सूतक
वासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता. चित्रा, विमलाबाई आणि वासुदेवरावांची मुलगी; वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकताच स्वतःच्या मुला बाळांना आणि नवऱ्याला घेऊन पहाटेच पुण्याहून निघाली होती आणि नुकतीच घरी पोचली होती. आल्या आल्याचं बायकांनी तिला पण गराडा घातला.
"आई....हे सगळं असं अचानक? कसं काय?" चित्राच्या डोळ्यात पाणी तरळले
"सकाळी उठून चहा घेऊन ह्यांच्या खोलीत गेले तर हे अजून झोपलेले. नेहमी पहाटे चारला उठून अंघोळ करून बैठकीत बसणारा माणूस पण आज काही केल्या उठेना. चार वेळा हाकापण मारून झाल्या. शेवटी अंगाला हात लावून बघितला तर अंग थंड गार पडलेलं." विमलाबाईंनी तेवढ्याच थंड पणाने उत्तर दिलं .
"चित्रा, सकाळपासुन विमला वाहिनी रडल्या नाही आहेत बघ. डोळ्यात एक टिपूस पण आलेलं नाही हो." घरा शेजारीच राहणाऱ्या मालतीबाईंनीं चित्राला माहिती पुरविली.
"आई,अगं असं का करतेयस? बाबा नाही राहिले गं..." चित्रा विमलाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली.
"हो. माहित आहे मला." असं म्हणून विमलाबाई उठल्या आणि संथपणे वाड्याच्या शेवटी असलेल्या अडगळीच्या खोलीकडं चालू लागल्या. आत जाऊन त्यांनी दरवाजा लोटून घेतला.
____________________________________________
वयाच्या सतराव्या वर्षी लग्न करून जेव्हा विमला पहिल्यांदा या वाड्यात आली तेव्हा एवढा मोठा वाडा बघून आधी बावरली. विमलाचे वडील श्री जनार्दन कुळकर्णी हे साताऱ्याचे प्रसिद्ध भटजी. घरात नेहमी सोवळ्यात स्वयंपाक चालायचा. विमला वडिलांच्या बरोबर लहानपणापासून पूजेला जाई. पूजेची तयारी करणे, वडिलांच्या पाठोपाठ मंत्रपठण करणे, स्वयंपाकघरात नैवेद्याला मदत करणे, नैवेद्याचं ताट सजवणे याची तिला अतिशय आवड. दर संध्याकाळी वडिलांचं बोट पकडून मुरलीधराच्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन ऐकत बसायला तिला खूप आवडे. एका बाजूला अतिशय शुद्ध मंत्रोच्चारण, खडा आवाज, प्रत्येक मंत्राचा माहित असलेला शास्त्रोक्त अर्थ तर दुसरीकडं तेवढीच गोड वाचा, सोज्वळ स्वभाव आणि सौन्दर्य ह्यामुळं वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच विमलाला स्थळे येऊ लागली. पण जो पर्यंत मुलगी हो म्हणत नाही तो पर्यंत लग्नाविषयी बोलणे नाही या तत्वावर ठाम असलेल्या जनार्दन रावांनी कधीच विमलाला लग्नासाठी गडबड केली नाही. मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाल्यावर मात्र विमलेच्या आईनं घरात लग्नाचा घोषा सुरु केला. त्या काळी लग्नासाठी सोळा वर्षे वय म्हणजे 'डोक्यावरून पाणी गेलं' अशी परिस्थिती असताना वयाच्या सतराव्या वर्षी पण मुलीचे लग्न न झाल्याने विमलाच्या आईला अतिशय चिंता वाटत होती. शेवटी तिच्या हट्टापुढं हात टेकून विमलाने लग्नासाठी स्थळे बघायला होकार दिला.
अगदी पहिलेच स्थळ आले वासुदेव जोशी यांचे. पंचवीस वर्षे वय, ऊंच, दिसायला रुबाबदार असलेल्या वासुदेव रावांनी पुण्याच्या फर्ग्युसन मधून डिग्री घेतली होती आणि आता ते आपल्या गावी, नागपुरात सरकारी कचेरीत काम करत होते.नागपुरात त्यांचचा टोलेजंग वाडा होता, शेतीवाडी होती, घरात सतत नोकर माणसांचा राबता असायचा. वासूदेवरावांचे वडील शेतीत आणि बागायतीच्या कामात लक्ष घालीत. एकूणच अतिशय श्रीमंत आणि सुयोग्य असं स्थळ होतं ते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, तिकडून होकारही आला. जनार्दन रावांची परिस्थिती बेताचीच असल्यानं आणि वासुदेव रावांचा हुंडा वगैरे प्रकाराला कडाडून विरोध असल्यानं साध्या पद्धतीनं पण अतिशय साग्रसंगीत असं विमला आणि वासुदेवरावांचं लग्न झालं.
लग्नानंतर वासुदेव रावांनी गावातून वाजत गाजत वरात काढली होती. घरी पोचता पोचता रात्रीचे नऊ वाजले.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून न्हाणं झाल्यावर विमलानं सगळ्यात आधी नेहमीच्या सवयीप्रमाणे बागेत जाऊन फुलं आणि दुर्वा आणल्या आणि सासूबाईंना विचारलं, "देवघर कुठं आहे सासूबाई, सोवळ्यात पूजा झाल्याशिवाय स्वयंपाकघरात शिवाशिव करत नाहीत आमच्यात, म्हणून म्हटलं आधी पूजा आटपून घ्यावी."
सासूबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला, बोलावं कि नको याचा त्या विचार करीत असताना मागून वासूदेवरावांचा मोठ्यानं आवाज आला.
"इथं घरात देव नाहीत. तेव्हा हि सगळी नाटकं बाजूला ठेवा आणि आणि आधी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी दूध घेऊन या."
विमलेच्या पदरातून फुलं खाली पडली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या.
"चल सुनबाई, आधी आत चल " असं म्हणत सासूबाई विमलेचा हात धरून तिला आत स्वयंपाकघरात घेऊन गेल्या.
"आता काय सांगायचं पोरी तुला, वासूचा देवावर विश्वास नाही, वयाच्या बाराव्या वर्षी घरातले देव त्यानं बाहेर फेकून दिले. तुझ्या माहेरासारखं अगदी देवभोळी माणसं नसलो तरी सकाळी पूजा अर्चा, संध्याकाळी पर्वचा, सणासुदीला नैवेद्य आणि वर्षातून एकदा सत्यनाराणाची पूजा एवढं देवाचं अस्तित्व जपलं होतं घरी. वासू आधी असा नव्हता पण अचानक एक दिवस तावातावानं घरी आला, देवघरात जाऊन देवाच्या मूर्ती बाहेर घेऊन आला आणि 'आज पासून या घरात देवाला जागा नाही" असं म्हणून सगळ्या मूर्ती त्यानं फेकून दिल्या. ह्यांनी आणि मी सगळ्या पद्धतीनं त्याला समजावयचा प्रयत्न केला. आधी गोडीनं नंतर रागावून पण सांगितलं, मी चार दिवस अन्नपाणी पण घेतलं नाही. त्यावर शेवटी 'जर तुम्हाला देव घरी ठेवायचे असतील तर खुशाल ठेवा पण मग मी इथं राहणार नाही' असं म्हणून वासू घरातून निघून गेला. ह्यांनी मग माणसं पाठवून शोधून आणलं. तेव्हापासून देव घरातून गेले ते गेलेच, देवघराला टाळं लावलं. आम्ही तरी काय करणार सुनबाई, नवसानं झालेलं पोरं हे, त्याच्याशिवाय काय देव महत्वाचा आहे होय? देव काय गं, मनात असला तर झालं, त्याची मूर्तिपूजा केली तरच आपण आस्तिक असं होत नाही, देव शेवटी आपल्यातच असतो कि, आणि जर हुडकायचाच असेल तर इतरांच्या मनात शोधावा असं एवढी वर्ष स्वतःला मनाला समजावत आम्ही जगतोय. घरात गणपती येत नाही कि गौर बसत नाही, हळदीकुंकवाला कुणालाही बोलवत नाही. आता आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही पण तू आमच्या वासूला साम्भाळून घे. हा देवाच्या बाबतीतला तिरस्कार सोडला तर अगदी हिऱ्यासारखा आहे आमचा वासू.... अतिशय शांत आणि प्रेमळ. मगाशी मोठ्या आवाजात बोलला ना ते तू देवाचं नाव काढलंस म्हणून. मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना सुनबाई ?"
"इथं घरात देव नाहीत" या एकाच वाक्यापाशी सगळं आयुष्य संपल्यासारखं वाटलं विमलाला. त्या नंतर सासूबाईंनी म्हटलेला प्रत्येक शब्द विमलाच्या कानात शिसं ओतल्यासारखा होता. लहानापासून देवाला नैवेद्य न दाखवता अन्नाचा एक घासही घश्याखाली न गेलेल्या विमलाला देवाचं अस्तित्वाचा नाकारणाऱ्या घरी अन्न गोड कसं लागणार? सगळंच अशुद्ध आणि अवघड होऊन बसलं होत. विमलाची खूप काळजी घेणारे आणि प्रेम करणारे वासुदेवराव देवाचा विषय काढला कि दुर्वास रूप घेत. सरळ सरळ काय पण आड वाळणानं पण कधी विमलाची याचना त्यांनी ऐकली नाही.
पण काहीच पर्याय नव्हता. फक्त नास्तिक आहेत म्हणून नवऱ्याला सोडून जाणं हे बालिशपणाचं होत आणि अर्थातच तो काळही तसा नव्हता. मनात कडवटपणा भरलेला असूनही विमला संसाराचं ओझं पेलत होती. दिवसातून एकदा तरी तिची नजर देवघरापाशी खिळून राही, कधी कधी देव तिच्या स्वप्नात येई तर कधी मंदिरात जाण्यासाठी तिचा जीव तळमळे, घरा शेजारी चालणाऱ्या आरत्या गणपती उत्सवात तिचं काळीज चिरत. घरात शेतीच्या कामांसाठी तसेच कुणी ना कुणी पाहुणे येत जात असल्याने जवळपास वीस पंचवीस लोकांचा स्वयंपाक रोज बनवावा लगे. विमला तिचा बराचसा वेळ मनातल्या मनात स्तोत्र म्हणण्यात घालवी, विमला आपले मन त्यात गुंतवे, कधी वाचनालयातून पुस्तकं वाची तर कधी सासू बाईंची सेवा करी. वर्षभरानंतर घरात गोड बातमी मिळाली तेंव्हा पहिल्यांदा विमलाच्या ओठावर मनापासून हसू आलं. आता निदान वेळ घालवण्यासाठी अगदी आपल्या जवळचं कुणीतरी येणार या विचारानेच तिला आकाश ठेंगणं झालं. त्यानंतर चित्राचा जन्म झाला आणि दोन वर्षानंतर चैतन्यचा. मुलांना झोपवताना विमला अंगाई ऐवजी गणपती किंवा मारुती स्तोत्र म्हणे, त्यांना महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी हलक्या आवाजात सांगे जेणेकरून मुलांना नास्तिकतेच्या झळा लागू नयेत.
वर्षे सरत गेली. सासू सासरे गेले आणिविमला आता विमलाबाई बनल्या. मुलांना मोठं करता करता, नवऱ्याची काळजी घेता आणि घरातला रोज वाढणारा गोतावळा सावरता विमलाबाई कधी चाळीशीच्या झाल्या ते कळलंच नाही. चित्राचं लग्न झालं, चैतन्य शिकायला पुण्याला होता. आता एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त विमलाबाई आणि निवृत्त झालेले वासुदेवराव राहत.
मनातल्या एका कोपऱ्यात दाट अंधार ठेवून जगत असलेल्या विमलाबाईंची गात्रं आता शिथिल झाली होती. कधी कधी आपण घालवलेल्या आयुष्याचा त्यांना राग येई. पंचवीस वर्षांच्या संसारात आपल्याला आवडेल असं एकदाही करायला मिळत नसेल तर ह्याला कारावास का म्हणू नये? हे म्हणतात कि ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे पण जर त्या प्रेमापायी फक्त एकदा आपलं ऐकलं असतं तर काय झालं असतं ? दर वर्षी त्या वासुदेव रावांसमोर त्या गाऱ्हाणे मांडायच्या, कार्तिक सुरु झाला कि 'अहो फक्त या वर्षी घरी गणपती बसवूया कि, फक्त दीड दिवसाचा. घरी कुणीतरी पाहुणा आलाय असंच समजा. दीड दिवसांनी विसर्जनच करायचं आहे मूर्तीचं . फक्त एकदा माझं ऐका, फक्त माझ्यासाठी.. परत कधीही काहीही मागणार नाही मी तुम्हांला. हवी तर शेवटची इच्छा समजा माझी.'
पण नाही, वासुदेवरावांनी एकदाही विमलाबाईंचं ऐकलं नाही. आयुष्यत प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते, स्वतःला हवं त्या व्याख्येत दुसऱ्याला सुखी ठेवताच येत नाही. दुसऱ्याला सुखी ठेवायचं असेल तर स्वतःच्या तत्त्वांपासून थोडंसं वळण घेऊन त्यांना दुसऱ्याच्या परिभाषेत बसवायला हवं आणि हेच कधी वासुदेवरावांना कळलं नाही.
________________________________________________________________
अडगळीच्या खोलीचा दरवाजा किरकिरला. दरवाज्यात चैतन्य उभा होता.
"आई, सगळी तयारी झालीय, मोक्ष धामाकडं घेऊन जायचंय बाबांना."
"बर" असं म्हणत विमलाबाईंनी कोपऱ्यातली धुळीत ठेवलेली ट्रंक उघडली. लाल रंगाच्या सुती वस्त्रात गुंडाळलेले देव बाहेर काढून त्या खालमानेने त्यांना निरखू लागल्या.
"आई अगं चल लवकर आणि हे काय करत बसलीयेस? गुरुजी सांगत होते कि घरात १३ दिवस सूतक आहे तेव्हा देवपूजा करायची नाही आणि तू मात्र इथं......"
सकाळपासून पहिल्यांदाच विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मान वर करून डबडबत्या डोळ्यांनी चैतन्य बघून त्या शांतपणे म्हणाल्या "चित्राला माझ्या आंघोळीचं पाणी काढायला आणि देवघर झाडून ठेवायला सांग. आजच तर सूतक संपलंय घरातलं."
💬 प्रतिसाद
(49)
प
पद्मावति
Tue, 10/30/2018 - 10:53
नवीन
खुप आवडली कथा.
- Log in or register to post comments
क
कलम
Tue, 10/30/2018 - 11:12
नवीन
मी लिहिलेली हि पहिलीच लघुकथा. कृपया चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रिया द्या. त्याप्रमाणे माझं लिखाण सुधारण्याचा प्रयत्न करेन.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Tue, 10/30/2018 - 11:25
नवीन
सुंदर मिलाफ दोन विरुद्ध स्वभावांचा, या लघुकथेत साकारला गेला आहे . लघुकथा फारच छोटी पण छान झाली आहे .
- Log in or register to post comments
क
कलम
Tue, 10/30/2018 - 11:30
नवीन
मनापासून धन्यवाद
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/30/2018 - 11:55
नवीन
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/30/2018 - 12:01
नवीन
बाहेर फेकलेले देव घरातल्या वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी आणून दडवून ठेवून दिले असतील.
- Log in or register to post comments
क
कलम
Tue, 10/30/2018 - 12:23
नवीन
वयाच्या बाराव्या वर्षी घरातले देव त्यानं बाहेर फेकून दिले..
- झालेल्या प्रकारांनंतर बावरलेल्या नव्या सुनेला सर्व इतिहास सांगण्याचा एका सासूचा प्रयत्न.
विमलाबाईंनी कोपऱ्यातली धुळीत ठेवलेली ट्रंक उघडली. लाल रंगाच्या सुती वस्त्रात गुंडाळलेले देव बाहेर काढून त्या खालमानेने त्यांना निरखू लागल्या.
-यशोधरा यांनी सांगितल्या प्रमाणे देव घरातच अडगळीच्या खोलीत दडवून ठेवलेले आहेत. आज इतक्या वर्षांनंतर विमलाबाई देवांच्या मूर्तीना इतक्या जवळून पाहत आहेत आणि स्पर्श करत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न होता.
@माहितगार आणि यशोधरा .. प्रतिसादांबद्दल आणि कथा इतक्या काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Tue, 10/30/2018 - 12:00
नवीन
@ कलम,
कथा आवडली.
नास्तिक व्यक्तीला घरच्या आग्रहामुळे बळेच सण-सोहळे करावे लागणे आणि नास्तिकांच्या घरात देवभीरू व्यक्तींची होणारी घुसमट दोन्ही टोकं पाहिली आहेत. दोन्हीकडे साध्य काहीच होत नाही, मने तेव्हढी दुखावतात.
जिवाभावाच्या व्यक्तीवर स्वतःचे आग्रह लादू नये हेच योग्य.
- Log in or register to post comments
क
कलम
Tue, 10/30/2018 - 12:28
नवीन
माणूस स्वतःच्या सुख दुःखाच्या व्याख्येत समोरच्याला बसवू पाहतो. आपण समोरच्याला दिलेलं सुख हेच खरं सुख आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. थोडं दुसऱ्यासाठी दुसऱ्याला हवं तसं जगलं तर संसार सुखाचे होतील.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/30/2018 - 12:41
नवीन
+१ कथेतील देवभिरु स्त्रीची घुसमट समजता येऊ शकते तरी देखिल भारतीय संस्कृतीतील खरोखर सश्रद्ध स्त्री "....सकाळपासून पहिल्यांदाच विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मान वर करून डबडबत्या डोळ्यांनी चैतन्य बघून त्या शांतपणे म्हणाल्या "चित्राला माझ्या आंघोळीचं पाणी काढायला आणि देवघर झाडून ठेवायला सांग. आजच तर सूतक संपलंय घरातलं."..." नवर्याप्रती जो काही असेल तो कडवटपणा एवढ्या तडका फडक सहसा काढणार नाही आणि १३ दिवसाचे सूतकपण पाळेल. वास्तव शक्यते पेक्षा लेखकाच्य व्यक्तिगत भावना विमलाबाईंच्या रंगवलेल्या पात्रातून प्रकट होत असाव्यात आणि हि लेखकाची भूमिका देवभीरु असेल पण नास्तिकतेप्रती हिंदू संस्कृतीस अभिप्रेत संयमाचे दर्शन घडवणारी आहे का ? टोकाची नाही ना ? या बाबत प्रथमदर्शनी साशंकता वाटते.
- Log in or register to post comments
क
कलम
Wed, 10/31/2018 - 05:19
नवीन
नवर्याप्रती जो काही असेल तो कडवटपणा एवढ्या तडका फडक सहसा काढणार नाही आणि १३ दिवसाचे सूतकपण पाळेल.
नवर्याच्या हट्टापायी संसाराची पंचवीस तीस वषर्षे ती एक प्रकारचं सूतकच पाळत आली आहे की. त्याच्या मरणा नन्तर आणखी १३ दिवस पाळले तर काही होणार नाही हे जरी खरे असले तरी काही घाव खूप आत पर्यंत जखम करतात.
जर वासुदेवराव बायकोवर इतकं प्रेम करत होते तर ज्याप्रमे आपली आस्तिक बायको फक्त आणि फक्त आपल्यासाठी इतकी वर्षे स्वतःला देवापासून दार ठेवत होती हे समजून घेऊन त्यांनी तिच्यासाठी एकदा दीड दिवसाचा गणपती (कथेत सांगितल्याप्रमाणं) बसवू द्यायला काय हरकत होती? समोरच्याचा विचार न करता आपले निर्णय समोरच्यावर लादणे याला प्रेम म्हणावे का? या सर्व गोष्टी लक्षात घेता विमलाबाईंची (जरी टोकाची वाटत असली तरी किंवा त्या कालच्या संयत स्त्रीला न शोभणारी असली तरीही) चुकीची वाटत नाही.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 10/30/2018 - 12:01
नवीन
आवडली कथा.
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Tue, 10/30/2018 - 12:07
नवीन
खूप मस्त :)
आवडली कथा!!
- Log in or register to post comments
क
कलम
Tue, 10/30/2018 - 12:23
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 10/30/2018 - 12:20
नवीन
छान!! आवडली कथा... दोन विरूध्ध स्वभावाच्या व्यक्तींचा संसार... असं चित्र बर्याच वेळेला दिसतं खरं!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 10/30/2018 - 12:57
नवीन
सुंदर वातावरणनिर्मीती आणि लेखन.
जर्रा खटकले ते सूतक शब्दाविषयीचे वलय म्हणून. शक्यतो (कारण संसार म्हणून जे अभिप्रेत आहे त्याचे वर्णन कथेच्या पूर्वभागात आलेच आहे. देवाप्रति भावना नाही हे कारण मन खट्टू व्हायला कारणीभूत असले तरी माणूस आणि नवरा म्हनून कोणतीही खोट दिसत नाही. ) कोणतीही स्त्री जोडीदाराच्या मरणानंतर सूतक संपले हा शब्दप्रयोग वापरणार नाही. त्यातल्या त्यात तो नास्तिक असल्यावर. आणि इतकी वर्षे त्याच्यासोबत संसार केल्यावर थोडे तरी मतपरिवर्तन झालेच असेल की.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 10/30/2018 - 14:21
नवीन
++२११२१
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 10/30/2018 - 14:22
नवीन
देवाबद्दल कितीही आपलेपणा असला आणि ज्या काळातील हि कथा आहे त्या काळातील बायकांचे कर्मकांडाविषयी असलेले अत्त्यांतीक प्रेम (?) लक्षात घेतले तरीही त्या काळातील बायका नावर्याप्रति समर्पित असत व नवरा म्हणजे देव मानत असत (at least या भावनेतून बाहेर पडल्या नव्हत्या) अशा वातावरणात नवरा बाकी अत्यन्त प्रेम करत असताना केवळ देवामुळे त्याचा इतका तिरस्कार करावा कि डोळ्यात अश्रूही येऊ नये? इतकंच काय ते पटलं नाही. पण कथा म्हणून तुम्ही खूप अप्रतिम लिहलीय. सगळं चित्र समोर उभं राहतं
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 11/01/2018 - 15:13
नवीन
उपरोक्त वाक्यातील वस्तुस्थिती नसती आणि कथेतून लेखिका मांडतात तसे झाले असते तर, विवाहोत्तर अथवा पळवून नेल्यामुळे धर्मांतरीत झालेल्या भारतीय स्त्रीयांनी भारतीय संस्कृतीतील कथानके आणि कदाचित मुर्तीपुजाही एवढ्या हट्टाने जपली असती तर, भारतीय ईस्लाम आणि भारतीय ख्रिश्चॅनिटीचे स्वरूप फार निराळे राहीले नसते का ?
- Log in or register to post comments
क
कलम
Wed, 10/31/2018 - 05:23
नवीन
नवर्याच्या हट्टापायी संसाराची पंचवीस तीस वषर्षे ती एक प्रकारचं सूतकच पाळत आली आहे की. त्याच्या मरणा नन्तर आणखी १३ दिवस पाळले तर काही होणार नाही हे जरी खरे असले तरी काही घाव खूप आत पर्यंत जखम करतात.
जर वासुदेवराव बायकोवर इतकं प्रेम करत होते तर ज्याप्रमे आपली आस्तिक बायको फक्त आणि फक्त आपल्यासाठी इतकी वर्षे स्वतःला देवापासून दार ठेवत होती हे समजून घेऊन त्यांनी तिच्यासाठी एकदा दीड दिवसाचा गणपती (कथेत सांगितल्याप्रमाणं) बसवू द्यायला काय हरकत होती? समोरच्याचा विचार न करता आपले निर्णय समोरच्यावर लादणे याला प्रेम म्हणावे का? या सर्व गोष्टी लक्षात घेता विमलाबाईंची (जरी टोकाची वाटत असली तरी किंवा त्या कालच्या संयत स्त्रीला न शोभणारी असली तरीही) चुकीची वाटत नाही.
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Wed, 10/31/2018 - 06:51
नवीन
थोडं व्यक्तिगत होईल पण स्वतःच्या घरी फार मजेदार प्रसंग बघितलेले आहेत.
मातोश्री प्रचंड धार्मिक, रोज पहाटे यथासांग पूजा-अर्चा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नसत. दुसरीकडे एका अत्यंत दुःखद घटनेनंतर पिताश्रींनी देवपूजेला कायमचा रामराम ठोकलेला. रोज मातोश्रींनी देवापुढे दिवा लावला रे लावला की ते वातीनी सिगरेट पेटवणार !
हा प्रसंग दररोज घडत असला तरी दोघांनी एकमेकांना कधी 'पूजा करू नका' किंवा 'दिव्यावर सिगरेट पेटवू नका' असे एकदाही सुचवले नाही. राग नाही, भांडण नाही, विवाद नाही. दोघांचे एकमेकांवर असलेले अलोट प्रेम आणि खेळीमेळीचे नाते हे सर्वाधिक महत्वाचे आहे हे लहानपणीच उमजले :-)
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 10/30/2018 - 13:52
नवीन
छान कथा . +१
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 10/30/2018 - 16:49
नवीन
खूप आवडली कथा.
वासुदेवरावांचे असे हेकट वागणे हा आई वडिलांवर व बायकोवर एकप्रकारे मानसिक अत्याचार करणारेच वाटले. एवढी वर्षे मन मारून जगलेल्या विमलाबाईंच्या भावना अशाप्रकारे व्यक्त होणे नाही खटकले. पुढील लेखनास शुभेच्छा.
- Log in or register to post comments
क
कलम
Wed, 10/31/2018 - 05:24
नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 10/30/2018 - 18:34
नवीन
स्वत:ची तत्वे श्रेष्ठ आणि त्याचा अट्टाहास महत्वाचा का आयुष्याच्या जोडीदाराचं मन,सुख महत्त्वाचे हे ज्यानं त्यानं ठरवावं.
तत्व कुरवाळत मिरवता येते दागिन्यांसारखे,पण मनाच्या जखमा खोल आणि जिव्हारी राहतात.
बिनदागिन्याचा नाखु पांढरपेशा
- Log in or register to post comments
क
कलम
Wed, 10/31/2018 - 05:25
नवीन
अगदी मनापासून पटलं.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Tue, 10/30/2018 - 22:41
नवीन
ते काय म्हणतात ना "short but sweet " तशीच ही कथा छान कागदावर उतरलेली आहे. मनापासून कथा आवडली. शेवटच्या वाक्याने सुंदर परिणाम साधता आला हे कथेचे वैशिष्ट्य मला आवडले. पुलेशु.
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Tue, 10/30/2018 - 23:27
नवीन
वासुदेवरावाना देवाविषयी घ्रुणा का निर्माण झाली?
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 10/31/2018 - 07:27
नवीन
हाच प्रश्न मनात आला. वासुदेवरावांची बाजु कळली नाही .
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 10/31/2018 - 00:50
नवीन
कथा आवडली.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 10/31/2018 - 02:40
नवीन
आधुनिक मिराबाई का?ं
- Log in or register to post comments
क
कलम
Wed, 10/31/2018 - 05:26
नवीन
सर्व प्रतिसादांबद्दल आभार.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 10/31/2018 - 06:00
नवीन
कथा आवडली!
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Wed, 10/31/2018 - 06:08
नवीन
चांगलीच जमली आहे कथा
- Log in or register to post comments
न
नँक्स
Wed, 10/31/2018 - 13:26
नवीन
खुप आवडली कथा.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 10/31/2018 - 14:06
नवीन
.
- Log in or register to post comments
स
सविता००१
गुरुवार, 11/01/2018 - 06:54
नवीन
सुंदर कथा आहे.
दोघेही आपापल्या मतांवर नको इतके ठाम आहेत असं वाटून गेलं पण
- Log in or register to post comments
क
कलम
गुरुवार, 11/01/2018 - 09:09
नवीन
तिथंच तर गणित चुकतं संसाराचं. :(
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
गुरुवार, 11/01/2018 - 11:12
नवीन
कथा आणि त्यातले विमलाबाईंचे शेवटचे वागणे लई भारी!

- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 11/01/2018 - 13:19
नवीन
कथा आवडली.. लेखनशैली आणि कथानकही.
वेगळ्या दृष्टीकोनातून -> एखादा नास्तिक म्हणजे वाट चुकलेला, मग आयुष्याने धडा शिकवल्यावर त्याला उपरती होवून तो शेवटी अस्तिकतेला शरण जातो असं कंटाळवाणं कथानक यात नाही.. नास्तिक माणूस नास्तिक म्हणूनच जगतो आणि मरतोही हे दाखवलंय ते आवडलं :)
अर्थात आपली मतं दुसर्यावर लादण्याचं (अस्तिक वा नास्तिक कुणीही..) समर्थन होवू शकत नाहीच.
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
गुरुवार, 11/01/2018 - 14:45
नवीन
छान कथा लिहली आहे !
त्या नास्तिका मूळे विमला बाईंच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी मन विषण्ण करते .
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 11/01/2018 - 16:19
नवीन
वाह, क्या बात हैं ! किती सुंदर कथा !
देव हा जीव की प्राण असणार्या विमलाबाईंचं दु़:ख आणि क्लेश समजण्यापलीकडचे आहेत.
जोडीदार सुतक बरोबरच गेले.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 11/01/2018 - 22:07
नवीन
माहितगार,
मला इथे थोडा वेगळा विचार दिसतोय. नाहीतरी वासुदेवरावांचा विश्वास नव्हताच, तर मग विमलाबाईंनी तरी सुतक का पाळायचं? सुतकाच्या पहिल्या दिवशी देवपूजा करून दोन्ही हेतू साध्य होताहेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 11/02/2018 - 04:41
नवीन
@ गा. पै.
वरचा श्वेता४ यांचा प्रतिसाद कदाचित अधिक नेमका असावा. कथा शीर्षक + कथा यांचा अप्रत्यक्ष अर्थ एका कडव्या नास्तिका सोबतच्या संसाराची सुरवात हे मरण, संसार कालावधी हा सूतक काळ आणि नवर्याचे मरण हे मुर्तीपुजेच्या आस्थेवरचे ग्रहण सुटणे. मुर्ती पुजकांच्या आस्थे सोबतची भावना लेख नास्तिकांपर्यंत सहज पोहोचवतो. अर्थात कथा भावनिकतेच्या माध्यमातून नास्तिकांशी / मुर्तीपुजा नाकारणर्यांशी आवश्यक पंगा उत्तमपणे घेऊ शकत असली तरी तत्वज्ञानाच्या पातळीवर पंगा घेऊ शकत नाही हि अडचण शिल्लक रहाते.
या कथेतील नायिके प्रमाणे नायिका मानव जातीला ज्यू लोकांनी अशेरा देवी काठ्या तोडताना, अब्राहम ख्रिअश्चन ते मुस्लिम मुर्ती भंजनानंतर भरपूर प्रमाणात मिळाल्या असत्या तर अखंड भारताचा १/३ आणि पृथ्वीतलावरील २/३ लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुर्ती भंजकांपासून बरेच अधिक सुरक्षीत राहु शकले असते. या कथेतील नास्तिक नायका प्रमाणे जोडीदाराचे स्वांतत्र्य नाकारणारे नास्तिक तसे कमी असतात. खरी समस्या मुर्ती भंजक आस्तिकांची असते त्यांचे मुर्ती भंजन मात्र एका अर्थाने पूर्ण मानवी समाज व्यवस्थेसाठी सांस्कृतिक मरण असावे. आणि सर्वसाधारण नास्तिकांपेक्षा मुर्ती भंजक आस्तीक अधिक सूतकी वातावरण आणत असावेत असे वाटते.
- Log in or register to post comments
क
कलम
Fri, 11/02/2018 - 05:19
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 11/02/2018 - 03:20
नवीन
या कथेत व्यक्तिगत जिवनातील प्रसंग आहे. व्यावसायिक जिवनात नास्तिक व्यक्तिस आस्तीकतेस समोर जाताना होणार्या कुचंबणेचा विषय मागे अतिवास यांनी यशस्वी माघार हा लेख लिहिला होता. आणि त्यातील काही बाबींवर व्यक्तिगतता नी व्यावसायिकतेचे नाते हा चर्चा धागा लिहिला होता.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 11/02/2018 - 05:55
नवीन
या कथेतील नायक बहुधा विक्षीप्तपणामुळे टोकाची भूमिका घेतो. पण बर्याचदा समाज पतीची भूमिका उर्वरीत कुटूंबावर लादत असतो. अगदी अलिकडे देवेंद्र फडणविसांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पत्नीने नौकेवर जोखीमपुर्णपणे काढलेल्या सेल्फी बद्दल देवेंद्र फडणविसांच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी आहेत आणि त्यांच्या पत्नीचे आदर्श तरुणाईने गिरवू नयेत म्हणून त्यांच्या पत्नीने अधिक जबाबदारीने वागावे. याचीच तुलना सीते बद्दल प्रजा रामाला जबाबदार धरते आणि प्रजेपुढे हतबल राम पत्नीत्याग करुन मोकळा होतो याच्याशी करा.
नेतृत्वाचे अनुयायी जोडीदारावरही अपेक्षा लादत असतात. विदर्भातील एका विवाद्य व्यक्तिमत्वाच्या पत्नीला स्वतःचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व असूनही पतीच्या विवाद्यतेमुळे आमदारकीपासून हात धुवावा लागला. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रथम पत्नीस अगदी शेवटच्या काळात पंढरपूर मंदिरात प्रवेश नसतानाही बाहेरुन दर्शन घेण्याची इच्छा डो. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारावी लागली असे वाचून आहे (संदर्भ हाताशी नाही चुभूदेघे) . तर नरहर कुरुंदकरांनी स्वतःचा विश्वास नाही असे जाहीर करुनही काही मुंज इत्यादी कर्मे कुटूंबीया खातर केली तर पुरोगाम्यांच्या टिकेस त्यांना समोर जावे लागले होते.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 11/03/2018 - 04:08
नवीन
कथा आवडली.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 11/06/2018 - 12:38
नवीन
आवडली कथा!
असे कितीतरी संसार असतील जिथे बायका नाईलाजाने आपल्या अजिबात न आवडणार्या, दुराग्रही, व्यसनी, बेजबाबदार, मारकुट्या, रागीट, नाकर्त्या, संशयखोर,भांडखोर, उद्धट नवर्यासोबत अक्षरशः दिवस काढत असतील. काही काही नवरे मी असेही पाहिले आहेत ज्यांच्यामध्ये हे सगळे गुण एकत्र कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सुखेनैव नांदत होते. असे संसार वर्षानुवर्षे कसे टिकतात देव जाणे...
- Log in or register to post comments