने कूच करण्याकरिता निघते, तेव्हा या सैन्याचे दोन विभाग करून-त्या दोन विभागांना जरी अखेरीस एकाच उद्दिष्ट ठिकाणावर एकत्र जमवायचे असते, तरी तेथपर्यंत मध्यंतरीच्या अवकाशात त्याना दोन निरनिराळ्या रस्त्यांनी बहधा पाठविण्यात येत असते, हा लष्करी हालचालीचा एक ठराविक प्रघातच पडून गेलेला आहे. व याचे कारणही उघडच आहे. ज्यात हजारो लोक एकत्र झालेले आहेत, असे एखादे मोठे सैन्य सगळेच जर एकाच वाटेने जाऊ लागेल, तर इतक्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना अन्नपाणी व दाणावैरण मिळण्याचीही पंचाईत पडते. व इतके लोक ज्या प्रांतातून कूच करीत असतात, त्या प्रांतात ते असा मोठा दुष्काळ उत्पन्न करतात की, त्या आपण उत्पन्न केलेल्या दुष्काळामध्येच त्यांना मरणाची पाळी येते. शिवाय, एकाच रस्त्याने इतके मोठे सैन्य चालून झाले, तर सैन्याची रांग अनेक कोसच्या कोस लांब वाढते व त्यामुळे सैन्याला जलदी कूच करता येत नाही व अशा स्थितीत सैन्याच्या ज्या हालचाली जलदीने व्हावयाला पाहिजे असतात, त्या होऊ शकत नाहीत. आणि सैन्याची अशी लांबच लांब रांग चाललेली असता शत्रूने जर त्या रांगेला मध्येच गाठले, तर मात्र मग त्या रांगेतील सैन्याची दुर्दशा विचारायलाच नको. त्या रांगेच्या तोंडाशी पायदळ असले आणि त्या पायदळाची व शत्रूची लढाई जुंपली, तर त्या पायदळाचे घोडेस्वार आणि तोफखाना ही मागे राहिल्यामुळे त्यांचा काही उपयोग होत नाही. व एक एक विभागावर जय मिळवीत मिळवीत शत्रूला सगळे सैन्य सहज जिंकता येते. परंतु हेच त्या सैन्याचे दोन विभाग करण्यात येऊन ती दोन्ही सैन्ये निरनिराळी कूच करीत असली, तर निरनिराळ्या प्रांतातून त्यांना अन्नपाण्याचा मुबलक पुरवठा होऊ शकतो, त्यांना कूच करण्याला ऐसपैस अवकाश मिळतो आणि त्यातील एका विभागावर शत्रूने हल्ला केला असता दुसऱ्या विभागातील सैन्य त्या शत्रूवर दुसरीकडून येऊन हल्ला करू शकते, असे या विभागणीच्या तत्त्वामध्ये अनेक फायदे आहेत.
हल्ली रेल्वे आणि तारायंत्रे ही नवीन उपयुक्त साधने उपलब्ध झाल्यामुळे अलिकडच्या सैन्याच्या हालचालीचे शास्त्र फारच प्रगतीला जाऊन पोहोचलेले आहे. परंतु शंभर-सव्वाशे वर्षांच्या पूर्वी तशी स्थिती नव्हती. आगगाड्याच्या असावी त्या वेळची सैन्ये पायांनीच कूच करीत असत. आणि तारायत्राच्या अभावी हर, बातमीदार, हरकरे, वगैरेच्या साधनांची सैन्यांच्या हालचालीच्या बातम्या एकमेकांना कळविण्यात येत असत, हल्लीची सुधारलेली साधने पूर्वी जरी नव्हती, तरी त्या प्रकारची शिस्त ठेवण्यात तरी त्या वेळच्या मानाने त्या सैन्यांमधून पुष्कळ शिस्त ठेवण्यात येत असे. एखादे सैन्य कूच करून जावयाचे असले, त्यावेळची पध्दत अशी होती की, सैन्याच्या तळावर पहाटेच्या वेळी किंवा उंटावररून कूच करण्याची नौबद वाजविण्यात येत असे. ती बरोबर बिनीवरचे लोक पुढे जाण्याकरिता निघत असत. त्यांनी पुढे आपल्या लष्कराला पाण्याची आणि सावलीची वगैरे कोठे सोय होईल, पाहन त्याप्रमाणे त्यांच्याकडून मुक्कामाची जागा ठरविण्यात येत असे. नंतर साधारण दिसू लागले, म्हणजे सैन्याच्या तळावर दुसरी नौबद वाजून सर्व लष्कर आपापल्या सामानसुमानासुध्दा कूच करण्याला सुरुवात करीत असे. हे लष्कर आपल्या नवीन मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचले, म्हणजे कोणत्या पथकाने कोणत्या ठिकाणी उतरावे, याच्या जागा बिनीवाल्यांनी आधीच ठरवून ठेविलेल्या असत. व त्याप्रमाणे ज्यांची निशाणे जेथे उभारलेली असतील, त्या ठिकाणी ती पथके जाऊन मोठ्या व्यवस्थेने आपल्या डेरेराहुट्या देत असत.
अशा प्रकारच्या या सैन्यातून खुद्द लढणारे म्हणून जितके शिपाई किंवा घोडेस्वार असत, त्यांच्या मानाने बिनलढवय्ये अशा लोकांचीही संख्या त्यांच्या सभोवती पुष्कळ जमा झालेली असे. घोडे, उंट, हत्ती, या जनावरांची निगा राखून त्यांना संभाळणारे नोकर, तंबू, डेरे, राहुट्या ठोकणारे लोक, मेणेवाले आणि डोलीवाले भोई, तोफांच्या गाड्या ओढणाऱ्या बैलांची निगा राखणारे नोकर, असे कितीतरी अवांतर लोक सैन्यामध्ये जरूर लागत असत. शिवाय इतक्या मोठ्या सैन्याला लागणारी अन्नसामग्री वाहून नेणाऱ्या वंजारी लोकांच्या हजारो तांडेच्या तांडे ते निरनिराळेच. आणि याशिवाय या लष्कराच्या बरोबर जो एक फिरता बाजार चालत असे, त्यातील माणसांची संख्या तर याहून निराळीच असे. हे जे फिरते बाजार या लष्करांच्या बरोबर फिरत असत, त्यांचा तळी सैन्याच्या तळाच्या जवळच कोठे तरी आसपास पडत असे. या लष्करी बाजारात केवळ जरूरीचे तेवढेच शिधा सामग्रीचे जिन्नस मिळत असत असे नसून मोठमोठ्या स्थानिक शहरांतन मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या चीजवस्तू या बाजारातूनही विकल्या जात असत. अशी या बाजाराची आणि एकंदर छावणीची व्यवस्था फार उत्तम प्रकारची असे. त्यावेळच्या शिंद्याच्या अशा प्रकारच्या एका छावणीचे एक चित्र जे वर दिले आहे,
त्यावरून वाचकांना त्या वेळच्या लष्करी परिस्थितीची काही अंशी कल्पना येण्यासारखी आहे, व अशाच प्रकारची बहुतेक व्यवस्था इंग्रजांच्या हाताखालील लष्करामध्ये असे. त्यांचे लष्कर जेव्हा एखाद्या छावणी देऊन उतरत असे, तेव्हा एका बाजूला पायदळाचा तळ असे आणि दुसऱ्या बाजूला घोडेस्वारांच्या पागा असत. आणि या दोहोंच्या पोटात तोफखाना सामानसुमानाच्या गाड्या वगैरे असत. त्यांच्या छावणीत जो बाजार असे. त्यामध्येही सर्व जिन्नसा मिळत असून सर्व प्रकारचे लोक त्यात सामील झालेले असत. यात उपयोगाच्या आणि चैनीच्या अशा सर्व वस्तूंची दुकाने असत. तेथील सराफांच्या दुकानातून चांदवडी, बाबाशाही, शिवराई, वगैरे सर्व प्रकारची नाणी वटवली जात असून सर्व ठिकाणच्या हुंड्या देण्यात आणि घेण्यात येत असत. सोने, चांदी , हिरे, मोती वगैरेचे दुकानदारही या छावण्यातून असत. आणि सामान्य वस्त्रांची तर गोष्ट राहोच, पण ढाक्याची मलमल आणि काश्मीरच्या शाली, गजनी, मश्रू, मखमल वगैरेसारखे उंची कापडही येथे मिळू शकत असे. कदाचित् एखाद्या शत्रूचा अकस्मात् छापा येऊन आणि एखादी मोठी लढाई जुंपून ज्या लष्करातील हजारो लोक दुर्दैवाच्या अवकृपेने मारले जाण्याचा प्रतिक्षणी संभव आहे, अशा लष्करातील या बाजारामध्ये शिंपी उंची कपडे शिवीत आहेत आणि सोनार सोन्यामोत्यांचे दागिने घडवीत आहेत हे पाहून दुःखात सुख मानून घेण्याची जी ही मानवी प्रवृत्ती, तिच्याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटल्या वाचून राहाणार नाही ! उद्या हे कपडे आणि हे दागिने शत्रूच्या लुटीत लुटले जाणार नाहीत कशावरून आणि ते लुटले गेले नाहीत तरी ते कपडे आणि ते दागिने अंगावर घालण्याला उद्या कोणी जिवंत राहाणार आहे, याबद्दल काडीचीही शाश्वती नसताना शिंपी कापडाला टाके घालीतच आहे आणि सोनार सोने ठोकीतच आहे, हे पाहून मनुष्याच्या या अव्याहत व्यवहाराबद्दल आश्चर्यही वाटते आणि उद्वेगही वाटतो!
पूर्वीच्या काळच्या या लष्करी छावण्यातून दुसरेही अनेक प्रकार दृष्टोत्पत्तीस तात. हल्लीच्या किंवा त्या वेळच्या दिल्ली, आग्रा, काशी, कलकत्ता, ग्वालेर, इंदूर हैदराबाद वगैरे शहरांच्या मोठमोठाल्या बाजारातील रस्त्यात दिसत. त्या सगळ्या या लष्करी बाजारातूनही दृष्टोत्पत्तीस येत असत त्रागा करून पैसा मिळविणारे फकीर आणि बैरागी हे तेथे असत. दुपारची पोटाची भ्रांत असतानाही आपल्या पोतडीतून वाटतील तितके रुपये काढणारे आणि टोपल्यातून वाटतील तितके साप काढणारे गारुडी आपली पुंगी वाजवीत तेथील रस्त्यातून फिरत असत, जादुटोणा करणारे तांत्रिक आणि औषधे देणारे वैदू तेथे होते, त्याचप्रमाणे उंच काठीच्या टोकावर चढून तेथून कोलाट्या मारणारे कोल्हाटी दिवसा रस्त्यातून आपले ढोलके बडवीत जात असत आणि रात्री त्यांच्याच पैकी ज्या कोल्हाटणी असत, त्यांचे डफतुणतुण्यावरील तमाशेही ठिकठिकाणी चालत असत. व या व्यसनाला जास्त रंग आणून देण्याकरिता तेथे आसपास कलालांची दुकानेही नसत असे नाही. शिवाजीमहाराजांच्या वेळेला सैन्याच्या छावणीतील शिस्त फार कडक असे अशी वर्णने आढळतात. लष्करामध्ये बटीक किंवा कलावंतीण कोणाच्याही बरोबर असू नये, अशी सक्त ताकीद असे. पण तो धर्मभीरुपणा पुढे इंग्लिशांच्या छावण्यांमधून मुळीच टिकविण्यात आला नाही. आणि आपल्या शिपायाचे नैतिक वर्तन चांगले असावे, अशी चाड इंग्लिशांनी बाळगण्याचे तरी काय कारण होते ? या हिंदी शिपायांनी आपल्या हिंदी देशबांधवांवर बरोबर गोळीबार केला म्हणजे झाले; मग छावणीत गेल्यावर ते शिपायी वाटेल ते बदमाशपणाच काम करीनात ! अशी त्या वेळची परिस्थिती होती…
पुढे चालू. ....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jatt Ludhiyane Da... :- Student Of The Year 2