Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रूढी, समजुती, परंपरा व त्यामागची संभाव्य शास्त्रीय, तार्किक कारणे

स
सौन्दर्य
Tue, 02/18/2020 - 04:51
🗣 28 प्रतिसाद
मला नेहमीच असे वाटत आले आहे की आपल्या हिंदू धर्मातील कित्येक श्रद्धा, समजुती, रितीरिवाज, रूढी, परंपरा ह्यांना शास्त्रीय बैठक होती. कालांतराने त्यातील शास्त्रीय किंवा तार्किक बैठक विस्मृतीत गेली व पुढील पिढी त्या गोष्टी एक परंपरा किंवा श्रद्धा, समजुती म्हणून पाळत आली. अशी शास्त्रीय बैठक विस्मृतीत जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, फारसे प्रश्न विचारलेले पूर्वी आवडत नसत. दुसरे कारण हे ही असू शकते की समोरच्याचे समाधान होईल असे उत्तर त्यांच्याकडेही कदाचित नसावे. अशा वेळी काहीतरी अगम्य कारण देऊन अथवा धर्माची, देवाची किंवा काहीतरी अघटित (वाईट) घडू शकेल अशी भीती दाखवून प्रश्नकर्त्याला गप्प बसविण्यात येई. त्यामुळे अमुक एक गोष्ट आपण का करता? असे विचारले तर "आमच्यात तशी प्रथाच आहे" असेच उत्तर बहुतेक वेळा ऐकायला मिळते. ह्या धाग्याचा विषय म्हणजे ‘आपण पाळत आलेल्या किंवा आसपास दिसण्यात येणाऱ्या श्रद्धा, समजुती, रूढी, परंपरा व त्या मागचे संभाव्य शास्त्रीय कारण, तर्क अथवा लॉजिक. आपण आपल्या आसपास दिसणार्य काही श्रद्धा, समजुती, रूढी मांडून त्या मागचे शास्त्रीय अथवा तार्किक कारण मांडायचे आहे. असे केल्याने अनेक श्रद्धा, रूढी, परंपरा ह्याविषयी शास्त्रीय किंवा पटेल अशी माहिती गोळा होऊ शकते. तर सुरुवात मी करतो. सुर्यास्तानंतर किंवा दिवेलागणीनंतर घरातला केर काढू नये - आमची आजी म्हणायची असे केल्याने दारिद्र्य येते. (एक समजूत) संभाव्य तार्किक कारण - पूर्वी ज्यावेळी विजेच्या दिव्यांचा शोध लागला नव्हता किंवा खेडोपाडी वीज पोहोचली नव्हती त्यावेळी बहुतेक विविध प्रकारच्या तेलाचे दिवे वापरत असत. त्या दिव्यांचा प्रकाश अतिशय मंद असे व ते सर्वत्र प्रकाश पसरावा म्हणून उंचावर ठेवले जायचे त्यामुळे जमिनीवर तसा कमीच प्रकाश पडायचा. अशावेळी घरातील एखादी मौल्यवान वस्तू, दागिना (नथ, अंगठी वगैरे) किंवा पैसे जर जमिनीवर पडले असतील तर कमी प्रकाशामुळे केराबरोबर ते घराबाहेर लोटले जाऊ शकत होते. दुसरे संभाव्य कारण म्हणजे गावातली घरे जमिनीलगत असायची, पुढे मागे अंगण-परसदार असायचे, घराभोवती बाग असायची. घरात जर साप, विंचू, किंवा तत्सम सरपटणारे जनावर शिरले व एखाद्या कोपऱ्यात लपून बसले तर दिवेलागणीनंतर केर काढताना ते दिसणार नाहीत व अनावधानाने त्यांना डिवचले जाऊन, त्यांचा दंश होण्याचा धोका होता. अंगणात रांगोळी काढणे (एक परंपरा) - संभाव्य कारणे - १) पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे जीव घरात शिरकाव करू शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. २) तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणार्याला कळत असावे. ३) घरातल्या स्त्रीला तिचे कलागुण दाखवायला एक दालन मिळत असे. ४) घराला सौंदर्य लाभत असे. चला तर मंडळी, तुम्हाला ज्ञात असलेल्या रूढी, श्रद्धा, परंपरा व त्यामागची संभाव्य कारणे येऊ द्यात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20167 views

🗣 चर्चा (28)
ब
बोलबोलेरो Tue, 02/18/2020 - 06:29 नवीन
