अन्न प्या आणि पाणी खा
वजन कमी करण्याच्या विविध मार्गांचा धांडोळा घेत असताना "अन्न प्या आणि पाणी खा" किंवा "Drink your food and chew your water" या एका नवीन संकल्पेनेची ओळख झाली. हे नक्की काय आहे? तर अन्न खाताना इतक्या वेळा चावा की त्या अन्नाचा लाळेत मिसळून पाण्यासारखा पातळ लगदा (पेस्ट) झाला पाहिजे आणि मग तो लगदा गिळा म्हणजे प्या. आणि पाणी पिताना एकदम घट घट न पिता एक एक घोट घेत, तोंडात फिरवून, त्यात लाळ मिसळून (चावून) प्या. ही खरंच नवीन संकल्पना आहे का? प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावून खावा हे ज्ञान आपल्याला लहानपणी वडीलधाऱ्यांकडून मिळालेले असतेच. बत्तीस वेळा घास का चावायचा या बालसुलभ प्रश्नाला, कारण बत्तीस दात असतात म्हणून हे तितकेच बालसुलभ उत्तरही मिळालेले असते. त्याचप्रमाणे पाणी पिताना खाली बसून हळुवारपणे एक एक घोट घेत प्यावे हे सुद्धा सांगितलेले असते. म्हणजे हे सगळे आपल्याला या आधीपासूनच माहीत आहे तर!
या बद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी आंजात्खनन करताना फ्लेचरायझेशन या एका नवीन संज्ञेची ओळख झाली. हॉरेस फ्लेचर नावाचा एक अमेरिकन फुडी होऊन गेला जो द ग्रेट मास्टीकेटर (The great masticator) या नावाने ओळखला जातो. त्याने जेवताना प्रत्येक घास १०० वेळा चावून खावा याचा प्रचार आणि पुरस्कार केला. त्याला त्याच्या जीवन काळात भरपूर अनुयायी मिळाले ज्या मध्ये अनेक तत्कालीन प्रसिद्ध व्यक्ती देखील होत्या. पुढे ही संकल्पना फ्लेचरायझेशन या नावाने प्रसिद्ध झाली.
एक घास १०० वेळा चावून खाल्याने त्यात लाळ मिसळून अन्नाचे पाण्यात रूपांतर होते व असे केले तर कमी अन्न खाल्ले जातेच परंतु तरी देखील मनुष्याच्या शक्तिमध्ये प्रचंड वाढ होते असा त्याचा दावा होता. त्याने या संदर्भात केलेले काही अचाट शक्तीचे प्रयोग प्रसिद्ध आहेत. तसेच फ्लेचरायझेशन मुळे "a pitiable glutton would turn into an intelligent epicurean" असे त्याचे म्हणणे होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे फ्लेचरचा मानवी मल-मूत्र (human excreta) संबंधी देखील अभ्यास होता आणि त्या संदर्भात त्याचे केवळ मल-मूत्र निरीक्षणातून रोग निदान करता येईल असे दावे प्रसिद्ध आहेत. आणि मजेची गोष्ट अशी की तो स्वतः डॉक्टर नव्हता म्हणे!
एकंदरीत त्याने सांगितलेल्या मुख्य गोष्टी अशा आहेत. जेव्हा भूक लागली असेल तेव्हाच जेवा (मला उगीचच डॉ. दीक्षित आठवले). मनस्थिती ठीक नसेल (राग, दुःख इत्यादी) तर अन्न सेवन करू नका. अन्नाचा घास इतक्या वेळा चावा की प्रत्येक अन्नकण बारीक होऊन त्याचे लाळेत मिसळून पाण्यात रूपांतर झाले पाहिजे आणि मग तो घास प्या. अन्न आधाशीपणे गिळू नका. पाणी पिताना एक एक घोट हळुवार पणे त्यात लाळ मिसळून (थोडक्यात चावून) प्या. एकदम घट घट वेगाने पाणी पिऊ नका.
या संदर्भात आधुनिक वैद्यक शास्त्राचा मागोवा घेतला तर योग्य रीतीने चावून खाल्ले तर लाळ अन्नात मिसळून पचन क्रिया सुरू होते, पाचक रस स्रवणे सुरू होते, अन्नकण बारीक झाल्याने पचनासाठी पोटावर पडणारा ताण कमी होतो आणि मेंदूला पुरेसा वेळ मिळून पोट भरल्याची संवेदना वेळेवर झाल्यामुळे अन्न आवश्यक तेव्हढेच खाल्ले जाऊन त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो असे संदर्भ आढळून आले आहेत. त्याचबरोबर दातांचे आरोग्य सुधारते व जबड्याचे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो असे कळले परंतु दातांचे आरोग्य कसे सुधारते हे समजले नाही.
या बाबतीत माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव असा आहे की कोरडा घास ( उदाहरणार्थ शिळी भाकरी आणि कोरडी भाजी) ३२ पेक्षा जास्त वेळा चावणे शक्य आहे परंतु ओलसर अन्नपदार्थ (ज्यूसी) तितका चावता येत नाहीत कारण तोंडात घास शिल्लकच राहात नाही, ३२ वेळा चावायच्या आधीच गिळला जातो. सुरवातीला कित्येकदा ३२ वेळा चावायचे लक्ष्यातच राहत नाही, आधीच घास गिळला जातो.
असा प्रयोग कोणी केला आहे का? इथे मिपावरील धाग्यांवर चावणारी बरीच मंडळी माहिती आहेत. अन्नपदार्थांच्या बद्दल जशी आवड निवड असते तशी विषयांची आवड निवड असणारे मिपाकर आहेत. सामान्यतः आवडणाऱ्या खाद्य पदार्थांवर लोकं तुटून पडतात मात्र येथे नावडत्या विषयांवर मिपाकर अधिक तुटून पडतात असे माझे तुलनेने नव मिपाकर असलेल्याचे निरीक्षण आहे. यामध्ये YOLO (यू ओन्ली लिव्ह वन्स) वाले वरीजनल आयडी मिपाकर आणि पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि मिपा काडी करणम् वाले काडी मिपाकर्स अशा दोन्ही प्रकारच्या मिपाकरांचा समावेश होतो. परंतु अन्नपदार्थ ३२ वेळा चावून खाणारे कोणी मिपाकर आहेत का? असतील तर तुमचे अनुभव वाचायला आवडतील.
स्लोलीम् खा तू !!
कुठलाही पशु पक्षी पाणी जिभेने चाटत चाटत पितो आणि आपण मात्र घटाघटा पितो.फक्त मांसाहारी पशू पाणी जिभेने चाटत पितो, तर शाकाहारी पशू पाणी तोंडात ओढून घेतो (सक्शन) व पितो. बहुतेक पक्षी पाणी चोचीत ओढून/भरून घेऊन डोके व मान वर करून ते पितात.कुठलाही प्राणी अन्न खाल्ल्यावर ते यथेच्छ चघळत बसतोशाकाहारींपैकी केवळ काही (सर्व नाही) प्राणीच रवंथ करतात (पक्षी : गवत/तत्सम शाकाहारी पदार्थ घाईने खातात व नंतर शांतपणे बसायला वेळ मिळाला की, ते खाणे परत तोंडात आणून चावून चावून बारीक करून, परत गिळतात). गवतासारखे शाकाहारी पदार्थ पचवणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्राण्यांच्या या प्रकारात, अनेक भाग असलेले जठर असते, त्यातला पहिला भाग घाईने खाल्लेले अन्न साठवण्यासाठी असतो, जेथून ते रवंथ करण्यासाठी परत तोंडात आणणे शक्य असते. तसेच, रवंथ करून परत गिळलेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी त्यांच्या जठरांत, शाकाहारी अन्नात मोठ्या प्रमाणात असणार्या सेल्युलोजचे पचन करण्यासाठी उपयोगी असलेले, खास बॅक्टेरिया असतात.पॉट फुटेस्तोवर खातो आणिपाणीपण गटागटा पितोही सवय आरोग्याला उपयुक्त नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. :)