Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाग ५ - हजारोंच्या सेनेचे संचलन कसे कसे जात असे? मराठ्यांच्या लढायांचा इतिहास...

श
शशिकांत ओक
Tue, 04/14/2020 - 20:05
🗣 23 प्रतिसाद
1 1

भाग ५ - हजारोंच्या सेनेचे संचलन कसे कसे जात असे?

1 कै. शि. म. परांजपेंच्या लेखणीतून हे वर्णन पान २४५ वर आले आहे... 1 त्यावेळच्या शिंद्याच्या अशा प्रकारच्या एका छावणीचे एक चित्र पुढे दिले आहे, त्यावरून वाचकांना त्या वेळच्या लष्करी परिस्थितीची काही अंशी कल्पना येण्यासारखी आहे, व अशाच प्रकारची बहुतेक व्यवस्था इंग्रजांच्या हाताखालील लष्करामध्ये असे. 1 (या चित्रातील मला समजलेल्या, भावलेल्या बाबी:- ) १. वेळ साधारण सायं ४ नंतर. ९ तंबूंची रांग. मराठा सरदारांच्या सैन्याचे केशरी ध्वज फडफडत आहेत. २. ५ स्त्रिया ९वारी लुगड्यात. एक बाई पाण्याचे दोन घडे डोईवरून नेत आहे. ३. कोणत्याही पुरुषांचे डोके बोडके नाही. ४. मधोमध बसायची जागा, दोन सुखवस्तू जोड्या ५. एका बाजूला तंबूतील दुकाने थाटून विक्रेते... ६. दुसऱ्याबाजूला घोडदळाच्या रस्त्याची बाजू. ७. पांढऱ्या कपड्यातील पुरुषांच्या हातात शस्त्रे नाहीत. एक वृद्ध भिकारी ८. एक पालखीतून जात आहे. त्याने आपला नोकराला पाठवून तंबूतील विक्रेत्याकडून सामान मागवले आहे. ९. एक छप्परबंद कारागीर छपराची दुरुस्ती करताना १०. बैलावरून सामानाची वाहतूक ...... जेव्हा एखादे मोठे सैन्य अशा रीतीने कूच करण्याकरिता निघते, तेव्हा या सैन्याचे दोन विभाग करून-त्या दोन विभागांना जरी अखेरीस एकाच उद्दिष्ट ठिकाणावर एकत्र जमवायचे असते, तरी तेथपर्यंत मध्यंतरीच्या अवकाशात त्याना दोन निरनिराळ्या रस्त्यांनी बहधा पाठविण्यात येत असते, हा लष्करी हालचालीचा एक ठराविक प्रघातच पडून गेलेला आहे. व याचे कारणही उघडच आहे. ज्यात हजारो लोक एकत्र झालेले आहेत, असे एखादे मोठे सैन्य सगळेच जर एकाच वाटेने जाऊ लागेल, तर इतक्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना अन्नपाणी व दाणावैरण मिळण्याचीही पंचाईत पडते. व इतके लोक ज्या प्रांतातून कूच करीत असतात, त्या प्रांतात ते असा मोठा दुष्काळ उत्पन्न करतात की, त्या आपण उत्पन्न केलेल्या दुष्काळामध्येच त्यांना मरणाची पाळी येते. शिवाय, एकाच रस्त्याने इतके मोठे सैन्य चालून झाले, तर सैन्याची रांग अनेक कोसच्या कोस लांब वाढते व त्यामुळे सैन्याला जलदी कूच करता येत नाही व अशा स्थितीत सैन्याच्या ज्या हालचाली जलदीने व्हावयाला पाहिजे असतात, त्या होऊ शकत नाहीत. आणि सैन्याची अशी लांबच लांब रांग चाललेली असता शत्रूने जर त्या रांगेला मध्येच गाठले, तर मात्र मग त्या रांगेतील सैन्याची दुर्दशा विचारायलाच नको. त्या रांगेच्या तोंडाशी पायदळ असले आणि त्या पायदळाची व शत्रूची लढाई जुंपली, तर त्या पायदळाचे घोडेस्वार आणि तोफखाना ही मागे राहिल्यामुळे त्यांचा काही उपयोग होत नाही. व एक एक विभागावर जय मिळवीत मिळवीत शत्रूला सगळे सैन्य सहज जिंकता येते. परंतु हेच त्या सैन्याचे दोन विभाग करण्यात येऊन ती दोन्ही सैन्ये निरनिराळी कूच करीत असली, तर निरनिराळ्या प्रांतातून त्यांना अन्नपाण्याचा मुबलक पुरवठा होऊ शकतो, त्यांना कूच करण्याला ऐसपैस अवकाश मिळतो आणि त्यातील एका विभागावर शत्रूने हल्ला केला असता दुसऱ्या विभागातील सैन्य त्या शत्रूवर दुसरीकडून येऊन हल्ला करू शकते, असे या विभागणीच्या तत्त्वामध्ये अनेक फायदे आहेत. हल्ली रेल्वे आणि तारायंत्रे ही