सुन्दर धागा! मलाही असेच वाटते. अशी एक परम्परा म्हणजे, स्नानाआधी तेल लावणे, माखू घालणे. त्यामुळे, त्वचेत व शरीरात पुरेशी आर्द्रता राखली जाते, व संभाव्य त्वचाविकार अस्थीविकार टाळता येउ शकतात. स्वानुभव आहे!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/18/2020 - 06:39 नवीन
आम्ही मित्र मित्र श्रमपरिहराल बसलो की प्रत्येक जण ग्लासामधले द्रव्य बोटाने चार थेंब चारी दिशांना शिंपडतो. आपल्या भोवताली घुटमळणारे अतृप्त आत्मे हे थेंब पिउन तॄप्त व्हावे व कार्यक्रम सुरु असताना त्यांनी एखाद्या कार्यक्रमार्थीला झपाटू नये असा त्या मागे उद्देश असावा. तसेच बाटलीतले सगळे द्रव संपले की बाटलीला बुच लावून ती उपडी करुन ठेवायची व पाच दहा मिनिटांनी उघडून झाकणात जमा झालेले शेवटचे सात आठ थेंब एखाद्या अविवाहीत मित्राला पाजायचे अशी एक पध्दत आहे. अविवाहीत मनुष्याचे लवकरच लग्न व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करण्याची ही एक पध्दत असावी. एखाद्याला चैतन्य चुर्ण देताना ते बोटांच्या चिमटीत पकडुन देत नाहीत तर ते हातावर ठेवुन हात पुढे करायचा असतो व घेणार्‍याने ते देणार्‍याच्या हातातुन चिमटीने घ्यायचे असते. असे केल्याने मैत्री वाढते असे म्हणतात. जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर. चैतन्यकांडी पण दुसर्‍याला देताना ती दोन बोटाच्या बेचकीत न पकडता चिमटीत पकडुन द्यावी असे पूर्वज सांगून गेले आहेत. धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा. अजून आठवले की लिहितो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/18/2020 - 08:06 नवीन
:) धागा शतक होणार असे दिसते
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/18/2020 - 08:09 नवीन
धुमसती कांडी देताना देणार्‍याला किंवा घेणार्‍याला चटका लागू शकतो. तो टाळण्या साठी हा रिवाज सुरु झाला असवा.
कांडी दिल्यास त्याला आयुष्यभर जे चटके बसतात ते टाळण्यासाठी काही रुढी?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/18/2020 - 08:47 नवीन
चैतन्यचूर्णाचा विडे वाटावेत, चैतन्य विड्याच्या चैतन्य पिंकावाटे कफाचा सुकार पसरुन कांडीने फुप्फुसात पसरलेल्या उष्णतेस थंडावा देतो . आपल्याला फुप्फुसातील थंडी इतर फुफूसात पसरवण्यासाठी उबळ दाबू नये अशा काही प्रथा पाळल्याकी झाले.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 02/19/2020 - 20:11 नवीन
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 02/19/2020 - 20:12 नवीन
चैतन्यकांडीवरून आठवलं. कॉलेजमध्ये असताना, एका सिनिअरने समोरच्या पानवाल्याच्या दुकानातून चैतन्यकांडी प्रज्वलित करून आणण्याचा हुकूम दिला. पानवाल्याने ती प्रज्वलित करून देताना, "एक दोन झुरके मार, म्हणजे ती प्रज्वलित राहील" असा प्रेमळ सल्ला दिल्याचे आठवते. मात्र विडी प्रज्वलित ठेवण्यासाठी अशी कृती करावी लागत नाही अशी बहुमूल्य माहिती विनामूल्य पदरात पडली. बाय द वे, विडीला कोणती कांडी म्हणायचे बरे ? ग्लासामधले द्रव्य चारी दिशाना शिंपडण्यामागचे किंवा बाटली उपडी करून बुचाच्या जमा झालेले द्रव्य अविवाहित मित्राला पाजण्यामागचे शास्त्रीय (असल्यास) किंवा तार्किक कारण कळले असते तर ह्या धाग्याचा हेतू सफल झाला असता. विषयाला धरून एक प्रश्न विचारतो - उत्तेजनाद्रव्य चषकांत भरल्यावर, चषक एकमेकांवर नाजूकपणे भिडवल्यावर 'चिअर्स' म्हणतात. चिअर्स एकमेकांच्या आनंदात वृद्धी होवो ह्या इच्छेने बोलतात पण मुख्य प्रश्न हा आहे की असे चषक का भिडवितात ? युअर टाइम स्टार्टस नाऊ.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/18/2020 - 08:32 नवीन
अंधश्रद्धा निर्मुलनवादी किती कोकलले आणि त्यांनी स्वतः स्विकारले नाही तरी त्यांच्या स्वतःसहीत तर्कापेक्षा, संबंधीत व्यक्ती प्रभावित होणार्‍या व्यक्तीकडची अतर्क्य वक्तव्ये आणि अंधश्रद्धा अधिक चटकन खपतात. सर्वसाधारण व्यवहारात भावना तर्कपूर्णतेला सहज मात देते. कोणतीही संस्था त्यात धर्मसंस्था आली (कोणताही धर्म आणि विशेषतः हिंदू धर्म एक चांगले उदाहरण आहे) तर्कपूर्ण माणसाने मांडलेल्या केवळ तर्कांवर धावत नाही प्रत्यक्षात दैनंदीन जिवनात अंधश्रद्धा बाळगणारे धर्मसंस्था टिकवून असतात. अतर्क्य विधानांचे तर्कपूर्ण अथवा अतर्क्य समर्थन कसे करायचे ते संबंधीत समुदाय बघून घेत असतो. रांगोळीने वातावरणास प्रसन्नता आणि सौंदर्य लाभते . फारतर कलाकारास आपली कलात्मक अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळते हे म्हणणे पुरेसे असावे. पण या तर्काचा क्रम वर येण्याच्या आधी १) पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे जीव घरात शिरकाव करू शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. २) तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणार्याला कळत असावे. हे लौकर खपते यातही काही तर्क आहे यास अधिक अतर्क्य केले तर कदाचित अधिक चटकन खपेल. एखादी प्रथा काही व्यक्ती कुटुंबे समुह पाळतात तेव्हाच काही जाणीवपूर्वक पाळत नाहीत, अंधश्रद्धा चटकन खपते हा नियम एखादी प्रथा न टाळली जाण्याबाबतही तेवढाच लागू शकत असावा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/18/2020 - 09:04 नवीन
दिवेलागणी नंतर केर काढू नये यात धागा लेखातील पहिला तर्क - मौल्यवान गोष्ट अनवधानाने अंधारात बाहेर टाकली जाऊ नये - ह्या कारणाची शक्यता अधिक पण तरीही धागा लेखकाचा तर्क क्रमांक २ चटकन खपेल, सरपटणारा प्राणी डिवसेल या कारणाने दिवेलागणी नंतर केर न काढता डिवसणारा प्राणी तसाच राहुदेणे तर्कशुद्धतेवर घासल्यास टिकत नाही, झोपलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते त्यामुळे डिवसणारे प्राणी घालवले जावेत म्हणून दिवेलागणी नंतर झोपण्याआधी केर काढणे श्रेयस्कर असा तर्क ही मांडता येऊ शकतो. अशा तर्क-मुल्य-मांडणी अंशतः स्थलकालसमुह सापेक्ष असतात. महाभारत काळात कंबरेच्या खाली शस्त्राचा वार करु नये व्यक्ती जिवंत राहील्यास त्याला किमान कुठे जाता आले पाहीजे या मुल्यास प्राधान्य होते. आताच्या काळात पायावर गोळी मारा कंबरेच्या वर वार करु नका पंगु झाला तर ठिक व्यक्ती जगली पाहीजे असा विचार आहे. तसे पहाता दोन्ही मांडणी परस्पर विरोधी आहेत आताच्या काळातला महाभारत वाचताना मनोमन तत्कालीन प्रथेचे आपोआप समर्थन करतो, आणि तिच व्यक्ती आजच्या काळात गोळी पायावर न मारता पूर्ण एनकाऊंटर का केला असा प्रश्नही विचारते. आणि माणूस स्वतःच्या तत्वातली अशी काँट्राडीक्शन्स घेऊन सहज जिवन कंठत असतो.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 02/19/2020 - 10:04 नवीन
पलेल्या अवस्थे पेक्षा केर काढणारी अवस्था अधिक सावध असते
हे वाक्य वाचुन भुलभुलैय्या मधला रसिका जोशी चा झाडू वाला प्रसंग आठवला :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 02/18/2020 - 10:28 नवीन
सुन्दर धागा! समाजात दोन टोके दिसतात दुर्दैवाने १) "हे असेच असते पूर्वीपासून" म्हणून प्रश्न विचारू नका, पाळा आणि नाही पाळलेत तर तुम्ही धर्मविरुद्ध म्हणून समोरच्याला ला झोडपणारे २) सगळे जे आहे त्यामागे काही तर्क असेल हे विचारात ना घेता झोडपणारे आणि खास करून ज्यांना फक्त हिंदू धर्मातील प्रथातच खोट दिसते असे अति टोकाचे अंधश्रदनिर्मूल वाले ( सर्वच नाही )
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 02/18/2020 - 16:10 नवीन
छान विषयावर धागा... माझ्यामते हिंदू धर्मात कोणी एकमेकांना भेटल्यावर शेकहँन्ड न करता हात जोडून नमस्कार करणे ही प्रथा आहे त्या मागेही शास्त्रीय कारण असावे. एकमेकाला स्पर्श न करता उगाचच रोगराईचा प्रसार होऊ नये हा उद्देश असावा. मला अजूनही कोणालाही शेकहॅन्ड करायला आवडत नाही. कारण त्या व्यक्तीने त्याचा हात आधी कोठे वापरला असेल काय माहीत? उगाच जखम खाजवली असेल किंवा नाका तोंडात बोट घातली असतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/18/2020 - 16:36 नवीन
अंशतः सहमत. अगदीच अस्पृश्यताही समर्थनीय ठरत नाही त्याच वेळी युरोपीय ज्या नव्या वसाहतीत गेले अशा अनेक वसाहतींमध्ये युरोपीय नव लोकसंपर्कातून वीषाणू जिवाणू बाधा होऊन इम्यूनिटी नसल्याने साथीचे आजार पसरुन अख्खी लोकसंख्या नामशेष झाली ते ही सयुक्तीक ठरत नाही. काही वीषाणू संक्रमण अटळ असते शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीस काही पर्याय नाही. सरसकट अस्पृश्यतेत रुपांतरण न करता किमान आजारी आणि अशक्त व्यक्तींनी शेकहँड टाळणे ठिक. कारण हात स्वच्छ असतील तरीही श्वसना वाटे वीषाणू संक्रमणाचा धोका शिल्लक रहातो. इतर सशक्त व्यक्तिंनी पुरवी प्रमाणे अभ्यागतांचे स्वागत हात पाय धुण्यासाठी गरम पाणी साबण देऊन करावे आणि नंतर हस्तांदोलन करावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/19/2020 - 05:52 नवीन
अनेक कालबाह्य रुढी व परंपरा संस्कृतीच्या/धर्माच्या नावाने गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात. शास्त्र असतं ते! ;)
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 02/19/2020 - 07:48 नवीन
रूढी, परंपरा आणि कर्मकांडे यात सतत नवनवीन गोष्टींची भर पडताना दिसते. त्यात जगभरच्या इतर संस्कृतीमधून घेतलेल्या उसन्या प्रथांचाही समावेश होत चाललेला आहे. खर्चिक, दांभिक आणि निरूपयोगी गोष्टी तर आधुनिक कर्मकांडांमधेही असतातच. (प्री वेडिंग शूट, तथाकथित टीम बिल्डींग अ‍ॅक्टिव्हिटीज , कंपनीच्या खर्चाने केलेले नाईट आउट, बेबी शॉवर, व्हेलेंटाईन डे, हॅलोविन डे, अमुक डे तमुक डे, लग्नप्रसंगी वराची चप्पल पळवणे, आंतरपाट मधे असताना वराने वधूला उजलून घेणे, सोवळ्या ओवळ्यासारखे स्थानमहात्म्य दर्शक आधुनिक टाय डे, ब्लेझर डे सारखे ड्रेस कोड पाळणे, फीत कापून उद्घाटन करणे, संचलणे आणि कवायती इ.). यात अमुक एक संस्कृती आणि अमुक एक धर्माचा संबंध दिसला की अन्यायकारक किंवा शोषणपूरक नसलेल्या प्रतिकात्मकतेला देखील एक ठराविक समाजघटक कडाडून विरोध करताना दिसतो हे गमतीशीर वाटते. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/19/2020 - 09:56 नवीन
ध्वजवन्दन, दीपप्रज्वलन,पसायदान,हम होन्गे कामयाब राहिले ना
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 10:55 नवीन
.... ‘आपण पाळत आलेल्या किंवा आसपास दिसण्यात येणाऱ्या...
सद्य वर्तमान काळ, भूतकाळातील तत्कालीन वर्तमानकाळाबद्दल सकारात्म्कता, सांस्कृतिक परंपरांच्या ठेव्यातील सकारात्मक उद्दीश्टे शोधण्याचा, न्हाऊ घातलेल्या पाण्यातील बाळ फेकले जाणार नाही याचा रचनात्मक प्रयत्न धागा लेखातून दिसून येतो
अनेक कालबाह्य रुढी व परंपरा संस्कृतीच्या/धर्माच्या नावाने गतानुगतिक पद्धतीने पाळल्या जातात. शास्त्र असतं ते! ;)
घाटपांडे साहेबांच्या समतोल दृष्टीकोण सहसा मला भावतो, बाळाला न्हाऊ घातलेले पाणी टाकले जावे संस्कृती आणि समाज अधिक उन्नत व्हावा म्हणून टिका नक्कीच गरजेच्या असतात त्यांचे स्वागत करावयास हवे पण न्हाऊ घातलेले पाणी फेकुन दिल्या नंतर एक बाळ शिल्लक रहाणार असते त्याकडे दुर्लक्ष करण्याची टिकाकारांची अपेक्षा कितपत रास्त असते ? १९ व्या शतकातले २० व्या शतकात, २०व्या शतकातले काही सुधारणा संशोधन २१ व्या शतकात बाद होणार असते म्हणजे १९ अथवा २० शतकात झालेल्या सुधारणा आणि संशोधनाच्या उद्दीष्टात तत्कालिन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादेत झालेल्या प्रयत्नांचे उद्दीष्ट्ये सकारात्मक आणि शास्त्रीय म्हणजे गिव्हन अंडरस्टँडींगमध्ये लॉजीकल आणि पद्धतशिर नसतीलच असे नव्हे. हे डिस्काऊंटींग अंडरस्टँडिंग आम्ही १९ वा २० व्या शतका बाबत दाखवू शकतो तर प्राचीन काळाबाबतही तत्कालीन संसाधन आणि ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन का दाखवू नये. ऋग्वेदात बहिणीच्या प्रस्तावास नकार देणारा यम, इंद्रपूजा नाकारुन पर्वत पूजा श्रेयस्कर असल्याचे सुचवणारा कृष्ण, शेतीच्या आर्थिक वृद्धीसाठी गाईं-बैलांचे सेवन करण्याचे थाबंवणारा समाज, ईश्वराच्या नावाने अर्चांसाठी केल्या जाणारे प्राणी बळी थांबवण्यासाठी चळवळी प्रमाणे झटणे, अद्वैत सिद्धांत, काम्य व्रतांना नाकारून इश्वराच्या नावाने कर्मयोग सांगणे, सत्यं शिवम सुंदरम, अहं ब्रह्मास्मी , कराग्रे वसते लक्ष्मी, शुभम करोती पसायदान, अशी महा वाक्ये प्रचलित करणे या त्या त्या काळाच्या उपलब्ध मर्यादेत झालेल्या सुधारणाच असतात. घरात येणारी नवी सून धनधान्याने भरलेला तांब्या पायाने लवंडते यात धान्याची नासाडी पहाणार की घरात येणार्‍या नव्या सदस्यांच्या छोट्या मोठ्या चुकांचा बाऊ न करता घरातील आपले पणाचा आधिकार पहाणार ? भाकरीचा तुकडा ओवाळून टाकताना नसलेली नजर काढण्याचे अंधश्रद्धात्मक औचित्य आजच्या काळात शिल्लक नसेल कदाचित पण अंधश्रद्धेच्या मर्यादा लक्षात ठेऊन केवळ प्रेमापोटी काढलेल्या नजरेच्या कृती मागचे अनमोल प्रेमाची अनुभूती केवळ तर्कांच्या हट्टांसाठी त्याज्य करावी काय? किंवा व्यक्तिंना वेळोवेळी ओवाळणे असेल. ओवाळल्याने अथवा आशीर्वाद दिल्याने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यात यशस्वी होतेच असे नाही तर्कांची कसोटी कडक केली तर शुभ शब्दातील शुभ शब्दच नव्हे तर सकारात्मक इच्छांना ही अर्थ कारण त्रयस्थाच्या इच्छा केवळ इच्छा असतात त्यांचे भविष्यातील घटनाक्रमाशी आणि फलिताशी नात्याची ग्वाही देणे कदापी संभव नसते म्हणून सदिच्छा व्यक्त करणे आशिर्वाद देणे आशिर्वाद देताना चार रंगित तांदूळाचे दाणे फेकणे ओवाळणे इत्यादीतील प्रसन्नता मानसिक समाधान आनंद विश्वास यांचा प्रत्यय थांबवणे खरेच गरजेचे आहे काय ? कुंकू अथवा टिकली टेक्निकली यात शृंगार तरी आहे. पुरुषांनी कपाळावर गंध लावणे अंधश्रद्धेच्या यादीत सहज ढकलता येते त्यात नटण्याचाही उद्देश्य नसतो. कालच्या हिशेबाने कुंकू गंधाचा सांस्कृतिक शिरकाव कदाचित अंधश्रद्धेनेही झाला असेल. पण कपाळावरील कुंकू आणि गंधामुळे स्त्रीपुरुष संवाद-काळात कपाळ व डोळ्यांवर लक्ष केंद्रीत ठेवणे सोपे होऊन ऑगलींगच्या शक्यता कमी रहात असतील - (मी पडदा पद्धतीचा समर्थक नाही हे यावेळी नमुद करतो) आणि प्रथेचे उपयुक्तता आणि सौंदर्य मुल्य असेल तर प्रथा केवळ जुनी आहे म्हणून दडपण्यात काही अर्थ असेल का ? डोक्यावरच्या पदराचे अट्टाहास पुरुषसत्ताकतेचे निदर्शक म्हणून मागे टाकणे श्रेयस्कर असले तरी, नवीन कितीही पोषाख आले तरी नऊवारीसाडीचे स्त्री संदर्भात उपयुक्तता मुल्य कसे कमी होते ? असो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/19/2020 - 11:37 नवीन
मयतीच्या वेळी मडक्यात विस्तव ठेवून ते दहन विधीला नेण्याचे कारण त्यावेळी नदी काठी अंत्यसंस्कार केले जात ,नदी काठी वारे असे त्यामुळे अग्नि पेटायला अडचणी येत म्हणुन खबरदारीचा उपाय म्हणुन विस्तव मडक्यात ठेवला जाई. आज ती परिस्थिती नाही पण प्रथा मात्र पडली ती तशीच चालू आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 11:50 नवीन
ज्या काळात सहज अग्नी प्रज्वलन साधनांची कमतरता राहीली असेल आणि नेलेल्या अग्नीचे वार्‍यापासून संरक्षण हा उद्देश्य समजण्या सारखा आहे. दहनासाठी नदी काठ निवडले जाणे मडक्यात अग्नी नेण्याच्या दृष्टीने अंशतः दुय्यम बाब असावी. (आता हि माझी छिद्रान्वेषी तर्क चिकित्सा निरुद्देश्यच आहे- पुढे जाऊन कुणि त्याचे इतर कोणतेही म्हणजे सार्कॅझम सहीत अर्थ काढू नयेत -एखादी नवी अंधश्रद्धा शब्दपुजा जन्मू म्हणून फॉर रेकॉर्ड )
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/19/2020 - 11:52 नवीन
* एखादी नवी अंधश्रद्धा शब्दपुजा जन्मू नये म्हणून फॉर रेकॉर्ड .
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 02/20/2020 - 14:48 नवीन
जगातली ही एकमेव देण्याची पध्दत आहे जिथे देणार्‍याचा हात खाली असतो आणि घेणार्‍याचा वर.
चुरडून त्यात चुना अंगठ्याने मळून तयार बुकणा द्यायला हात खाली अन चिमटीत पकडून अलगद गालाच्या खळीत साठवायला घेणार्‍याचा हात वर असतो हे लक्षात येते...!
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Fri, 02/21/2020 - 10:27 नवीन
मयताच्या वेळी चिता पूर्णपणे पेट घेतल्याची खात्री करून घराकडे निघण्यापूर्वी मडक्यातील पाणी चितेभोवती फिरवले जाते. ज्याचे शास्त्रीय कारण असे समजले की आप्तेष्ट, नातेवाईक निघून गेल्यानंतर एखादे जाळीत लाकूड खाली पडून अजूबाजूचे वाळलेले गवत, पालापाचोळा आदीने पेट घेऊ नये म्हणून असे केले जायचे. ही प्रथा सुरु झाली त्यावेळी आत्ताच्या प्रमाणे स्मशानभूमी नव्हत्या हे समजून घ्यावे.
  • Log in or register to post comments
व
वकील साहेब Fri, 02/21/2020 - 10:51 नवीन
मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा एक भाग म्हणून मयत व्यक्तीला घराच्या बाहेर शेजारपाजारचे चार लोक येऊन अंघोळ घालतात. ज्याने मयत व्यक्तीच्या अंगावर काही मारहाणीच्या खुणा आहे की नाही हे समजते. म्हणजे पोस्टमोर्टम ची जुनी पद्धत म्हणा की. मयत व्यक्तीला कडक पाण्याने अंघोळ घातली जाते. आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात देखील जेथे व्यक्ती मयत झाल्याचे डॉक्टर चुकीचे निदान करतात तेथे जुन्या काळात एखाद्या जिवंत व्यक्तीला चुकून मयत घोषित करून त्याचे दहन होऊ नये म्हणून गरमागरम पाण्याने अंघोळ घटली जायची. जेणेकरून जर व्यक्ती जिवंत असेल तर चटका बसल्याने काहीतरी हालचाल नक्की होईल. वर आणि वधूला विवाहा पूर्वी हळद लावण्याच्या निमित्ताने चारचौघात अंघोळ घातली जाते जेणेकरून मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावर कोड किंवा अन्य काही त्वचारोग असेल तर ते समजतात. स्थळ पाहण्याच्या वेळी असे थेट विचारता येत नाही म्हणून लग्न लागण्यापूर्वी एका प्रथेतून पाहिलेली हि एक सोय. आताच्या सारखे डायनिंग टेबल किंवा गुळगुळीत फरशा नव्हत्या तेव्हा लोक मातीवर बसून जेवण करत असत. त्यामुळे एखादा किडा, मुंगी ताटात जाण्याची शक्यता असायची. म्हणून जेवणापूर्वी ताटा भोवती पाणी फिरवले जायचे. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी कोणाला काही देऊ नये अशीहि एक प्रथा होती. जेव्हा काडेपेटीचाही शोध लागलेला नव्हता तेव्हा चुलीत विस्तव जपून ठेवला जात असे. स्वयंपाक झाला कि शेणापासून केलेला एक गवरी सदृश्य मुटका चुलीत ठेऊन त्यावर राख लोटली जायची मुटका आत सावकाश जळत राहायचा. पण हवा न लागल्याने त्याचे ज्वलन अत्यंत सावकाश व्हायचे. जेव्हा पुन्हा स्वयंपाक करायची वेळ व्हायची तेव्हा फक्त तो मुटका फोडला कि आत विस्तव जिवंत असायचा. त्यावर गोवऱ्या, वाळलेल्या काड्या असे काही टाकले कि पुन्हा जाळ तयार व्हायचा. पण काही काही वेळी असा मुटका खूप वेळ झाल्याने विझून जायचा. मग शेजारी पाजारी विस्तव मागायला जावे लागायचे. पण सायंकाळच्या वेळी विस्तव द्यायला गेलं. आणि अंधारात ठेचकळल्याणे विस्तव जर चुकून कुठे खाली पडला तर दारात बांधलेल्या जनावारचे गवत, वाळलेल्या गोवऱ्या, पालापाचोळा आदीने पेट घेतला तर कुडाची घरे जाळायला वेळच किती लागायचा? म्हणून सायंकाळच्या वेळी कुणाला काही देऊ नये अशी प्रथा पडली असावी.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/21/2020 - 14:29 नवीन
जेवणापुर्वी ताटाभोवती पाणि फिरवण्याच्या तत्कालिन शक्य कारणाचा मुद्दा पटला. लग्नापुर्वी हळद लावून स्नान घालण्याचे कारण हळद लावण्याने सौंदर्यात वृद्धी होते हा समज अधिक कारण असावे. पुर्वी विवाहास सरळ सरळ शरीर संबंध असेच संबोधले जात असल्यामुळे या विषयावर मुलामुलींचा संकोच कमी करणे असाही उद्देश्य असू शकेल. सोबतच कुटुंबाचा सामुहीक थट्टा मस्करी आनंद हेच महत्वाचे घटक असावेत. तत्कालीन धार्मिक विश्वासात एकदा ठरल्यानंतर त्वचारोग वगैरेवरुन विवाह मोडणे शक्य राहीले असेल असे वाटत नाही. सायंकाळी काही न देण्याचा संबंध सायंकाळी लक्ष्मी घरी येते या समजूतीशी असावा कारण समकक्ष प्रथा लक्ष्मीपूजन तसेच गौरी म्हणजे महालक्ष्मी पूजनाच्या वेळीही दिसून येत. मयताला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात तो पर्यंत विश्वास न बसलेल्यांची मानसिक समजूत काढण्याचा प्रयत्न अधिक असावा, आपण म्हणता तसे साशंकीत मृत्यू असेल तर लक्षात यावे असा दुय्यम हेतु असू शकतो. पण आधुनिक वैद्यकीय पद्धतीला समजणार नाही आणि गरम पाण्याच्या स्नानाने व्यक्ती जिवंत होण्यास मदत होईल या दाव्या बद्दल प्रथम दर्शनी साशंकता वाटते आणि मिपा डॉक्टरांनी आणि जाणकारांनी यावर मत व्यक्त करणे अधिक उचित असावे. व्हायरल (विषाणू) अथवा बॅक्टेरीअल (जिवाणू) आजाराने किंवा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला असल्यास आणि आधुनिक वैद्यकीय चाचणी नंतर मृत घोषीत केले असल्यास गरम पाण्यातूनही विषाणू जिवाणू पसरणार नाहीत का अशी माझी आपली व्यक्तीगत साशंकता आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार काय अधिक योग्य ते डॉक्टरांनी सांगितलेले बरे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/21/2020 - 15:58 नवीन
साधारण ८० अंश सेल्सियस ला सर्व जिवाणू आणि विषाणूच नव्हे तर बरीचशी विषे सुद्धा निष्क्रिय/ मृत होतात. त्या मुळे अगदी उकळते नसले तरी कढत पाणी असेल तर त्याने बहुसंख्य जिवाणू आणि विषाणू निष्क्रिय/ मृत होतील आणि बरीचशी विषे सुद्धा. रूढी त्यासाठी आहे का हे माहिती नाही
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/21/2020 - 17:21 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद देऊन अस्मादिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/21/2020 - 14:56 नवीन
देवा पेक्षा माणसाला मोठे करणे. (व्यक्तीपुजा)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/21/2020 - 15:28 नवीन
मी सुद्धा व्यक्तिपुजांचा मुलतः विरोधक आहे पण देवाच्या नावाने बदलण्यास युक्त नियम पुस्तके परंपरा बदलू दिल्या जात नसतील तर नवे देवाची कालांतराने देव म्हणून जागा घेणारे बदललेल्या काळाचे नवे देव तयार व्हावेत म्हणून थोडा काळ एरवी असह्य व्यक्ती पूजा सहन करुन घेण्यास हरकत नसावी. तोंडपुजेपणा व्यक्तिशहः व्यक्तीपूजा न करणार्‍ञांना कठीण वाटले तरी एकदा तोंडपुंजेपणाची स्पर्धा करण्याचे ठरवलेले असले तर इतरांना मागे टाकणे कठीणही नसावे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा