तो माझा सांगाती..

तो माझा सांगाती..
हिमालय. त्याचं वेड लागतं.
प्रत्येक ऋतूगणिक लोभस ते रौद्र अशी वेगवेगळी रूपं धारण करणारं, ते एक वेगळं आणि सुंदर असं जग आहे. ज्ञात-अज्ञात शिखरं, वळत वळत, स्वत:भोवती गिरक्या घेत जाणारे रस्ते, घनदाट जंगलं, आपल्या मस्तीत वाहणारे जलप्रवाह, हिरव्यापिवळ्याकरड्या शेतपायर्या, बर्फ, पठारं, गुरफटून टाकणारे ढग आणि धुकं, मनात येईल तिथे उगवणारी फुलं, दूर दूर उगवलेली, आजूबाजूच्या निसर्गाशी एकरूप झालेली एकांडी घरं. नक्षत्रलोकाशी इथे आपसूक आणि सहज नाळ जुळते.
काही काही योग नशिबात असावे लागतात, आणि जेव्हा ते पदरात पडतात, तेव्हा येणारी अनुभूती शब्दांत मांडणं खरं तर अशक्य. मला वाटतं, हिमालयात एकदा पाऊल पडलं की ती पावलं हिमालयाचीच होऊन जातात. मग सुटका नाही, हेच खरं. हिमालय आणि त्याच्या परिसराविषयी मी एकूणच भारावूनच विचार करते हे मला बर्याचदा जाणवतं, पण तो एकूणच परिसर, हिमालयाचे भव्य करकरीत कडे, खोल उतरत जाणार्या दर्या, वनसंपदा, हिरवी पठारं, निळ्या हिरव्या नद्या, जलप्रपात, पहाडांच्या अंगाखांद्यांवर विसावलेलं आभाळ असं सारं पाहताना, अनुभवताना नेहमीच भरून, उचंबळून येतं. वेडेपणा आहे, पण असू द्या. आपणही काही काळासाठी ह्याचाच एक भाग झालेलो आहोत, ही जाणीव दर वेळीच मोठी सुखावणारी आणि मन पिसासारखं हलकं करणारी ठरते.
काही दिवसांसाठी हिमालयात भटकताना, मनात येईल तेव्हा आणि तसं, अगदीच स्वान्तसुखाय असं, आपण इथे दिवस घालवू शकत नाही, ह्याची काहीशी खंतही वाटते कधीकधी मनात. पहाडांमधलं सर्वसामान्यांचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नाही, ही जाणीव असतेच, तरीही इथे येऊन बसेरा करण्याचा मोह होत राहतो. जमेल का, ही एक भीती वाकुल्या दाखवत राहते म्हणा. तर ते एक असो. आपल्या आयुष्याच्या मांडलेल्या पसार्यालाही कारण आपणच असतो न काय! म्हणता म्हणता आयुष्याचे पसारे वाढतात, एकातून दुसरा असे उलगडतात, कधी कधी आवरले जातात. आपणच मांडलेला खेळ असतो, तेव्हा ह्या सार्याची जबाबदारी झुगारणार तरी कशी आणि कुठे? आणि झुगारायची तरी कशासाठी? पहाड नाही का युगानुयुगे ठामपणे उभे राहतात आपल्या जागी? पाऊस, वारा, वादळं ह्या सार्यांत आपली जागा सोडत नाहीत, तसंच काहीसं आपलं.
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रवासाची चाकोरी कदाचित आखूनच मिळते जन्माबरोबरच. कोणाची वाट कधी मळलेली, तर कोणाची जरा अधिक रुळलेली, तरी प्रवास हा ठरलेला. तो कोणी चुकवू शकत नाही. कोणी ठरलेल्या इच्छित गंतव्याला सुखेनैव पोहोचणारा आणि कोणाच्या प्राक्तनात गंतव्यच काय, रस्ताही अनभिज्ञ. अशा प्रवासाचीही स्वतःची खुमारी असणारच. प्रत्येक प्रवास, त्याच्या वाटा, त्यातले खाचखळगे, प्रवासाची लांबी-रुंदी सारं काही प्रत्येकासाठी वेगळं. आपल्याला झेपेल, पेलेल अशा बेताने मार्गक्रमण करावं. आपण फक्त मार्गक्रमणाचे धनी, इतर व्याप आपल्याला तरी कशाला? घडणारा प्रवास जाणिवा समृद्ध करत जातो. अनुभवांत भर घालत जाणारे, कधी सुखावणारे तर कधी दुखावणारे, कधी सुन्न करणारे तर कधी समाधानाने ओसंडून वाहणारे क्षण. आणि अशाच लहान-मोठ्या अनुभवांतून शिकणारं, अनुभवांची खूणगाठ पक्की करत आयुष्याशी जुळवून घेत जगायचा धडा गिरवणारं मन, हेच तर ह्या प्रवासाचं फलित. एखाद्या वळणावर उलीकशीच विश्रांती घेत, अशा अंतर्बाह्य प्रवासाचा अधूनमधून धांडोळा घेत पुढल्या प्रवासाला त्याच आत्मीयतेने सिद्ध असणं, शुद्ध तितकं मनात जपत आणि हीण असेल ते विसरून जात, पुढे पुढे चालायचं. भविष्याच्या प्रतीक्षेत फार न गुंतता, आत्ता समोर उभ्या ठाकलेल्या क्षणाशी समरसून जगायला शिकलो की प्रवास सफल होतो आहे म्हणायला हरकत नसावी.
प्रचंड अशा हिमालयातून दर्याखोर्या, पहाड पालथे घालताना़ हे सारं नकळत आस्ते आस्ते आत उतरत, झिरपत राहतं. कोणी मुद्दाम म्हणून शिकवायची, सांगायची गरजही पडत नाही. हाच बहुधा 'सत्यं, शिवं, सुंदरा'चा साक्षात्कार. सुंदर, आणि कल्याणदायक, हितकारक सत्य. नैसर्गिक. जराही अशुद्धाचा मागमूस नसलेला आणि चिरकाल टिकून राहील, असा.
हिमालय म्हणजे अक्षय, अखंड आनंदाचा स्रोत आहे. पहाडांच्या उतारांवर उभी असणारी आणि मैलोनमैल पसरलेली, हिरव्या रंगातील अनेक छटांची उधळण करणारी जंगलं अनुभवणं आणि त्या जंगलांमधून वाट काढत ट्रेकचा रस्ता पार करणं, हा दर वेळीच एक विलक्षण अनुभव असतो. त्यांच्या आठवणी आनंदाने आणि सुखाने मनात जपायच्या. व्हॅलीमधला मखमाली शेवाळाने नखशिखांत मढलेला, नावालाही लाकडाची एखादी वाळकी काडीसुद्धा न दिसणारा, शेवाळाबरोबरच अंगाखांद्यावर दाट पर्णराजी बाळगून असलेला आणि सकाळच्या मृदू सोनसळी किरणांनी न्हाऊन निघालेला वृक्षराज. काश्मिरातल्या गगनगीरातलं सणसणीत उंचीवरचं आणि पहाडांच्या तीव्र उतारांवरलं घनदाट काळपट हिरवं जंगल, दुगलबिट्टातून तुंगनाथाकडे जाताना ठायीठायी भेटलेले, अस्ताव्यस्त पसरलेले, कवेतही न येणारे अवाढव्य वृक्ष. बागी नावाच्या खेड्यातून पराशर मुनींच्या स्थानापाशी पोहोचण्यासाठी केलेला दाट जंगलातून केलेला उभ्या चढणीचा प्रवास.. चुन्नी गावातून निघून देवरिया ताल ह्या ठिकाणी पोहोचताना केलेला जंगलातला प्रवास.. कितीतरी आठवणी .. हिमालयातल्या जंगलांनी आपल्या गर्द आठवणींचं छ्त्र माझ्या माथ्यावर, मनावर कायमसाठी धरलेलं आहे.
झाडा-वृक्षांचं स्वतःचं एक जग असतं, म्हणे. हर्मन हेसं म्हणतो, Trees are sanctuaries. खरंच आहे. हिंदी भाषेत sanctuariesना 'शरणस्थान' हा एक चपखल शब्दप्रयोग आहे. हिमालयात अमाप हिरवी माया ल्यालेले वृक्ष पाहताना आणि वाटा चालताना थकून ह्या वृक्षांच्या सावलीत टेकताना त्यांना शरणस्थान का म्हणायचं ते उमजतं. चालून चालून पायांचे तुकडे पडलेले असतात. पाठीवर कितीही कमी ओझं असलं तरी ते एका क्षणी खूप वाटायला लागलेलं असतं आणि अचानक चालताना एखाद्या वळणापाशी किंवा समोरच रस्त्यावर एखादा एकांडा वृक्ष किंवा एखादं जंगल किंवा छोटीशी वनराई सामोरी येते. थकव्याने जळशीळ झालेलं मन क्षणार्धात हलकं होतं. हिरव्या रंगाच्या पोपटी सोनेरी बाळछ्टेपासून सावळ्या हिरव्या रंगाच्या परिपक्व छटा आस्ते आस्ते पांथस्थाला अंतर्बाह्य शांतवतात. अजस्र बुंध्याचा खडबडीत स्पर्श टोचणारा नसतो, मायेने जवळ घेणारा, आश्वासक असतो. घरच्या म्हातार्या लोकांच्या खरखरीत पण मायाळू हातांची आठवण होते. वृक्ष जणू त्याच्या न दिसत्या हातांनी पण ऐसपैस पसरलेल्या अस्तित्वाने कवेत घेतो. वृक्षाच्या बुंध्याशी शरीर सैलावतं, मन विसावतं. 'झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया' ही ओळ मनातून उमटते.
जंगलांमधून फिरताना पावलोपावली सौंदर्य उलगडतं. अलगद खाली उतरणारे सूर्यकिरण, एखाद्या पक्ष्याची 'मी आहे सोबतीला' सांगणारी शीळ, वृक्षांवर उमटलेली मखमाली शेवाळी, त्याच्या बुंध्या-पायथ्याशी उमललेली रानफुलं. एखाद्या पहाडावरून स्तब्ध उभी असलेली वृक्षराजी पाहताना मला उगाच भरून येतं. कशासाठी युगानुयुगं ते वृक्ष असे उभे असतील, असं वाटतं. जिथे मनात येतं तिथे थांबून हळूच जाऊन एखाद्या वृक्षाला, त्याच्या खोडाबुंध्याला कव घालत मी माझ्या दुबळ्या मिठीत घ्यायचा प्रयत्न करते. जमत नाही, पण वृक्षराज माझ्या रागलोभांसकट मला स्वीकारतो आहे, असं वाटत राहतं. त्याच्या रंध्रारंध्रात भरलेली आश्वासक ऊर्जा आणि शांतता माझ्यात झिरपत राहते. थोड्या वेळाने माझ्या पुढच्या मार्गावर चालण्यासाठी मला शक्ती मिळते. सोबतीला वृक्ष आणि पाण्याचे स्रोत असतील, तर कितीही लांब वाटचाल आनंददायी आठवण ठरते.
ह्या सार्याबरोबरच हिमालयातच काय, जगात कुठेही फारसा ताण न घेता वावरण्यासाठी, कोणत्याही प्रसंगात डोकं शांत ठेवत, त्यातून मार्ग काढण्यासाठी एक मंत्र जपायला शिकायचा. एकदम सोपा मंत्र आणि तो म्हणजे "कोई दिक्कत नहीं!" हिमालयात राहणार्या, जे आहे त्यात समाधानी असणार्या, सतत हसतमुखाने वावरणार्या आणि आजूबाजूच्या निसर्गाइतकीच निर्मळ मनं असलेल्या हिमालयातल्या प्रत्येक व्यक्तीकडून ह्या मंत्राची दीक्षा मला मिळालेली आहे. ह्या साध्यासुध्या पण प्रभावी मंत्राचं महत्त्व अगदी शंभर काय, दोनशे टक्के मला कळलंय, वळवायचे प्रयत्न मात्र अथक आणि सतत करावे लागत आहेत! इतकी वर्षं अंगी भिनलेल्या माझ्या शहरी जाणिवा कदाचित इतक्या लवचीक नसाव्यात. इथल्या स्थानिकांचा मात्र हा अजपाजप!
समजा, बस वेळेवर आली नाही, तर त्याला पहिलं उत्तर असतं - कोई दिक्कत नहीं, आ जायेगी| मग वाट बघायची किंवा रस्ता चालू लागायचा अथवा शक्य असल्यास दुसरं वाहन बघायचं, पण चिडचिड करायची नाही. कुठे भूस्खलन झालं, उत्तर? कोई दिक्कत नहीं, साफ हो जायेगा| बीआरओवालेही त्यांचं काम इमानेइतबारे करतात, कधी कधी वेळ लागतो. तोवर काय करायचं? तोवर शांतपणे त्या निसर्गाचाच भाग बनून एखाद्या ठिकाणी ठिय्या द्यायचा, बिडीकाडी करायची, शिळोप्याच्या गप्पा मारायच्या. रस्ता बंद आहे, पूल खचला आहे, एखादी व्यक्ती कुठे पोहोचायचं तिथे पोहोचू शकली नाही, कोणासाठी काही मदत येणार होती, ती वेळेत पोहोचली नाही आणि अशा कित्येक आणि प्रत्येक समस्येला पहिलं उत्तर काय, तर ते आहे 'कोई दिक्कत नहीं!' साक्षात झेनची परमावधी. समस्येचा मुकाबला कसा करायचा, तो पुढील विचार, पण त्याही आधी कोणत्याही समस्येला कोई दिक्कत नहीं हे तीन शब्द सोपे बनवून टाकतात. समस्या एकदम आवाक्यातली वाटायला लागते. उत्तर सापडेल अशी आशासुद्धा वाटायला लागते!
सुंदर पण लहरी निसर्गाशी जु़ळवून घेत आनंदाने जगायचं असेल, आयुष्य सुसह्य, सोपं बनवायचं असेल तर ताण घेऊन कसं चालेल? थोडंसं जुळवून घेत, दोन पावलं पुढे जात, गरज असल्यास एक पाऊल मागे घेत, पुन्हा संधी मिळते तसं पुढे चालायचं. तेच तर करत असतात इथले स्थानिक. ही माणसं रोजच्या आयुष्यातही जगण्यासाठी करत असलेले कष्ट, त्यांचे लहानसहान ते मोठे संघर्ष, त्यातूनही सतत पुढे जायची वृत्ती पाहिली की हटकून 'तेथे लव्हाळी वाचती' उक्तीची आठवण येते. पुन्हा सतत हसतमुख! अगत्यशील, आतिथ्यशील आणि सौम्य प्रवृत्तीच्या इथल्या स्थानिकांविषयी आपलेपणा वाटायला वेळ लागत नाही. कित्येकदा - नव्हे नेहमीच, ट्रेक करतानाचा अनुभव आहे की सामोरी येणारी व्यक्ती हटकून हसतमुखाने नमस्ते म्हणणार, अतिशय आत्मीयतेने २-४ शब्द बोलणार. एखादी गृहिणी चहा घेतेस का, पानी पिओगी? म्हणून थांबवणार. एखादी आजी चटचट पाय उचलायचा प्रेमळ सल्ला देणार. "बस, चलते रहना, जरूर पहूंच जाओगे", "बस, थोडाही आगे हैं अब" असं उत्साह आणि धीर वाढवणारं काही बोलणार. इथल्या स्थानिकांच्या निखळ प्रेमाचं दर्शन मला फार आश्वस्त करून जातं. त्यांचा अंगभूत प्रामाणिकपणा आणि नि:स्वार्थी स्वभाव नेहमीच चकित करतो. कधीकधी वाटतं, आ़जूबा़जूच्या वातावरणाचा माणसाच्या स्वभावावर काही प्रमाणात प्रभाव पडत असला पाहिजे. भव्य हिमालयाच्या सान्निध्यात येथील सर्वसामान्य स्थानिकांची मनंही मोठी होत असली पाहिजेत. ह्याच कारणासाठी पूर्वीच्या काळी ऋषिमुनी येथील वातावरणात येऊन राहत असतील का? सतत शुद्धाच्या सहवासात राहून माणसाच्या मनावरील राग, लोभ, लोभ, मोह अशांसारख्या भावना, लालसा, वासना यांची पुटं गळून पडत असावीत का? आयुष्य अधिक सोपं होत असावं का आणि आपुला संवाद आपणासी होण्याची सुरुवात होत असावी?
हिमालयात वा त्याच्या आवतीभोवती वावरताना हे असं सारं चिंतन मनातल्या मनात घडत राहतं. नेहमीच्या चिंता, त्रास, त्याबद्दलचे विचार जरा मागेच पडतात. अंतर्मुख व्हायला होतं. प्रगाढ शांतता अनुभवताना, अंतर्मनाशी संवाद साधताना, आपण इतर वेळी शब्द, साधनं, सोयी ह्यांची उधळपट्टी करण्यात कळत-नकळत किती हातभार लावतो, ह्याची जाणीव क्षणागणिक अधिकच बोचरी होत राहते. प्रत्येक वास्तव्यात खूप सारे आनंददायी आणि काही बोचरे क्षण पदरात टाकत माझ्यातलं माणूसपण टिकवायला, ते अधिक पक्कं करायला हिमालय मला त्याच्या सर्व साधनांनिशी मदत करत राहतो, त्याच्या पहाडांदर्यांनद्यांफुलांपानांजंगलांवाटांसकट आणि त्याच्या माणसांसकट. दर वेळी, अधिक उत्साहाने, अधिक आत्मीयतेने.
हिमालयाकडे पुन्हा पुन्हा परतून जाण्यासाठी मला इतकं कारण पुरेसं ठरतं. हिमालयातला एक मुक्काम सरत आला की पुढल्या मुक्कामासाठी कुठे जायचं, किती दिवसांसाठी जायचं ह्याचे आराखडे, अंदाज मनातल्या मनात जुळायला लागतात. हिमालयातून परतणार्या पावलांना, पुन्हा एकदा हिमालयातल्या जंगलातल्या, दर्याखोर्यांतल्या, पहाडांतल्या वाटांवरून चालण्याची स्वप्नं पडायला सुरुवातही झालेली असते.
हिमालयात पुन्हा पुन्हा परतून जाण्यातलं सुख मला कधीचं गवसलेलं आहे.
***
प्रकाशचित्रे ऋणनिर्देश : दीपतेश घोष, मोहित बहल आणि पुनित तिवारी.

- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments



