नवीन उपयुक्त साधने उपलब्ध झाल्यामुळे अलिकडच्या सैन्याच्या हालचालीचे शास्त्र फारच प्रगतीला जाऊन पोहोचलेले आहे. परंतु शंभर-सव्वाशे वर्षांच्या पूर्वी तशी स्थिती नव्हती. आगगाड्याच्या असावी त्या वेळची सैन्ये पायांनीच कूच करीत असत. आणि तारायत्राच्या अभावी हर, बातमीदार, हरकरे, वगैरेच्या साधनांची सैन्यांच्या हालचालीच्या बातम्या एकमेकांना कळविण्यात येत असत, हल्लीची सुधारलेली साधने पूर्वी जरी नव्हती, तरी त्या प्रकारची शिस्त ठेवण्यात तरी त्या वेळच्या मानाने त्या सैन्यांमधून पुष्कळ शिस्त ठेवण्यात येत असे. एखादे सैन्य कूच करून जावयाचे असले, त्यावेळची पध्दत अशी होती की, सैन्याच्या तळावर पहाटेच्या वेळी किंवा उंटावररून कूच करण्याची नौबद वाजविण्यात येत असे. ती बरोबर बिनीवरचे लोक पुढे जाण्याकरिता निघत असत. त्यांनी पुढे आपल्या लष्कराला पाण्याची आणि सावलीची वगैरे कोठे सोय होईल, पाहन त्याप्रमाणे त्यांच्याकडून मुक्कामाची जागा ठरविण्यात येत असे. नंतर साधारण दिसू लागले, म्हणजे सैन्याच्या तळावर दुसरी नौबद वाजून सर्व लष्कर आपापल्या सामानसुमानासुध्दा कूच करण्याला सुरुवात करीत असे. हे लष्कर आपल्या नवीन मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचले, म्हणजे कोणत्या पथकाने कोणत्या ठिकाणी उतरावे, याच्या जागा बिनीवाल्यांनी आधीच ठरवून ठेविलेल्या असत. व त्याप्रमाणे ज्यांची निशाणे जेथे उभारलेली असतील, त्या ठिकाणी ती पथके जाऊन मोठ्या व्यवस्थेने आपल्या डेरेराहुट्या देत असत. अशा प्रकारच्या या सैन्यातून खुद्द लढणारे म्हणून जितके शिपाई किंवा घोडेस्वार असत, त्यांच्या मानाने बिनलढवय्ये अशा लोकांचीही संख्या त्यांच्या सभोवती पुष्कळ जमा झालेली असे. घोडे, उंट, हत्ती, या जनावरांची निगा राखून त्यांना संभाळणारे नोकर, तंबू, डेरे, राहुट्या ठोकणारे लोक, मेणेवाले आणि डोलीवाले भोई, तोफांच्या गाड्या ओढणाऱ्या बैलांची निगा राखणारे नोकर, असे कितीतरी अवांतर लोक सैन्यामध्ये जरूर लागत असत. शिवाय इतक्या मोठ्या सैन्याला लागणारी अन्नसामग्री वाहून नेणाऱ्या वंजारी लोकांच्या हजारो तांडेच्या तांडे ते निरनिराळेच. आणि याशिवाय या लष्कराच्या बरोबर जो एक फिरता बाजार चालत असे, त्यातील माणसांची संख्या तर याहून निराळीच असे. हे जे फिरते बाजार या लष्करांच्या बरोबर फिरत असत, त्यांचा तळी सैन्याच्या तळाच्या जवळच कोठे तरी आसपास पडत असे. या लष्करी बाजारात केवळ जरूरीचे तेवढेच शिधा सामग्रीचे जिन्नस मिळत असत असे नसून मोठमोठ्या स्थानिक शहरांतन मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या चीजवस्तू या बाजारातूनही विकल्या जात असत. अशी या बाजाराची आणि एकंदर छावणीची व्यवस्था फार उत्तम प्रकारची असे. त्यावेळच्या शिंद्याच्या अशा प्रकारच्या एका छावणीचे एक चित्र जे वर दिले आहे, त्यावरून वाचकांना त्या वेळच्या लष्करी परिस्थितीची काही अंशी कल्पना येण्यासारखी आहे, व अशाच प्रकारची बहुतेक व्यवस्था इंग्रजांच्या हाताखालील लष्करामध्ये असे. त्यांचे लष्कर जेव्हा एखाद्या छावणी देऊन उतरत असे, तेव्हा एका बाजूला पायदळाचा तळ असे आणि दुसऱ्या बाजूला घोडेस्वारांच्या पागा असत. आणि या दोहोंच्या पोटात तोफखाना सामानसुमानाच्या गाड्या वगैरे असत. त्यांच्या छावणीत जो बाजार असे. त्यामध्येही सर्व जिन्नसा मिळत असून सर्व प्रकारचे लोक त्यात सामील झालेले असत. यात उपयोगाच्या आणि चैनीच्या अशा सर्व वस्तूंची दुकाने असत. तेथील सराफांच्या दुकानातून चांदवडी, बाबाशाही, शिवराई, वगैरे सर्व प्रकारची नाणी वटवली जात असून सर्व ठिकाणच्या हुंड्या देण्यात आणि घेण्यात येत असत. सोने, चांदी , हिरे, मोती वगैरेचे दुकानदारही या छावण्यातून असत. आणि सामान्य वस्त्रांची तर गोष्ट राहोच, पण ढाक्याची मलमल आणि काश्मीरच्या शाली, गजनी, मश्रू, मखमल वगैरेसारखे उंची कापडही येथे मिळू शकत असे. कदाचित् एखाद्या शत्रूचा अकस्मात् छापा येऊन आणि एखादी मोठी लढाई जुंपून ज्या लष्करातील हजारो लोक दुर्दैवाच्या अवकृपेने मारले जाण्याचा प्रतिक्षणी संभव आहे, अशा लष्करातील या बाजारामध्ये शिंपी उंची कपडे शिवीत आहेत आणि सोनार सोन्यामोत्यांचे दागिने घडवीत आहेत हे पाहून दुःखात सुख मानून घेण्याची जी ही मानवी प्रवृत्ती, तिच्याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटल्या वाचून राहाणार नाही ! उद्या हे कपडे आणि हे दागिने शत्रूच्या लुटीत लुटले जाणार नाहीत कशावरून आणि ते लुटले गेले नाहीत तरी ते कपडे आणि ते दागिने अंगावर घालण्याला उद्या कोणी जिवंत राहाणार आहे, याबद्दल काडीचीही शाश्वती नसताना शिंपी कापडाला टाके घालीतच आहे आणि सोनार सोने ठोकीतच आहे, हे पाहून मनुष्याच्या या अव्याहत व्यवहाराबद्दल आश्चर्यही वाटते आणि उद्वेगही वाटतो! पूर्वीच्या काळच्या या लष्करी छावण्यातून दुसरेही अनेक प्रकार दृष्टोत्पत्तीस तात. हल्लीच्या किंवा त्या वेळच्या दिल्ली, आग्रा, काशी, कलकत्ता, ग्वालेर, इंदूर हैदराबाद वगैरे शहरांच्या मोठमोठाल्या बाजारातील रस्त्यात दिसत. त्या सगळ्या या लष्करी बाजारातूनही दृष्टोत्पत्तीस येत असत त्रागा करून पैसा मिळविणारे फकीर आणि बैरागी हे तेथे असत. दुपारची पोटाची भ्रांत असतानाही आपल्या पोतडीतून वाटतील तितके रुपये काढणारे आणि टोपल्यातून वाटतील तितके साप काढणारे गारुडी आपली पुंगी वाजवीत तेथील रस्त्यातून फिरत असत, जादुटोणा करणारे तांत्रिक आणि औषधे देणारे वैदू तेथे होते, त्याचप्रमाणे उंच काठीच्या टोकावर चढून तेथून कोलाट्या मारणारे कोल्हाटी दिवसा रस्त्यातून आपले ढोलके बडवीत जात असत आणि रात्री त्यांच्याच पैकी ज्या कोल्हाटणी असत, त्यांचे डफतुणतुण्यावरील तमाशेही ठिकठिकाणी चालत असत. व या व्यसनाला जास्त रंग आणून देण्याकरिता तेथे आसपास कलालांची दुकानेही नसत असे नाही. शिवाजीमहाराजांच्या वेळेला सैन्याच्या छावणीतील शिस्त फार कडक असे अशी वर्णने आढळतात. लष्करामध्ये बटीक किंवा कलावंतीण कोणाच्याही बरोबर असू नये, अशी सक्त ताकीद असे. पण तो धर्मभीरुपणा पुढे इंग्लिशांच्या छावण्यांमधून मुळीच टिकविण्यात आला नाही. आणि आपल्या शिपायाचे नैतिक वर्तन चांगले असावे, अशी चाड इंग्लिशांनी बाळगण्याचे तरी काय कारण होते ? या हिंदी शिपायांनी आपल्या हिंदी देशबांधवांवर बरोबर गोळीबार केला म्हणजे झाले; मग छावणीत गेल्यावर ते शिपायी वाटेल ते बदमाशपणाच काम करीनात ! अशी त्या वेळची परिस्थिती होती… पुढे चालू. ....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10747 views

🗣 चर्चा (23)
र
रीडर Tue, 04/14/2020 - 23:12 नवीन
छान लेख आणि माहिती. चित्र ही खूप छान.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 04/15/2020 - 00:52 नवीन
मला बरेच दिवसापासून प्रश्न आहे लुटीतला माल सॆनॆक कुठे ठेवत असत ? युद्धावर गेले असता त्यांच्या सामानाची रक्षण कशी होते? सैनिक युद्धात मेल्यावर त्यांचे मालमत्ता मूळ देशी नातेवाईकांना कशी दिली जाते ?
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 04/15/2020 - 04:13 नवीन
मजेदार प्रश्न आहे. एकाच घोड्यावर सतत अनेक दिवस स्वार होणे शक्य नसते, त्यामुळे घोडा फार थकून जातो. या कारणासाठी जवळ सतत २ ते ३ घोडे सैनिकाजवळ असत. जी लूट मिळाली ती पोत्यात भरून या जादा घोड्यावर लादायची. मोठ्या सरदाराकडे अर्थात उंट, हत्ती आणि बैल असत आणि थोडया बैल/घोडा गाड्या असत पण त्या फार थोडया. त्यामुळे लूट अशी हवी की फार अवजड नको. कॅश वॉज किंग. याच कारणासाठी गुलाम, तंबू वगरे लूट बाळगणे कठीण होत असे. त्यामुळं अशी लूट लगेच दुसऱ्या दिवशी मिळेल त्या किमतीत फुंकून टाकून पैसा गाठीला बांधला जाई. सैनिकांचे पगार नेहमी थकलेले असत, २-४ वर्षांची बाकी राहणे असे सगळ्याच सैन्यात (ब्रिटिश सोडून) होई. त्यामुळं पैशाची नेहेमी ओढाताण होई. सैनिकाने सावकाराकडून कर्ज घेतलेले असे, त्याची बाकी शिल्लक असे. बऱ्याचदा पगारावरून दंगे होत. सरदाराला घेराव घालून धरणे दिले जाई. बऱ्याचदा शत्रूचे सैनिक म्हणत, आमचा पगार द्या, आम्ही किल्ला देऊन टाकतो. औरंगझेबाने असे कित्येक किल्ले घेतले आहेत. सैनिकांची मालमत्ता पाहिली तर हसू येईल, एकादी धोतर जोडी, घोडा, मोडकी बंदूक, एक दोन तलवारी, ढाली आणि भाला. सैनिक लढाईत पडला की शत्रूच सगळ्यात आधी जे हाताला येईल ते लांबवत असे, मग वारसांना काय मिळणार. मृत सैनिकांचे वारस छत्रपती अथवा पेशव्यांकडे जात, त्यांना बालपरवेसी असं म्हणतात. त्यांना फार तर एखादा गाव अथवा काही उत्पन्न नेमून दिले जाई अथवा किल्ल्यावर ठेवले जाई. मोगली सैन्यात मृत मनसबदाराची मालमत्ता सर्व सरकारजमा होई. मग त्याचे वारस बादशाहकडे जात. तो मोठ्या दयाळूपणे(!) थोडासा भाग वारसांना नेमून देई. या कारणासाठी मनसबदार एक युक्ती करत. आपल्या मोठ्या सुंदर अश्या बागेतल्या घरात ते नंतर आपली कबर बनवत (garden-tomb) बादशहाला इस्लामी धर्मशास्त्रानुसार कबरीला धक्का लावता येत नसल्याने ती बाग आणि हवेली त्याच्या वारसांना मिळत असे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 04/15/2020 - 05:48 नवीन
मनो म्हणतात त्यात थोडी भर... दिल्लीतील मध्य भागात सरकारी क्वार्टर मिळणे मोठी नशीबाची गोष्ट... एक महाशयांना निवृत्तीनंतर ते सोडायचे जिवावर आले होते. एक दिवशी त्यांचा इंतकाल झाला. जवळच्या नातेवाईकांनी तिथे बापाची एक मजार बनवली! 'इथे मन्नत पूरी होती है' म्हटले जाऊ लागले... दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. शेवटी कसेतरी करून ते क्वार्टर परत मिळवले गेले...
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 04/15/2020 - 21:34 नवीन
जुन्या काळी मैदानी युद्ध महिनाभर चालायचे सैनिक तंबू मध्ये राहायचे तसेच सगळे सैनिक घोडयावर नसतात ,पैदल सैन्य पण खूप असते ते दररोज युद्धावर जाताना मौल्यवान वस्तू कुठे ठेवणार? दररोज बाजारात विकणे पण शक्य नाही आता पानिपत घ्या पुण्यापासून दिल्ली जाणार ,किंवा अब्दालीचे सैन्य अफणीस्तान हुन दिल्ली ,पैसे अडका आणि समझ मौल्यवान वस्तू ज्या भारतातात विकता येणार नाही ,inventory management कसे?
  • Log in or register to post comments
म
मनो गुरुवार, 04/16/2020 - 00:32 नवीन
हस्तरसाहेब, ज्याच्याकडे काही इन्व्हेंटरी असते त्यालाच manage करण्याचा प्रश्न येतो. ज्या सैनिकाला ३ वर्षांचा पगार मिळाला नाही त्याच्याकडे काय मौल्यवान असणार? त्या काळी संपत्ती अंगावर घातली जात असे, कठीण प्रसंगी गळ्यातली मोत्यांची माळ, अंगठी, सोने मोडणे सोपे असे. अवजड संपत्ती जवळ बाळगून लढाईला जाणारे सैनिक त्या काळात नव्हते. त्या काळी गरजा थोड्या म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा याच होत्या, आजच्या सारख्या सुखसोयी नव्हत्या.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर गुरुवार, 04/16/2020 - 17:56 नवीन
सैनिक पगाराचे पैसे ठेवत असणारच ,तसेच लुटीचा माल असतोच
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 04/16/2020 - 18:25 नवीन
सैनिक ज्या तंबूत विश्रांती घेत असत तिथे आपापल्या ढाल-तलवारी, कपडे, खायची प्यायची भांडी कुंडी, वगैरे सामान ठेवत असतील... त्यांची रखवाली कोण करत असतील? लुटीचा माल कुठे लपवून ठेवत असतील? अशी शंका येते?
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 04/17/2020 - 07:01 नवीन
हो चोरि होत नसणार?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 04/17/2020 - 16:08 नवीन
आपण सेनेच्या पलटणीतील वातावरणात राहून पहा... एकाचा तंबूत, बिलेट मधे राहाणारे एक दुसऱ्याच्या सामानाच्या चोऱ्या करत नाहीत... पुर्वीही तसेच असावयचे. जर कोणी दुसऱ्या तंबूतून सफाई किंवा अन्य बहाणा करून आला तर त्याला पकडून मारामाऱ्या होत असत... शेजारच्या तंबूत राहणारा शिपाई मित्र लढताना कामी आला तर त्याचे सामान घरवाल्यांना पोहोचते करायचे काम करावे लागत असे... माझ्या वैयक्तिक जीवनात फ्लाईंग ऑफिसर धनंजय मोटे याच्या अपघाती निधनानंतर मला असेच त्याच्या सामानाचे विशेष करून त्याची परम प्रिय गिटार, ड्रॉईंग्ज, साईबाबांचे फोटो वगैरे घरचांना प्रत्यक्ष भेटून पोहोचते करायचे दुखद काम करावे लागले होते.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 04/17/2020 - 18:34 नवीन
अहो ,पहिली गोष्ट म्हणजे जुना काळ ,मराठे शाही किंवा आधीचा आणि युद्धावर सैनिक जातात तेव्हा तंबू रिकामेच असणार १००० सैन्य ,समझ २०० तंबू ,तरी पहारेकरी तरी कितीत ठेवणार
  • Log in or register to post comments
य
योगविवेक Wed, 04/15/2020 - 09:34 नवीन
ओकसरांनी फोटोतील दाखवलेले काही तपशील मला डोळे बारीक करून शोधावे लागले... उदा. छप्परबंद... शेवटी सापडला... तो तर मला हत्तीवर चढलेला वाटला... अगदी समोर दोघेजण पांढऱ्या वेषातले ...आपापसात संगममत करून कट्ट्यावर बसलेल्या जोडप्याला गंडवून पैसै पळवायचा बेत आखतायत का असे ही वाटले... चित्रकाराची कमाल आहे की त्याने कल्पना करायला भरपूर वाव ठेवलाय....
