ऋतू !
ऋतू !
हा एवढा ऋतू संपल्यावर
काळोखातल्या गारठ्यामध्येच
निघेन मी ! .... दूरच्या गावात जाण्यासाठी ....
अंधारात स्तब्ध पणे उभ्या असलेल्या
तुझ्या गावातल्या, या झाडांना निरोप देऊन .....
या झाडांकडूनच शिकलीये बरंच काही .......
सगळे ऋतू एकाच जागी उभे राहून झेलायचे ....
इतरांना हवंय म्हणून बहर दाखवायचा अन
स्वतःला हवंय म्हणून टिपं पण गाळायची.....
श्रावण असल्याचे निमित्त करून ..... .
उन्हाळ्यात, क्वचित दुरून येणारा थंड वारा
'तुझ्याकडूनच' आला आहे असं समजून
पानांची सळसळ करून झेलायचा......
त्या स्पर्शाने नकळत शहारून घेतल्यावर
त्याला समुद्राच्या लाटांमध्ये सोडून घ्यायचं .....
आणि लाटांच्या वाढणाऱ्या आवाजात ....
आपण निमूट होऊन जायचं ...... !
तुला न भेटताच निघत आहे ........
पुढल्या ऋतू मध्ये जेव्हा प्राजक्ताचा
सडा पडला असेल तुझ्या दारात .....
तेव्हा त्या नाजूक फुलांवर पाय न ठेवता
तू जसा दुरून निघून जाशील ........
अगदी तशीच !!
-----------------फिझा !
💬 प्रतिसाद
प
प्रमोद देर्देकर
Fri, 02/08/2019 - 05:08
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
प
पलाश
Fri, 02/08/2019 - 05:12
नवीन
सुंदर.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Fri, 02/08/2019 - 09:58
नवीन
हरेक ऋतू येतंच असतो
घेऊन नवीन सांगावा
कुणी पोळून टाकतो , करतो लाही लाही
तर कुणी उभारतो रम्य देखावा
मन सैरभैर , हरेक ऋतूत
सळसळ अंगी बाणावलेली कायम
चक्र असेच चालू राहते अविरत
सृष्टीचा असे अलिखित नियम ................
-------- सुंदर कविता ------------
- Log in or register to post comments