Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अन्न प्या आणि पाणी खा

च
चामुंडराय
Mon, 01/07/2019 - 01:46
🗣 27 प्रतिसाद
वजन कमी करण्याच्या विविध मार्गांचा धांडोळा घेत असताना "अन्न प्या आणि पाणी खा" किंवा "Drink your food and chew your water" या एका नवीन संकल्पेनेची ओळख झाली. हे नक्की काय आहे? तर अन्न खाताना इतक्या वेळा चावा की त्या अन्नाचा लाळेत मिसळून पाण्यासारखा पातळ लगदा (पेस्ट) झाला पाहिजे आणि मग तो लगदा गिळा म्हणजे प्या. आणि पाणी पिताना एकदम घट घट न पिता एक एक घोट घेत, तोंडात फिरवून, त्यात लाळ मिसळून (चावून) प्या. ही खरंच नवीन संकल्पना आहे का? प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावून खावा हे ज्ञान आपल्याला लहानपणी वडीलधाऱ्यांकडून मिळालेले असतेच. बत्तीस वेळा घास का चावायचा या बालसुलभ प्रश्नाला, कारण बत्तीस दात असतात म्हणून हे तितकेच बालसुलभ उत्तरही मिळालेले असते. त्याचप्रमाणे पाणी पिताना खाली बसून हळुवारपणे एक एक घोट घेत प्यावे हे सुद्धा सांगितलेले असते. म्हणजे हे सगळे आपल्याला या आधीपासूनच माहीत आहे तर! या बद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी आंजात्खनन करताना फ्लेचरायझेशन या एका नवीन संज्ञेची ओळख झाली. हॉरेस फ्लेचर नावाचा एक अमेरिकन फुडी होऊन गेला जो द ग्रेट मास्टीकेटर (The great masticator) या नावाने ओळखला जातो. त्याने जेवताना प्रत्येक घास १०० वेळा चावून खावा याचा प्रचार आणि पुरस्कार केला. त्याला त्याच्या जीवन काळात भरपूर अनुयायी मिळाले ज्या मध्ये अनेक तत्कालीन प्रसिद्ध व्यक्ती देखील होत्या. पुढे ही संकल्पना फ्लेचरायझेशन या नावाने प्रसिद्ध झाली. एक घास १०० वेळा चावून खाल्याने त्यात लाळ मिसळून अन्नाचे पाण्यात रूपांतर होते व असे केले तर कमी अन्न खाल्ले जातेच परंतु तरी देखील मनुष्याच्या शक्तिमध्ये प्रचंड वाढ होते असा त्याचा दावा होता. त्याने या संदर्भात केलेले काही अचाट शक्तीचे प्रयोग प्रसिद्ध आहेत. तसेच फ्लेचरायझेशन मुळे "a pitiable glutton would turn into an intelligent epicurean" असे त्याचे म्हणणे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फ्लेचरचा मानवी मल-मूत्र (human excreta) संबंधी देखील अभ्यास होता आणि त्या संदर्भात त्याचे केवळ मल-मूत्र निरीक्षणातून रोग निदान करता येईल असे दावे प्रसिद्ध आहेत. आणि मजेची गोष्ट अशी की तो स्वतः डॉक्टर नव्हता म्हणे! एकंदरीत त्याने सांगितलेल्या मुख्य गोष्टी अशा आहेत. जेव्हा भूक लागली असेल तेव्हाच जेवा (मला उगीचच डॉ. दीक्षित आठवले). मनस्थिती ठीक नसेल (राग, दुःख इत्यादी) तर अन्न सेवन करू नका. अन्नाचा घास इतक्या वेळा चावा की प्रत्येक अन्नकण बारीक होऊन त्याचे लाळेत मिसळून पाण्यात रूपांतर झाले पाहिजे आणि मग तो घास प्या. अन्न आधाशीपणे गिळू नका. पाणी पिताना एक एक घोट हळुवार पणे त्यात लाळ मिसळून (थोडक्यात चावून) प्या. एकदम घट घट वेगाने पाणी पिऊ नका. या संदर्भात आधुनिक वैद्यक शास्त्राचा मागोवा घेतला तर योग्य रीतीने चावून खाल्ले तर लाळ अन्नात मिसळून पचन क्रिया सुरू होते, पाचक रस स्रवणे सुरू होते, अन्नकण बारीक झाल्याने पचनासाठी पोटावर पडणारा ताण कमी होतो आणि मेंदूला पुरेसा वेळ मिळून पोट भरल्याची संवेदना वेळेवर झाल्यामुळे अन्न आवश्यक तेव्हढेच खाल्ले जाऊन त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो असे संदर्भ आढळून आले आहेत. त्याचबरोबर दातांचे आरोग्य सुधारते व जबड्याचे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो असे कळले परंतु दातांचे आरोग्य कसे सुधारते हे समजले नाही. या बाबतीत माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव असा आहे की कोरडा घास ( उदाहरणार्थ शिळी भाकरी आणि कोरडी भाजी) ३२ पेक्षा जास्त वेळा चावणे शक्य आहे परंतु ओलसर अन्नपदार्थ (ज्यूसी) तितका चावता येत नाहीत कारण तोंडात घास शिल्लकच राहात नाही, ३२ वेळा चावायच्या आधीच गिळला जातो. सुरवातीला कित्येकदा ३२ वेळा चावायचे लक्ष्यातच राहत नाही, आधीच घास गिळला जातो. असा प्रयोग कोणी केला आहे का? इथे मिपावरील धाग्यांवर चावणारी बरीच मंडळी माहिती आहेत. अन्नपदार्थांच्या बद्दल जशी आवड निवड असते तशी विषयांची आवड निवड असणारे मिपाकर आहेत. सामान्यतः आवडणाऱ्या खाद्य पदार्थांवर लोकं तुटून पडतात मात्र येथे नावडत्या विषयांवर मिपाकर अधिक तुटून पडतात असे माझे तुलनेने नव मिपाकर असलेल्याचे निरीक्षण आहे. यामध्ये YOLO (यू ओन्ली लिव्ह वन्स) वाले वरीजनल आयडी मिपाकर आणि पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि मिपा काडी करणम् वाले काडी मिपाकर्स अशा दोन्ही प्रकारच्या मिपाकरांचा समावेश होतो. परंतु अन्नपदार्थ ३२ वेळा चावून खाणारे कोणी मिपाकर आहेत का? असतील तर तुमचे अनुभव वाचायला आवडतील. स्लोलीम् खा तू !!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21295 views

🗣 चर्चा (27)
म
मार्मिक गोडसे Mon, 01/07/2019 - 04:09 नवीन
माझ्या बाबांच्या मित्राच्या वडलांना पोटाचा आजार होता, त्यांना निसर्गोपचार केंद्रात नेले होते.तेथे प्रथम लंघन आणि अन्न प्या , पाणी चावा हिच उपचार पद्धत चालु होती. त्यांना खूप चांगला फरक पडला. मी तेव्हा लहान होतो, हा प्रयोग मी स्वतः करून बघितला, अन्न ३२ वेळा चावले की खरोखरच ते पाण्यासारखे पातळ होते,परंतू सातत्य राखणे जमले नाही. अपचन झाल्यास हा प्रकार नक्कीच करून बघा, फरक पडतो हा माझा अनुभव आहे. अवांतर: जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी चावल्यास उगाच जास्त पाणी प्यायले जात नाही आणि पाणीही गोड लागते. माझी पित्त प्रकृती असल्याने मी अधून मधून हा प्रयोग करत असतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/07/2019 - 05:17 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 01/07/2019 - 07:24 नवीन
कृतीत आणण्याचा प्रयत्न केला होता पण सातत्य राखणे जमले नाही. ही सवय लावून घ्यायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 01/07/2019 - 07:33 नवीन
१. बत्तीस वेळा चावण्याचा कंटाळा येतो किंवा लक्षातच रहात नाही. यावर एक उपाय आहे. तोंडात घास घातल्यावर लागलीच आपला हात दुसरा घास बनवायच्या तयारीला लागतो. तो घास बनवून झाला की तोंडातला घास गिळायची इच्छा अनावर होते. यास्तव तोंडातला घास संपूर्णपणे गिळला जाईस्तोवर हाताची हालचाल होऊ नये म्हणून हाताची मूठ वळून ठेवायची. सवय होईपर्यंत सुरवातीलाअस करायला लागेल. यात पुढे पुढे अस लक्षात येईल की आपण ३२ वेळेपेक्षाही जास्त वेळा घास चावायला लागतो. त्यामुळे ३२ आकडे मोजत बसण्याचा कंटाळवाणा कार्यक्रम करायला लागत नाही. आपल्या बरोबर जेवायला बसणाऱ्याला आपल्या नकळत एखादा घास आपण किती वेळा चावतोय यावर मधूनच लक्ष ठेवायला सांगायचे. आलेले उत्तर आश्चर्यकारक असेल. २. भातासारखे पदार्थ खाताना ३२ वेळा चावले जात नाही. यासाठी प्रत्येक घासाबरोबर एक भाजलेला किंवा ८-१० तास भिजत घातलेला दाणा खायचा. मी बऱ्याच वेळेस शेव चिवडा असही थोडस तोंडात टाकतो. याशिवाय चावायला लागेल अस सॅलड कोशिंबीर पण उपयोगाला येऊ शकते. ३. या प्रकारात गप्पा मारणे अवघड जाते. गप्पा ऐकायला अडचण येत नाही. ४.सुरवातीचे काही दिवस तरी मोबाईल टिव्ही बंद ठेवायला लागतो. अर्थात पुढेही ही चांगली सवय चालू ठेवायला हरकत नाही. ५. जेवायला लागणारा वेळ दुप्पट होऊ शकतो त्यामुळे ऑफिसमधे हे प्रत्येकाला कस जमवायचे ह्यावर विचार करायला लागेल. ६. पोट भरल्यामुळे आणखी जेवायला नको वाटते. पण नेहमी जेवढे जेवतो त्यापेक्षा कमी जेवले गेल्याने फारच मजेशीर स्थिती मनाची होते. आपण उपाशी आहोत अस मनाला वाटते. तर शरीर म्हणत असते आता बास! अर्थात ही सुरवातीच्या काही दिवसातील गोष्ट आहे. याच काळात माणूस मनाच्या या अवस्थेमुळे ही चांगली सवय सोडून देण्याची शक्यता असते. ७. साधारणत: जेवण झाल्यावर मागचे आवरायचे कंटाळवाणे काम घरची गृहिणी करते. पण घरच्या पुरूषाने ही पध्दत सुरू केल्यास, घरातल्या सगळ्यांचे जेवण होऊन सुध्दा याचे जेवण चालूच असते. त्यामुळे आवरायला व झोपायला उशीर होऊ शकतो. घरातले सर्वच जण हा प्रकार अंगिकारत असतील तर कोणीतरी खोळंबून बसलय अस होत नाही. पण झोपायला उशीर होतोच. गृहलक्ष्मी जर नोकरी करणारी असेल तर हे जाम त्रासदायक असू शकते. यावर उत्तम उपाय म्हणून जेवणाची वेळ २०-२५ मिनिटे अलिकडे घेणे योग्य होते.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 01/09/2019 - 15:45 नवीन
अतिशय योग्य मुद्दा! आपल्याकडे स्वयंपाक घरातील कामे फक्त आईनेच करावीत असे गृहीत धरले जाते. ही भावना, वृत्ती बदलायला हवी. आमच्या लहानपणी जेवण्यापूर्वी पाटपाणी घेणे हे ही एक काम असे. आम्ही चार भाऊ आणि एक बहिण असल्याने याच्या पाळ्या लावल्या होत्या...
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 01/14/2019 - 00:04 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/07/2019 - 09:16 नवीन
हे सर्व आता गोऱ्या साहेबांच्या नावावर झालेले आहे , पण या सर्व गोष्टींचे मूळ मात्र आपल्या भारत देशात फार पूर्वीपासून रुचले आहे .. आपण सर्वानी जर श्री राजीव दीक्षित यांचे लिखाण किंवा ध्वनिफिती किंवा चित्रफिती पाहिल्यावर हे लक्षात येईल . दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला किंवा ती संशयास्पद हत्याही असू शकते . रामदेव बाबा हे नाव त्यावेळेस कुणाच्याही लक्षात नव्हते किंबहुना त्याचे काहीच स्थानदेखील नव्हते . पण या व्यक्तीच्या जाण्याने , त्या बाबाची मात्र भरभराट झाली . इतकी कि त्याची मजल युनिलिव्हर या नामचीन कंपनीलाहि त्याने चांगलेच लोळवले . अर्थात या सर्व गोष्टींना राजकीय पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही . असो ... हा अवांतर भाग आहे . मूळ मुद्दा हा आहे , कि श्री राजीव दीक्षित यांनी , यावर रोचक माहिती दिली आहे तीही उदाहरणासहित . त्यांनी पाणी कसे प्यावे यावर पशुपक्ष्यांचे उदाहरण दिले आहे .. कुठलाही पशु पक्षी पाणी जिभेने चाटत चाटत पितो आणि आपण मात्र घटाघटा पितो . कुठलाही प्राणी अन्न खाल्ल्यावर ते यथेच्छ चघळत बसतो आणि माणूस मात्र जेवण पटकन उरकून ते ढेकर देत बसतो .. हि आपल्या ऋषीमुनिंची शिकवण आहे त्याला कुण्या गोर्याने निव्वळ विज्ञान सापेक्ष पुरावे देऊन ती आपली केली आहे एव्हढाच काय तो फरक .. श्री राजीव दीक्षित यांचे कार्य मरणोत्तरही लक्षात राहील असे आहे . जर त्यांचा खून झाला असेल तर तर जे कुणी यामागे असतील ते सोडून मरतील आणि जर खरंच ते असेच गेले असतील तर देव त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देवो .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/07/2019 - 14:17 नवीन
बाकी चर्चेत भाग घेत नाही. पण, खालील शास्त्रिय तथ्ये मांडल्याशिवाय राहीले नाही म्हणूनच केवळ हा प्रतिसाद... कुठलाही पशु पक्षी पाणी जिभेने चाटत चाटत पितो आणि आपण मात्र घटाघटा पितो. फक्त मांसाहारी पशू पाणी जिभेने चाटत पितो, तर शाकाहारी पशू पाणी तोंडात ओढून घेतो (सक्शन) व पितो. बहुतेक पक्षी पाणी चोचीत ओढून/भरून घेऊन डोके व मान वर करून ते पितात. कुठलाही प्राणी अन्न खाल्ल्यावर ते यथेच्छ चघळत बसतो शाकाहारींपैकी केवळ काही (सर्व नाही) प्राणीच रवंथ करतात (पक्षी : गवत/तत्सम शाकाहारी पदार्थ घाईने खातात व नंतर शांतपणे बसायला वेळ मिळाला की, ते खाणे परत तोंडात आणून चावून चावून बारीक करून, परत गिळतात). गवतासारखे शाकाहारी पदार्थ पचवणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्राण्यांच्या या प्रकारात, अनेक भाग असलेले जठर असते, त्यातला पहिला भाग घाईने खाल्लेले अन्न साठवण्यासाठी असतो, जेथून ते रवंथ करण्यासाठी परत तोंडात आणणे शक्य असते. तसेच, रवंथ करून परत गिळलेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी त्यांच्या जठरांत, शाकाहारी अन्नात मोठ्या प्रमाणात असणार्‍या सेल्युलोजचे पचन करण्यासाठी उपयोगी असलेले, खास बॅक्टेरिया असतात.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 01/08/2019 - 08:33 नवीन
छान विश्लेषण दिलेत म्हात्रे सर आपण .. बादवे मी यातील काही एक पाळत नाही , कारण मला भूक प्रचंड लागते आणि पॉट फुटेस्तोवर खातो आणिपाणीपण गटागटा पितो .. पण त्या राजीव दीक्षित साहेबांचा मात्र मी मनापासून पंखा आहे. बरेच चित्रफिती त्यांच्या पहिल्या आहेत .. आवडतात आणि भारी आहेत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/08/2019 - 13:47 नवीन
पॉट फुटेस्तोवर खातो आणिपाणीपण गटागटा पितो ही सवय आरोग्याला उपयुक्त नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. :)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 01/09/2019 - 15:06 नवीन
खरंय म्हात्रे सर , पण अजून तरी यावर माझ्याकडे उपाय नाही आहे . कारण एकच, बायकोच्या हाताची अप्रतिम चव आणि मला विचारून केलेले माझ्या आवडीनिवडीचे जेवण .. हे जोपर्यन्त थांबत नाही तोपर्यंत आम्ही वर जाईपर्यंत असेच अव्याहतपणे चालू राहणार .. एक आहे ते म्हणजे मला बाहेरचे मग ते कितीही चांगले असो , मला खायला बिलकुल आवडत नाही . ते मात्र मी कटाक्षाने पाळतो ..
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 01/07/2019 - 10:35 नवीन
मी सध्या ४० वेळा चावून खायला सुरवात केली आहे. १५ दिवस झाले. आत्तापर्यंत तरी सातत्य राखले आहे. ज्यांना सातत्य राखायला जमत नाही आहे त्यांच्यासाठी हि लिंक https://youtu.be/9wSRE_ca6YM तसेच R माधवन चा विडिओ इच्छूकांनी पहावा . फारच छान आहे. त्याची लिंक https://youtu.be/2ErEFwXOpZ8
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 01/07/2019 - 10:47 नवीन
बाकी द्रव पदार्थ कसे खायचे वा प्यायचेत (उदा: दूध, ताक, चहा, कॉफी, पेप्सी, व्हिस्की ई)
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 01/07/2019 - 13:13 नवीन
कारल्याच्या भाजीचा घास ५०-६० वेळा चावून खाल्यास खूप छान चव लागते आणि चकलीचा तुकडा ३२ वेळा चावून खाल्यास चकलीचा मूळ स्वाद हरवून जातो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/07/2019 - 13:18 नवीन
हे सर्व खोटं आहे. मोठे लोक उगाचच सल्ले देत फिरतात.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 01/14/2019 - 00:28 नवीन
कंकाका, फक्त हेच नाही तर हे जग देखील खोटे आहे. मिपा सत्यं जगन्मिथ्या :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/07/2019 - 15:06 नवीन
घास ३२ वेळा चावून खा हे आयुर्वेदात सांगितलं आहे ते आपला घास व्यवस्थित बारीक झाला पाहिजे यासाठी आणि जितका वेळ घास तोंडात ठेवाल तितका वेळच त्याची चव लागेल या मूळ तत्वासाठी. घास ३२ वेळा चावला जातो आहे कि नाही त्याकडे पाहत राहणे हे कर्मकांड आहे. हे म्हणजे १०८ वेळेस नामस्मरण करणे म्हणून माळ घेणे या सारखे आहे म्हणजे १०६ वेळेस नाव घेतले तर तुमचे नामस्मरण वाया गेले असे नव्हे. घास नीट चावून खाल्ला पाहिजे हे ताक दूध दही किंवा द्रव पदार्थासाठी अजिबात लागू पडणार नाही. पण बेसनाचा लाडू, भाकरी सारखी कोरडी वस्तू खाल्ली तर घास नक्कीच नीट चावून खाल्ला पाहिजे कारण पोटात गेल्यावर त्या पदार्थाच्या मोठ्या गोळ्याच्या मध्यभागी पाचकरस जात नाहीत आणि या न पचलेल्या अन्नावर जिवाणूंची क्रिया होऊन लोकांना पोटात "गॅस" होतात. हा प्रकार दात गलितगात्र झालेल्या वरिष्ठ नागरिकांत हटकून दिसून येतो. त्यातून कवळी लावलेल्या लोकांना कवळी टोचते म्हणून घास नीट न चावट गिळण्याची सवय होते आणि त्यांना तर हटकून "गॅस" होतात. जेवताना भराभर जेवणारे लोक असेच मोठे मोठे घास नीट न चावता गिळतात. तरुण वयात दगड सुद्धा पचतात अशा वेळेस त्रास होत नाही पण जसे चाळीशी पार होते तशी आपली दृष्टी अशक्त होते आणि चष्मा लावायला लागतो, केस राजीनामा द्यायला लागतात, गुढघे आपली उपस्थिती जाणवून देऊ लागतात, त्याच बरोबर आपली पचनशक्ती पण अशक्त होऊ लागते. अशा लोकांना घास नीट चावून खाल्ला पाहिजे हा सल्ला अतिशय मोलाचा आहे. पण ३२ वेळेस मोजून चावणे हे कर्मकांड आहे. शास्त्रात रूढी बलीयसी-- म्हणजे शास्त्रापेक्षा कर्मकांड आणि रूढी जास्त बलवान होतात
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 01/14/2019 - 00:18 नवीन
हो, कर्मकांड नको हे खरे ! सुरवातीला प्रत्येक घास ३२ वेळा मोजून चावावा लागतो परंतु नंतर त्याची आवश्यकता वाटत नाही. तोंडात अन्नाचे पाणी झाले कि झाले. मला तर एक ऍप देखील सापडले ३२ सेकंद - १ सेकंद - ३२ सेकंद - १ सेकंद ... असे ते चालते. ३२ सेकंद चावण्यासाठी (शेवटी आवाज येतो) आणि १ सेकंद घास घेण्यासाठी असतो. परंतु नंतर त्याची देखील गरज उरत नाही. गमतीचा भाग असा कि जास्त वेळा चावल्याने महिन्याला २००० kCal जास्त जळतात असे देखील कुठेतरी वाचले आहे. म्हणजे बघा, वजन कमी करायला मदतच होते कि नाही?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 01/15/2019 - 10:39 नवीन
बाकी काही माहीत नाही. पण चावायला लागल्या पासून माझं जेवण खूप कमी झालंय असं बायकोच मत आहे. रोज जेवण शिल्लक राहायला लागलंय... ती नेहमी मला हावरटा सारखं खतोस असे म्हणायची. पण काल आम्ही हॉटेलात गेलेलो असताना ती माझ्यासमोर हावरट दिसत होती ☺️☺️
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 01/28/2019 - 13:14 नवीन
कुठले ऍप ? आम्हाला ही सांगा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/07/2019 - 15:32 नवीन
बरोबर, कर्मकांड नको. थोडावेळ घास तोंडात ठेवला तरी चालतो.( ठेवावा)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 06/24/2019 - 05:59 नवीन
केवळ हा एकमेव उपाय आणि मधेमधे होणारा व्यायाम याच्या साहाय्याने सध्या मी 6 महिन्यात 9 किलो वजन कमी केले आहे. अजून 4/5 किलो कमी झाले की लेख पाडेन.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 06/24/2019 - 19:03 नवीन
अभिनंदन. हे वाचून आनंद वाटला. या वर आता एक विस्तृत लेख येऊ द्या. या मुळे आपल्या अनुभवाचा इतरांना देखील फायदा होईल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/24/2019 - 12:57 नवीन
आम्ही जीच"कारि... Fitness Formula by Dr Shrikant Jichkar आरोग्याविषयी जागरूक असलेल्या प्रत्येकाने ऐकायलाच हवं, असं क्रांतिकारी मार्गदर्शन डॉ. श्रीकांत जिचकार यांनी स्व... www.youtube.com बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 07/02/2020 - 06:39 नवीन
चामुंडराय, १४ किलो कमी झाले आतापर्यंत.. काहीही कष्ट नाहीत, की कोणताही जिभेवर/ भुकेवर ताबा नाही. आत्ता ८०/८१+-. ८० च्या खाली आलो की एक लेख लिहेन.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 07/03/2020 - 03:02 नवीन
अरे व्वा, छान. हे वाचून आनंद वाटला. तुमचा अनुभव जरूर लिहा त्यातून आम्हा सर्वांना स्फूर्ती मिळेल.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 07/03/2020 - 04:22 नवीन
काही शंका आहेत. १. जर घास ३२ वा तत्सम वेळा चावायचा आहे तर नेहेमीपेक्षा मोठा घास घ्यायची इच्छा होत नाही का? म्हणजे एरवी चपातीचा जितका तुकडा चार पाच वेळा चर्वण करुन गिळला जातो तो ३२ वेळा चर्वण करता येऊ शकतो काय? दुसरी शंका थोडी अतार्किक आहे. घास जर नेहेमीपेक्षा कमी वेळा चावुन गिळला तर पचनसंस्थेवर ताण येतो हे वाचले आहे. पण ताण येणे म्हणजे जास्तीचे काम व त्यात कॅलरी खर्च होत असतीलच की.? म्हणजे तुम्ही निवांत बसला आहात आणि जठराचा व्यायाम चालु आहे असे काहीसे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा