Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ?

आ
आबा
गुरुवार, 01/10/2019 - 15:14
💬 74 प्रतिसाद
आपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती आहे. इ.स. १७९६ साली सॅम्युअल हानेमन (Samuel Hahnemann) या जर्मन व्यक्तीने होमिओपॅथीची सुरुवात केली. एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट घटक (उदा. एखादे रसायन) व्याधी तयार करत असेल तर तोच घटक ती व्याधी झालेल्या व्यक्तिला निरोगी बनवू शकते अशी (अजब!) होमिओपॅथीची पहिली समजूत आहे. थोडक्यात "क्ष" या घटकामुळे ताप येत असेल, तर तापावर ऊपचार म्हणूनही "क्ष"हाच घटक वापरायचा. हानेमनने ही समजूत कोणताही वैज्ञानिक पद्धती न वापरता स्वत:च्या लहानश्या अनुभवावरून ठरवली होती, आणि त्यानंतरही आजतोपावेतो कोणालाही ही समजूत वैज्ञानिक साच्यात बसेल अशा पद्धतीने सिद्ध करता आलेली नाही. मात्र बऱ्याच लोकांचा याला प्रचंड पाठींबा आहे असे आम्हाला दिसून आले आहे. काट्याने काटा निघतो किंवा विषच विषाला बरे करते असा सरळधोपट तर्क हे लोक मांडतात. हा न्याय जर सगळ्या बाबतीत सत्य आहे असे मानायचे असेल तर मग विष प्यायलेल्या व्यक्तिला अजून विष पाजून बरे करता यायला हवे! विज्ञान अशा विचित्र कल्पनांवर चालत नाही. एवढे मोठे जहाज पाण्यात बुडत नाही तर मग एखादा छोटा दगड कशाला बुडेल हा तर्क जितका हास्यास्पद आहे तेवढाच हास्यास्पद होमिओपॅथीचा हा दावा आहे (जहाज बुडत नाही आणि दगड बुडतो याचे कारण सुद्धा विज्ञानातील सखोल आणि संख्यात्मक विवेचन करून द्यावे लागते. केवळ गुणात्मक (Qualitative) तर्कवादाला विज्ञानात जवळपास काहीही किंमत नाही.) आधुनिक वैद्यकशास्त्रात काही प्रकारच्या सूक्ष्मजीवाणुंमुळे (Bacteria) होणाऱ्या आजारांवर औषध म्हणून प्रतीजैविके (Anti-biotics) वापरली जातात, ज्यामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढवण्यासाठी मृतप्राय झालेले सूक्ष्मजीवाणूच औषध म्हणून वापरले जातात. तसेच लहान मुलांना पोलिओ किंवा देवीच्या लसी दिल्या जातात त्यामध्येही लहान वयातच रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार व्हावी म्हणून त्याच (किंवा त्याच्या सारख्या) रोगांच्या मृतप्राय जंतूचे जैविक द्रावण लस म्हणून दिले जाते (शाळेत ऐकलेली एडवर्ड जेन्नरची कथा आपल्याला आठवत असेलच). अर्थातच आधुनिक वैद्यकशास्त्रातील या दोन्ही गोष्टी विज्ञानातील सर्व प्रकारच्या काटेकोर कसोट्यांवर तपासल्या गेलेल्या आहेत, आणि जे आजार सूक्ष्मजीवाणुंमुळे होत नाहीत त्यासाठी या पद्धती औषध म्हणून चालतही नाहीत. होमिओपॅथीमध्ये मात्र मूतखड्यापासून ते मधुमेहा पर्यंत सर्वच आजारांवर बेधडकपणे "काट्याने काटा काढावा" ही विक्षिप्त समजूत वापरली जाते. होमिओपॅथीचे व्यावसाईक त्यांच्या समर्थनार्थ सतत आधुनिक विज्ञानातील लसीकरणाचा आणि प्रतिजैविकांचा हवाला देत असतात. एवढेच नव्हे तर पाश्चात्य देशांतील बरेच होमिओपॅथीचे व्यावसाईक लसीकरणाला विरोधही करतात! आता होमिओपॅथीसारख्या थोतांडावर विश्वास ठेवून आपल्या मुलांचा बळी द्यायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. परंतू खरी गमतीची बाब अशी, की "लसीकरणाची कार्यपद्धती" ही एकमेव वैज्ञानिक गोष्ट थोडीफार होमिओपॅथीच्या समजुतीच्या जवळ जाते, आणि तीला सुद्धा बऱ्याच पाश्चात्य होमिओपॅथी व्यावसाइकांचा विरोध आहे. स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण कोठे मिळेल? पोटेन्सी म्हणजे काय? मात्र होमिओपॅथीची दुसरी समजूत याहीपेक्षा कितीतरी पटीने विचित्र आहे. ही समजूत बनवण्या पाठीमागे सुद्धा हानेमानची एक मजेशीर अंधश्रद्धा होती, परंतू या लेखापुरती आपण ती बाजूला ठेऊयात आणि ती समजूत काय आहे यावर लक्ष केंद्रित करूयात. या समजूतीनुसार, होमिओपॅथीचे औषध जसेच्या तसे दिले तर त्याचा परिणाम होत नाही किंवा उलट परिणाम होतो आणि त्यामुळे हे औषध नेहमी विरल करून, म्हणजे पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये अत्यंत कमी प्रमाणात टाकून दिले जावे. जेवढे औषध जास्त विरल तेवढा त्याचा परिणाम अधिक अशी महाअजब समजूत असल्यामुळे होमिओपॅथीचे कोणतेही औषध अत्यंत सौम्य करून मगच रूग्णाला देण्याची पद्धत आहे. या विरलीकरणाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये मूळ औषधाचा अतिशय छोटासा अंश बऱ्याच जास्त पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये) टाकला जातो, आणि व्यवस्थित ढवळून ते औषध साबुदाण्यांसारख्या दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्यांवर टाकून रुग्णाला दिले जाते. होमिओपॅथीची औषधे किती विरल असतात हे समजण्याकरिता आपण, जेम्स रॅंडी नावाच्या विज्ञानअभ्यासकाने केलेली एक सोपी आकडेमोड समजाऊन घेऊ. होमिओपॅथीच्या औषधांच्या बाटल्यांवरती १००C, २००C अश्या संख्या लिहिलेल्या असतात. या संख्या त्या औषधाची पोटेन्सी म्हणजेच परिणामकारकता दर्शवतात. आता ठराविक पोटेन्सीचे होमिओपॅथीचे औषध तयार करण्याची पद्धत साधारणपणे अशी आहे : एक भाग औषधी घटक घ्यायचा आणि तो ९९ (नव्व्याण्णव) भाग पाण्यात (किंवा अल्कोहोलमध्ये) टाकायचा आणि नीट ढवळायचा. हे झालं फक्त १C चं औषध. म्हणजे १C च्या औषधा मध्ये प्रत्यक्षात औषधाचे प्रमाण असते १:१०० (शंभरात एक भाग). म्हणजेच होमिओपॅथीच्या, १C पोटेन्सीच्या १०० साखर-गोळ्या खाल्या की पोटात गेलेले एकून औषध फक्त एका गोळी एवढे असेल ! आता या १C औषधाचा एक भाग घ्यायचा आणि तो ९९ भाग पाण्यात टाकायचा, की तयार झालं केवळ २C चं औषध. यात औषधाचे प्रमाण असेल १:१०००० (एक भाग औषध नऊ हजार नऊशे नव्व्याण्णव भाग पाणी किंवा अल्कोहोल). अश्याच पद्धतीने तयार केलेल्या २२C च्या औषधात औषधाचे प्रमाण असेल १:१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० !. म्हणजेच साधारण १ थेंब औषध आणि "एकावर चव्वेचाळीस शून्ये" एवढे थेंब पाणी किंवा अल्कोहोल ! हे प्रमाण किती कमी आहे हे समजण्यासाठी एक सोपी तुलना करू: पृथ्वीवरच्या सर्व समुद्रांत आणि महासागरांत मिळून पाणी आहे साधारण १०००००००००००००००००० (एकावर अठरा शून्ये) इतके लिटर. म्हणजे पृथ्वीवरील पाण्यामध्ये एकूण रेणू (पाण्याचा रेणू म्हणजे पाणी ज्या कणांचे बनलेले आहे तो कण) आहेत जवळपास १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर चव्वेचाळीस शून्ये). एका पाण्याच्या थेंबात साधारण १०००००००००००००००००००० (एकावर २० शुन्ये) इतके रेणू असतात. याचा अर्थ असा होतो की जर आपण जर पृथ्वीवरील संपूर्ण समुद्रात मिळून औषधाचा एक थेंब (हो फक्त एक थेंब!) टाकला आणि सगळे समुद्र व्यवस्थित ढवळून घेतले आणि मग त्यातली एक बाटली पाणी घेतले तरी होमिओपॅथीच्या मते हे अतिशय तीव्र औषध (२२C पोटेन्सीच्या १०००००००००००००००००००० पट तीव्र!) असेल आणि याला अजून बरेच विरल केल्याशिवाय घेता येणार नाही! म्हणजेच २२C चे होमिओपॅथीच्या औषध इतके विरल असते की औषधाचा फक्त एक रेणू पोटात जाण्यासाठी अगस्ती ऋषींच्या आख्यायिकेप्रमाणे सर्वच समुद्रांचे पाणी पिऊन टाकावे लागेल. साध्या नळाचे पाणी जरी एक पेला भरून प्यायले तरी यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात रसायने व क्षार पोटात जातात. आता हीच पद्धती आणखी पुढे नेऊन ४०C चे औषध तयार केल्यास औषधाचे प्रमाण किती असेल? तर ते असेल एक भाग औषधाला १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० (एकावर ऐंशी शून्ये) एवढे भाग पाणी! या संख्येच्या प्रचंडपणाचा अंदाज येण्यासाठी, हा प्रश्न विचारतो, सबंध विश्वातल्या अणूंची संख्या किती आहे? तर तीही आहे "एकावर ऐंशी शून्ये". ४०C मध्येच औषधाचे प्रमाण इतके कमी असेल तर हाच तर्क पुढे नेला की हेही सहज लक्षात येयील की १००C, २००C च्या गोळ्यांमध्ये औषध असण्याची काहीच शक्यता नाही. म्हणजेच १C, २C च्या गोळ्या खाल्या तर पोटात औषध जाण्याचा थोडा तरी संभव आहे पण १०C, १२C च्या पुढच्या गोळ्यांत तर कोणतेही औषध नसेल. या ऊलट होमिओपॅथीचे व्यावसाईक तर असा दावा करतात की जेवढी पोटेन्सी जास्त तेवढा औषधाचा परिणाम जास्त. एवढेच नव्हे तर त्यांची जवळपास सर्वच औषधे ३०C पेक्षा जास्तच पोटेन्सीची असतात (हानेमान स्वत:ही "३०C पेक्षा कमी पोटेन्सीची औषधे देऊ नयेत" असे सांगत असे :) ) होमिओपॅथी मध्ये फ्लू वरील उपचारांसाठी सर्रास वापरले जाणारे ऑसिलोकोसिनियम नावाचे औषध तर चक्क २००C चे असते. विरलपणा वाढवला की परिणामकारकता वाढते हाच तर्क लावायचा ठरल्यास आजिबात औषध न घेणारा रुग्णच औषधाच्या अतितिव्रतेने दगावायला हवा ! काही जण असाही दावा करतात की "आपल्या शरीरातील संप्रेरकांचं (Hormones) प्रमाण कितीतरी कमी असतं.. आणि तरीही ती (संप्रेरके) किती परिणामकारक असतात... हे होमिओपॅथीचे विरोधक कधीही विचारात घेत नाहीत!". परंतू खरी गोष्ट अशी आहे, की होमिओपॅथीच्या औषधांशी तुलना करायची असेल तर शरिरातील संप्रेरकांची तीव्रता महाप्रचंडच म्हणायला पाहीजे. आम्हाला माहीत असलेल्या संप्रेरकांमध्ये सर्वांत कमी प्रमाणात आढळणारे संप्रेरक घेतले तरी रक्ताच्या एका थेंबात त्याचे १०००००००००००० रेणू आढळतात. याउलट एक थेंब तर सोडा पण अगदी पृथ्वीवरील सर्व पाण्याइतके जरी होमिओपॅथीचे औषध घेतले तरी त्यात औषधाचा एक रेणू मिळण्याची शक्यतासुद्धा जवळपास शून्य असते. त्यामुळे "काट्याने काटा निघतो" हे होमिओपॅथीचे खरेतर चूक असणारे तत्त्व थोडावेळ बरोबर आहे असे गृहीत धरले, तरीपण आपल्याला माहीत असणाऱ्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या सामान्य कसोटीवर सुद्धा होमिओपॅथीची विरलनाची प्रक्रिया अजिबात टिकाव धरत नाही. आम्हाला बरेच लोक (आणि बऱ्याचदा होमिओपॅथीचे "डॉक्टरही!") असे सांगत असतात की, या औषाधांचा परिणाम का होतो हे जरी माहीत नसले तरी परिणाम होतो हे नक्की आहे. तर्कसंगत बोलायचे झाल्यास असे म्हणावे लागेल की जेव्हा जेव्हा असा परिणाम दिसतो तेव्हा तो एकतर मानसिक असतो किंवा मग बऱ्याचदा डोकेदुखी जशी आपोआप बरी होते तसा असतो. एवढे सगळे स्पष्ट असूनदेखिल जगातील कित्येक लोक आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी माहीत नसल्याने सर्रास होमिओपॅथीचा उपयोग करतात आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, स्वित्झरलॅंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये होमिओपॅथीवर अत्यंत कडक निर्बंध असले तरी इतर बऱ्याच देशांमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभा आहे (यात आपला भारत देश आघाडीवर आहे), आणि सर्वसामान्य लोकांना फसवण्याचा हा धंदा बिनदिक्कत चालू आहे. महाराष्ट्रात तर बऱ्याच आमदारांनी मिळून होमिओपॅथी डॉक्टरांना; ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना देता येतील असा कायदा नुकताच विधिमंडळात संमत केला आहे ! यामागे या होमिओपॅथीच्या धंदेवाईकांनी विकत घेतलेल्या राजकारण्यांचा स्वार्थ उघड असला, तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांना आता नुसत्या पाण्याऐवजी किमान खरे औषध तरी मिळू शकेल. मात्र ज्यावेळी विज्ञानात स्वत: काम करणारी मंडळी होमिओपॅथीचे जोरदार समर्थन करताना दिसतात त्यावेळी हसावे की रडावे हेच कळत नाही. ====================================================== तळटीप होमिओपॅथीचे समर्थन करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आजपर्यंत झालेले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना थोडेही यश मिळालेले नाही. परंतु यातला एक उल्लेखणिय प्रयोग केला होता तो "जॅकस बेन्वेनीस्त" (Jacques Benveniste) नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाने इ.स. १९८८ मध्ये. बेन्वेनीस्तचा (अर्थातच चुकीचा) दावा असा होता की होमिऑपॅथीच्या औषधांइतक्या प्रचंड विरल केलेल्या द्रावणामध्ये सुद्धा विरघळवलेल्या पदार्थाचे गुणधर्म शिल्लक राहतात. जसे काही ते पाणी, त्यामध्ये पूर्वी विरघळवलेल्या (आणि अतिषय विरल केलेल्या) पदार्थांना लक्षात ठेवते. या गुणधर्माला बेन्वेनीस्तने "वॉटर मेमरी" म्हणजेच पाण्याची स्मरणशक्ती असे नाव दिले. बेन्वेनीस्तचा दाखला देऊन होमिओपॅथीचे व्यावसायिक असं सांगू लागले, की होमिओपॅथीच्या औषधांचा परिणामही वॉटर मेमरी मुळेच होतो. परंतु हा प्रयोग बेन्वेनीस्तला परत करून दाखवायला सांगितला असता त्याला तो अर्थातच जमला नाही. नंतर असेही समोर आले की बेन्वेनीस्तच्या गटामधल्या काही शास्त्रज्ञांना होमिओपॅथीच्या व्यावसायिकांनीच लाच दिली होती. वॉटर मेमरी तपासण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर झाले, परंतु असा कोणताही गुणधर्म अस्तित्वात नाही हेच वारंवार सिद्ध झाले. "वॉटर मेमरी" हा शब्दही विज्ञानाच्या क्षेत्रात आजकाल फक्त एक चेष्टेचा विषय म्हणून शिल्लक राहिला आहे ====================================================== इतर नोंदी: (१) हा लेख मी आणि स्नेहल शेकटकर यांनी एकत्र मिळून लिहिला आहे. स्नेहलचे अनेक आभार. (२) हा लेख ब्लॉग वर पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. (३) हा लेख ज्यावेळी लिहीला होता त्यावेळी महाराष्ट्राच्या विधीमंडळात होमिओपॅथ्स ना अ‍ॅलोपॅथीची औषधे देता येतील असा कायदा संमत केला होता, त्यामुळेच या लेखात "नुकताच" असा उल्लेख आलेला आहे. (४) हा लेख लिहील्यानंतर काही महिण्यात, भारत सरकारने; १९९५ पासून कुटुंबकल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या "आयुष" या विभागाला स्वतंत्र मिनिस्ट्रीचा दर्जा प्रदान केला. आयुषमध्ये आयुर्वेद, युनानी सारख्या प्रणालींसोबत होमिओपॅथीचा ही समावेष आहे. (६) साधारण त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय आरोग्य परिषदेने जुन्या आजारंवर आणि गंभिर आजारांवर होमिओपॅथीचा ईलाज करू नये असा सल्ला दिला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41042 views

💬 प्रतिसाद (74)
ब
बाप्पू गुरुवार, 01/10/2019 - 16:24 नवीन
होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ? माझे उत्तर - 101% फसवेगिरी कारण - याची करणे आपण आपल्या लेखात स्पष्ट केली आहेतच. कोणत्याही वैज्ञानिक तत्वावर होमिओपॅथी खरी उतरत नाही. काही रुग्ण बरे होतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या plecibo effect मुळे. आणि त्याचे क्रेडिट होमीओपॅथ घेऊन आपले दुकान चालवत राहतात. माझ्या माहितीप्रमाणे होमिओपॅथी बद्दल एक ओपन चॅलेंज पण आहे (बहुधा होमिओपॅथी तील औषधातून "औषधं " नावाचा प्रकार शोधून काढण्याचे ) पण आज तागायत ते कोणी घेऊन पूर्ण नाही केलेलं. बऱ्याच देशात यावर बंदी आहे मग भारतात यावर बंदी का नाही? मेडिकल कोलेजेस काढून विद्यार्थ्यांना डॉक्टर ची डिग्री विकण्याचे दुकान चालवण्यासाठी. अश्या दुकानात ते लोक गिर्हाईक बनतात ज्याची शास्त्रीय पद्धतीने डॉक्टरकी करण्याची लायकी नसते. (सरळ सांगायचे तर ज्यांना डॉक्टर बनायचे आहे पण त्या लायकीचे मार्क नाहीत अशी मुले मुली )
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/10/2019 - 17:19 नवीन
माझा होमिओपॅथीशी संबंध "म्हैशींना चालते का हो तुमची होमिओपदी?" या पु.लं.च्या वाक्यापुरताच .... बाकी ह्या थोतांडावर माझा तरी विश्वास नाही. वरील बाप्पू ह्यांच्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझ्या मामेभावाचा वर्गमित्र (कॉमर्स शाखेचा) काही काळानंतर दवाखाना उघडून बसलेला ह्याची देही ह्याची डोळा बघितला आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 01/10/2019 - 19:45 नवीन
महाराष्ट्रात तर बऱ्याच आमदारांनी मिळून होमिओपॅथी डॉक्टरांना; ॲलोपॅथीची औषधे रुग्णांना देता येतील असा कायदा नुकताच विधिमंडळात संमत केला आहे ! यामागे या होमिओपॅथीच्या धंदेवाईकांनी विकत घेतलेल्या राजकारण्यांचा स्वार्थ उघड असला, तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांना आता नुसत्या पाण्याऐवजी किमान खरे औषध तरी मिळू शकेल.
ही समाधानाची बाब नसून, हा सगळ्यात भयंकर प्रकार आहे. हे म्हणजे सायकल पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला विमान दुरुस्त करण्याची परवानगी दिल्यासारखे आहे. कित्येक उदाहरणे आहेत ज्यामध्ये रुग्ण दगावला गेला आहे किंवा आजार पहिल्या स्टेज पासून अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहचला आहे. याचे कारण - रुग्ण शेवटपर्यंत मी बरा होईल या आशेने साबुदाण्याच्या गोळ्या खात बसला आहे किंवा चुकीची आधुनिक औषधे आणि उपचार घेत आहे. कुत्र्यांच्या छत्र्याप्रमाणे गल्लोगल्ली उघडलेली ही दुकाने बंद करून रुग्णांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ गुरुवार, 01/10/2019 - 22:17 नवीन
माझी मैत्रीण BHMS डॉक्टर आहे. तिची बहुतेक mbbs सारखी ४ वर्षाची डिग्री आहे. तिच्या (आणि अजून १-२ जणांकडून ) कडून ऐकलं आहे कि सर्जरी (अगदी छोटे टाके घालणं पण ) सोडून बाकीचा अभ्यासक्रम mbbs सारखाच आहे. थेअरी सगळी mbbs सारखी पण प्रॅक्टिकल नाही. तिला आधी इंजेकशन द्यायची परवानगी नव्हती. काहीतरी छोटा कोर्स केल्यावर ती मिळाली. नंतर ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला कसलातरी असिस्टंट चा जॉब करत होती. अर्थात माझी माहिती -जवळपास १०-१४ वर्षापुर्वीची आहे. पण हो BHMS न करता सुद्धा बरेच लोक होपीओपॅथी डॉक्टर होतात, कसे देव जाणे.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 01/11/2019 - 09:30 नवीन
pharmaceutics. pharmaceutical chemistry. therapeutics. हे विषय त्यांच्या अभ्यासक्रमात नसतातं थोडक्यात ती खोटे बोलत आहें
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/11/2019 - 00:41 नवीन
प्रथम एक सांगावेसे वाटते की ही एक शैक्षणिक चर्चा आहे. रुग्णाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास "माझं दु:ख डॅाक्टरला सांगितलं, त्याने एक औषध दिलं आणि साताठ दिवसांत फारसा त्रास आणि खर्च न येता मी बरा झालो." एवढंच अपेक्शित असतं. काही दुखण्यांबाबत ते खरं आहे हे म्हणूनच होमिओपथी टिकून आहे. डॅाक्टरचं महत्त्व आणि काम म्हणजे रोगनिदान करणे. हे शिक्शण मिळण्यासाठी त्यास चारपाच वर्षं शरीरशास्त्र शिकावं लागतं. तोच डेथ सर्टिफिकेट देऊ शकतो. निदानानंतर उपल्ब्ध औषधांतून निवडून योग्य प्रमाणात ते देणं. मग होमिओपथीला मान्यता मिळण्याला विरोध का असावा? एखाद्याच्या औषधाने बरे होत नसल्यास ते उपचार सोडून देण्याचं स्वातंत्र्य रुग्णांना आहेच. काही वेळा पोटेन्सीची औषधे न देता हो० डॅा० ते मदर टिंक्चरही वापरतातच.
  • Log in or register to post comments
व
वगिश Fri, 01/11/2019 - 02:22 नवीन
Snehal Shektkar from Kopargaon?
  • Log in or register to post comments
श
शरद Fri, 01/11/2019 - 03:33 नवीन
मिपावर या विषयावर एक लेख आला आहे. https://www.misalpav.com/node/28925 शरद
  • Log in or register to post comments
व
विकास... Fri, 01/11/2019 - 14:19 नवीन
लिंक मिपाच्या घरी जातेय.
  • Log in or register to post comments
स
संपादक मंडळ Fri, 01/11/2019 - 15:53 नवीन
ती लिन्क आता दुरुस्त केली आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/11/2019 - 07:34 नवीन
हल्लीच्या डॉक्टरी -'अ‍ॅलोपॅथी' क्षेत्रातील धंदेवाईक लुटारू टोळ्यांच्या दुष्टचक्रात जन्मभर अडकण्याच्या भितीपायी लोक होमियोपाथी सारख्या निरुपद्रवी/अल्पकालीन उपचारांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याखेरीज अ‍ॅलोपॅथीचा इलाज अयशस्वी ठरल्यानंतर होमियोपाथीच्या इलाजाने बरे झालेले अनेक लोक आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/11/2019 - 08:48 नवीन
आजकाल पो बी.जे.पी. अ‍ॅन्टी बी.जे.पी./प्रो दिक्षीत अँटी दिक्षीत वगैरे बुद्धीभ्रम सगळ्या सोशल मिडीयावर चालत असल्याने लेखातील मते खरी आहेत की खोटी या वादात न पडता मला जे दिसले ते सांगतो. वर चित्रगुप्त साहेबांनी म्हटल्याप्रमाणे खर्चिक आणि धंदेवाईक अ‍ॅलोपथीवाल्यांचा अनुभव घेउन झाल्यावर मी ही काही वेळा होमिओपथीकडे वळलो आहे आणि माझा अनुभव (आणि मला मिळलेले डॉक्टर) फार चांगला आहे. बालदमा किंवा जुनाट दमा, कोरडा खोकला किंवा कसल्यातरी अ‍ॅलर्जी , अनियमित पाळी ,पांढरे कोड अशा बाबतीत रुग्णांना योग्य गुण आलेला बघितला आहे आणि उपचाराचा खर्च कमी आहे. पण शेवटी शहाण्या माणसाने कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी शक्यतो चढु नये (म्हणजे तशी वेळ येउ देउ नये) अशा मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 01/11/2019 - 09:11 नवीन
हा प्रश्न फक्त होमिओपॅथिशी निगडीत नसुन सव्र पॅथीशी निगडित आहे. Lancet मधिल भारतिय डाॅक्टरांशी संबधीत report वाचला कि लक्षात येइल. ह्याला मालप्रॅक्टीस असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 01/11/2019 - 09:48 नवीन
मी मात्र होमिओपॅथी उपचारांचा जो अनुभव घेतला आहे तो उत्तम आहे. लहान मुलांचे छोटे मोठे आजार तसेच ऍलर्जी वगैरे गोष्टींसाठी मला तरी होमिओपॅथी आवडते.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 01/11/2019 - 10:15 नवीन
या विषयाची ek बाजू मी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितलीच आहे. पण दुसरी बाजू देखील आहे जी इथे बरेच लोक सांगताहेत. कित्येक रुग्ण ऍलोपॅथी आयुर्वेदिक आणि इतर उपचार करून शेवटी होमिओपॅथी कडे वळले आणि बरे देखील झाले. हे प्रमाण फार थोडे आहे पण निश्चित च असे का होते यावर सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. माझ्या मते प्लॅसिबो इफेक्ट आणि पथ्य पाणी हेच कारण असावे. काही रुग्ण बरे झाले म्हणून होमीओपॅथी चांगली आणि खरी असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. शास्त्रीय कसोट्यांवर या गोष्टी सिद्ध व्हायला हव्यात. माझ्या एक नातेवाईकांना माणकेदुखी मुळे उठता येणे शक्य होत नव्हते. सारखे झोपून राहिल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. त्यांचे वय 85 च्या आसपास असल्यामुळे ऑपेरेशन करणे शक्य नव्हते. घरच्यांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. पण होमीओ पॅथी ची औषधे सुरु केल्यावर त्या पुढे 1.5 वर्षे जगल्या आणि थोडी फार चालणे फिरणे देखील शक्य झाले. पण हा अनुभव म्हणजे होमीओ पॅथी च्या सत्यतेचा पुरावा होऊ शकत नाही. म्हणूनच - जेव्हा इतर उपचार पद्धती हार मानतात तेव्हा आणि फक्त तेव्हाच होमिओपॅथी चा विचार करावा. किंवा इतर औषधोपचार चालू असताना आणखी एक सपोर्ट म्हणून होमिओपॅथी चा विचार करावा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/11/2019 - 10:26 नवीन
माझ्या नाकाचा वारंवार घोळणा फुटायचा. अनेक अ‍ॅलोपदी डॉक्टर झाल्या नंतर होमिओपदीस शरण गेलो. २०० पानी वही भरुन जाईल इतकी माझी चिकित्सा केली गेली. जवळ जवळ ६ महिने साबुदाण्याच्या गोळ्या खाल्या. पण त्या नंतर गेली २० वर्षे हा त्रास कधीही झाला नाही. हानेमनने ही समजूत कोणताही वैज्ञानिक पद्धती न वापरता स्वत:च्या लहानश्या अनुभवावरून ठरवली होती, आणि त्यानंतरही आजतोपावेतो कोणालाही ही समजूत वैज्ञानिक साच्यात बसेल अशा पद्धतीने सिद्ध करता आलेली नाही. मात्र बऱ्याच लोकांचा याला प्रचंड पाठींबा आहे असे आम्हाला दिसून आले आहे. काट्याने काटा निघतो किंवा विषच विषाला बरे करते असा सरळधोपट तर्क हे लोक मांडतात. हा न्याय जर सगळ्या बाबतीत सत्य आहे असे मानायचे असेल तर मग विष प्यायलेल्या व्यक्तिला अजून विष पाजून बरे करता यायला हवे! विज्ञान अशा विचित्र कल्पनांवर चालत नाही. अधुनिक विज्ञानवादी हा दावा सरसकट करतात. विषेशतः होमिओपदी किंवा आयुर्वेदाच्या उपचारांवर टीका करताना वरील दावा केला जातो. पण अधुनिक विज्ञानाला अजुनही बर्‍याच गोष्टींची उत्तरे देता आलेली नाहीत. त्या मुळे विज्ञानाच्या कसोटी तरी कितपत व्यवहार्य आहेत हे कसे तपासायचे? प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर उतरवुन दाखवा असे म्हणणे म्हणजे माशाला झाडावर चढायला सांगण्यासारखे आहे. ज्याला होमिओपदी पटत नसेल त्याने ती नये वापरु, पण म्हणुन त्यावर सरसकट बंदी आणावी हे काही पटत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/11/2019 - 12:16 नवीन
माझ्या मित्राच्या मुलीच्या (वय ६) अंगभर पुरळ उठायचे आणि मग ती रक्त येईपर्यंत अंग खाजवत रहायची. इतके की शेवटी तिच्या हातांना चिंधि / फडके गुंडाळुन ठेवावे लागायचे. अनेक अलोपदी डॉक्टर झाले ४० ते ५० हजार रुपयांच्या टेस्ट झाल्या, अनेक मलमे झाली त्यातली काहीतर १००० रुपयांच्या पुढे होती. सहा महिन्यात एकूण खर्च दोन लाखांच्या पुढे गेला असेल. पण काही फरक पडत नव्हता. उलट बिचारीचे दुखणे वाढतच होते. खाजेनी ती रात्रभर रडायची. त्यामुळे मित्राचे कुटूंब पण त्यामूळे सैरभैर झाले होते. एक दिवस त्यांना कुठून तरी एक वैद्यबुवा भेटले त्यांनी मुली कडे फक्त पाहिले (हात सुध्दा लावला नाही) आणि म्हणाले की तिच्या खाण्यातले गोडेतेल आणि तुरडाळ बंद करुन पहा. इतके उपाय झाले होते तर हा पण करु असे म्हणुन मित्राने तेल बदलले व डाळ माळ्यावर टाकून दिली. दुसर्‍या दिवसा पासूनच फरक दिसायला लागला आणि आठवड्याभरात लेकरु पूर्ण बरे झाले. खाज बंद झालीच आणि महिन्याभरात त्वच्या पूर्वी सारखी निर्मळ झाली. वैद्यबुवांनी हे सगळे फक्त एक कप चहाच्या बदल्यात केले. हा पण प्लासीबो इफेक्टच आहे का या वर जाणकारांनी प्रकाश टाकावा. (जगातली सर्व अक्कल केवळ इंग्रजांकडे आणि आमचे पूर्वज मात्र निव्वळ गाढव असे अजिबात मानत नसलेला) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 01/11/2019 - 14:42 नवीन
वैद्य आयुर्वेदिक असतील असे गृहीत धरतो. हेतूंवर, निदान पद्धतींवर अत्यंत खोलवर आणि ओरिजिनल विचार चरकादी लोकांनी केलेला आहे. उच्चकोटींची वैचारिक क्षमता आणि अनुभव, निरीक्षणं यातून हे घडलं आहे. हे करताना साकल्याने विचार कसा करावा हे अभ्यासण्यासाठी मुद्दाम चरक वगैरे वाचावेत. शास्त्र (थिअरी चा प्रतिशब्द म्हणून) म्हणून आयुर्वेद संपूर्ण आहे. आणि अश्या प्रकारच्या केसेस आधुनिक वैद्यकातल्या वैद्यांना सोडवायला जमत नाही हे मी नक्कीच सांगू शकतो(रोगनिदानातले साकल्य हा भाग ह्या अभ्यासक्रमात कसा शिकवतात ते माहीत नाही)
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 01/11/2019 - 14:44 नवीन
हा तर खूप अलीकडचा शब्द झाला. मानसभावाचा आयुर्वेदाने विस्तृत विचार केलेला आहे. गरज असेल तेव्हा प्लासीबोचीही सोय करून ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/14/2019 - 07:42 नवीन
प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर उतरवुन दाखवा असे म्हणणे म्हणजे माशाला झाडावर चढायला सांगण्यासारखे आहे.
प्रत्येक गोष्टींचे मापक / मोजपट्ट्या वेगवेगळ्या असतात. अंतर किलोग्रॅम्मधे कसे मोजता येईल. तसेच होमीऑपाथी मुळे जी मनोचिक्त्सिका केली जाते ती कशी मोजायची. मी होमीऑपाथी चा समर्थक नाहिय्ये. पण कुतुहलापोटी एक पुस्तक वाचत असता त्यात कालीमूर या क्षार चिकीत्सेत रोगाची लक्षणे " स्वप्नात मांजरे दिसतात" अशी दिलेली होती. ही लक्षणे हा आजार कसा असू शकतो हे ठरवण्या साठी हल्ली तरी एकोणतेच मोजमाप दिसत येत नाही. स्टेटेस्टिकस कितपत खरे मानायचे हे ही वादग्रस्त आहे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/11/2019 - 10:57 नवीन
शास्त्रीय कसोट्यांवर या गोष्टी सिद्ध व्हायला हव्यात.
... हे सिद्ध होणे नेमके कुणाला आणि कश्यासाठी हवे आहे ? व्याधि झेलणाराला येनकेनप्रकारे बरे व्हायचे असते, मग ते शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झाले असो वा नसो. आणि शास्त्रीय कसोट्यांची प्रमाणिता कशी ठरवायची ? अमूक एका कंपूने ठरवलेले निकष सर्वांनी का मानायचे ?
जेव्हा इतर उपचार पद्धती हार मानतात तेव्हा आणि फक्त तेव्हाच होमिओपॅथी चा विचार करावा.
हार मानण्यापूर्वी होणारा अमाप खर्च, मनस्ताप, दगदग, कुटुंबियांना होणारा त्रास, औषधांमुळे होणारे दुष्परिणाम, काही समस्यांच्या बाबतीत महागडी औषधे जन्मभर बोकांडी बसणे, हे सर्व कशासाठी करायचे ? ज्यांना होमियापाथी - वा अन्य उपचार्पद्धती - समाधानकारक वाटत असेल, त्यांनी हे सर्व का म्हणून करायचे ? आम्हा उभयतांना एकदमच काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया झाला होता. त्यावेळी इकडे तशी साथ आलेली होती. ज्या ज्या लोकांनी अ‍ॅलोपाथी औषधे घेतली, त्या सर्वांना अजून गुडघेदुखी वगैरे त्रास होत आहे. आम्ही सुरुवातीचे फक्त दोन दिवस होमियो औषधे घेतली. तापाची मुदत संपल्यावर आम्ही अगदी लवकर खडखडीत बरे झालो.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 01/11/2019 - 11:22 नवीन
माझ्या पत्नीचे हिमोग्लोबिन ५ होते. ऍलोपॅथिक उपचार १ वर्ष घेतले काही फरक पडला नाही. काही शरीरांच्या बाबतीत असे होऊ शकते असे आधुनिक वैद्यकच सांगते . कारण नैसर्गिक दोष वयपरत्वे असा येऊ शकतो की लोहाला शरीरात स्वीकारण्याची एकाद्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे होमिओ पथिक उपचार चालू केले . पत्नीच्या भावजयीला देखील हिमकोग्लोबीं बाबतीत होमिओपॅथीने उत्तम अनुभव आल्याने मी मनाविरुद्ध का होईना तयार झालो. पहिल्याच दिवशी वैद्याने जणू पैजेवर साम्गितले की गूण येणारच .तीन महिने झाले . महिन्यास २००० चे औषध लागते . ३ महिन्यानंतर हिमोग्लोबिन ७.१ आहे . तीन महिन्यात वाढच दिसली आहे पण फार धीमी . माझया सारखा अति चिकित्सक हाही कोड्यात पडला आहे . अर्थात समजा त्याने १० पर्यंत हिमो वाढवून दिले व औषधा बंद करताच ते पुन्हा ५ आले तर प्लॅसिबोच असे मी म्हणेन .
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/11/2019 - 14:15 नवीन
@चौरा: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी चुकंदर (लाल बीटरूट) पालक आणि शेपू यांचे ज्यूस किंवा स्मूदी नित्य प्यायल्याने हिमोग्लोबिन ११ पर्यंत वाढल्याचे अगदी माझ्या घरातलेच उदाहरण आहे. अवश्य करून बघा. याशिवाय लिंबू, अक्रोड, मोड आणलेली कडधान्ये, केळी, डाळिंब, खजूर, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, कलिंगड वगैरेंबद्दल खालील लेखात वाचा: https://www.ndtv.com/food/9-foods-that-can-help-increase-haemoglobin-1828770
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 01/12/2019 - 00:44 नवीन
आहारात लोह देणारे सर्व घेऊनं पाहिले .हा बी १२ कमतरतेचा भाग आहे व शाकाहारी माणूस बी १२ च्या बाबतीत दुर्दैवी असतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 01/11/2019 - 11:40 नवीन
असा विषय आलाय (किंवा मी वाचलाय म्हणा). माझा काही सोपे प्रश्न . १. अलोपाथी सोडून अन्य काही मार्गाने रुग्ण बरा होतो हे अलोपाठी वाल्यांना मान्य आहे का ? २. शेकडो हजारो लोकांना गेली कित्येक वर्षे आणि आजही वेगवेगळ्या उपचार पद्धतीनी चांगला गुण येतोय. हि पद्धती जर अलोपाठी नसेल तर तो प्लासिबो इफेक्ट आहे असे पट्कन का ठरवले जाते ३. कोणत्याही प्रचलित गोष्टीनमध्ये काही गृहीतके, श्रद्धा, समज, प्रत्यक्ष प्रमाण, नियम, अपवाद, सिद्धांत, विचारसरणी आदी गोष्टींचा समावेश असतो आणि त्याची एक चौकट असते. तथापि चौकटी बाहेर जेजे आहे तेते अस्तित्वातच नाही किंवा ते खोटे आहे हा हट्ट बालिश आहे. ४. ५+४ = ९ आणि ६+३ = ९ हे दोन्हीही शक्य आहे ह्यातील ९ उत्तर येण्याचे एकच समीकरण खरे असे म्हणून चालणार नाही ५. शास्त्रीय शास्त्रीय शास्त्रीय कसोट्या म्हणजे नेमके काय ? जे पुन्हा पुन्हा सिद्ध करता येते फक्त तेच शास्त्रीय? ज्या गोष्टींची कारण मीमांसा देता येते फक्त तेच शास्त्रीय? एखाद्या विशिष्ट घटना क्रमाला नाकारणे हे शास्त्रीय का त्यातील कार्यकारण भाव शोधणे हे शास्त्रीय ? ६. पुस्तकात छापून आलेले खरे का प्रत्यक्ष प्रमाण हे खरे ? सध्या एवढेच पुरे
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 01/11/2019 - 15:36 नवीन
1) allopathy वाल्यांना हे मान्य आहे. 2)असे पटकन ठरवले जात नाही. वेगवेगळ्या loby त्यासाठी काम करत असतात. हा सगळा धंद्यासाठीचा प्रयत्यन असतो. 3) बरेचसे आजार हे Allopathyच्पा scope पलीकडे असतात. त्यात मानसिक आजार. वेदना. अर्धशिशी वगैरे आजार येतात. 4) Hollistic ऊपचार बरेचदा चांगले result देतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 08:31 नवीन
१. अलोपाथी सोडून अन्य काही मार्गाने रुग्ण बरा होतो हे अलोपाठी वाल्यांना मान्य आहे का ? कोणतीही उपचार पद्धती परिपूर्ण नाही. आणि माणूस नैसर्गिक प्रतिकार शक्ती आणि स्वतः बरा होण्याच्या शक्तीमुळे बरा होतच असतो. कोणतीही उपचार पद्धती हि या नैसर्गिक शक्ती पेक्षा जलद काम करत असेल किंवा जेंव्हा नैसर्गिक प्रतिकार शक्ती काम करत नसेल अशा वेळेस उपयुक्त ठरते आहे असे सिद्ध झाले पाहिजे. असे सिद्ध करण्यात एखादी उपचार पद्धती जेंव्हा सातत्याने अयशस्वी होते तेंव्हा ती उपयुक्त आहे असे कसे म्हणावे. २. शेकडो हजारो लोकांना गेली कित्येक वर्षे आणि आजही वेगवेगळ्या उपचार पद्धतीनी चांगला गुण येतोय. हि पद्धती जर अलोपाठी नसेल तर तो प्लासिबो इफेक्ट आहे असे पट्कन का ठरवले जाते. कोणत्या रोगाला होमियोपॅथीने हटकून गुण येतोच असे सिद्ध झाले आहे? आधुनिक उपचार पद्धतीत असे शास्त्रीय ( जीवशास्त्रीय नाही तर भौतिक आणि रसायन शास्त्रीय आणि संख्या शास्त्रीय) कसोट्यांवर सिद्ध करता येते. ३. कोणत्याही प्रचलित गोष्टीनमध्ये काही गृहीतके, श्रद्धा, समज, प्रत्यक्ष प्रमाण, नियम, अपवाद, सिद्धांत, विचारसरणी आदी गोष्टींचा समावेश असतो आणि त्याची एक चौकट असते. तथापि चौकटी बाहेर जेजे आहे तेते अस्तित्वातच नाही किंवा ते खोटे आहे हा हट्ट बालिश आहे. ते अस्तित्वात नाही असे म्हणणे नाहीच पण जो माणूस ते अस्तित्वात आहे अस दावा करतो त्याने तो दावा सत्य आहे हे सिद्ध करायला नको का? संजय गांधी उद्यानात जिराफ आहे असे सांगणार्याने एक तरी जिराफ दाखवायला हवा कि नको? कारण जिराफ नाहीच हे सिद्ध करणे जास्त कठीण आहे ४. ५+४ = ९ आणि ६+३ = ९ हे दोन्हीही शक्य आहे ह्यातील ९ उत्तर येण्याचे एकच समीकरण खरे असे म्हणून चालणार नाही मान्य पण म्हणून ५ पेरू + ४ बटाटे हे ९ पेरू किंवा ९ बटाटे असे कसे म्हणता येईल? ५. शास्त्रीय शास्त्रीय शास्त्रीय कसोट्या म्हणजे नेमके काय ? जे पुन्हा पुन्हा सिद्ध करता येते फक्त तेच शास्त्रीय? ज्या गोष्टींची कारण मीमांसा देता येते फक्त तेच शास्त्रीय? एखाद्या विशिष्ट घटना क्रमाला नाकारणे हे शास्त्रीय का त्यातील कार्यकारण भाव शोधणे हे शास्त्रीय ? एखाद्या गोष्टीची( येथे औषधाच्या परिणामकारकतेची) मीमांसा देता येत नसेल पण ते औषध सलग हजारो रुग्णात गुणकारी ठरते आहे असे शास्त्रीय आणि सांख्यिक कसोटीवर सिद्ध करता येत असेल तर आधुनिक वैद्यकशास्त्र ते गुणकारी आहे हे मान्य करते. अशी स्थिती आजतरी होमियोपॅथी ची नाही. ६. पुस्तकात छापून आलेले खरे का प्रत्यक्ष प्रमाण हे खरे ? आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पुस्तकात छापून आलेले हे १०० % खरे सिद्ध होणार नाही कदाचित, पण सध्या उपलब्ध असणाऱ्या पुराव्यानुसार ते खरे मानता येईल इतका पुरावा उपलब्ध असतो. प्रत्यक्ष प्रमाण एका रुग्णाला आले म्हणजे ते सर्वाना येईल असे नाही मग एखादया कर्करोगाच्या/ किंवा तत्सम दुर्धर रोगाच्या रुग्णाला सिद्ध न करता येणाऱ्या खोट्या दाव्या मुळे उपचारास अक्षम्य विलंब झाला तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? (असे असंख्य रुग्ण मी पाहत आलो आहे.)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/11/2019 - 12:51 नवीन
सध्या रुग्णांनाही आणि सोयऱ्यांनाही "मला कसा मोठ्ठा रोग झाला,कशा महागड्या चाचण्या केल्या,अन कशी महागडी ट्रिटमेंट घेतली" हे सांगायची हौस आहेच. तर चालू दे ना. आपण आपलं बघायचं,पुज्य मोजायची नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विकास... Fri, 01/11/2019 - 14:16 नवीन
अत्यंत आभारी आहे या विषयावर लेख काढल्याबद्दल !! बरेच दिवस होमियोपॅथी वर लेख शोधात होतो. मिपा वर जाणकार लोकांनी होमियोपॅथी आणि खालील विषय याबद्दल अधिक माहिती द्यावी. Fungal Infection (ओला/कोरडा नायटा) असे समजते कि ७०% लोकांना हा त्रास आहे. Psoriasis (?) Immune Power/System (प्रतिकारशक्ती / रोगप्रतिकारशक्ती)
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 01/11/2019 - 18:34 नवीन
ऊपाय: करंज तेल लावणें. खोबरेल तेलात कापुर विरघळवुन ते तेल लावणे.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 01/11/2019 - 18:46 नवीन
वाढवण्यासाठी : धुतपापेश्वरचा च्पवनप्राश सेवन करणे. बाबा रामदेव नको चिंचोक्यापासुन बनवतात. कमी करण्यासाठी : ऐरंड तेल सोसेल इतके रोज पोटात जावु देणे. संधिवातासारख्या विकारात हे ऊपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/11/2019 - 14:40 नवीन
हा थोडासा देव आहे की नाही, श्रद्धा अंधश्रद्धा सारखा काठावर असलेला विषय आहे.. देव आहे की नाही हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करणे शक्य नसले तरी ज्यांना देव किंवा तत्सम अतींद्रिय अनुभव येतात ते असले शास्त्र फाट्यावर मारतात. तसेच काहीसे होमिओपॅथी चे पण आहे. माझ्या आजी आजोबांचा जुनाट दमा या प्लासीबो गोळ्यांनी बरा झालाय, आणि ते पण त्यांना आपण औषध खातोय हे माहीत नसताना माझा मलेरिया तिसऱ्या पाळीला ताप येता येता निदान करून औषध दिले, तिथेच ताप थांबला, 1 तासात पूर्ण बरा झालो.. असेलही प्लासीबो, but I dont care आता, काही गोष्टी कोणत्याच शास्त्राने दुसऱ्या शास्त्राला कमी लेखू नये.. या तीनही पॅथीचे डॉ हे सर्रास करताना दिसतात. ज्यामुळे गैरसमज अधिक वाढत जातात. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यावर तुम्ही गोळ्या खात बसाल की ऍडमिट व्हाल? या आपल्या मर्यादा ज्याला कळतात तो डॉक
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 02/02/2019 - 15:58 नवीन
+१ नंबर बोललात आनंदा साहेब .. पटलंय आणि स्वतः अनुभवलंय पण .. ऍलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोघांनाही मी मानतो किंबहुना जवळून अनुभवलंय म्हणून तर आईच्या आजारपणाच्या वेळी मी वरळीहून अंबरनाथला जायचो होमिओपॅथीची औषधे आणायला .. अनुभवही छान आले .. मला वाटत . आपण समोरच्या डॉक्टरला निदान सांगून तरी बघावे कि बाबा रे मी हे पण चालू ठेवले आहे जर त्याला काही आक्षेप असेल तर दुसरा सोयीस्कर मार्ग शोधावा ..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 01/11/2019 - 14:55 नवीन
एकंदरीत निष्कर्ष म्हणजे आधुनिक पद्धतीने सिद्ध होउ न शकलेली , काहींना उपाय झालेली काहींना उपाय न झालेली ही उपचारपद्धती आहे. आधुनिक वैद्यकीय शास्ताप्रमाणे याचे साईड इफेक्ट आहेत का ? रच्याकने वजन कमी करायला होमीओप्याथी आहे का ? (गाजराची पुंगी ;-) )
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 02/03/2019 - 04:32 नवीन
पुढे काय होणार, अन्न मिळणार का नाही या विवंचनेतून काहींचे शरीर अन्न चरबीरूपात साठवत असेल तर रोग म्हणता येणार नाही. मग त्यावर औषधही कसे असेल?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/03/2019 - 04:44 नवीन
"चरबी वाढणे" हे लक्षण शरीरात तीव्रतेने निर्माण करु शकणाऱ्या द्रव्याचे (उदा:श्रीखंड, गुलाबजाम अशा अन्नाचे) अंश घेऊन ते १०० x १०० x १००.... अशा पटीत नाहीसे होइपर्यंत विरळ केल्यास "चरबी कमी करणे" यासाठीचे औषध बनावे. ;-)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/03/2019 - 09:49 नवीन
:) हे कसे काय कोणाच्या ध्यानात आले नव्हते अजून ?!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 02/04/2019 - 06:25 नवीन
हहपुवा.... मस्त उपाय. पेटंट करून घ्या...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 05:45 नवीन
कोणत्याही पॅथीवर (उपचारपद्धती) टीका न करता काही वस्तुस्थिती १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा आपली आयुर्मर्यादा ३२ वर्षे होती आणि आता २०१८ मध्ये ती ७१ झाली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र सोडले तर इतर उपचारपद्धतीमध्ये गेल्या ७१ वर्षात फारसा बदल झालेला नाही म्हणजेच आपली आयुर्मर्यादा दुपटीपेक्षा जास्त झाली आहे याचे कारण इतर कोणतीही उपचारपद्धती नसून आधुनिक वैद्यकशास्त्र आहे हे स्पष्टच आहे. आपल्या हातापायाला जखम झाली तर कोणताही उपचार न करता ती बरी होते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि नैसर्गिकरित्या रोग बरा होण्याची क्षमता प्रत्येक प्राणीमात्रात असतेच. याच कारणासाठी कोणत्याही उपचारपद्धतीने रोग हा नैसर्गिकरित्या रोग बरा होण्याची क्षमतेपेक्षा लवकर बरा झाला तरच ती उपचार पद्धती उपयुक्त आहे असे म्हणता येईल. असा तुलनात्मक अभ्यास करून कोणत्याही उपचारपद्धतीने रोग लवकर बरा झाला हे स्पष्टपणे सिद्ध करणे आवश्यक असते. जगभरात केलेल्या अशा असंख्य अभ्यासात होमियोपॅथी सपशेल नापास झालेली आहे. उदाहरण म्हणून देतो-- काविळ हा रोग जर विषाणूमुळे झाला असेल तर ९९ % रुग्णांमध्ये तो नैसर्गिक रित्या बरा होतोच. कोणात थोडा अगोदर कोणात थोडा नंतर. जर १००० रुग्ण घेतले आणि वय, उंची, वजन, लिंग आणि प्रांत यात साम्य असणारे दोन गट केले आणि त्यापैकी ५०० जणांना औषध दिले आणि ५०० जणांना त्याच रंगाच्या औषध नसलेल्या गोळ्या दिल्या. आणि जर औषध दिलेल्या लोकांची कावीळ ५ दिवसात बरी झाली आणि न दिलेल्या रुग्णांची कावीळ १० दिवसांनी बरी झाली तर ते औषध नक्कीच गुणकारी आहे असे दाखवता येईल. (STATISTICALLY SIGNIFICANT). उगाच एका गटाची ५ दिवसात आणि दुसऱ्या गटाची सव्वापाच दिवसात बरी झाली तर तो केवळ दैवयोग आहे (STATISTICALLY IN SIGNIFICANT) होमियोपॅथी मध्ये आम्ही प्रतिकार शक्ती वाढवतो असा दावा करतात. पण प्रतिकारशक्ती वाढवतो म्हणजे नक्की काय? याचे ठोस उत्तर त्यांच्याकडे नाही. पांढऱ्या पेशी वाढतात का? नाही. त्या पेशींची मारक क्षमता वाढते का? नाही. रोग होण्याचे प्रमाण कमी होते का? तसे सांगता येत नाही. मग बाबा किंवा महाराजांच्या अंगाऱ्याने स्वामींची उदी लावली आणि ताप उतरला सांगणारे किती तरी लोक असतात. मग त्यांच्यात आणि या उपचार पद्धतीत फरक काय? बाबा गुरमीत राम रहीम सिंह यांनी पण अनेक रुग्ण बरे केले आहेत ( असा त्यांच्या भक्तांचा दावा आहे) कदाचित श्रद्धेचा फरक आहे. एखाद्या माणसाला एखाद्या औषधाचा गुण येतो म्हणून तो दुसऱ्याला येईलच असे नाही हे स्पष्ट आहे. क्रोसीन देऊन बहुसंख्य लोकांचा ताप अर्ध्या तासात उतरतो. पण काही लोकांचा उतरत नाही. याचे कारण त्या माणसाचे ताप निर्माण करणाऱ्या क्रियेचे विकर (एंझाइम)(COX -३) वेगळ्या रचनेचे असतात. अशा माणसाला ब्रुफेन/ डायक्लोफेनॅक दिले कि लगेच ताप उतरतो. पण हे सिद्ध करून दाखवता येते. असे कोणतेही सैद्धांतिक अधिष्ठान होमियोपॅथीला नाही. केवळ मला अनुभव आला हे मला भूत दिसले या तर्हेचे विधान आहे. कारण तो अनुभव माझ्या दृष्टीने "खराच" असतो. मूळ मुद्दा असा आहे कि सरकार जर उपचारपध्द्ती साठी पैसे खर्च करणार असेल तर त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसले पाहिजेत. उगाच एखादा हा धंदा उत्तम आहे म्हणतो म्हणून तुम्ही कोणत्याही धंद्यात पैसे टाकणार का? त्यातून मिळणार नफा कसा आणि कधी मिळेल याच काहीतरी हिशेब असले पाहिजेत. असे सगळेच्या सगळे हिशेब होमियोपॅथीबद्दल जगभर चुकलेले आहेत. यास्तव जगभरात आरोग्य विमा कंपन्यांनी किंवा सरकारानी या उपचार पद्धतीला पैशाचा परतावा देणे थांबवले आहे. बहुसंख्य लोकांचे अनुभव या कहाण्या असतात. त्या दुसऱ्या रुग्णाला बहुतांश लागू पडतच नाहीत. इतर कोणतीही उपचारपद्धतीचे असंख्य रुग्ण मी पाहत आलो आहे. जे रोग स्वतःहून बरे होणार आहेत त्याबद्दल इतर कोणतीही उपचारपद्धती घेतल्यानेच ते बरे झाले आहेत असा छातीठोक दावा करणारे इतर उपचारपद्धतीचे व्यावसायिक जेंव्हा स्वतःवर पाळी येते तेंव्हा आधुनिक वैद्यकशास्त्राचीच कास धरताना आढळतात. बाकी मुतखडा, पित्ताशयातील खडा, कर्करोगसारखे स्पष्टपणे दिसणारे रोग बरे होताना माझ्या २७ वर्षाच्या अनुभवात दिसलेले नाही. मी व्यवसाय सुरु केला तेंव्हा पासून गेल्या १० वर्षात माझ्या कडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्येक चाचणीच्या प्रतिमा आणि अहवाल(IMAGES AND REPORTS) माझ्या संगणकावर आहेच तेंव्हा त्यांचे अगोदरचे अहवाल आणि आत्ताचे ताडून पाहिले असताना मला एकही रुग्णात याचा परिणाम दिसून आलेला नाही. शिवाय वैद्यकीय नीतितत्त्व( ETHICS) प्रमाणे मी कोणत्याही डॉक्टरचे पैसे घेत नाही त्यामुळे माझ्या पंचक्रोषीतील अनेक डॉक्टर माझ्याकडे परत परत येतात तेंव्हा त्यांच्या स्वतःच्या अहवालात काहीही फरक जाणवत नाही हे पाहून ते माझ्याशी याबद्दल वाद घालू शकत नाहीत. बाकी ते व्यवसाय करत आहेत तेंव्हा आमची उपचार पद्धती निकामी आहे हे ते कधीही कोणत्याही रुग्णाला सांगणार नाहीतच. सर्वात वाईट स्थिती आहे ती होमीयोपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयांची. होमियोपॅथी मध्ये तिसऱ्या वर्षात अभ्यासक्रमात २५ गुण आधुनिक उपचार पद्धतीच्या साईड इफेक्टस साठी राखून ठेवले आहेत. यामुळे तेथून बाहेर पडणारे विद्यार्थी एक पूर्वग्रह घेऊनच बाहेर पडतात. पण बाहेर पडल्यावर आपण जे साडे चार वर्षे शिकलो आहोत त्याचा व्यवहारात उपयोग फार थोडा होतो आहे हे पाहून ते अत्यंत निराशाजनक स्थिती मध्ये दिसतात. त्यातून खेड्यामध्ये लोकांना ताबडतोब गुण हवा असतो आणि शहरात व्यवसाय करायचा तर येणार भांडवली खर्च आणि त्यातून मिळणार परतावा (होमियोपॅथी ने आपली औषधे आणि सल्ला स्वस्त असतात हा केलेला प्रचार आता त्यांच्याच अंगाशी येतो आहे) याच व्यस्त प्रमाण पाहुन हेच फळ काय मम् तपाला हि स्थिती येते. अशी अनेक मुले बी एच एम एस पदवी घेऊन दुसरेच पदव्युत्तर अभ्यासक्रम करताना किंवा विपणन(मार्केटिंग), मेडिकल ट्रान्सक्रिप्शन इ व्यवसायात जाताना आढळतात आणि बऱ्याच मुली लग्न करून घरीच बसलेल्या दिसतात. ज्याची श्रद्धा आहे त्याने हि उपचार पद्धती जरूर करावी परंतु ती शास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही हि वस्तुस्थिती. जाता जाता -- विषय फार गहन आणि गंभीर आहे. आणि याला उपाय फार मूलगामी आहेत पण त्याची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता तो सुटण्याची शक्यता आपल्या आयुष्यभरात आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 01/12/2019 - 07:05 नवीन
डॉक्टर साहेब, कळकळ पोचतेय, पण दुर्दैवाने ती व्यर्थ जाणार आहे. मुळात बहुसंख्य लोकांना तपशिलात जायलाच नको असतं. आणि डेव्हिल इज ऑलवेज इन डीटेल्स. त्यामुळे एकूण काहीही फरक पडण्याची शक्यता नगण्य आहे. फक्त याच बाबतीत नव्हे, सर्वच बाबतीत. धागाकर्त्याने तपशीलवार आणि सोपी करुन सांगितलेली माहिती (खरोखर पूर्णपणे) वाचूनही त्याउपर कोणाला होमिओपॅथीत काहीतरी उपयुक्त असणारच असं वाटत असेल तर त्यांनी ती वापरणंच योग्य ठरेल. कारण तर्कांच्या पातळीवर न शिरता थेट निव्वळ श्रद्धा ठेवत असल्यास, आणि आलेल्या चांगल्या अनुभवांचं श्रेय त्या श्रद्धेला पूर्ण मिळत गेल्यास (आणि वाईट अनुभवांचं अपश्रेय मात्र इतर कुठेतरी जात असल्यास) त्या श्रद्धा बळकट होत जातात. तशा त्या होत गेल्या असल्यास त्यात बदल करणं जगात कोणालाही शक्य नाही. तसाही होमिओपॅथी गोळ्या खाण्यात अपाय नाही. गोड असतात आणि निव्वळ साखर असते. इमर्जन्सी आली की सगळे आधुनिक वैद्यकीय इस्पितळात इमर्जन्सी विभागातच जातात, होमिओपॅथी क्लिनिकमध्ये नाही. मॉडर्न मेडिसिन अतिप्रामाणिकपणा या दोषापायी जेव्हा पेशंटला म्हणतं की यावर आता फारसा उपयोगी उपाय शिल्लक किंवा उपलब्ध नाही, तेव्हा निराशेच्या गर्तेत कोसळण्यापेक्षा होमिओपॅथीची आशा काय वाईट? खूप चिकित्सा होते. आपली नीट माहिती घेतली जाते. निराश पेशंटला खूप बरं वाटतं. (जी डिटेल्ड हिस्टरी , चौकशी दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनमधले बहुसंख्य डॉक्टर घेणं टाळतात आणि पाच मिनिटांत कटवतात, कटू पण सत्य..) ब्लडप्रेशर, ल्युपस, नायटा, लठ्ठपणा, न्यूरोपथी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, कॅन्सर .. काहीही नाव घ्या, उपाय नाही असं तिथे काही नसतंच. अर्थात त्यात अत्यावश्यक असा आशेचा किरण मिळतो. मनाला उभारी येते. तसाही इतर उपाय दिसत नसतो. तेव्हा दिल के खुश रखनेके लिये ए गालिब...ये गोली अच्छी है..!!
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sat, 01/12/2019 - 12:48 नवीन
डॉक्टर आणि गविंचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 01/12/2019 - 09:32 नवीन
उत्तम प्रतिसाद. १३-१४ वर्षांपूर्वी होमियोपॅथीक डॉक्टरांसाठी एक सॉफ्टवेअर बाजारात आले होते. कंपनीचे नाव नक्की आठवत नाही पण बहुतेक माइंड टेक्नोलॉजी होते. माझा एक मित्र कर्जत ते ठाणे आणि नवी मुंबई ह्या परिसरात त्या सॉफ्टवेअरचे मार्केटिंग करायचा. १०,००० रुपये किमतीचे हे सॉफ्टवेअर त्या परिसरातील जवळपास सर्व होमियोपॅथीक डॉक्टरांनी घेतले होते. पेशंटची सर्व माहिती फीड केली कि स्क्रीनवर ५-७ औषधांची नावे दिसत असत (ज्यात १-२ नावे प्रत्येक रिझल्ट मध्ये कॉमन असायची), मग त्यांना अजून फिल्टर केल्यावर जी २-३ औषधे शिल्लक राहत ती सर्व किंवा त्यातली एक दोन औषधे ते डॉक्टर रुग्णाला देत असत. अशा पद्धतीने दिली जाणारी औषधे घेऊन किती जणांना गुण यायचा ते देव जाणे पण तुमच्या प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे "ज्याची श्रद्धा आहे त्याने हि उपचार पद्धती जरूर करावी परंतु ती शास्त्रीय कसोट्यांवर टिकत नाही हि वस्तुस्थिती." हे नक्की!
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 01/12/2019 - 09:39 नवीन
डॉक्टर खरे सर. एकदम माझ्या मनातलं बोललात. मला देखील हेच मुद्दे मांडायचे होते पण शब्दांमध्ये बसवता येत नव्हते. पण आपण अगदी योग्य रीतीने समजावून सांगितलेत.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 02/04/2019 - 09:28 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद डॉक आणि गवी दोघांचाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 07:35 नवीन
गवि साहेब आशेचा किरण हा तर एक फार मोठा उपाय आहे. बहुतेक वेळेस रुग्णाला काहीच उपचार नाही (विशेषतः कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजला) हे फार क्लेशदायक असतं. अशा वेळेस आधार देणारं कोणीही असला तरी चालतं. मग ते स्वामी बाबा असोत किंवा साबुदाण्याच्या गोळ्या. वरील प्रतिसाद आणि आताच्या प्रतिसादाच्या "मधल्या काळात" माझ्याकडे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या बाई आल्या होत्या दोन वर्षांपूर्वी मीच निदान केलं होतं आणि शल्यक्रिया झाली होती. दुर्दैवाने कर्करोग सर्वत्र पसरला आहे. डॉ हेरूर( कर्करोग तज्ञ) यांनी काही उपचार नाहीत असे सांगितले आहे. आता ते निसर्गोपचार करत आहेत. पण ४ महिन्यात रोग अजूनच पसरला आहे. रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी काही उपाय चालू आहेत, काही वेळेस स्थिती अशी असते कि रुग्णाला काहीच उपचारांची गरज नसते अशा वेळेस पण हे "इतर" उपाय फारच छान लागू पडतात. एक उदाहरण देतो आहे. माझ्या कडे एक कच्छी काका आले होते वय वर्षे ८० राहणार मुंद्रा गावी. मुलाकडे मुंबईत लघवीच्या त्रासासाठी (प्रोस्टेट आहे म्हणून). सोनोग्राफी करताना त्यांना पित्ताशयात खडे आढळले. काकांना पोटाचा काहीही त्रास नाही. पण त्यांच्या मुलाने त्यांची शल्यक्रिया करायची म्हणून आग्रह धरला होता.मी त्या मुलाला सांगायचा प्रयत्न केला कि इतकी वर्षे त्यांना काही त्रास नाही तर उगाच शल्यक्रिया कशासाठी करता? पण मुलाला त्यांच्या फॅमिली डॉक्टरने (इतर पॅथीचा आहे) शल्यक्रिया आवश्यक आहे असे "पटवले"( आर्थिक कारणासाठी). त्यांच्या एका भावाने सांगितले कि आपण त्यांना होमियोपॅथीचे औषध देऊ. काका दोन वर्षे होमियोपॅथी चे औषध घेत आहेत. खडे जसेच्या तसे आहेत पण होमियोपॅथीच्या हळू हळू काम करण्याच्या पध्द्ती वरील विश्वास मुळे काकांची शल्यक्रिया टाळली गेली आहे. आहे कि नाही होमियोपॅथी परिणामकारक.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 01/12/2019 - 07:38 नवीन
:-D अगदी अगदी..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/12/2019 - 08:08 नवीन
ओवर द काउंटर मिळणारी होमिओपथिक औषध स्वस्त आणि मस्त असतात. चारपाच दिवस घेऊन बघायला काय जातं? चाळीसपन्नास रुपयांत काम होतं. दुकानदारास अनुभव असतोच की कोणतं लागू पडतं. ---------------- रुग्णाने उगाच खोलात शिरू नये ,आपला रोग बरा होतोय ना एवढंच पाहात राहावं. ----------- आयुर्वेदात तर रानटी भरमसाठ उगवणाऱ्या वनस्पतीच अधिक गुणकारी असतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/12/2019 - 08:35 नवीन
रानटी भरमसाठ उगवणाऱ्या वनस्पतीच अधिक गुणकारी असतात. हे सरसकटी करण आहे आणि धोकादायकही आहे. उत्तराखंडात चरस हि वनस्पती अनेक ठिकाणी उगवलेली दिसते( असे माझी वर्गमैत्रिण सांगते-ती ह्रिषीकेषच्या AIIMS ची अधिष्ठाती DEAN आहे). बाकी धोत्रा, रुई, अफू, कोकेन, कुचला(यात स्ट्रिकनीन असते) या पण रानटी वनस्पतीच आहेत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 01/12/2019 - 09:09 नवीन
एक छोटीशी दुरुस्ती... चरस हि वनस्पती नसून गांज्याच्या झाडांपासून मिळणारे एक बाय-प्रोडक्ट आहे, गांज्याच्या शेतातून तो पदार्थ मिळवण्याची पद्धत फार किळसणी आहे. त्याचे सेवन करणाऱ्यास जर ती आधी समजली तर तो त्यापासून चार हात लांब राहण्याची शक्यता जास्ती आहे :)
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 01/12/2019 - 13:06 नवीन
नक्की काय किळसवाणी म्हणजे ?
गांज्याच्या शेतातून तो पदार्थ मिळवण्याची पद्धत फार किळसणी आहे. त्याचे सेवन करणाऱ्यास जर ती आधी समजली तर तो त्यापासून चार हात लांब राहण्याची शक्यता जास्ती आहे :)
असे असेल तर कळू देत ना मिपावर. (व्यनि केला तरी चालेल. )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा