तिरुपती दर्शन (पूर्वतयारी) भाग १
नमस्कार मंडळी,
तिरुपती दर्शनासाठी ५ मार्च ला जाण्याचा मुहूर्त काढला आहे. यापूर्वी तिरुपती पहिले नसल्यामुळे जाण्याची प्रचंड उस्तुकता आहे. त्यातही कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत जात असल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. तयारी तर झाली आहे, बँग पाठीला बांधून निघण्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पाहत आहे. जाणकार मंडळींकडून काही सूचना, इतर काही पाहण्याची ठिकाणे, आलेले अनुभव इत्यादी चे स्वागतच आहे.
त्याचे झाले असे की, मागच्या महिन्यात एका मित्राच्या लग्नामध्ये आमची कॉलेज मधील काही मित्रमंडळी भेटली. गप्पाच्या ओघात एकत्र कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत पक्का केला. तसे तर कॉलेजला असताना गोव्याला जाण्याचा प्लान आखला होता, मात्र तो फिसकटला. असो, त्याप्रमाणे येत्या रविवारी भेटून कार्यक्रम ठरवू असे पक्के केले. त्याप्रमाणे रविवारी आम्ही भेटलो आणी जायचे कसे यावर बराच खल केला. एकाने सुचविले की आपण विमानाने जावू, त्यावर दुसर्याने सुचविले की तेवढ्या पैशात गाडी करून जाऊ म्हणजे एखाद ठिकाण जास्तीचे पाहण्यात येईल. एकजण म्हणाला गाडीने गेलो तर दिवस खूप लागतील त्यापेक्षा रेल्वेने जाऊ वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. आम्ही सर्वांनी त्याला होकार दिला व रेल्वेने जाण्याबाबत एकमत केले. त्यातल्या त्यात उन्हाळा सुरु होत असल्यामुळे रेल्वेचे थर्ड AC चे तिकीट काढावे असे ठरले. त्याप्रमाणे रेल्वेने जाणे-येणे, राहण्यासाठी रूम बुकिंग,आणी दर्शनासाठी पास बुक करणे यासाठी प्रत्येकी पाच एक हजार खर्चाचे अंदाजपत्रक काढले. त्याप्रमाणे सगळ्यांनी पाच -पाच हजार रुपये गोळा करण्याचे ठरविले. तसे मला online व्यवहाराचा थोडाफार अनुभव असल्यामुळे सर्व बुकिंग करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपिवली. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनी बहुमताने त्यांचा म्होरक्या म्हणून माझी नेमणूक केली.
तिरुपती सहल पूर्ण होईपर्यंत कोणाला काही सूचना, माहिती देता यावी यासाठी whats app वर आम्ही सहा मित्रांचा एक temporary ग्रुप केला. पाच मार्च ला जाण्याचे आणि सात मार्च चे परतीचे रेल्वे चे तिकीट बुक केले. तसेच विशेष दर्शनाचे रू 300 चे पास देखील बुक केले. तिरुपती देवस्थान च्या संकेतस्थळावर रूम available दाखवत नसल्यामुळे तिथे जाऊन काहीतरी सोय करू असा विचार केला.
जाण्यायेण्याची तयारी तर झाली होती.
पुढचा टप्पा तसा अवघड होता. तो म्हणजे गृहमंत्र्याच्या परवानगीचा., आम्ही मित्रांनी तिरुपतीला जाण्याचे बुकिंग केले म्हणल्यावर "आता मला काय विचारता" असा उद्गीव्न प्रश्न माझ्या पत्नीने विचारला. "मग कसं करू" हा पुढील प्रश्न मी विचारताच "बघू" असे म्हणत तिने तिचा निर्णय राखून ठेवला. काहीही झाले तरी जायचेच आता माघार नाही या माझ्या निर्णयावर मी ठाम होतो. त्यानंतर दोन दिवस घरात मला प्रचंड शांतता जाणवत होती. माझ्या कपड्यांची packing करण्यासाठी मी एक छोटी bag शोधत होतो. समोरच माझी पत्नी थांबली होती.
"येताना तुला काय आणू ?" असा भोळा प्रश्न मी विचारताच तिने माळ्यावरील एक बऱ्यापैकी मोठी bag माझ्यासमोर आणून आदळली.
"काही दिसले तर घेवून या" असे म्हणत तिने माझ्यापुढे सरकविलेली bag मला "काय दिसेल ते घेवून या" असा अप्रत्यक्ष इशारा देत होती. हुश्श ! काही का असेना परवानगी मिळाली, माझा जीव भांड्यात पडला. बाजूलाच थांबलेल्या माझ्या लहान मुलीने "पप्पा मला मोठ्ठी डॉल घेवून या" असे म्हणत ती आणण्याचे वचन माझ्या कडून घेतले.
एकंदरीत सर्व बुकिंग आणी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यामुळे तशी काही अडचण नव्हती. आता फक्त सामानाची packing करण्याचे राहिले होते. तसेतर प्रवासात फार कमी समान सोबत रहावे यावर माझा भर असतो. स्नान केल्यानंतर बदलावयाचे कपडे , टॉवेल, टूथब्रश इतकेच साहित्य सोबत घेतले आहे. बाकी पावडर,पेस्ट,खोबरेल तेल,शाम्पू, deo, face wash, साबण इत्यादी साहित्य आणण्याची जबाबदारी आमच्या ग्रुप मधील एकावर ढकलण्यात आली.
प्रवासाच्या दिवशी दुपारी जेवणाची जबाबदारी एकाने आनंदाने उचलली. घरून हुरडा, कांद्याचे धपाटे,मिरचीचा खर्डा, दही, शेंगाची आणि खोबऱ्याची चटणी असा फक्कड मेनू त्याने नुकताच आमच्या whats app ग्रुप वर जाहीर केला. सर्वाना जबाबदाऱ्याचे समान वाटप करण्यात आले.
परिचयातील आणी शेजारील काही लोकांनी "आमचाही नमस्कार सांगा" असे म्हणत कुणी ५० ,१००,२५० रुपये माझ्याकडे जमा केले. "येताना आमच्याकरता प्रसादाचा लाडू घेवून या" अशी तीन वेळेस "री" ओढून सांगितले. साधारण ९ लोकांचे नमस्कार सांगावयाचे असल्यामुळे आणि प्रवासाला जाण्यास अजून काही दिवस असल्यामुळे नमस्कार सांगायच्या व्यक्तींची मी एक यादीच बनवून टाकली.
असो, तयारी तर झाली आहे. packing देखील झाली आहे. चला तर मग ,आल्यावर भेटूच. आणी हो तुमचा देखील नमस्कार सांगायचा असेल तर नक्की सांगा.
+१
भारी अनुभव !