मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!
मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!
मी: "एक कणीस भाजून दे!"
मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"
पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...
"फक्त मीठ लावा" असे म्हटल्यावर तो कणीस वाला निर्विकार पणे म्हणाला, "हां साब, सब मिठा ही हैं!"
(त्याला म्हणायचे होते की सगळी कणीस गोडच आहेत!)
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"
तो, "सिरफ नमक नहीं हैं! सब मिक्स हैं!"
मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!"
कणीस: "मतलब?"
मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"
पुण्यात असूनही मी "मराठी बोलणारा एलियन" असल्याची जाणीव पुन्हा एकदा मला झाली. मराठी बोलणारे लोक महाराष्ट्रा च्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात एलीयन सारखे झालेत असे वाटण्यासारखी अनेक उदाहरणे मला अस्वस्थ करतात.
मग पुन्हा तोच प्रश्न मला सतावून गेला:
वर्षानुवर्षे पुण्यात व्यवसाय करूनही मराठी विना हे लोक कसे तरून जातात? त्यांना मराठी बोलण्याची गरज का वाटत नाही?
पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं:
मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!
आपणच जर मराठीचा आग्रह धरला तर त्यांच्या व्यवसायासाठी ते मराठी शिकतीलच!!
मराठी माणसच जर का पुण्यात मराठी बोलणार नसतील तर मग दुसरं कोण बोलणार?
आपण बोलल्याशिवाय दुसरे इतर राज्यांतील लोक तरी कशाला आणि का म्हणून मराठी बोलतील?
उदाहरण घ्यायचे तर हे घेता येईल:
भाजीवाला मराठीत ओरडत असतो, "भाजी घ्या, टमाटे वांगे! लसूण, आलं घ्या!" आणि मराठी माणूस त्याला विचारतो, "भैय्या अद्रक कितने का दिया?"
काय म्हणावं याला आता?
मराठीत ताईची दीदी झालीया
आणि आल्याचं अद्रक झालंया
मराठीचं तुफान आता संपलंया
त्याचं वारं बी वाहनं बंद झालंया
तसेच इतर राज्यांतील माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमी असे म्हणतो:
"और फिर, पुणे कब आ रहें हो?"
"When are you coming to पुणे?"
एकदा नाव बदलल्यावर परदेशातील लोक सुध्दा योग्य उच्चार करतात, मोडके तोडके का होईना पण ते "मुंबाय" म्हणतात तरी! फक्त मराठी माणसांनाच का पुणे आणि मुंबई म्हणायला लाज वाटते? जणू काही तो पर राज्यातील मित्र तुम्ही पुणे म्हटलं तर तुमच्याशी मैत्री तोडणार आहे!
पण बहुतेक मराठी माणसं स्वतःच "पूना कब आ रहें हो?" असे म्हणतात.
काय त्यांना पूना म्हणण्यात आनंद आणि भूषण वाटतं काय माहिती? हीच गोष्ट मुंबईसाठी!
हिंदी भाषिकांशी बोलताना मी नेहमी असेच बोलतो, "मुंबई में भारी बारिश हुई" पण आपली मराठी माणसंच जास्त करून बॉम्बे म्हणण्यात धन्यता मानतात!
आपणच आपल्या शहरांचा चुकीचा उच्चार करणार तर इतरांकडून कशाला बरोबर उच्चारही अपेक्षा करायची?
हाच मान मी दक्षिणेकडील राज्यांच्या शहरांना सुध्दा देतो जसे, बंगळूरू, चेन्नई याप्रमाणे उच्चार करून!
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"हे तुम्ही तरी कुठे मराठीत म्हटलंत? :)भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.येव्हढच महत्वाच आहे की दोन माणसांमधे संवाद होतो आहे. आणि मराठी भाषा संवर्धनाचा विषय असेल तर मला वाटत की मराठी माणसांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी शिकवून मराठी चांगलं वाचण्याची आणि लिहण्याची सवय लावायला हवी. त्यानेच मराठी भाषा आणखीन वाढेल आणि टिकेल.