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 04/15/2020 - 16:55 नवीन
योग विवेक,
डोळे बारीक करून शोधावे लागले
आपण शोधक नजरेने नवीन बारकावे शोधलेत.. यातून आणखी काहींना प्रेरणा मिळेल अशा अपेक्षा करतो...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/15/2020 - 17:23 नवीन
छान माहिती...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jatt Ludhiyane Da... :- Student Of The Year 2
  • Log in or register to post comments
प
परिंदा Fri, 04/17/2020 - 02:04 नवीन
रात्री त्यांच्याच पैकी ज्या कोल्हाटणी असत, त्यांचे डफतुणतुण्यावरील तमाशेही ठिकठिकाणी चालत असत. व या व्यसनाला जास्त रंग आणून देण्याकरिता तेथे आसपास कलालांची दुकानेही नसत असे नाही. कलाल म्हणजे कोण? मद्यविक्रेते?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 04/17/2020 - 15:03 नवीन
देशी दारू ताडी, माडी वगैरे बनवून विकणारे असावेत... नीरा त्यातला एक रिफाइन्ड ब्रांड...
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 04/17/2020 - 09:52 नवीन
फारच सुंदर माहिती देणारा धागा. पण आपण धाग्यात लिहिल्याप्रमाणे प्रत्येकवेळी सैन्याची हालचाल अशीच व्हायची क?? उदा. शिवाजी महाराजांवर जी आक्रमण झाली त्यात हा लष्करी नियम पाळला गेला नसावा किंवा पाळता आला नसावा. उदा. फत्तेखान किंवा अफझलखानाच्या स्वारीत तसेच मोगलानी जी आक्रमण केली उदा. शाहिस्तेखा,, जयसिंग यांचे सैन्य एकत्रच आले असावे असे दिसते. कदाचित शत्रूचे बल कमी आह,, या आत्मविश्वासाने तसे झाले असावे. अगदी बहलोलखानाच्या सैन्याचा तळ एकाच जागी पडल्याने प्रतापराव गुजरांना त्यांचे पाणी अडवणे शक्य झाले असावे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 04/17/2020 - 17:13 नवीन
शिवाजी महाराजां बाबत...सैन्याची हालचाल अशीच व्हायची क??
श्री गजानन मेहेंदळेच्या ग्रंथांतूनही चित्र सामान्यपणे असेच दिसते... मोहिमेचा पल्ला, किती काळाचा, कोण मुख्य सरदार, विजयाची शक्यता यावर त्यात सहभागी व्हायच्या बाजारातील व्यापारी लोकांचे स्वरूप बदलते असावे.... महाराजांच्या सेनेचे संचलनाचे तंत्र, १६७० नंतरच्या मोहिमात बदलले असावे कारण मैदानी लढायांना या काळात सुरवात झाली होती. कारंज्याची लूट त्या आधीची सूरतेची दुसरी लूट नंतर जिंजीच्या मोहिमेतून ते जाणवते...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 04/17/2020 - 18:13 नवीन
शशिकांत ओक, रंजक व रोचक मालिका आहे. धन्यवाद! :-) ध्वजास तीन पताका पाहून नवल वाटलं. दोन बघायची सवय झाली होती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 04/17/2020 - 20:00 नवीन
ओक साहेब, फारच रंजक आणि माहितीपूर्ण लेख आहे. मला काही प्रश्न पडलेत. सैन्य म्हंटले म्हणजे त्यात जास्तीत जास्त पुरुष व त्यातील बहुसंख्य तरुण असणार. घरादारापासून कित्येक महिने, कदाचित वर्षे दूर राहावे लागल्यामुळे पोटापाण्याच्या भुके बरोबर स्त्री-सहवासाची भूक किंवा ओढ लागणे नैसर्गिक आहे असे मला वाटते. सैन्यात जर शिस्त आणि सावधता हवी असेल तर ती सोय असणे गरजेचे आहे असे मला वाटते. नाहीतर शत्रू अश्या स्त्रियांना पाठवून गुप्त माहिती गोळा करू शकतो, तसेच सैनिकांचे नैतिक अधःपतन होऊन ते जिंकलेल्या सैन्यातील तसेच मुलखातील स्त्रियांवर अत्याचार करू शकतील. माझा प्रश्न असा आहे की अशी काही सोय त्याकाळी केली जात असे किंवा काय ? माझा दुसरा प्रश्न - जिंकलेल्या मुलखावर वर्चस्व ठेवण्यासाठी तेथे सतत मनुष्यबळ ठेवणे जरुरीचे असते नाहीतर तेथील कारभार कसा चालवता येणार ? अश्यावेळी त्याचे नियोजन कसे करायचे ? कूच करणाऱ्या सैन्याला सतत रसद पुरवठा कसा व्हायचा ? जो पर्यंत सैन्य आपल्याच किंवा आपल्या मित्र देशातून कूच करत आहे, रसद पुरवठा होऊ शकतो पण जर मध्येच दुसरा देश, शत्रूचा मुलुख किंवा तटस्थ प्रदेश आले तर मग हा रसद पुरवठा कसा होई ? सैन्यातील बाजारबुणगे म्हणजे नेमके कोण व त्यांना तसे नाव का पडले असावे ? वर हस्तर साहेबानी विचारलेलाच प्रश्न थोड्या फरकाने पुन्हा विचारतो - सैनिकांची वैयक्तिक मालमत्ता नसेल पण ज्या राजासाठी तो लढतोय त्या राजासाठी जिंकलेली मालमत्ता तर नक्कीच असणार, मग अशी मालमत्ता कुठे ठेवली जात असायची ? आभार.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 04/17/2020 - 23:56 नवीन
काही प्रश्नांची उत्तरे माझ्या अल्पमतीनुसार - सैन्य म्हंटले म्हणजे त्यात जास्तीत जास्त पुरुष व त्यातील बहुसंख्य तरुण असणार. घरादारापासून कित्येक महिने, कदाचित वर्षे दूर राहावे लागल्यामुळे पोटापाण्याच्या भुके बरोबर स्त्री-सहवासाची भूक किंवा ओढ लागणे नैसर्गिक आहे असे मला वाटते. सैन्यात जर शिस्त आणि सावधता हवी असेल तर ती सोय असणे गरजेचे आहे असे मला वाटते. नाहीतर शत्रू अश्या स्त्रियांना पाठवून गुप्त माहिती गोळा करू शकतो, तसेच सैनिकांचे नैतिक अधःपतन होऊन ते जिंकलेल्या सैन्यातील तसेच मुलखातील स्त्रियांवर अत्याचार करू शकतील. माझा प्रश्न असा आहे की अशी काही सोय त्याकाळी केली जात असे किंवा काय ? हेरगिरी आणि मारेकरी म्हणून. वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रीयांचा वापर केल्या गेला आहे. चाणक्यानं तर जे हेरांचे प्रकार सांगीतलेत त्यावरून युद्धशास्त्रात केवढा खोल विचार केलाय ते बघून नवल वाटतं. बाकी मोंगलाई म्हणजे अत्याचार हे ठरलेलंच होतं. तुम्ही म्हणता तसं त्यामागचं कारण असू शकेल. बटक्यांची आणि गुलामांची त्याकाळी दानत नव्हतीच आणि त्याची सोय वेगळी करायची गरजही नसावी. माझा दुसरा प्रश्न - जिंकलेल्या मुलखावर वर्चस्व ठेवण्यासाठी तेथे सतत मनुष्यबळ ठेवणे जरुरीचे असते नाहीतर तेथील कारभार कसा चालवता येणार ? अश्यावेळी त्याचे नियोजन कसे करायचे ? लूट जिथं करायची तिथे हा प्रश्न यायचाच नाही, पण मुलूखगिरीवर निघालेल्या सैन्याला आधीच्या जित राज्यातून दगा होऊ नये यासाठी, आपले काही सैन्य आणि सरदार अशा ठिकाणी ठेवून, जित राज्याचे काही सैन्य-दाणापाणी व्यवस्था वापरली जात असे. सिकंदराच्या लढायात याचे वर्णन सापडते. अर्थात् दगा होणारच नाही अशी ही व्यवस्था नव्हती, पण त्यातल्या त्यात हा मार्ग. जेव्हा राज्य जिंकून ते काबूत ठेवायचे असेल तेव्हा मोठा प्रकार होतो. कारण तिथं आपलं सैन्य, सरदार आणि भरपूर न लढणारी माणसं नेवून वसवावी लागतात. वतन देणं म्हणजे हेच. म्हणूनतर थोरल्या बाजीरावांचं फार कौतुक वाटतं. अशी कितीक घराणी त्यांनी वसवली आणि वाढवली. कूच करणाऱ्या सैन्याला सतत रसद पुरवठा कसा व्हायचा ? जो पर्यंत सैन्य आपल्याच किंवा आपल्या मित्र देशातून कूच करत आहे, रसद पुरवठा होऊ शकतो पण जर मध्येच दुसरा देश, शत्रूचा मुलुख किंवा तटस्थ प्रदेश आले तर मग हा रसद पुरवठा कसा होई ? हा युद्धाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आक्रमण होणार असं समजलं की आपल्या त्या मार्गातल्या लोकांना हलवून जवळच्या किल्ल्यांवर नेवून वसवायचं. दाणापाणी जेवढं जमेल तेवढं गोळा करून किल्ल्यांवर पोहोचवायचं. इतर सगळं स्वत:च जाळून टाकायचं. जेणेकरून शत्रूच्या हाती काहीच लागणार नाही. आणि रसद पुरवठा सतत ठेवण्यासाठी त्याला फार मेहनत घ्यावी लागेल. त्या रसदीवर छापे घालण्याचं काम मुख्य सैन्यानं विभागून करायचं आणि लूट गोळा करून न्यायची नाहीतर नष्ट करायची. त्यामुळे एकाच ठिकाणी फार दिवस काढणे शत्रूला कठीण व्हायचं. मुघलांसमवेतच्या बर्‍याच लढायांत मराठ्यांनी या तंत्राचा वापर केलाय. महाराजांच्या आणि थोरल्या बाजीरावांच्या लढाईच्या पद्धतीत एक साम्य आहे. वेग. घोडेस्वार जास्त. बाकीचे लोकं कमी. बहुदा तिच लोकं जमतील तशी कामं वाटून घेत असावीत. तान्हाजींचा सावंतवाडी जवळचा किस्सा यावर प्रकाश टाकतो. लढाई झाल्यावर काही दिवस त्यांनी रस्ते तयार करण्याचं काम केल्याचा उल्लेख आठवतो. सैन्यातील बाजारबुणगे म्हणजे नेमके कोण व त्यांना तसे नाव का पडले असावे ? मोठ्या सैन्यासमवेत असणारी महत्त्वाची पण न लढणारी माणसं. वर एका प्रतिसादात मनोंनी सांगितलंय तसंच मुख्य लेखातही याबद्दल खुलासेवार लिहिलंय. बुणगा या शब्दाची व्युत्पत्ती मात्र माहित नाही बुवा. वर हस्तर साहेबानी विचारलेलाच प्रश्न थोड्या फरकाने पुन्हा विचारतो - सैनिकांची वैयक्तिक मालमत्ता नसेल पण ज्या राजासाठी तो लढतोय त्या राजासाठी जिंकलेली मालमत्ता तर नक्कीच असणार, मग अशी मालमत्ता कुठे ठेवली जात असायची ? मुघल पद्धतीत ही मालमत्ता बादशहाकडे पाठवल्या जाई. कारण आपल्या मर्दुमकीची टिवटिव त्याच्या कानी घालण्याची ही नामी संधी असे. शाहिस्तेखानानं चाकणचा किल्ला/गढी घेतल्यावर त्यातून मिळालेली लूट पार दिल्लीला पाठवल्याचा उल्लेख येतो. आता ३०० लोक राहू शकतील अशा गढीत आणिक काय मिळणार त्याला? महाराजांच्या पद्धतीत लूट विभागून जवळच्या किल्ल्यांवर पोहोचवल्या जाई. सुरतेच्या लुटीतला बराचसा भाग २-३ किल्ल्यांवर ठेवल्याचा उल्लेख आठवतो.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 04/18/2020 - 07:16 नवीन
माझा प्रश्न असा आहे की अशी काही (बायांची) सोय त्याकाळी केली जात असे किंवा काय ?
हा प्रश्न प्राचीन काळापासून सोडवणे सेनादलाचा डोकेदुखीचा भाग आहे. तो जास्त जटिल नाविक दलाच्या जवानांना जाणवतो... नाविक तळाजवळ रेडलाईट झोन आजही तयार करण्यात आलेले असतात. हवाईदलाच्या गार्डरूम मध्ये अशा लालबत्ती गल्ल्यांच्या याद्या, नकाशे दर्शवलेले माझ्या पाहण्यात आले आहेत. हवाई, थलदलाच्या अड्ड्यावरून, बोटीवरून तिथे जाऊन परत यायला पास दिले जातात. काहींनी अशा परिस्थितीत पळून जाऊ नये म्हणून शिपायांच्या तुकड्या तैनात असतात. बोट परदेशात नांगरून पडली असेल तर तिथे त्या त्या देशातील रक्षकदल टेंपररी विसा सारखे पास देऊन शहरातील विविध विशिष्ट भागात फिरायला परवानगी दिली जाते. बोटीला पुढील प्रवासासाठी जेवण खाण, आतील बंकरवरील सर्व कपडे धुलाई, संडास स्वच्छता मोहीम राबविण्यात वेळ लागतो... डिझेल भरणे आणि अन्य दुरुस्तीसाठी बोट डॉक मधे बरेच दिवस अडकून पडते. आठवत असेल की वीर सावरकरांच्या बाबत फ्रान्स देशाच्या मार्सेली बंदरात बोट थांबली असताना त्यांनी चकमा देऊन पोहत पोहत मालधक्का गाठला होता. तिथे त्यांचे सहकारी भेटून गायब करायचा त्यांचा प्लान होता. तसे त्यांचे सहकारी आले पण होते मात्र त्या आधी फ्रेंच पोलिसांनी मागून शोधत आलेल्या ब्रिटिश पोलिसांकडे त्यांना सुपूर्त केले होते. असो...
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Fri, 04/17/2020 - 21:25 नवीन
राजासाठी जिंकलेली मालमत्ता खजिन्यात कोषाधीश कडे ,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा