अनवट किल्ले ३८ : वेताळवाडी गड (Vetalwadi gad)
वास्तविक गड-किल्ले म्हणजे संरक्षणासाठी उभारलेली लष्करी ठाणी. सहाजिकच सैन्याला उपयोगी पडेल आणि संरक्षणाचे काम चोख होईल हि काळजी घेणे याची प्रार्थमिकता असते. भक्कम तटबंदी, त्यातून पुढे आलेले बुरुज, चर्या, फांजी, खणखणीत महाद्वार, शेवटचा पर्याय म्हणून असलेला चोरदरवाजा. मात्र काही गडांच्या भाळी यापेक्षा जास्त भाग्य येते. त्यांचा निर्माता फक्त कोरड्या सैनिकी दृष्टीकोनाचा नसतो, तर हळव्या मनाचा कलांवंत असतो. तो गडाची रचना करताना एखादी बारादरी उभारतो, तटबंदीलाही कलात्मक रुप देतो, तटबंदीतील सज्जालाही एखादी महिरप ठेवतो. हे सर्व भाग्य लाभलेला, पण आज दुर्लक्षाच्या गर्तेते सापडलेला किल्ला म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील "वेताळवाडी" उर्फ "वाडीगड". आजच्या धाग्यात आपण त्याचीच सैर करुया.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
जंजाळ्याचा औरस चौरस गड पाहून आम्ही आमच्या पुढच्या लक्ष्याकडे निघालो, तो म्हणजे वेताळवाडीचा किल्ला. अंभईमार्गे आधी उंडणगावला पोहचलो, तेथून हळदामार्गे सोयगाव रस्त्यावर असलेल्या हळदा घाटाकडे निघालो. मात्र हा गड या परिसरात वेताळवाडीच्या एवजी "वाडीगड" या नावाने परिचित आहे, त्याचे कारण आम्हाला पुढे समजले. अर्थात या गडावर येण्यासाठी बरेच पर्याय आहेत.
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी वेताळवाडी गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्ला सुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
२ ) जंजाळा किल्ला पाहून वेताळवाडी दरवाज्यामार्गे उतरुन थेट चालत वेताळवाडीचा किल्ला गाठता येईल.अर्थात हि वाट खास दुर्गभटक्यांसाठीच ठिक.
निम्मा हळदा घाट उतरुन आल्यानंतर वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तटबुरूजांचे अवशेष आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागतात. गडाच्या डोंगराला वळसा घालून हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते.
डोंगर उताराला बांधलेली लांबलचक तटबंदी आणि बुरुज, समोर दोन बलदंड बुरुजात दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे वर चढत जाणारी भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते
गडाच्या दरवाजाकडे जाताना दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. या दोन बुरूजामागे नक्षीदार सज्जा असणारे त्यांच्यापेक्षा उंच व मोठे बुरुज आहे. दरवाजापर्यंत पोहचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजांची रचना केलेली आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची रचना थोडी वेगळी आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर बुरुजांच्या पुढे जिभी बांधण्यात आली आहे. जिभी म्हणजे मुख्य दरवाजापुढे उभारलेली एक भिंत. जेणेकरून शत्रुचा हल्ला झाल्यास थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये अशी रचना.अशीच जिभी मला पुढे नांदेड जिल्ह्यातील कंधार किल्ल्यावर पहायला मिळाली.
या दोन बुरुजामधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख दरवाजाकडे जाते.
डावीकडच्या बुरुजाच्या तळात एक लहान दरवाजासारखे बंद बांधकाम दिसते पण त्याचा उपयोग लक्षात येत नाही. हा दरवाजा जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्याने जंजाळा दरवाजा म्हणुन ओळखला जातो.
दरवाजाची उंची २० फुट असून त्याच्या दोन्ही बाजूस शरभशिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत
बुरुजाच्या वरील बाजुस आत उतरणारा एक लहान जिना असुन हा जिना आपल्याला बुरुजातील कोठारात घेऊन जातो.
दरवाजावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी,गडाखालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. वेताळवाडी धरणाच्या मागे प्रचंड विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला दिसतो.
हा दरवाजा पार करून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची संपुर्ण माची अंदाजे २०-३० फूट उंचीच्या तटबंदीने संरक्षित केली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग्या ठेवलेल्या आहेत. इथून वरील बाजुस वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते.
दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक प्रचंड मोठे खांबटाकं आहे. वास्तविक या टाक्याचे पाणी आधी पिण्यायोग्य होते, मात्र आता आतमधे वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात वसाहत केल्याने पाणी खराब झाले आहे. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं. ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो.
दरवाजाच्या पाय-या उतरून खालच्या भागात गेल्यवर किल्ल्याच्या बुरुजामध्ये हवामहल सारखी सुंदर खोली बांधून काढलेली दिसते. इथेच बाजुला दारुगोळा ठेवण्यासाठी असलेली कोठडीसुध्दा दिसते. एकंदरीत पहारेकर्यांना पहारा कसा सुसह्य होईल हे पाहिले आहे.
गडाबाहेरून नक्षीदार सज्जा दिसणारा बुरुज हाच बुरुज आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना दुर्ग निर्मात्याच्या रसिकपणाची दाद देते.
उजवीकडे वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज व त्यावर असलेले झाड नजरेस पडते. तटबंदीतील पूर्व टोकाचा हा बुरुज तटबंदीपासुन थोडासा सुटावलेला आहे.
या बुरुजावर जाण्यासाठी आठ-दहा पायऱ्या आहेत. इथून अजिंठा डोंगररंग व डावीकडच्या डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी दिसुन येतात.अंजिठा रांगेत असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फुट ( ६२५ मीटर ) आहे.
या बुरुजावरून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर दहा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो.
दुर्दैवाने झालेल्या दुर्लक्षामुळे या देखण्या बुरुजाची पडझड झाली आहे. मात्र तरीही त्याचे सौंदर्य उणावलेले नाही.
तोफेसाठी ठेवलेल्या खिडकीतून हळदा घाटाची वळणे आणि त्यावरुन प्रवास करणारी लाल बस मोठी झक्क दिसत होती. बालेकिल्ला दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार पसरलेला असुन येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे.
बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ सुंदर नक्षीकाम व छ्ताला झरोका असणारी हमामखान्याची घुमटाकार वास्तू आहे. हा हमामखाना भिंतीतील खापराच्या नळ्यावरून लक्षात येतो.
मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेलतुपाचे गोलाकार रांजणटाके पहायला मिळतात. इथे झाडीझुडुपातून वाट काढत आपण समोरच्या एका इमारतीपाशी पोहोचतो.
हि इमारत म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारतीचे वाड्याचे अवशेष आहेत.
वास्तविक गड पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मात्र दम देणार्या निळ्या-लाल फलकाशिवाय इथे कोणतेही काम पुरातत्व खात्याने केलेले दिसत नाही. गडावर पहारेकरी नेमला आहे, असे समजले पण हा कधीही दिसत नाही.
पुढे गेल्यावर नमाजगीर नावाची सुंदर नक्षीकामाने व कमानीने सजलेली इमारत (मस्जिद) आहे.
त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळातील निजामशाहीच्या वर्चस्वाची जाणीव करून देते.
नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर असुन समोर एक प्रचंड मोठा बांधीव शेवाळलेला तलाव आहे.
सध्या किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.अर्थात या तलावातील पाणीसुध्दा पिण्यायोग्य नाही. एकंदरीत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याने या गडावर मुक्काम करणे शक्य नाही.
पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील या उत्तर टोकावर बारदरी उर्फ हवामहल नावाची सुंदर बांधकाम केलेली २ कमान असलेली इमारत आहे.
राजघराण्यातील स्त्रियांना वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही. खरेतर वेताळवाडी गडाच्या सौंदर्याचा सर्वोच्च अविष्कार म्हणजे हि वास्तु. गडाचा ईतिहास आज फारसा ज्ञात नसला तरी गडावर कदाचित एखादे राजघराणे मुक्कामाला असावे असे एकंदरीत इथल्या वास्तुंची बांधणी बघता अंदाज करता येतो. कदाचित संध्याकाळच्या निवांत वेळी गडावरील राणी किंवा ईतर राजस्त्रिया इथे बसून आजुबाजुच्या मुलुखाची शोभा पहात असतील, पश्चिमवारा अंगावर घेत जंजाळ्याच्या गडामागे बुडणारा सुर्यास्त निरखत असतील. आज फक्त अंदाज बांधणे आपल्या हाती उरले आहे. पण निदान या बारादरीसाठी तरी ह्या गडाला भेट द्यायला हवीच. हि वास्तु राबता असताना कदाचीत वरुन लाकडाच्या छताने बंदिस्त असावी, आज मात्र छप्पर उरलेले नाही.
या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला सदरेची एक इमारत आहे.
बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या भक्कम बुरुज असणारा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.वास्तविक हि जागा मुक्कामासाठी आदर्श आहे, पण गडावर पिण्याच्या पाण्याच्या ठणठणाटाने हे अवघड वाटते. तरीही पुरेशी तयारी करुन गेल्यास हा अनुभव घ्यावा.
किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते.
खाली उतरून सपाटीवर आल्यानंतर समोर तटबंदीच्या चर्या दिसतात.
येथे एक कातळ कोरीव बुजलेले टाके आहे. अर्थात आज त्यात पाण्याचा टिपुसही नाही. पण एकंदरीत शिबंदीचा विचार करुन पाण्याची चोख व्यवस्था केली आहे.
या टाक्याच्या बाजूला ६ फुट १० इंच लांबीची खणखणीत तोफ पडली आहे. वास्तविक गडावर असणारे बुरुज आणि त्याला असणार्या जंग्या पहाता, या गडावर मोठ्या प्रमाणात तोफा असणार हे नक्की. पण आज हि एकमेव तोफ गडावर दिसते. बाकीच्या तोफा कोठे गेल्या, कि स्थानिकांनी त्या पळवल्या ? याचे उत्तर सापडत नाही. पण निदान हि तोफ तरी जपली पाहिजे.
इथे समोरच उजव्या बाजूच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो.
दरवाजातून आतमध्ये गेल्यावर वरील बाजुस बुरुज असून खाली बांधीव खंदक आहे. चोर दरवाजा बघून किल्ल्याच्या वेताळवाडी दरवाजाकडे निघावे.
दोन दरवाजांच्या समूहातील पहिला दरवाजा साध्या बांधणीचा आहे. त्याच्याच पुढे मुख्य वेताळवाडी दरवाजाला जाणारी वाट असून हा पश्चिमाभिमुख दरवाजा दोन्ही बाजूंनी अजस्त्र तट व बुरुजांनी संरक्षित केलेला आहे.
दोन दरवाजाच्या मधील भागात देवड्या आहेत. दरवाजाच्या पाय-या उतरून बाहेर पडुन पाहिल्यावर दरवाजाची भव्यता दिसुन येते.
जवळपास गडफेरी पुर्ण झाली. मध्यम आकाराचा हा गड फिरण्यास साधारण दीड तासाचा अवधी लागतो. ईतिहासामधे या गडाचा फार उल्लेख नाही. बहुधा जवळ असलेला जंजाळा आणि हा गड एकाच कालखंडातील असावेत. कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख "बैतुलवाडी" असा येतो. वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला "वेताळ" हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला वाडीचा किल्ला म्हणुन संबोधतात.
आजही उत्तम स्थितीत असलेल्या या दरवाजाच्या संरक्षक बुरुजावर शरभशिल्प कोरलेली आहेत.
एकंदरीत खणखणीत तटबंदी, प्रचंड दरवाजे, उपदरवाजे, जिभीसारखे सहसा न पहायला मिळणारे दुर्गवैशिष्ट्य, कातळकोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना, तोफा आणि बारादरीसारखी अनोखी वास्तु अशी गडाला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये उराशी बाळगून हा वेताळवाडीचा गड उभा आहे. गड, किल्ले पहाण्यात रस असणार्यांनी या किल्ल्याला सवड काढून किमान एकदा तरी नक्की भेट द्यावी. मात्र मला एकाच गोष्टीची उणीव भासली, ती म्हणजे एखादा शिलालेख असता तर या गडाच्या ईतिहासावर प्रकाश पडला असता. बाकी एखादा महाराष्ट्रातील गड पहातोय कि राजस्थानमधील, ईतका देखणा हा किल्ला आहे.
इथून समोरच सकाळी भेट दिलेला जंजाळा किल्ला दिसत होता.
इथून गडाचा बालेकिल्ला आणि विशेषतः बारादरी लक्ष वेधून घेतात.
येथे आपली गड फेरी पूर्ण करुन वेताळवाडीगावाच्या दिशेन उतरु लागलो. गड उतरायला सुरवात केल्यावर माचीवरील वेताळवाडी गावाच्या दिशेला चर्या असणारी तटबंदी आणि काही भग्नावशेष दिसुन येतात.
पावले खाली उतरत होती मात्र मन अजून वेताळवाडीगडात गुंतून पडले. खाली उतरत असलो तरी, वारंवार गडाकडे नजर जात होती. वाटेत मला हे भुयार दिसले. हे मानवनिर्मित कि एखाद्या प्राण्याचे बीळ हे समजु शकले नाही.
सुर्य झपाट्याने उतरत होता. मावळतीच्या संधीप्रकाशात गडाकडे पुन्हा एकदा पाहून घेतले. कदाचित इथे येण्याचा योग परत येईल कि नाही हे माहीती नाही. केवळ २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचलो. आमची बस आधीच गावात येउन थांबली होती. पण बस उभी असलेल्या कालावधीत कोणीतरी मागचा ब्रेकलँप पळवून नेला होता. एक कटू अनुभव सोबत घेउनच आम्ही निघालो.
वास्तविक देशभरातील आणि आतंरराष्ट्रीय पर्यटक जिथे भेट द्यायला आवर्जुन येतात, त्या अजिंठ्या लेण्यापासून हा गड केवळ पन्नास कि.मी. वर असूनही उपेक्षित वाटतो. थोडी निगा ठेवली, स्थानिकांची गाईड म्हणून नेमणूक केली आणि पुरेशी प्रसिध्दी केली तर हे एक उत्तम पर्यटनस्थळ होईल यात शंका नाही.
रुद्रेश्वर लेणी :- वेताळवाडीगडा बरोबर जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाता येतात. वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. अर्थात वेळेअभावी आम्हाला काही हि लेणी पहाता आली नाहीत. स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
जंजाळ्याचा औरस चौरस गड पाहून आम्ही आमच्या पुढच्या लक्ष्याकडे निघालो, तो म्हणजे वेताळवाडीचा किल्ला. अंभईमार्गे आधी उंडणगावला पोहचलो, तेथून हळदामार्गे सोयगाव रस्त्यावर असलेल्या हळदा घाटाकडे निघालो. मात्र हा गड या परिसरात वेताळवाडीच्या एवजी "वाडीगड" या नावाने परिचित आहे, त्याचे कारण आम्हाला पुढे समजले. अर्थात या गडावर येण्यासाठी बरेच पर्याय आहेत.
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी वेताळवाडी गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्ला सुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
२ ) जंजाळा किल्ला पाहून वेताळवाडी दरवाज्यामार्गे उतरुन थेट चालत वेताळवाडीचा किल्ला गाठता येईल.अर्थात हि वाट खास दुर्गभटक्यांसाठीच ठिक.
किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते.
( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता. ब्लॉगचा पत्ता: भटकंती गड-कोटांची संदर्भग्रंथः- १) औरंगाबाद जिल्हा गॅझेटियर २ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे ३ ) मराठवाड्यातील किल्ले :- पांडुरंग पाटणकर ४ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट ५ ) www.durgbharari.com हि वेबसाईट💬 प्रतिसाद
ह
हेमंतकुमार
Fri, 08/24/2018 - 10:48
नवीन
व फोटो ! तुम्ही तुमचे सदस्यनाम सार्थ करता .
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 08/24/2018 - 16:20
नवीन
प्रतिसादाबध्दल धन्यवाद. हे लिखाण आंतरजालावर यावे म्हणूनच हा आय.डी. घेतला.
- Log in or register to post comments
क
किल्लेदार
Fri, 08/24/2018 - 16:15
नवीन
वेताळगड नावाचा किल्ला मालवण मध्ये पण आहे काय हो ?
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 08/24/2018 - 16:19
नवीन
बरोबर, हा गड धामापुर तलावाच्या मागच्या बाजुला आहे. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 08/24/2018 - 17:26
नवीन
तुमच्या दुर्गभ्रमंतीच्या पॅशनला त्रिवार सलाम. खूप छान माहिती मिळत आहे. खूप आधीचे भाग वाचले नाहीयेत अजून, पण जसे जमेल तसे सगळे वाचून काढणार.
- Log in or register to post comments
न
निशाचर
Fri, 08/24/2018 - 23:51
नवीन
सुरेख दिसतोय हा किल्ला. धरण आणि घाटाचे फोटो विशेष आवडले.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 08/25/2018 - 00:54
नवीन
या लेखमालेचे असेच १०० भाग होण्याकरिता आपणास शुभेच्छा!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 08/25/2018 - 05:43
नवीन
दुर्गवास्तूंनी संपन्न असलेल्या वेताळवाडी किल्ल्याचा परिचय फार आवडला. अजिंठा लेणीजवळचा हा परिसर अनेक प्राचीन वास्तू, गड, लेणी, मंदिरे, जंगले ह्यांनी समृद्ध आहे. ह्या परिसरातील तुमची भटकंती फार आवडतेय.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Tue, 08/28/2018 - 11:33
नवीन
मला वाटतंय कमीतकमी पडझड झालेला हा एकमेव किल्ला असावा !!
सुंदर छायाचित्रे आणि छान माहिती .
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 08/28/2018 - 11:51
नवीन
दुर्गविहारीजी
सर्वप्रथम प्रचंड पॅशनेट आणि अप्रतिम लिखाणाबद्दल धन्यवाद.
फक्त एक सूचना करु इच्छितो, आपले इजिप्त फेम फॅरोहा टर्मिनेटर आहेत त्यांनी कसे फोटो छोट्या साईजमध्ये स्लाईड शो टाईप घेतलेत तशा पध्दतीचे काही सेटिंग करुन घेता आले तर घ्यावे आपल्या गड किल्ल्यांच्या धाग्याला. होतेय काय की स्लो नेट वाल्यांना जास्त फोटोचे धागे उघडायला त्रास होतो आणि तुमचे बरेच फोटो फुल रिझोल्युशनमध्ये असतात. ते कॉम्प्रेस न होता तसेच ओपेन होतात. मग अजुन जास्त वेळ लागतो. सो....प्लीज.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/28/2018 - 14:51
नवीन
जिओच्या जमान्यात स्लो नेट, कैतरीच काय अभ्याजी..!
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Wed, 08/29/2018 - 08:26
नवीन
झकास एकदम.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
गुरुवार, 08/30/2018 - 14:31
नवीन
कुमार१, किल्लेदार, टर्मिनेटर, निशाचर, शब्दबंबाळ, वल्लीदा, ट्रम्प, अभ्या.. आणि चाणाक्य साहेब, तसेच सर्व वाचकांचे मनापासून आभार. वास्तविक पुर्णपणे अप्रसिध्द ठिकाणांनविषयी मी लिहीत असूनही आपल्या प्रतिसादांमुळे प्रोत्साहन मिळते.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
गुरुवार, 08/30/2018 - 14:36
नवीन
टर्मिनेटर साहेब, जरुर वाचा आणि प्रतिसाद कळवा.
शुभेच्छांसाठी मनापासून आभार!
अभ्याजी, आपली सुचना स्वागतार्ह आहे, बहुतेक वेळा फोटो आणि त्याची माहिती अशी माझ्या धाग्यात रचना असते, तरीही जिथे जास्त फोटो असतील तिथे स्लाईड शोस्वरुपात आणायचा नक्कीच प्रयत्न करीन. कमी रिझोल्युशनचे फोटो टाकण्याचा प्रर्यत्न करुन पहातो. काही धागे लिहून तयार आहेत. पण जे अजून लिहीले नाहीत, त्याठिकाणी याचा प्रयोग करुन पहातो. सुचनेसाठी मनापासून धन्यवाद !
- Log in or register to post comments