जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्वाचे घटक
***************
जागतिक सरासरी आयुर्मान (The World Factbook, २०१६), "पुरुष : ६८ वर्षे ४ महिने व स्त्रिया : ७२ वर्षे ८ महिने", असे आहे हे आपण मागच्या भागात पाहिले आहे. ही सरासरी आहे. म्हणजे, त्यापेक्षा कमी काळ आयुर्मान व जास्त काळ आयुर्मान असलेले लोक असणारच, हे सांगायला नकोच. सरासरी अमेरिकन आयुर्मान आहे ७८.२ वर्षे आहे आणि त्याचबरोबर अमेरिकन जनतेतील ७०,००० पेक्षा जास्त लोकांनी शंभरी ओलांडली आहे. म्हणजे, नीलप्रदेशांत दीर्घायुष्याचे प्रमाण सर्वसाधारण सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, पण, नीलप्रदेश सोडून इतर कोठेच दीर्घायुषी लोक आढळत नाहीत, असेही नाही. ही वस्तुस्थिती जशी अमेरिकेत आहे, तशीच ती जगातील इतर भागांतही कमी-जास्त प्रमाणात आहे. अमेरिकेतील वस्तुस्थितीचे विश्वासू आकडे मिळाले म्हणून ते उदाहरण दिले, इतकेच. तर मग या दीर्घायुषी लोकांमध्ये असे काय आहे, ज्याचा इतर लोकांमध्ये अभाव आहे? अनादी काळापासून अमरत्वाची आस असलेल्या मानवाने या बाबतीत सतत संशोधन चालू ठेवले नसते तरच आश्चर्य होते. :) या धडपडीत आपल्या हाती आलेल्या माहितीचा गोषवारा या भागात घेतला आहे. अ) आपल्या नियंत्रणाबाहेर असलेला घटक, "जनुकीय वारसा" : जनुकीय वारसा हे दीर्घायुष्याचे सर्वात मोठे व सर्वात महत्त्वाचे कारण आहे, असा सर्वसाधारण समज आहे. असे असते तर समान जनुके असणार्या लोकांत (रोगजंतूंच्या संसर्गाने होणारे आजार, वेगळे वातावरण, इत्यादींचे परिणाम ध्यानात घेतल्यानंतर) आयुर्मानाचे प्रमाण जवळपास सारखेच असायला हवे. पण, तसे व्यवहारात लक्षणीयरीत्या आढळत नाही. सर्वच जुळ्यांमध्ये एकसमान एकसमान जनुके नसतात. याचे एक धडधडीत उदाहरण म्हणजे जुळ्यांतील एक मुलगा व एक मुलगी असणे ! तंतोतंत एकसमान (identical) जनुके असणार्या जुळ्यांना, एकसमान जुळी (identical twins) म्हणतात. अश्या जुळ्यांच्या आयुर्मानातील फरकावर, केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, माणसाच्या आयुर्मानावर जनुकांचा फक्त २०% इतकाच प्रभाव असतो. याचा अर्थ असा की मानवाचे आयुर्मान ठरविण्यात, जनुके सोडून इतर अनेक घटकांचा ८०% इतका मोठा सहभाग असतो. ते इतर घटक शोधून काढण्यासाठी, नॅशनल जिओग्राफिक्सच्या सहकार्याने केलेल्या, जगातील दीर्घायुषी लोकांच्या (नीलप्रदेशांतील लोक आणि इतर ठिकाणच्या दीर्घायुषी लोकांचे गट) सर्वेक्षणामध्ये खालील गोष्टी आढळल्या... आ) आपल्या नियंत्रणात येऊ शकतील असे, "इतर घटक" : १. नैसर्गिक हालचाल : हे लोक वजन उचलणे (आयर्न पंपिंग), दीर्घ अंतराचे धावणे (मॅरॅथॉन रनिंग), किंवा व्यायामशाळेतील इतर कठीण व्यायाम करत नाहीत. त्याविरुद्ध, ते नकळत (पक्षी : खास विचार न करता, सवय/आवश्यकता म्हणून) सतत हालचाल करावी लागेल अश्या कृती करत असतात. आर्थिक सुस्थितीत असले व कष्टाचे काम करायची गरज नसली तरी ते बागकामासारख्या छंदामध्ये स्वतःला गुंतवणारे असतात. ते शक्यतो, घरात व घराबाहेरही, शारीरिक हालचाल कमी करावी लागेल अशी यांत्रिक साधने वापरण्याचे टाळतात. २. जीवनाचा उद्येश : ओकिनावाचे लोक ज्याला "इकिगाई (Ikigai)" म्हणतात, तर निकोयातील रहिवासी "देवाची योजना (plan de vida) म्हणतात, त्या दोन्हींचा अर्थ "जीवनाचा उद्येश" असा होतो. जीवनातले ध्येय मानसिक ताकदीत भर घालते व शारीरिक कृतीला उत्साह निर्माण करते. यामुळे, आयुर्मानात सुमारे ७ वर्षांची भर पडते असे आढळले आहे. दिशाहीन जीवन बहुदा निराशेचे कारण बनते. निराशेचा सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्तीवर (immunity) व म्हणून आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, हे सर्वमान्य आहे. अर्थातच, निरुद्येश व्यक्तीच्या आयुर्मानावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. ३. ताणतणाव : मानसिक व सामाजिक ताणतणाव आरोग्यावर, आणि म्हणून आयुर्मानावर, प्रतिकूल परिणाम करतात, हे सर्वमान्य आहे. नीलप्रदेशातील लोकही ताणतणावापासून मुक्त नसतात. मात्र, दीर्घायुषी गटांत घट्ट कौटुंबिक व सामाजिक संबंध आढळतात. हे संबंध अधिकाधिक घट्ट रहावे यासाठी अनेक कौटुंबिक व सामाजिक प्रथा/रुढी कटाक्षाने पाळल्या जातात. उदा : सर्वसाधारण सण-समारंभ, धार्मिक मेळावे, प्रार्थनासभा, इत्यादी, इकॅरियन लोकांमधील दुपारची झोप, सार्डिनियन लोकामधील "हॅपी अवर", इत्यादी. अश्या कृती माणसांमधील जवळीक वाढवत व सुखदु:खात मानसिक आधार मिळाल्यामुळे मनावरचे ओझे कमी करण्यास मदत करतात. याचा आरोग्य व आयुर्मानावर सकारात्मक परिणाम होतो. ४. ८०% नियम : ओकिनावामध्ये “Hara hachi bu” हा कन्फ्युशिअन मंत्र कटाक्षाने पाळला जातो. त्याचा अर्थ असा की ८०% पोट भरले की जेवण थांबवा. पोटाला तडस लागेपर्यंत खाणे सर्वच नीलप्रदेशांत टाळले जाते. ही सवय आणि 'सतत केली जाणारी हालचाल' यांचा संयोग, स्थूलपणा आणि त्याबरोबर येणारे अनारोग्य टाळते, हे सांगायला नकोच. ५. शाकाहाराकडे झुकाव : शाकाहार व विशेषतः भरपूर कडधान्ये असलेला आहार, सर्वच नीलप्रदेशांत सर्वसामान्यपणे आढळतो. तेथे मांसाहार आठवड्यांतून सरासरी फक्त पाच वेळाच केला जातो आणि एका वेळेस फक्त ३ ते ४ औंस (सुमारे ८५ ते ११० ग्रॅम) मांस खाल्ले जाते. ६. वारुणी(वाइन)सेवन @५ : अॅडव्हेंटीस्ट पंथाचा समाज सोडून इतर नीलप्रदेशात, नातेवाईक व मित्रांबरोबर, मर्यादित प्रमाणात (moderate, १ ते २ ग्लास/दिवस) वारूणीसेवन व जेवण केले जाते. मर्यादित प्रमाणात मद्यसेवन करण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे शास्त्रीयरीत्या सिद्ध झाले आहे. मात्र, दिवसाला ६०मिली व्हिस्की किंवा समप्रमाणात इतर वारुणीची सीमा ओलांडल्यास, आरोग्यावरचे परिणाम नकारात्मक होऊ लागतात. तसेच, दिवसाला ६०मिली म्हणजे, (पहिले पाच/सहा दिवस न पिता) आठवड्याच्या शेवटी ४२० मिली मद्य पिणे नव्हे, हे सुद्धा पक्के ध्यानात ठेवायला हवे. नियमित एकत्र येण्याच्या व एकत्र भोजन करण्याच्या सवयीमुळे कौटुंबिक व सामाजिक संबंध जास्त घट्ट होतात. याचा आरोग्य व आयुर्मानावर सकारात्मक परिणाम होतो. ७. धार्मिक/पंथिक संबंध : सर्वेक्षणातील २६३ पैकी ५ सोडून इतर सर्व शंभरी पार केलेले लोक कोणत्या ना कोणत्या पंथाचे (faith-based community) अनुयायी होते. या आणि इतर संशोधनांत असे आढळून आले आहे की दर महिन्याला चार सत्संग/प्रार्थनासभांना उपस्थित लावणार्यांच्या आयुर्मानात ४ ते १४ वर्षांनी वाढ होते. ८. कौटुंबिक प्रेमसंबंध : नीलप्रदेशातील शतकवीरांच्या जीवनात कौटुंबिक संबंधांना (families first) अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे आढळून आले. ८.अ) वृद्धापकाळात पती/पत्नी जवळ असण्याने त्यांच्या आयुर्मानात ३ वर्षांची वाढ होते, असे आढळले आहे. ८.आ) बालपणात जवळिकीने काळजी घेतलेली मुलांमध्ये, आपल्या वृद्ध आई-वडिलांची मनःपूर्वक काळजी घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते. 'जवळिकीचे संबंध असणे' आणि 'एकत्र किंवा जवळपास राहणे' यामुळे कुटुंबांतील वृद्ध व मुले या दोन्हींच्या मनःस्वास्थ्यावर, आरोग्यावर व आयुर्मानावर, सकारात्मक परिणाम होतो. ९. योग्य गटाचे सभासदत्व : येथे, "योग्य गट" म्हणजे, (वर वर्णन केलेल्या) आरोग्यदायक सवयी असलेल्या लोकांचा गट, असे समजावे. दीर्घायुषी लोक एकतर योग्य गटात जन्मलेले असतात, आपल्याभोवती योग्य गट जमवतात किंवा योग्य गटात राहण्याची निवड करतात. उदा : ओकिनावन्समध्ये आयुष्यभर घट्ट मैत्रीचे संबंध असलेल्या पाच लोकांचे moais गट बनविण्याची प्रथा आहे. तसेही, माणूस समविचारी व समआचारी लोकांच्या संगतीत जास्त रमतो व जास्त आनंदी राहतो... असा गट जर सकारात्मक सवयी असलेल्या लोकांचा असेल तर त्याचा आरोग्य व आयुर्मानावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. Framingham Studies नावाने प्रसिद्ध असलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, सर्व प्रकारच्या सवयी संसर्गजन्य असतात... (अ) जश्या सिगरेट ओढणे, अतीखाणे, इत्यादी समान सवयींच्या लोकांची मैत्री होते व त्यांच्या त्या सवयींत वाढ होते, तसेच, (आ) चांगल्या सवयींमुळेही लोक एकत्र येतात व एकमेकाच्या सकारात्मक सवयींत वाढ करतात. अर्थातच, आरोग्यदायक सवयी असलेल्या लोकांच्या गटातील सभासद एकमेकाचे आरोग्य व आयुर्मान वाढवतात, हे सांगायला नकोच. वरच्या माहितीवरून खालील गोष्टी स्पष्ट होतात... * जनुकीय वारसा आपल्याला जनुकीय लॉटरीने मिळणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच, आपल्या नियंत्रणात नसलेली गोष्ट आहे. अर्थातच, त्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. मात्र, आयुर्मानावर जनुकांचा फक्त २०% परिणाम होतो. * त्याचबरोबर, आपल्या नियंत्रणात येऊ शकणारे "इतर घटक" मानवी आरोग्य व आयुर्मानावर ८०% परिणाम करतात, ही आशादायक गोष्ट आहे. कारण, या इतर घटकासंबंधात सकारात्मक कृती करून, आपल्याला आरोग्य व आयुर्मान वाढवणे शक्य आहे. नीलप्रदेशांतील लोकांच्या अनुभवावरून, या "इतर घटकांचा" आपल्या रोजच्या व्यवहारात सकारात्मक उपयोग केल्यास, आयुर्मान १०-१२ वर्षांपर्यंत वाढू शकते. * हे "इतर घटक", मानवी जीवनशैलीचे महत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत. आपल्या जीवनशैलीचा आपल्या आनंद, आरोग्य आणि आयुर्मानावर लक्षणीय प्रभाव पडतो. ***************
न पिणाऱ्याने ६० एम.एल. प्यायला सुरवात करावी असा घ्यायचा का?=)) त्यांचे म्हणणे असेही असू शकेल... १. कुटुंब किंवा समविचारी सुहृदांबरोबर नियमितपणे एकत्र येऊन भोजन करणे. १. दिवसात ६० एम.एल. पेक्षा जास्त असलेले प्रमाण ६० एम.एल. पर्यंत खाली आणणे. २. विकांतात जास्त पिण्याऐवजी दिवसाला ६० एम.एल. किंवा कमी असे प्रमाण करणे. सकारात्मक विचार करण्याने आरोग्य व आयुर्मान सुधारण्यास मदत होते. ;) :)