मेकॉलेचे 'मिनट'.
(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे आणि ते संदर्भ क्र.१, क्र.२ अशा प्रकारे दिलेले आहेत.)
'Macaulay's Minute' ही गोष्ट आपल्या सर्वांच्या साधारण माहितीची आहे. २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी मेकॉलेने एक टिपण लिहिले ज्याचे ह्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आणि पर्यायाने देशावर देशावर फार खोलवर आणि चिरस्थायी परिणाम झाले. त्या 'मिनट'ची पूर्वपीठिका आणि पार्श्वभूमि काय होती ह्याबद्दल फारशी महिती नसते, ती देणे हा ह्या लेखनामागील मर्यादित हेतु आहे. (मेकॉले ह्या नावाचा खरा इंग्रजी उच्चार 'मकॉलि' असा काहीसा आहे पण मराठी वाचकांना मेकॉले हा उच्चार अधिक परिचित असल्याने तोच येथे वापरला आहे.)
१८३४ सालचा हिंदुस्तान. दुसऱ्या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्तानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब! ह्यामुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषकरून ब्रिटिश) संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश हे हिन्दुस्तानी संस्कृति, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणतः श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती.
मेकॉले म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८०० - ५९). १८३२ ते १८३३ अखेर लंडनमधून ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यावर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा सेक्रेटरी, तदनंतर १८३४ ते १८३७ अखेर ह्या काळात कलकत्त्यात गवर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये लॉ मेंबर अशी साधारण ६ वर्षे त्याचा हिंदुस्थानच्या कारभाराशी प्रत्यक्ष संबंध होता. इंडियन पीनल कोड तयार करणे हे महत्त्वाचे काम त्याने ह्या काळातच पार पाडले. ह्याखेरीज कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनचा अध्यक्ष म्हणून त्याने जी विस्तृत टिप्पणी लिहिली तिला 'Macaulay's Minute' असे नाव मिळाले. मेकॉलेचे मूळ पूर्ण टिपण केव्हाच गहाळ झाले आहे असे दिसते पण त्याचा पुष्कळसा भाग तळटीप ४ मध्ये उपलब्ध आहे. टिपण संक्षेपाने पाहायचे असेल तर ३:४०९ पहा. (टिपणातील काही विधाने आज भारतीयांना रुचणारी नाहीत, ती वंशश्रेष्ठत्व, टोकाचा दुरभिमान, patronizing विचार दाखविणारी आहेत पण ती तत्कालीन पूर्वग्रह आणि समजुतींची द्योतक असल्याने मेकॉलेला आज त्यांवरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही. त्या विधानांवर प्रस्तुत लिखाणामध्ये मी कोणतेहि मत व्यक्त करीत नाही हे मी विशेषेकरून उल्लेखीत आहे.) हे संपूर्ण ’मिनट’ कोलंबिया विद्यापीठाच्या ह्या संस्थळावरहि उपलब्ध आहे.
त्या टिप्पणीचा परिणाम म्हणजे हिंदुस्थानातली शिक्षणाची पद्धत मुळापासून बदलली आणि शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. आज आपणाला दिसतो तो भारत देश तिच्यातून निर्माण झाला आहे. हिन्दुस्तानी प्रजेला कशा प्रकारचे शिक्षण ह्यापुढे अधिक योग्य आहे ह्या मुद्द्यावरून कमिटीच्या दहा सदस्यांमध्ये ५-५ अशी विभागणी झाली होती. ५ सदस्यांच्या मते सरकारने तोवर चालत आलेले सरकारी शैक्षणिक धोरणच पुढे चालवावे ज्या योगे सरकार जुन्या पद्धतीच्या संस्कृत, अरेबिक आणि पर्शियनच्या अभ्यासावर भर देणारे धोरणच चालू ठेवील. उर्वरित ५ सदस्य इंग्रजी भाषा आणि आधुनिक ज्ञान देणाऱ्या नव्या पद्धतीचा आग्रह धरत होते. (ह्या दोन विचारांना पुढील लेखनात अनुक्रमे पौर्वात्य आणि पाश्चात्य असे संक्षेपाने संबोधले आहे.) कमिटीचा अध्यक्ष म्हणून मेकॉलेने जे भारदस्त टिपण (minute) लिहिले त्यामुळे पारडे पाश्चात्य पक्षाच्या बाजूस झुकले आणि तेव्हापासून इंग्रजी भाषेची चलती हिंदुस्थानात सुरू झाली.
ह्या वादातील पराभूत पौर्वात्य पक्षाचा प्रमुख म्हणजे हेन्री थॉबी प्रिन्सेप (१७९२ - १८७८) आणि ब्राह्मी लिपीचा संशोधक जेम्स प्रिन्सेपचा थोरला भाऊ. हाही कलकत्त्यातील उच्चपदस्थांपैकी एक होता. गवर्नर जनरल विल्यम बेंटिंकचा अंतिम निर्णय त्याच्या पौर्वात्य पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे कमिटीच्या सदस्यत्वाचा त्याने राजीनामा दिला.
शिक्षणधोरणविषयक हा वाद सरकारी पातळीवर केला जाण्याचे कारण म्हणजे १८१३ सालचा ’चार्टर कायदा’ आणि काही सरकारी पैसा एतद्देशीय प्रजेच्या शिक्षणासाठी वापरण्याची त्या कायद्यात करण्यात आलेली तरतूद. ही रक्कम 'learned natives of India' ह्यांच्या उत्तेजनासाठी वापरायची होती. हे 'learned natives of India' म्हणजे नक्की कोण ह्यावरचा वाद कलकत्त्यामध्ये कमिटी ऑफ पब्लिक एज्युकेशनपुढे विचारार्थ आला. हा मुद्दा कायद्याच्या शब्दांचा काय अर्थ लावावा असा होता. सदस्यांमध्ये पौर्वात्य आणि पाश्चात्य अशी ५-५ दुभागणी झाल्यामुळे मामला अध्यक्ष ह्या नात्याने मेकॉलेपुढे विचारासाठी आला. त्यावर तो म्हणतो: (क्र.४)
'... सार्वजनिक शिक्षण कमिटीच्या काही सदस्यांच्या मते आजतागायत चालत आलेली पद्धति हीच काय ती ब्रिटिश संसदेने १८१३ मध्ये पुरस्कृत केलेली पद्धति आहे...
मला नाही असे वाटत की संसदेने केलेल्या कायद्याचा कशाहि मार्गाने अर्थ लावला तरी त्यामधून सध्या लावलेला अर्थ काढता येईल. अमुकच भाषा किंवा अमुकच शास्त्र असे काहीहि कायद्यात उल्लेखिलेले नाही. 'वाङ्मयाचे पुनरुज्जीवन आणि विकास आणि सुशिक्षित एतद्देशीयांना उत्तेजन अशा हेतूने, आणि ब्रिटिश सत्तेखालच्या भागातील रहिवाशांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रवेश आणि विकास व्हावा अशा हेतूने' काहीएक रक्कम बाजूस काढून ठेवण्यात आली आहे. ह्यावरून असे मांडण्यात येत आहे किंवा असे गृहीत धरून चालण्यात येत आहे की संसदेच्या मते वाङ्मय म्हणजे केवळ अरेबिक वा संस्कृत वाङ्मय. मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान वा न्यूटनचे पदार्थविज्ञान ह्यांच्याशी परिचय असणाऱ्या एतद्देशीयाला जणू 'सुशिक्षित एतद्देशीय' ही उपाधि संसदेने लावलीच नसती. कुश दर्भाचे उपयोग आणि परमेश्वरात विलीन होण्याचे रहस्य हिंदूंच्या पवित्र ग्रंथातून शिकलेल्यांनाच जणू ही उपाधि लागावी. हा अर्थ समाधानकारक आहे असे मला वाटत नाही.' (टिपणाच्या ज्या भागाचा हा अनुवाद आहे तो भाग क्र. ५ मध्ये बघावा. असे लिहिण्यामागचा आपला हेतूहि तो स्पष्ट करतो. तो भाग क्र. ६ येथे बघावा.)
अशा रीतीने चार्टर कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रसंग पडल्याने आणि learned natives of India ह्या शब्दांचा अर्थ 'युरोपीय ज्ञान घेतलेले' असा प्रस्थापित झाल्याने जुन्या पद्धतीच्या शिक्षणावर खर्च केला जाणार सरकारी पैसा थांबवून त्याच्या जागी नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यात यावे हा निर्णय सरकारी पातळीवरून करण्यात आला.
ह्या पूर्वीच १८२३ साली राजा राममोहन रॉय ह्यांनी गवर्नर जनरल लॉर्ड ऍमहर्स्ट ह्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कलकत्त्यामध्ये प्रस्तावित संस्कृत कॉलेज न काढता तीच रक्कम एतद्देशीयांना पाश्चात्य विज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी वापरली जावी असे सुचविले होते. ह्या सूचनेमधून तेव्हातरी काही निष्पन्न झाले नाही.
हा संपूर्ण वाद क्र.१ येथे दर्शविलेल्या जागी वाचावयास उपलब्ध आहे. तेथील पल्लेदार इंग्रजीतील लांबलचक टिपणे वाचायची नसतील तर त्यांचा उत्तम सारांश क्र. २ मध्ये प्रोफेसर आणि शब्दकोषकार मोनियर विल्यम्स ह्यांनी लिहिला आहे.
आतापर्यंत मेकॉलेच्या मिनटची पार्श्वभूमि काय होती ह्याचे निवेदन केले. अलीकडे ’राष्ट्रीय’ विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांकडून ह्या ’मिनट’चा वेगळाच अर्थ लावण्यात येतो आणि भारतीयांना कायमच्या दास्यामध्ये ठेवण्याचा हा दुष्ट डाव होता असाहि प्रचार करण्यात येतो. त्यासाठी ईमेल-वॉट्सॅप-फेबु अशा माध्यमातून बरेचदा एक 'लॉर्ड मेकॉलेचे पत्र' येत असते. त्यात त्याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश संसदेला उद्देशून केलेल्या तथाकथित भाषणाचा काही भाग दिलेला असतो. तो असा-
I have travelled across lenght & breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we should ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I prpose that we replace her old and ancient education system, her culture, for if the indians think that all that is foreign and English is good greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation.आणि या पत्रानंतर "बघा, आता तरी सुधारा, इंग्रजीचा नाद सोडा..." वगैरे छापाची तथाकथित देशभक्तीपर आवाहने असतात. हे ’भाषण’ संपूर्णपणे खोटे आणि manufactured आहे हे थोड्याच शोधावरून दिसते. पहिले म्हणजे २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी तो ’लॉर्ड’ झाला नव्हता तर साधा मेकॉलेच होता. तो लॉर्ड झाला १८५७ मध्ये जेव्हा त्याला ’बॅरन’चा दर्जा मिळाला. तसेच २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी तो लंडनमध्ये पार्लमेंटात भाषण करूच शकला नसता कारण १८३४तच आपली हिंदुस्थानातली कारकीर्द सुरू करण्यासाठी तो हिंदुस्थानात पोहोचला होता आणि १८३८ साली ती जागा सोडून इंग्लंडला परतेपर्यंत तो हिंदुस्थानातच होता. (ह्याची अधिक चर्चा येथे पाहता येईल.) शिक्षणपद्धति प्रमाणेच लिपीबदल करून सर्व हिन्दुस्तानी भाषांना रोमन लिपि लागू करावी अशा आग्रहाचेहि काही लोक होते आणि तो वादहि कलकत्तेकरांच्या छोटया वर्तुळात हिरीरीने लढवला गेला होता. त्याबद्दल अन्य केव्हातरी. संदर्भः १. The application of the roman alphabet to all the Oriental languages ... सेरामपूर प्रेस, १८३४. (http://tinyurl.com/yyt2x4q) २. Original papers illustrating the history of the application of the Roman Alphabet to the Languages of India, संपादक मोनियर विल्यम्स, १८५९. (http://tinyurl.com/y2s5a6b) ३. The Life and Letters of Lord Macaulay Vol 1, जॉर्ज ओटो ट्रेवेल्यन, १८८०. http://tinyurl.com/y2zbqbq ४. http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html ५. '...the opinion of some of the gentlemen who compose the Committee of Public Instruction, that the course which they have hitherto pursued was strictly prescribed by the British Parliament in 1813,... It does not appear to me that the Act of Parliament can, by any art of construction, be made to bear the meaning which has been assigned to it. It contains nothing about the particular languages or sciences which are to be studied. A sum is set apart 'for the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knolwdge of the sciences among the inhabitants of the British territories.' It is argued, or rather taken for granted, that by literature, the Parliament can have meant only Arabic and Sanscrit literature, that they never would have given the honorable appellation of 'a learned native' to a native who was familiar with the poetry of Milton, the Metaphysics of Locke, and the Physics of Newton; but that they meant to designate by that name only such persons as might have studied in the sacred books of the Hindoos all the uses of cusa-grass, and all the mysteries of absorption into the Deity. This does not appear to be a very satisfactory interpretation.' ६. '... it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.' (http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html)
💬 प्रतिसाद
(43)
श
श्वेता२४
गुरुवार, 07/05/2018 - 09:06
नवीन
आवडला
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 07/05/2018 - 10:46
नवीन
रोचक.
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 07/05/2018 - 14:56
नवीन
अगदी सहमत. २०१४ साली या विषयावर एक सुंदर पुस्तक प्रसिद्ध झाले होते. लेखकद्वय वाटवे- आजगावकर होते असेही आठवते. वास्तविक ते मी बुकगंगावरून मागवून संग्रही ठेवले आहे. पण संग्रहातून ते तात्काळ शोधणे कठिण जाते. हा विषय संस्थळांवर, फेसबुकादि माध्यमांवर वारंवार चर्चिला जातो आणि तद्दन खोटी माहिती पसरवली जाते. त्याचे खंडन पुराव्यानिशी या पुस्तकात केले आहे. १८३५ साली मेकॉले भारतात होता हे त्यात व्यवस्थित दाखवून दिले आहे. या पुस्तकाच्या आधारे माध्यमांमध्ये अनेक वेळा मी या मुद्द्याचा प्रतिवाद केला आहे. एका राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात हा मुद्दा होता आणि तोच या खोट्या माहितीचा उगम असावा असा अंदाजही या पुस्तकात व्यक्त केला गेला आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 07/05/2018 - 17:16
नवीन
हे पण फेक आहे का ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 07/05/2018 - 17:42
नवीन
आज त्यांवरून झोडपण्यात काहीच तथ्य नाही. आणि मी कोणतेहि मत व्यक्त करीत नाही हि दोन विधाने परस्पर विरोधी वाटतात
या न्यायाने मनुस्मृतीतील जन्माधारीत विषमता ते हिटलरचा वंशवाद बरेच काही माफ करावे लागेल :))
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 07/05/2018 - 18:20
नवीन
धन्यवाद. मी काही दिवस आधी ईस्ट इंडिया कंपनी वर लिहिले होते आणि त्यानंतर "गोरे साहेब" ह्या मथळ्या खाली काही प्रमुख गोरे साहेब आणि त्यांची कारकीर्द ह्यांच्या बद्दल लिहायला सुरुवात केली होती. नंतर सविस्तर पणे प्रकाशित करूच पण आपण मेकॉले बद्दल इतके लिहिले ह्याबद्दल धन्यवाद.
मॅकोलेचे वायरल मिनिट प्रत्यक्षांत बेगडी आहे हे मी सुद्धा आधी इथे लिहिले होते. आपण जास्त खोलांत गेला आहात. ह्याविषयावर पुढील लेख वाचावा असा आग्रह धरते :
http://koenraadelst.bharatvani.org/articles/hinduism/macaulay.html
http://koenraadelst.blogspot.com/2017/02/macaulays-biography.html
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 07/05/2018 - 18:55
नवीन
अस्मितावादी, देशीवादी यांना रूचणार नाही, पण हे जर असे असेल, तर बर्याच लोकांचा गैरसमज दूर होईल. धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/05/2018 - 21:01
नवीन
तुम्हीच दिलेल्या लिन्क मधील एक पॅरा क्वोट करत आहे :
[11] It will hardly be disputed, I suppose, that the department of literature in which the Eastern writers stand highest is poetry. And I certainly never met with any orientalist who ventured to maintain that the Arabic and Sanscrit poetry could be compared to that of the great European nations. But when we pass from works of imagination to works in which facts are recorded and general principles investigated, the superiority of the Europeans becomes absolutely immeasurable. It is, I believe, no exaggeration to say that all the historical information which has been collected from all the books written in the Sanscrit language is less valuable than what may be found in the most paltry abridgments used at preparatory schools in England. In every branch of physical or moral philosophy, the relative position of the two nations is nearly the same.
>>>>
ह्या एका वाक्यावरुन ह्या माणासची मनोवृत्ती तुमच्या लक्षात येत नाही का ?
हा माणुस त्याच टिपिकल युरोपियन मेन्टॅलिटीला रीप्रेसेन्ट करतो कि ज्यांनी अमेरिकेतील , मेक्सिकोतील , दक्षिण अमेरिकेतील संस्कृती उध्वस्त केल्या , लोकांचे जीनोसाईड करुन संपवुन टाकले.
पण ठीक आहे ! आहे हे चांगलेच आहे , भारतातील बहुसंख्य लोकांना " तुम्हाला काहीही अभिमानास्पद संस्कृती नाही , काहीही इतिहास नाही , काहीही आदर्श नाहीत, तुमचा सगळा भुतकाळ म्हणजे जहीयत आहे जहीयत !" हे आजच्या काळात कन्विन्स करणे अशक्यच आहे . मॅकोले ने ते करुन ठेवले आहे म्हणुन ही मेंढरे हाकणे शक्य होत आहे !
आम्हीही ह्या मेंढरांच्या कळपातच शिकलो आहोत ! पण सुदैवाने कळत्या वयात हिंदु तत्वज्ञान , संगीत , नाट्यशास्त्र , चित्रकला शिल्पकला, अर्थशास्त्र , गणित , खगोलशास्त्र , आयुर्वेद , ह्यांची हलकीशी का होईना पण ओळख झाली , आणि कसे शिस्तबध्द पधतीने हे सारे दडपुन टाकले गेले हे ही कळाले .
पण ते असो. ह्या मॅकोले साहेबांची फार कृपा आहे बहुसंख्यांवर ! आम्हीही ह्यांचा आदर्श घेवुन पुढे मागे क्लासेस किंव्वा इंजिनियरींग कॉलेज किंव्वा गेलाबाजार इन्टर्नॅशनल स्कुल तरी काढावे असा विचार करत आहोत :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 05:12
नवीन
मी ही जवळपास असाच काहीसा प्रतिसाद लिहीण्यासाठी आलो.
ठिक आहे मकॉले ईतर व्हीलन पेक्षा कमी व्हीलन असेल , कदाचित त्याचे नसलेले लेखन / भाषण त्याच्या नावावर खपवले गेले असेलही पण त्या महोदयांची दुसरी वाक्ये आहेतच अशी की असे काही लेखन मेकॉलेच्या नावावर ख्पवणे सोपे झाले असावे.
धागा लेखक म्हणतात त्या प्रमाणे ज्या माणसाचा भारताशी सरळ संबंधच इनमीन ६ वर्षे आला त्याचा पूर्ण भारत पहाणे शक्य झाले नसणार हे खरे आहे , पण त्याच वेळी ज्याच्याने कधी भारत फिरुन झाला नाही , केवळ काही वर्षाच्या वरवरच्या परिचयावर एका भल्या मोठ्या भारत देशा बद्दलचे महत्वपुर्ण निर्णय परकीय व्यक्ती किती सहज घेऊ शकत (आणि कदाचित आजही घेऊ शकतात !) आणि आपल्याच बहुसंख्य बांधवांची आपल्या निर्णय क्षमता दुसर्या हाती देण्यास मुकसंमती असते किंवा काही वेळा त्याचे कौतुकही ! हे पाहुन आचंबित होण्यास होते.
भारतावर आक्रमण करणार्या आणि भारतीय बुद्धीस सक्षमपणे ग्रासणार्या शक्तींच्या नावे क्लासेस किंव्वा इंजिनियरींग कॉलेज किंव्वा गेलाबाजार इन्टर्नॅशनल स्कुल काढायला काहीच हरकत नाही , किंबहुना अगदी स्मारकेच नाही तर मंदिरेही काढावीत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 07/06/2018 - 15:36
नवीन
??
त्याचा काय संबंध ? मॅकॉले ने शिक्षणपध्दतीत सुधारणा केल्या ना ? म्हणुन कॉलेज क्लासेस काढावे म्हणालो . मॅकॉलेची स्मारके मंदिर काढुन पैसा कसा छापता येईल हे कळाले नाही !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 16:03
नवीन
जास्त वाईडर स्टेटमेंट केले मी, आक्र्मक आणि परक्यांची व्यक्तिपूजा आणि प्रतिमा मंडणाची भारतीय सुडोपुरोगाम्यांची हौस स्मारके अथवा मंदिरे काढून भागवावी असे फार मनात आहे. आपला प्रतिसाद आधी आलेला नसता तर आज सकाळी सकाळी १०० % नवा सटायर धागा टाकणार होतो. पण त्या साठी तसे मेकॉले फारच छूटपूट टार्गेट होते त्यात तुमच्या प्रतिसादाने काम झालेले होते म्हणून बेत पोस्टपोन केला
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 05:29
नवीन
ब्रिटीश पार्लमेंटच्या वेबसाईटवर Mr Thomas Macaulay नावाने February 6, 1833 ते August 24, 1833 या काळातील पार्लमेंट मध्ये केलेल्या भाषंणांचे दुवे दिसताहेत. जिज्ञासूंना त्यांची भाषणे तपासून पहाता येतील म्हणून दुवा देत आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 05:46
नवीन
या दुव्यावर १८३१ ते १८५३ या काळातील संसदेतील वक्तव्ये दिसतात , शोधायलाही सोपी दिसतात.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 07/06/2018 - 05:49
नवीन
मुळात या बनावट मिनिट्समधली विसंगती इथे आहे.....
that I do not think we should ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I prpose that we replace her old and ancient education system, her culture,
यात तो (अॅलेज्डली) म्हणतो की भारतावर विजय मिळवण्यासाठी त्यांची जुनी शिक्षणव्यवस्था बदलायला हवी. मुळात एखाद्या देशाची शिक्षणव्यवस्था "बदलण्याच्या आधी" देशावर विजय मिळवायला हवा ना? तुम्ही राज्यकर्ते झाल्याशिवाय तुम्ही शिक्षण व्यवस्था कशी बदलणार?
वैसे भी १८३०-३५ पर्यंत ब्रिटिशांनी बहुतांश भारतावर अगोदरच विजय मिळवलेला होता. शिक्षणव्यवस्था बदलून विजय मिळवण्याचा लांबचा मार्ग न अवलंबता.......
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 07:02
नवीन
हे वाक्य मेकॉलेचे नाही हे २००४ मध्येच लक्षात आले असावे. आंतरजालावर काही ठिकाणी इंडिया एवजी आफ्रीकेचेही उल्लेख दिसताहेत मजकुर तोच आहे. ईंग्लंडच्या विरोधात प्रचार करणार्या कुणि तरी हे धकवले असावे असू शकते जसे ईराण रशिया किंवा इतर कम्युनीस्ट . -आम्हालाही वेगळ्या काँस्पीरसी थेअरीज जमतात :)
दुसरी शक्यता
वाक्य मेकॉलेच्या नावावर खपवणे बरोबर नव्हे पण वाक्य रचना पहाता पूर्ण कृत्रिमही नसावे. ईतर कुणि कुठेतरी भारत किंवा आफ्रीकेबद्दल असे उल्लखे केलेले असू शकतील जे कुठल्यातरी आंजावर न शोधता येणार्या कुठल्यातरी स्रोतात असू शकेल. आणि काळाच्या ओघात त्याचा कदाचित शोधही लागेल.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 06:52
नवीन
१८५३ मधील मेकॉलेचे भाषणातील काही भाग रोचक आणि मेकॉलेचे कौतुक करण्या जोगा आहे. मुख्य म्हणजे नेपोटीझमच्या तो किती विरोधात होता. ज्यांना ईतर कारणासाठी मेकॉलेचे कौतुक वाटते त्यांनी कमीत कमी नेपोटीझमचा विरोध मेकॉले कडून नक्कीच शिकावा . हे भाषण मोठय मी पण पूर्ण वाचल नाही पण रोचक दिसतय.
मुख्य म्हणजे मेकॉले स्वतःही आज हयात असता तर त्याला भारता बद्दल निर्णय घेण्याचा मुदलात अधिकार नव्हता हे त्यानेही कदाचित कबूल केले असते. पण पंचेंद्रीये बंद केलेल्या मेकॉले भाविकांना ते कदाचित पटणार नाही.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 07/06/2018 - 09:21
नवीन
>>पण पंचेंद्रीये बंद केलेल्या मेकॉले भाविकांना
हे कोणाला उद्देशून म्हटले आहे? माझ्या प्रतिसादाला हा उपप्रतिसाद आहे म्हणून विचारलं !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 09:37
नवीन
अजूक एक काँस्पीरसी थेअरीसाठी जागा शोधायची आहे का ? आपल्याला दिलेला उपप्रतिसाद वेगळा आहे !
* हेही बरय खरे ऊपप्रतिसाद नजरे आड होतात, सर्वसाधारण प्रतिसाद उपप्रतिसाद दिसतात , काय काही कॉन्स्पिरसी नाही ना ?
-
हे आपल्याला उपप्रतिसाद नाही पण प्रत्येक पंचेंद्रीये बंद केलेल्या मेकॉले भाविकाला लागू पडेल नाही का ? ज्यांना टोचते त्यांनी आपापली भाविकता तपासून मॅकॉलेची मंदिरे उभी करुन बाहेर चापलूसी-द्वारपालाच्या ठिकाणी आपापल्या प्रतिमा लावून घेण्यास हरकत नसावी.
मॅकॉले मंदिराचा समर्थक माहितगार
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 07/06/2018 - 10:24
नवीन
मॅकोलेनी जी शिक्षणपद्धती आणली ती नसती तर या देशातली शिक्षणपद्धती काय असती ? आणि त्या शिक्षणाने आज आपण कुठे पोहोचलो असतो याचे काही काल्पनिक चित्र रेखाटता येईल का ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 11:19
नवीन
=)) लोल; जगातल्या अदमासे १९५ देशा पैकी एकमेव भारताच्या शिक्षणपद्धतीत मेकॉलेचे योगदान आहे . मेकॉलेने शिक्षण पद्धती न दिलेले सर्व १९४ देश अयशस्वी झाले म्हणावयाचे आहे का ?
मेकॉले नव्हता चीन, जपानचे काय वाईट झाले ?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 07/06/2018 - 12:18
नवीन
मी प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय मिळाले.. !!
जाउ द्या तुमच्यासाठी वेगळ्या शब्दात पुन्हा विचारतो ...
- आजची शिक्षणपद्धती ही मॅकोलेचे योगदान आहे का ?
- असल्यास ही शिक्षणपद्धती नाकारायचे ठरवल्यास पर्यायी शिक्षणपद्धत काय असावी ?
- आधुनिक विज्ञान /तंत्रज्ञान शिकू नये काय ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 12:40
नवीन
हा जावई शोध कुठून लावला. मेकॉले नेपाळ मध्येही गेला नव्हता आणि नॉर्थ कोरीआतही तिथेही कधी ना कधी आधुनिक विज्ञान /तंत्रज्ञान शिक्षण चालू झालेच ना .
भारतीय बहुसंख्यांपैकी आधुनिक विज्ञान /तंत्रज्ञान शिकू नका म्हणून कोण आणि कधी म्हणाले ? मेकॉले शिक्षण द्यायला नाही तरी नॉर्थ कोरीआ नाकात दम आणू शकतो, रशिया अवघ्याशा लोकसंख्येने महासत्ता रहातो.
१) शिक्षण पद्धती मेकॉलेनी आणली का अजून कोणी हा प्रश्न नाही .
धागा लेखात दिलेला फेक उतारा सोडून द्या. खालील विधानात जर काही फेक नसेल तर ते आक्षेपार्ह आहे. असे विधान करणारी व्यक्ती ईतर बाबीत कितीही पूण्यवान असली तरी मला खालील वाक्याने आरती म्हणणे अवघड जाईल . कल्पना आहे भारतीयांच्या मोठ्या वर्गाला "...a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect...." अशा वाक्याने अंगाला भोक पडणे सोडा खाजपण सुटत नाही.
२) युरोपातलेच आधुनिक विज्ञान /तंत्रज्ञान भारतीय भाषातूनही शिकता आले असते . शिक्षणासाठी इंग्रजीवरील अवलंबित्वाचे क्रेडीट मी मेकॉलेला नव्हे भारतीयाम्च्या पराभूत मानसिकतेस देतो.
सुटलेले (भान) विमान एवढ्या सहज वापस थोडेच येते. डिमांड आणि सप्लाय चा बॅलन्स बदलला ईंग्रजी भाषेचा सप्लाय डिमांडपेक्षा अधिक झाला की मगच विमाने खाली येऊन मेकॉले भविकांचे पाय जमिनीवर टिकतील तो पर्यंत नव्हे. डिमांड आणि सप्लाय चा बॅलन्स न बदलण्यासाठी अर्थशास्त्र कुणाचेही जावई नसते.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Sat, 07/07/2018 - 11:22
नवीन
अहो मॅकोलेची शिक्षणपद्धती नाकारायला ना नाही .. पण नेमकी काय शिक्षणपद्धती अपेक्षित आहे इतकाच प्रश्न आहे ..जमल्यास उत्तर द्या नाहीतर राहू द्या.
मी काही मॅकोले भाविक वगैरे नाही. ...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/07/2018 - 13:30
नवीन
मेकॉले येऊन गेलेल्याला पाऊणे दोनशे आणि भारत स्वतंत्र झालेल्याला ७१ वर्षे झालीत. मेकॉलेची शिक्षण पद्धती काय होती याच्या इतिहासाची मला माझी व्यक्तिगत मते बनवण्यासाठी गरज वाटत नाही. (माझा मॅकॉले बाबतचा पहिला आक्षेप तो परकीय होता भारतीय शिक्षण पद्धती बद्दल निर्णय घेण्याचा त्याला नैतिक अधिकार नव्हता दुसरा भारतीय ब्रिटीशांचे अप्रत्यक्ष मानसिक वैचारीक गुलाम रहावेत अशा स्वरुपाची अपेक्षा इथे पर्यंतच माझे आक्षेप मर्यादीत आहेत - भारतीयात प्रखर राष्ट्रप्रेम तेवत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे मेकॉलेची नव्हे)
मेकॉलेस चर्चेतून रिटायर करुन ...
सध्या मला दिसणार्या शिक्षणपद्धतीत मला अभिप्रेत असलेले बदल (बदल तेवढेच सबंध बदलण्याची माझी अपेक्षा नाही) तेवढे साम्गू शकतो. पण तत्पुर्वी काही राजकीय आणि अर्थशास्त्रीय विचार सोबत जोडलेले असतील. यातील काही उपाय लय कडक आणि विवाद्य वाटतील. पण मला भारताचा हुकूमशहा होण्याची संधी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे वाचकांना फार काळजी करावी लागणार नाही. :)
१)
* भारतीय लोकशाही प्रणालितील पॉपुलीझमचा इफेक्ट आणि त्या अंगाने चालणारे राजकारण कमी करण्यासाठी निवडणूक कालावधि पाच वरुन आठ किंवा दहा वर्षांवर नेणे, (याची अर्थशास्त्रीय कारणेही आहेत पण मुख्य म्हणजे सत्तेतील नवे समिकरण शिक्षण क्षेत्रात दर पाचवर्षांनी ढवळाढवळ करते ती कमी होऊन शिक्षण क्षेत्रासही रिलेटीव्ह स्टॅबिलीटी मिळेल )
* २/३ हून अधिक बहूमत न घेणार्या राजकारण्यांना राजकारणात आठपेक्षा अधिकवर्षे न राहू देणे . आणि त्यांना पॉलिटीकल रिटायरमेंट नंतर गुड्स प्रॉडक्शन कमीशन देऊन शेती किंवा वस्तु उत्पादनात टाकणे आणि न ऐकल्यास शेती- वस्तू उत्पादन क्षेत्रासाठी लेबर कँपमध्ये पाठवणे
* अर्थशास्त्र शेती आणि वस्तु उत्पादन केंद्रीत करणे म्हणजे की जमिनीचा प्रत्येक तुकड्यावर शेती उत्पादन झालेच पाहिजे उपजाऊ जमिनी उत्पादनाशिवाय रिकाम्या राहू नयेत . आणि हातास काम नसलेल्या प्रत्येकाने शेती किंवा वस्तू उत्पादनात सहभागी झालेच पाहीजे . भारत रात्रंदिवस काम करताना दिसला तरी चालेल कॅपिटलचा मॅक्झिमम उपयोग उत्पादन क्षेत्रात झाला पाहिजे जेणेकरुन कॉस्ट ऑफ कॅपिटल कमीत कमी राहील.
* ईयत्ता आठवी पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्ह्याला ६ महिने शेतकी आणि ६ महिने औद्योगिक उत्पादनात सहभागी व्हावे लागेल. आणि त्याच वेळी शीस्त बाणवली जाण्यासाठी एनसिसी टाईप लष्करी शिक्षणही दिले जाईल, त्यानंतर पुढचे शिक्षण पुन्हा सुरु होईल.
* देशांतर्गत कॉर्पोरेट व्यवहार भारतीय भाषातूनच करण्याचा कायदा असावा.
२) शिक्षणक्षेत्रात जन्माधारीत विषमता नसावी ८ वी पर्यंत सर्वांना मोफत सक्तीचे आणि सेक्युलर देवनागरी लिपीतील मातृभाषेतून शिक्षण असावे - मुल्याधारीत शिक्षणाचा विषय म्हणून समावेश असल्या नंतर धार्मिक शिक्षण देणार्या वेगळ्या समांतर शाळांचे प्रयोजन रहात नाही घटनेतील संबंधीत तरतूद रद्द करावी. भारतीय मातृभाषेतून शिक्षण घेणार्यांना मातृभाषेतून शिक्षण न घेतलेल्यांपेक्षा खासगीक्षेत्रात सुद्धा २० % अधिक पगार असावा आणि ९५ टक्के आरक्षणाची व्यवस्था करावी.
३) जिथे ईतर भाषा विषय शिकवले जातात तिथे अभ्यासास असलेले किमान ३० टक्के साहित्य स्थानिक राज्यातील लेखकांचे असावे २० टक्के इतर भारतीय लेखक परदेशातील लेखकाम्चे साहित्य ५० टेक्के पेक्षा अधिक असू नये.
४ ) भाषा विषयच्या शिक्षकांवर पर भाषातील माहिती ज्ञान स्थानिक भारतीय भाषात आणि भारतीय भाषातील तत्वज्ञान विचार परदेशी भाषात मोट्याप्रमाणावर अनुवादीत आणि विवीध माध्यमातून उपलब्ध कराण्याची जबाबदारी राहील आणि हि जबाबदारी ते त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी शेअर करु किंवा लादू शकतील .
५) वयाच्या ३५ व्या वर्षी किमान एक वर्षासाठी सर्वच लोकांना पुन्हा रिफ्रेशर कोर्सेस करणे कंपलसरी असेल .
६) विद्यार्थ्यांसाठी पुरेसे जॉब असल्याची खात्री न करता खासगी कॉलेजांचे फॅक्टर्या काढणार्या व्यावसायिक संस्था प्रवर्तक राजकारण्यांना १०० पेक्षा अधिक विद्यार्थी बेकार राहील्यास , अशा बेकार विद्यार्थ्यांच्या घरची धुणी भांडी करण्याची शिक्षा असेल.
- आता कळला ना मला कोण पण राजकारणात येऊ देणार नाही ते :)
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 07/09/2018 - 08:29
नवीन
जबरदस्त मागाजी.. खूप आवडला प्रतिसाद..
मेकॉलेचा विषय ताणायला नको. कोल्हटकर सरांनी केवळ मेकॉलेच्या नावावर जे खपवले जाते ते कसे खोटे आहे एवढे सांगण्यासाठी हा धागा काढला आहे. बाकी, आजच्या परिस्थितीला पोषक अशी 'नयी तालिम' कश्या स्वरूपाची असावी यावर चर्चा करणे अधिक ईष्ट. नाही का?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 07/06/2018 - 12:56
नवीन
तिसर्या प्रश्नाचं उत्तर उघड नैये का?.
सगळं ज्ञान वेदांमधून आधीच उपलब्ध असताना "पाश्चात्यांना जे आधुनिक वाटतं ते" शिक्षण घ्यायची काय आवश्यकता आहे?
पाश्चात्य आधुनिक अभ्यासक्रमातलं ऐकून आताची मुलं आपल्या बापाला माकड समजतात आणि त्यांना आदर देत नाहीत. (भारतीय बहुसंख्यांपैकी आधुनिक विज्ञान /तंत्रज्ञान शिकू नका म्हणून कोण आणि कधी म्हणाले ? - या प्रश्नाचं उत्तर).
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 13:41
नवीन
त्याच काए ना कि वेद आणि स्म्रुती सगळीकडून ज्ञान घेण्यास सांगतात , अन एंडेड लूप आहे तो त्यात सगळीकडचे सगळे ज्ञान घेण्याची परवानगी आली.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 07/06/2018 - 11:24
नवीन
समजा ब्रिटन जिंकला नसता फ्रेंच / स्पेन / जर्मनी / डच कुणि जिंकले असते तर त्यांनी लादलेले आम्ही स्विकारले असते -आणि त्यांच्या देशातल्या मेकॉलेंची पूजा बांधली असती कारण आम्हा भारतीयांच्या स्वभावाचे हे वास्तव आहे. मेकॉले वाईट होता का याचे उत्तर तेवढा वाईट नव्हता असेच आहे दोष भारतीयांच्या पराभूत मानसिकतेचा आहे हे अधोरेखित होणे महत्वाचे असावे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 07/06/2018 - 22:49
नवीन
म.क.,
रोचक प्रश्न आहे, बरंच लिहिता येईलसं वाटतंय. माझं मत थोडक्यात सांगतो.
भारतात : आज शिक्षणावर उपजीविका चालवण्याची पद्धत पडली आहे त्याऐवजी शिक्षणावर जीविका चालवली गेली असती. उपजीविका म्हणजे पोट भरणे तर जीविका म्हणजे आपण कशासाठी जन्मास आलो आहोत यावर चिंतन करून तदनुसार कर्म आचरणे.
जगात : दोन महायुद्धे झाली नसती.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/07/2018 - 06:35
नवीन
गा.पै. मला वाटते त्यांचा प्रश्न कदाचित असा आहे कि भारतात अध्यात्मिक शिक्षण होत होतेच, ऐहिक जिवनासाठी लागणार्या विज्ञानादी ऊपयूक्ततावादी शिक्षण आणि युरोपीय नवविचारांचे वारे संधी परंपरागत शिक्षणात अती मर्यादीत झालेल्या होत्या. - येथे सावरकरांनी ज्या बेड्यांची वर्णने केली ती लक्षात घ्यावीत- त्यात अंशतः तथ्य असे आहे , पण ते अंशतःच आहे. भारतीय अध्यात्मिक ग्रंथांनी ऐहिक जिवनासाठी लागणार्या शिक्षणावर कोणतीही बंधने लादलेली नव्हती संदर्भ लो. टिळक. पण खरी गोची बहुसंख्यांसाठी साक्षरतेचे सार्वत्रिकरण नव्हते.
ऐहिक जिवनासाठी जे ज्ञान तंत्रज्ञान लागते त्याची बाकी जगासोबतची देवाण घेवाण भारतीय हजारो वर्षांपासून करत आले असावेत. फक्त ऐहीक जिवनासाठी असलेले ज्ञान तंत्र एका प्रदेशातून दुसर्या प्रदेशात स्थानांतरीत होताना कुटूंब आणि समुहांपर्यंत मर्यादीत रहात होते आणि साक्षरतेच्या अभावी त्याचे जतन संवर्धन विकास या बाबींना अडथळा होता. बहुसंख्यांसाठी साक्षरतेचे सार्वत्रिकरण झालेले असते विज्ञान विषयक शोध आणि प्रगती काळाच्या ओघात भारतातही झाली असती.
ब्रिटीशांमुळे साक्षरतेच्या सार्वत्रिकरण अधिक आधी होण्याचा फायदा निश्चित झाला, आधूनिक विज्ञान आणि युरोपीय शीक्षणाची ओळख झाल्याने भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या भावना जागवण्याची काही रिस्क असेल तरीही शिक्षणाचे आधूनिकीकरण थांबवूनये अशा मताचा मेकॉले होता, तो प्रत्यक्ष गुलामगिरीच्या विरोधात होता, राज्य आणि चर्च सेपरेशन त्याला मान्य असावे (चुभूदेघे) पण त्याचवेळी भारत ब्रिटीशांचा अप्रत्यक्ष गुलाम होऊन राहीला हेच आधूनिक शिक्षण मानसिक गुलामगिरीसाठी वापरता आले तर हवे, आणि परस्पर एव्हँजेलीकलीझम झाला तरी चांगलेच ( चुभूदेघे) . म्हणजे प्रत्यक्ष एवजी भारतीयांनी मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम बनून रहावे ब्रिटीशांचे व्यापारी हितसंबंध चालू रहावे.
आता मानसिक गुलाम झालेल्यांकडून जे चित्र रंगवले जाते ते हे की भारतीय परंपरा अपरैवर्तनीय होत्या. वस्तुथिती कदाचित वेगळी असावी . भारतीय समाज सातत्याने परिवर्तीत होणारा आहे . ऐहिकतेचे तत्वज्ञानही भारतास अगदीच नवा शोध नाही. ऐहिक जिवनासाठीचे विज्ञान तंत्रज्ञान आणि इतरही माहिती भारतीयांपर्यंत युरोपीय वसाहतवादाशिवाय पोहोचली असती तर भारतीयांनी ती आत्मसात केली नसती हा विचार वस्तुनिष्ठ वाटत नाही. कोणत्याही नव्या ज्ञान तंत्रज्ञानाला थोडाफार काळ विरोध सर्वच मानवी वंश / समुदायात होतो पण त्याचे फायदे लक्षात आले की ग्रहणही केले जाते - या मानवी गुण विशिष्ट्यात युरोपीय आणि भारतीयात फरक नसावा. म्हणून युरोपीयांनी वसाहतवाद केला नसतातर, ब्रिटीशांनी साक्षरता सार्वत्रिकरण केले नसतेतर मेकॉलेनी शिक्षणत नव्या विषयांचा समावेश केला नसते आणि नुसती ज्ञान विज्ञानाची देवाण घेवाण झाली नसती तर भारतीय ऐहिक मागासच राहिले असते हा विचार तर्कपूर्ण वाटत नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/07/2018 - 06:52
नवीन
* ' आणि नुसती ज्ञान विज्ञानाची देवाण घेवाण झाली असती तर भारतीय ऐहिक मागासच राहिले असते हा विचार तर्कपूर्ण वाटत नाही.' असे वाचावे.
पुरोगामी विचारांना खुपणारी दुसरी समस्या साक्षरतेस अडथळा आणणार्या सामाजिक स्तरीकरणची भारताच्या बाबतीत जात आणि अस्पृश्यता विषयक , पण ऐहिकतेसाठी लागणारे ज्ञान विज्ञान उपलब्ध होऊन अर्थशास्त्रिय प्रभावांनी येणारे परिवर्तन आणि ज्ञान विज्ञान समाजाच्या सर्वस्तरापर्यंत पोहोच णे थांबवताही येत नाही एवढे अर्थशास्त्रिय प्रभावांचे प्राबल्य असतेच. अर्थशास्त्रिय प्रभावांचे अनुषंगाने वैचारीक परिवर्तनेही होतच असतात. भारतीयांच्या शैक्ष्णिक सामाजिक विकासासाठी युरोपीय वसाहतवाद कॅटालीस्ट ठरला असू शकेल पण युरोपीय वसाहतवाद आवश्यकच होता तो नसता तर भारतीयांनी बापजन्मी प्रगती साधली नसती हा विचार हास्यास्पद असेल तर ठिक पण तो मानसिक गुलामगिरीचे निदर्शक आहे हे अधोरेखीत होणे महत्वाचे असावे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Sat, 07/07/2018 - 11:27
नवीन
म्हणजे शाळेत (किंवा तत्सम संस्था - गुरुकुल वगैरेत) जावून मुलांनी नेमकं काय शिकायचं ? विषय काय असावे ? असं समजा की अशी एक संस्था आहे जी अशी नवीन (म्हणजे मॅकोलेला डावलून ) शिक्षणपद्धती विकसित करु पहाते आहे आणि त्यांनी तुमच्याशी सल्लामसलत करुन आराखडा निश्चित करायचं ठरवलं आहे तर तुम्ही नेमका काय आराखडा सुचवाल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 07/07/2018 - 14:54
नवीन
मकालेच्या परखड विचाराने अमची अस्मिता दुखावली का नाही हाच विषय आहे.
त्याने सुचवलेली पध्दत बरोबर/योग्य/अयोग्य हे गौण आहे. आताच्या/किंवा १९६०नंतरच्या काळासाठी कोणती हवी ही चर्चा करायची तर जर्मनी किंवा इतर देशातले शिक्षण पाहण्यासाठी एक टीम परदेशवारी करू शकते( हे मुख्य.)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/07/2018 - 15:36
नवीन
परखड ? परखड माणसे भारतातही जन्मतात की ! (उदा. मिपावरच्या माहितगारांचे नाव ऐकले नाही का ? :) ) माहितगार शिवाय इतर चिक्कार परखड दिग्गज पण पडीक असतात की :) ) परखडपणाची भूक भागवण्यासाठी परक्या खड्यांवरचे अवलंबित्व उमगत नाही !! :)
(ह.घ्या.)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 07/07/2018 - 15:57
नवीन
परखड टीका ऐकून न भडकता त्यावर विचार करण्याची वृत्ती ठेवली तर गोष्ट वेगळी.
परखड_विचार_निसटता_अभ्यास_मंच_सभासद•
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 07/07/2018 - 18:38
नवीन
न भडकता ? जो भाग खरेच चांगाला असतो तो अगदी न भडकता वाचता आणि पचवता येतो. अगदी मेकॉलेच्या चांगल्या वाक्यांचे वरील काही प्रतिसादातून हातचे न राखता कौतुकही केले आहे. पण मेकॉले भाविकांप्रमाणे देशाभिमान विरोधी असलेली वाक्ये खपवण्याचे गुत्ते घेतलेले नाहीत.
.
.
हा खाली अभारतीय भारतीयांची मोलाची सेवा करुन गेला. शॉर्टकट न मारता/ गूगल न करता फोटो वरुन किती मेकॉले भाविकांना खालील फोटो ओळखता येतो बघू बर ?
ह्या फोटो असलेल्या माणसाचे हिंदू मुसलमानांवर भारतावर कोणतेही विशेष प्रेम नसलेला युरोपीय माणूस, तरीही स्वतःच्या जिवावर उदार होणारा अत्यंत प्रोफेशनल. कोण नाही करणार शतदा प्रणाम ?
आता दुसर्या एका माणसाचे छायाचित्र देतो
ओळखता येतोय ? चीन मधले लोक भारताशी शत्रूत्व झालेतरी या माणसाची व्यक्तिपूजा बांधतात. तेच त्यांच्या शेजारच्या जपानी सैन्याने चीनी जनतेवर खरोखरेचे रेप केले . आता एखाद्या जपानी माणसाने पारंतत्र्याच्या काळात चीनला कितीही चांगली शिक्षण निती समजा आपण तसे परखडपणे बनवून दिली तरी एखादा चिनी माणूस वरच्या फोटोतल्या भारतीया प्रमाणे पारतंत्र्यात वावरुन गेलेल्या जपानी माणसाची व्यक्ती पूजा बांधेल ? विचारुन पहा दोन - चार चिनी माणसांना आणि काय अनुभव येतो ते पहा.
उपरोक्त वाक्य शुद्ध मानसिक बलात्कार नाहीए ? मेकॉलेचे पार्लमेंट मधील भाषण पुर्वग्रहांशिवाय वाचल्यावरही वरचे वाक्य पाहिल्यावर आमची अस्मीता पुन्हा पुन्हा जागी होतेच नुसती भडकत नाही तीळ-पापड होऊन आमचा चेहरा जेवढा लाल होतो ना तो मेकॉले समोर आला असता तर उलटा लटकवून खालन मिरच्यांची धूरी देऊन तेवढा लाल त्या मेकॉलेला नक्कीच केला असता एवढे देश प्रेम आणि अस्मीता अद्यापही जिवंत आहे. मध्ये काही शतके गेली हे मेकॉलेसाठी बरे झाले.
मी वरच्या एका प्रतिसादात म्हटलय, मुख्य म्हणजे मेकॉले स्वतःही आज हयात असता तर त्याला भारता बद्दल निर्णय घेण्याचा मुदलात अधिकार नव्हता हे त्यानेही कदाचित कबूल केले असते. पण पंचेंद्रीये बंद केलेल्या मेकॉले भाविकांना ते कदाचित पटणार नाही, आणि असे मेकॉले भाविकांची भारतात भरणा असावा हे भारताचे गेल्या काही हजार वर्षा पासूनचे दुर्दैव आहे,
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 07/09/2018 - 09:46
नवीन
जिम कॉर्बेट का ? गुगल केले नाही.. पण फोटोवरुनही ओळखले नाही.
पण तुमच्या पुढील वाक्यावरुनच तसे वाटले. बरोबर आहे का ?(गुगले करण्याचा तसाही कंटाळा आलाय म्हणून तुम्हालाच विचारतो)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 07/08/2018 - 05:43
नवीन
लोकमान्य टिळकांच्या चरित्रात त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था काढल्याचे वाचले आहे. त्यांनी काढलेल्या शाळांमध्ये मेकॉले-पठडीत नसलेले शिक्षण देण्यात येत होते का? तिथे शिक्षणाची कोणती पद्धत होती? कोणते विषय शिकवले जात होते? किंवा मेकॉले पठडीत शिकवले जाणारे कोणते विषय शिकवले जात नव्हते?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 07/08/2018 - 08:25
नवीन
आगरकर आणि लो. टिळकांचे शिक्षण निती विषयक काही अग्रलेख आंजावर उपलब्ध आहेत . मी त्यांचे आणि आगरकरांचे लेखन चाळले आहे. ( आताच्या काळात वाचण्यासाठी नाही म्हटले तरी कंटाळवाणे होते. ) टिळक केवळ स्त्री शिक्षणाबद्दल चूलमुल परंपरावद शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. बाकी ऐहिक जिवनासाठी लागणारे उपयूक्ततावादी विज्ञान इंग्रजी आणि राष्ट्रवाद शिक्षण सर्वांना उपलब्ध करण्यावर त्यांचा भर होता. वेदादी धार्मिक शिक्षण सर्वांना समान संधी न मिळाल्याने काही फरक पडत नाही असे काहीसे त्यांचे मत असावे ज्या मतामुळे ब्राह्मणेतर चळवळितील त्यांच्या बद्दलच्या गैरसमजास बळ मिळाले असावे पण तसाही आधूनिक शिक्षणाचा धार्मिक शिक्षणाशी टिळकांनी फार मेळ घातलेला दिसत नाही )
माझे जे मत जे झाले ते असे की शिक्षण संस्था उभारणितील टिळकांचा सहभाग ऑर्गनायझेशनल स्वरुपाचा होता . या संस्था त्यावेळच्या वेगवेगळ्या वैचारीक धुरीणांच्या विचारांचे एकत्रित परिणाम करत होत्या केवळ टिळकांच्या विचारांच्या नव्हे. त्यामुळे टिळकांचा राष्ट्रवाद स्विकारला जात असताना सुधारणेची गरज मान्य झालेल्या ठिकाणी कर्मठपणा बाजूला ठेवला जात होता.
एक उदाहरण म्हणजे संमती वयाच्या बद्दलचा वाद जेव्हा जोरात चालू होता , तेव्हा न्यु इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक (आता नाव आठवत नाहीए) त्यांचे धर्मशास्त्रावरचे प्रभूत्व होते. त्यांनी धर्मशास्त्रा नुसार संमती वय अधिक असले पाहीजे हे आगरकरांचे म्हणणे पुराव्या निशी चूक आहे हे सिद्ध केले पण संमतीवय वाढवणे हेच आधूनिक आणि कालसुसंगत आहे अशी टिळक विरोधी भूमिका लावून धरली .
लोकमान्य टिळकांच्या चिरंजीवांनी स्वतः समाज सुधारणेच्या बाबतीत उघड उघड टिळक विरोधी बाजू घेतली आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या बाबतीत टिळकांची बाजू घेतली. - स्वतः टिळकही बदलत होते , बदललेलेच होते पण परंपरावाद्यांची बाजू घेणारे जोरकस दुसरे नेतृत्व नसल्याने परंपरावादी भूमिका त्यांनी सांभाळुन नेण्याचे काम केले आणि त्याबदल्यातली टिका प्रेमाने स्विकारली-
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 07/08/2018 - 12:55
नवीन
मकाले अथवा कुणा इतर विलायती अधिकाय्राच्या मतांचा पाठराखा किंवा विरोधक मी नाही. त्यावेळी त्यांच्याकडे सत्ता होती आणि ते त्यांच्या बाजुचाच विचार मांडणार.
केवळ शिक्षण पद्धत यावर एक कालानुसार बदल म्हणून त्याने काय म्हटले हे पाहावे लागते. आता काय करायला हवे म्हटल्यास वेगळी चर्चा घडेल.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 07/08/2018 - 15:47
नवीन
म.क.,
थेट प्रश्नाबद्दल आभार. :-)
मात्र याचं थेट उत्तर देणं अवघड आहे. कारण की मी शिक्षणतत्ज्ञ नाही. मात्र एक 'हुशार' विद्यार्थी आणि एक निरीक्षक म्हणून माझी मतं मांडतो.
१. ही गुरुकुल शाळा केवळ उपजीविकेचं शिक्षण देणारी आहे का? तसं असेल तर तिथं मिळणारी विद्या हे शिक्षण नसून प्रशिक्षण असेल. प्रशिक्षणासंबंधी मला फारसं काही सांगता नाही येणार.
२. तिथं जीविकेचं शिक्षणही मिळणार असेल असं गृहीत धरतो. अशा वेळेस विद्यार्थ्याच्या अंगची कौशल्यं खणून बाहेर काढण्याची योजना सतत अंमलात असेल.
३. तंत्रज्ञान, विज्ञान व गणित या आधुनिक विषयांना प्रात्यक्षिक व सैद्धांतिक दोन्ही प्रकारचं महत्त्व असेल. सैद्धांतिक भागात या विषयांकडे एक दृष्टीकोन या अर्थाने शिकवण्यात येईल.
४. 'एक दृष्टीकोन' हा एक तात्त्विक दृष्टीकोन अशा अर्थी शिकवला जाईल. भारतातल्या प्राचीन तत्त्वज्ञान शाखांशी उपरोक्त आधुनिक विषयांची सांगड घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल.
५. शिकलेले तत्त्वज्ञान आचरणांत आणण्यावर भर दिला जाईल. याकरिता शक्तीची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ (सुमारे ४०% ते ६०%) बलोपासनेत व्यतीत होणारा असेल.
६. वरील सर्व मुद्द्यांचे स्थान विद्यार्थ्यास निश्चितपणे दिसण्यासाठी त्याच्याकडून अध्यात्मिक साधना करवून घेतली जाईल. किंबहुना प्रत्येक कृती अध्यात्मिक मूल्यांच्या कसोटीवर कशी घासून पहावी यांस उत्तेजन दिलं जाईल. ईश्वरप्रणिधानतेस प्राधान्य असेल.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 07/08/2018 - 18:13
नवीन
यावर वेगळा लेख काढावा.
( शिक्षणपध्दतीत बदल काय आणि कसे)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 07/09/2018 - 08:44
नवीन
माहितगार,
माझ्या मते परिस्थिती बरोबर उलटी होती. लोकसाक्षरता इंग्लंडमध्ये नव्हती. मात्र भारतात तशी होती. ही शिक्षणपद्धती इंग्रज आल्यावर बंद पडली.
मी पूर्वी माबोवर एके ठिकाणी प्रतिसाद दिला होता त्याचा दुवा : https://www.maayboli.com/node/41445?page=2#comment-2606180
वरील स्रोतातून उतरवलेला काही मजकूर :
आ.न.,
-गा.पै.
टीप : माबोवरचा दुवा वाचता येत नसल्यास इथे मजकूर चिकटवून देऊ शकेन.
- Log in or register to post comments