आलमगीर स्वतः दक्षीणेत का उतरला ??
आलमगीर औरंगझेब तत्कालीन जगाच्या सारीपाटावर पहिल्या पाच शक्तीशाली सम्रांटांमधे गणला जायचा. मराठी राज्य जिंकण्याच्या ईर्षेने तो २७ वर्षे महाराष्ट्रात लढला आणि त्याचा शेवट देखील इथेच झाला हे आपण जाणतोच. पण तो स्वतः दक्षीणेत का उतरला याची समाधानकारक तर्कसंगती मला अजुन लागलेली नाहि.
कुरुंदकरांसारख्या विचारवंतांनी या विषयावर चांगलच विवेचन केलय, पण गुंता पुरा सुटलेला नाहि. मिपाकरांचे विचार ऐकावे म्हणुन हा चर्चा प्रपंच.
औरंगझेबाला महाराष्ट्र काहि अपरिचीत नव्हता. तरुण असताना तो मुघल साम्राज्याचा दक्षीणेचा सुभेदार होता. इथल्या भौगोलीक परिस्थीतीची त्याला जाणीव होती. आदिलशाही, कुतुबशाही वगैरे प्रबळ सत्ताच्या ताकतीचा त्याला व्यवस्थीत अंदाज होता. आपल्या वडिलांच्या मरणोत्तर मुघल सल्तनतीचं तख्त काबीज करायला तो दिल्लीला गेला तेंव्हा शिवजीचे स्वराज्याचे उद्योग सुरु झाले होते. पुढे त्याने खास शिवाजीचा बदोबस्त करायला म्हणुन मोहिमा धाडल्या. पण मिर्झाराजांव्यतिरीक्त कोणि काहि खास छाप पाडली नाहि, किंबहुना सर्वांना पराजयच पत्करावा लागला. मिर्झाराजेंनी मात्र शिवाजीला पुरतं नामोहरम केलं.
अफजलखानाला सैन्यासहीत गारद करणारा, शाइस्तेखानादी सरदारांना आपल्या युद्धकौशल्याने पराभूत करणारा, सुरतेवर मजल मारण्याइतपत योजना आखण्यात तरबेज असलेला, आरमाराची सुरुवात करणारा, सर्वात मुख्य म्हणजे अत्यंत प्रजाहितदक्ष आणि तेव्हढाच लोकप्रीय असा शिवाजीराजा औरंगझेबाला उमगला नसेल असं होऊ शकत नाहि. मिर्झाराजांशी पराजीत अवस्थेत तह करुन शिवाजीराजांनी आपलं २/३ राज्य औरंगझेबाच्या हवाली केलं. आग्र्याला शिवाजीला अटक झाली पण तिथुन तो निसटला. तरिसुद्धा शिवाजी प्रकरणाचा अंत होत आला आहे अशीच परिस्थीती होती, पण चमत्कार वाटावा तसं झालं नेमकं उलट. आणि जे झालं त्यात शिवाजी म्हणजे नेमकी किती अफाट ताकत आहे आणि ति त्याच्या मुलुखात-माणसांत कशी अद्वैताने भरली आहे याची कल्पना औरंगझेबासारख्या चाणाक्ष राजाला निश्चीत आलि असणार.
मिर्झाराजांशी तहानंतर शिवाजीकडे दोन दशक किल्ले देखील उरले नव्हते, त्याचे शिवाजीने दोन शतक बनवले, स्ट्रॅटीजीक डेफ्त म्हणावी अशी दक्षीण दिग्वीजय मोहीम राबवली. सर्वात कहर म्हणजे शिवाजीने आपला राज्याभिषेक करवुन घेतला आणि त्याला काशीच्या अत्यंत सन्माननीय पिठाचे आशिर्वाद लाभले. तत्कालीन राजकारण्यांच्या, त्यातल्या त्यात हिंदु सरदारांच्या नजरेत शिवाजी कितीही पराक्रमी असला तरी होता एक जमीनदाराचा मुलगा. पण राज्याभिषेकामुळे तो क्षत्रीय राजा झाला, आणि नाहि म्हणायला त्याचा परिणाम राजपूत सरदारांच्या मनावर कुठेतरी नक्की झाला असणार. प्रत्यक्ष शिवाजीचं व्यक्तीमत्व किती प्रभावशाली आहे याची कल्पना तर औरंगझेबाला होतीच, वर आता तो मान्यताप्राप्त, सिसोदीया क्षत्रीय म्हणुन राजा झाला. तेंव्हा कुठलाही राजपूत सरदार शिवाजीपुढे टिकाव धरेल याची शंकाच औरंगझेबाला असेल. तसंही शिवाजीपुढे मिर्झाराजांव्यतीरीक्त कोणाचं काहि चाललं नाहि. दिलेरखानासारखे सरदार कितीही लढवय्ये असले तरी आता त्यांची ताकत शिवाजीपुढे अपुरीच पडायची आणि राजकारणात तर ते शिवाजीच्या पासंगालाही पुरत नव्हते.
याच्या पुढची पायरी म्हणजे कुतुबशाही-आदिलशाही-शिवशाही अशी ग्रँड अलायन्स तयार होणार आणि उत्तरेकडील आक्रमणाला केवळ प्रतिकार करणार्या दक्षीणी फौजा आता उत्तरेवर आक्रमण करणार असं राजकारण, अगदी ताबडतोब नसलं तरी, अगदी स्वाभावीक होतं. तसं राजकारण शिजवणं शिवाजीला शक्य होतं. दक्षीणी फौजा अगदीच उत्तरेकडे नाहि सरकल्या तरी शिवाजीच्या प्रेरणेने उत्तरेत बंडाळी सुरु होतील आणि आपल्या पश्चात हे आव्हान पेलण्याची कुवत आपल्या कुठल्याच मुलात नाहि हे औरंगझेब जाणुन होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगझेबाने स्वराज्यावर निर्णायक वार करायचा निर्णय घेतला. पण हे आव्हान पेलणार कोण? जो दक्षीण जिंकेल तो आपला उत्तराधिकारी असं आमीष दाखवुन राजकुमारांना उत्तेजन द्यावं म्हटलं तर त्यांचा धसमुसळेपणा नवीन आफत निर्माण करायचा. सर्व तुर्की सरदार मनगटाने सशक्त असले तरी शिवाजीपुढे टिकाव न धरु शकणारे. शिवाय त्यांची गरज उत्तरेकडच्या मैदानात अधीक. राजपुतांमधे मिर्झाराजांच्या तोडीचा कोणी मोहोरा नाहि, शिवाय मिर्झाराजाला स्वत: आलमगीराने घातपाताने मारवले. तेंव्हा आलमगीर स्वत: मैदानात उतरणार हे ओघाने आलं. पण...
आलमगीर काहि नुसत्या भावनेच्या भरात कारभार करणारा माणुस नक्कीच नव्हता. दक्षीण मोहीमेचं एस्टीमेशन त्याने केलच असावं. पण हि मोहीम इतकी चिवट असणार हे जर त्याला लक्षात आलं असतं तर तो खरच दक्षीणेत उतरला असता काय? एक मत प्रवाह असा आहे कि शिवाजी जिवंत असेपर्यंत औरंगझेब दक्षीणेत यायला तयार नव्हता. पण शिवाजीराजा अकाली निवर्तला आणि हि संधी साधायलाच हवी असा निर्णय औरंगझेबाने घेतला. या दाव्यात कितपत तथ्य आहे ठाऊक नाहि.
शिवाजीने जे राज्य निर्माण केलं त्याचा प्रथमदर्शनी धोका आदिलशाहीला होता. पुढे कुतुबशाहीशी देखील शिवाजीचं वाजलच नसतं याची काहि खात्री नव्हती. तेंव्हा दक्षीणेच्या राजकारणाची शक्ती तिथेच मुरण्याची शक्यता होती आणि त्यामुळे उत्तर-दक्षीणेत एक समतोल साधता आला असता. अशा परिस्थीतीत औरंगझेबाने मुघल साम्राज्याचा पाया खिळखिळा होण्याची रिस्क पत्करुन दक्षीणेवर आक्रमण करण्याची काहिही गरज नव्हती. तरीही तो स्वतः दक्षीणेत का उतरला...
औरंगझेब धर्मवेडा म्हणण्याइतपत धर्मप्रेमी होता असं म्हणतात. तेंव्हा अत्यंत मोलाचं धर्मकृत्य करुन आपलं धार्मीक उत्तरदायीत्व पार पाडावं म्हणुन तो दक्षीणेत उतरला असं एक लॉजीक सांगतात. पण धार्मीक अंगाने देखील त्याची गरज उत्तरेतच अधीक होती. सह्याद्री जिंकायच्या नादात हिंदुकुश मोकळा सोडण्यात काहिच शहाणपण नव्हतं. मुघल फौजा फक्त शिवाजीशी लढायला म्हणुन राखीव नव्हत्या. त्या सतत कुठे ना कुठे युद्धात गुंतलेल्या असायच्या. मुघल साम्राज्य व्यवस्थीत स्थीरस्थावर झालेलं असलं तरिही लहान मोठ्या बंडाळ्या होतच असणार. तरिही औरंगझेब स्वत: दक्षीणेत उतरला... का?
कुरुंदकरांच्या मते अफजलखान वधाचेवेळी शिवाजीची एक चुक झाली. त्याला वाटलं कि अफजलखानाला मारलं तर औरंगझेब प्रसन्न होईल... शिया-सुन्नी वादाची याला पार्श्वभूमी होती, शिवाय स्वतः औरंगझेबाने अफझलखानाचा तडाखा भोगला होता. पण तसं झालं नाहि. अफझलखान खर्च झाला तरी शिवाजी वरचढ व्हावा हे औरंगझेब सहन करु शकला नाहि आणि त्याने शाइस्तेखानाला स्वराज्यावर आक्रमण करायला धाडलं. नेमकी अशीच चुक औरंझेबाने स्वराज्यावर आक्रमणाचेवेळी केली. आपण स्वतः दक्षीणेत उतरलो तर वेळप्रसंगी हिंदु-मुस्लीम वादावर दक्षीणी राजांची युती मोडता येईल असाही औरंगझेबाचा कयास असावा. पण तसं व्हायला फार उशीर लागला. त्याकरता औरंगझेबाला विजापुर जिंकावं लागलं. दक्षीणी युतीच्या अभेद्यतेची कल्पना औरंझेबाला असती तरी तो दक्षीणेत उतरला असता काय??
आलमगीराबद्दल फार काहि वाचनात आलं नाहि माझ्या. 'शहेनशाह' वाचलं आहे, पण ति आलमगिरावर लिखीत कादंबरी आहे, त्याच्या राजकारणाचं काहिच विवेचन नाहि त्यात (मला सध्यातरी आठवत नाहि त्याबद्दल). उपरोक्त चर्चाविषयावर प्रकाश टाकणारं काहि साहित्य माहित असल्यास अवष्य सुचवावे.
शेवटी प्रश्न उरतोच.... आलमगीर स्वत: दक्षीणेत का उतरला????
🗣 चर्चा
(45)
य
यशोधरा
Sun, 06/17/2018 - 05:33
नवीन
रोचक. धागा वाचत राहणार आहे.
- Log in or register to post comments
ज
जानु
Sun, 06/17/2018 - 06:15
नवीन
दौलताबाद ला भेट दिल्यावर असा विचार मनात आला होता, पण इतक्या सुसंगतपणे नाही, आपण विवेचन उत्तम केले आहे.
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Sun, 06/17/2018 - 06:27
नवीन
आवडत विषय , जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा ही विनंती .
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 06/17/2018 - 06:55
नवीन
विंध्य सातपुडा रांगांमुळे उत्तर भारत व दक्षिण भारत नैसर्गिक रीत्याच विभाजीत आहे. बहुतांश आक्रमकांचा अॅक्सेस उत्तरेकडून असल्याने ते उत्तरेतच मर्यादीत होते. आलमगीर जवळ्जवळ १/२ भारताचा मालक होता, दक्षिण सोडले तर इतर दिशाना कदाचित फारसे काही उरले नसावे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 06/17/2018 - 11:06
नवीन
सबका मालिक १ नसतो का ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:13
नवीन
केवळ दक्षीण दिशा उरली म्हणुन तेव्हढ्याकरता आलमगीर उत्तरेतल्या राज्यावर निखारा ठेऊन स्वतः दक्षीणेत उतरेल हे काहि पचनी पडत नाहि.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 06/17/2018 - 21:55
नवीन
दक्षिण भाग हा बहुपयोगी होता. सुपीक जमीन , समुद्रकिनारा , नद्या , व्यापार , रेव्हेन्यू इ इ .. उगाच जमीन आणि प्रदेशाच्या नावाने वाळवंट , नेपाळ अन मणीपुरात जाऊन काय करणार ?
रिस्क बेनेफीt रेशो त्याला अनुकूल वाटला.
बाकी , त्याच्या मृत्यूने मोगलाई संपली असे मला वाटत नाही , मेला तेंव्हा 88 वर्षाचा होता , त्यामुळे कुठेही असता तर तो मरणारच होता , राज्य मोठे झाले की बंडाळी , वारस प्रश्न , फाळण्या , एकाच्या 2 गाद्या , हे तर सगळ्याच साम्राज्याना भोगावे लागते , स्वतः औरंगजेबाही या संघर्षातूनच कसाबसा टिकला होता , पतन होणाऱ्या राज्यात मोघल सल्तनत तसे पार अगदी 1857 ला पडले - म्हणजे अगदी शेवटी . इथे मेला काय अन दिल्लीतच मेला असता काय , त्याचे काहीही बिघडणार नव्हते .
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 22:11
नवीन
पण मोगलाईचा अस्त सुरु झाला हे नक्की.
आर्थीक दृष्ट्या दक्षीण अत्यंत फ्रुटफुल होती हे निर्वीवाद. पण सोन्याची साखळी मिळवायला गळ्याची किंमत मोजण्यात काहि शहाणपण नाहि ना. केवळ साम्राज्यविस्तारासाठी आलमगीराने किती मोहिमा आपल्या जिवावर उदार होऊन काढल्या यात कदाचीत उत्तर सापडेल.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 06/17/2018 - 22:37
नवीन
मोघलांच्या कबरी लांब लांब विखुरल्या आहेत .
बाबर - अफगाणिस्तान
हुमायून - दिल्ली
औरंगजेब - खुलताबाद - औरंगाबाद महाराष्ट्र
बहाद्दूरशहा - ब्रह्मदेश
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 01:50
नवीन
बाबर राज्य स्थिरस्थावर करतानाच पैगंबरवासी झाला. हुमायून थोडा सेटल झाला असेल. औरंगझेब महाराष्ट्रात का आला हा तर धाग्याचा मुख्य विषय आहे. बहादूरशहा इंग्रजांच्या कैदेत वारला.
आलमगीरीच्या दक्षीण स्वारीबद्द्ल हि लिस्ट काहिच कमेण्ट करत नाहि.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Mon, 06/18/2018 - 04:10
नवीन
मोघल सल्तनतिच्या सीमा सांगा -
पश्चिम- उत्तरेला बाबराचे थडगे , दक्षिणेला औरंगजेबाचे थडगे अन पूर्वेकडे बहाद्दूरशहाचे थडगे - यांच्यामध्ये मोघल सल्तनत होते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 04:18
नवीन
मग भारताच्या सीमा सप्तखंडात पसरल्या म्हणायचा
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Sun, 06/17/2018 - 10:21
नवीन
सद्य परिस्थितीत महाराष्ट्र केवळ शिवप्रभुंपासुन सुरू होणारा इतिहास आपला मानतो. पण शरणागत का होईना स्वतः चे राजेपन जिवंत ठेवलेल्या कैक घराण्यांना फक्त मुसलमान सत्तेचे गुलाम सरदार म्हणून अवहेलना करतो. इथं असलेली सरंजामी जहागिरी पद्धत कितीही वाईट असली तरी त्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष रयत बादशाही ची गुलाम न राहता जहागीर जहागीरदार यांच्या लहान लहान राज्यांमध्ये विभागलेली होती. हे जहागीरदार स्वतंत्र सैन्य पाळत, दरबार भरवत, न्यायनिवाडे करत सारा वसुल करत, म्हणजे बादशाही च्या वतीने राज्यकारभार चालवत. सरदारांच्या घरान्यांमधे वैर भाव असे कधी सोयरीक असे, हे सरदार आपला बादशा सुद्धा बदलु शकत, फक्त १ च गोष्ट करत नव्हते ती म्हणज स्वतः चे राज्य स्वतः स्वतः ने चालवणे, शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले व लोकराज्य बनवले, हि गोष्ट बादशाही-सरंजामशाही-रयत या पायाभूत सुत्राला छेद देणारी होती, जहागीरदार कोणी बादशाही मदतीशिवाय राज्य चालवु शकतो हि बाब इस्लामी सत्तांच्या ऱ्हासाला कारण होईल, त्यामुळे हे राज्य चिरडने गरजेचे आहे हे आलमगीर जाणला असावा. दखणींसाठी दख़न हे महाराजांचे सुत्र व सत्ताधारी दक्षिण राजांची मोट बांधण्याचा महाराजांचा प्रयत्न हे सारे प्रयत्न त्याच महायुद्धाची पुर्वतयारी, नंतर काय झालं ते वेगळे सांगायला नको.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 06/17/2018 - 11:12
नवीन
या वाक्याशी नक्कीच सहमत ,
एवढ्यासाठी शिवाजी आमच्या हृदयाचे महाराज असतात, त्यांना या निमीत्ताने __/|__
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:18
नवीन
औरंगझेबाला स्वराज्याचा घास घ्यायलाच होता यात शंका नाहि. प्रश्न उरतो कि त्याकरता औरंगझेबाने जि किंमत चुकवली ति त्याला अपेक्षीत होती काय... अन्यथा तो स्वतः उतरलाच नसता.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Sun, 06/17/2018 - 21:32
नवीन
किंमत किती द्यावी लागणार हे आधी कसे समजणार ?
दक्षिणही काबीज झाली असती तर सर्वत्र control करायला मध्यवर्ती स्थान म्हणून महाराष्ट्र्र उपयोगी ठरेल असाही हेतू असू शकेल.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 03:45
नवीन
तुम्हा-आम्हाला नाहिच समजणार.. पण आलमगीराचं काय ? त्याचं आकलन चुकलं, अतिआत्मविश्वास नडला, दक्षीणेचं धबाड इतकं मोठं होतं त्याला कुठलिही एक्स्ट्रीम रिस्क घ्याविशी वाटली, दक्षीणेच्या संभाव्य आव्हानाने त्याला स्वस्थ बसु दिलं नाहि, अत्यंत विरक्त अवस्थेत तो धर्मकार्याला सामोरा गेला... हे सगळं होतं कि आणखी वेगळं काहि... तेच शोधायचा प्रयत्न करतोय.
दक्षीणेत अॅट्लिस्ट द्वितीय सत्ताकेंद्र स्थापीत करण्याचा मुद्दा मेक्स सेन्स. मुघल सम्राज्याची मुळं उत्तरेत तशीही पुरेशी घट्ट झाली होती.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/17/2018 - 11:28
नवीन
हादिथ / हादिस (ज्यांना इस्लाममध्ये कुराणानंतर दुसरा क्रमांक दिला जातो) मध्ये असे लिहिलेले आहे की, इस्लाममधील दोन गट इस्लामचा सर्व जगावर अंमल पूर्णत्वास नेतील. त्यातला एक गट हिंदुस्तानवर (गझवा-ए-हिंद) तर दुसरा 'इसा इब्न-ए-मरियम' च्या पाठिराख्यांवर उर्फ ख्रिश्चनांवर आक्रमण करून विजय मिळवेल व त्यानंतरच जगाचा अंत होईल (योम-ए-कयामत येईल). अर्थातच, या गटांच्या नेत्यांना इस्लाममध्ये मानाचे स्थान मिळेल यात शंका नव्हती... इतरांच्या भाषेत याला, 'आपले नाव अमर करणे' असे म्हणायला हरकत नाही. कट्टर धार्मिक असलेल्या औरंगजेबाला या 'इस्लामी अमरत्वाच्या' कल्पनेची भूरळ पडल्यास नवल नव्हते.
एका मोठ्या साम्राज्याच्या धन्याला, स्वतः दक्षिणेत उतरून, मरेपर्यंत एककल्लीपणे २७ वर्षे चिकाटीने प्रयत्न करत रहायला लावण्यासाठी, धर्मवेडापेक्षा जास्त नशा देणारी दुसरी गोष्ट, या जगात क्वचितच सापडेल.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:26
नवीन
आलमगीर आपल्या धार्मीक कर्तव्याच्या जणिवेने प्रेरीत होता हे एक फिचर आहेच. पण तो मरेस्तो इथेच लढला कारण युद्ध अर्धवट सोडुन परत जाणे त्याच्या राजकारणाला, इभ्रतीला, आणि मुघल साम्राज्याला काळीमा फासुन गेले असते.
त्याने आपल्या दक्षीण मोहीमेला ऑफीशेअली गझवा-ए-हिंद चा उत्तरार्ध म्हणुन डिक्लिअर केले होते काय माहित नाहि... संदर्भ चेक करावे लागतील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 06/17/2018 - 16:16
नवीन
औरंगजेबाविषयी समग्र माहिती देणारे एकमेव पुस्तक म्हणजे जदुनाथ सरकारांचे 'औरंगजेब' . हे पुस्तक अवश्य घ्या. बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे यात मिळतील.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:28
नवीन
पण तुम्ही असं नुसतं एका वाक्यात उत्तर देणं म्हणजे.. इ नॉ चलबे. तुमची काहि कॉमेण्ट्री तरी येऊ देत औरंगझेबावर.
- Log in or register to post comments
म
मेघपाल
गुरुवार, 06/21/2018 - 13:23
नवीन
पुस्तक आउटडेटेड आहे. स्वतःला अपडेट करणे योग्य ठरेल. अर्थात कितीही आउटडेटेड झाले तरी हिंदुत्ववाद्यांच्या आवडत्या पुस्तकात हे पुस्तक समाविष्ट राहणार आहेच.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 06/21/2018 - 15:03
नवीन
म्हणजे?
- Log in or register to post comments
म
मनो
Fri, 06/22/2018 - 06:55
नवीन
बरं, मग तुम्ही प्रौढ वयात फारसी शिका, मोगल दप्तरातले हजारो हस्तलिखित कागद वाचा, औरंगझेबाच्या समकालीन ग्रंथकारांनी लिहिलेले इतिहासग्रंथ वाचा, आणि लिहून टाका एक निष्पक्ष अपडेटेड इतिहास. आम्ही नक्कीच वाचू.
जदुनाथ यांनी तपशिलाच्या अनेक चुका केल्या असतील, पण मेहेनतीबद्दल त्यांना सलाम.
https://youtu.be/n6vfd1LNxWM
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sun, 06/17/2018 - 17:29
नवीन
उत्तम धागा. मुळात तुम्ही धाग्यात जे प्रश्न विचारलेत, त्याची उत्तरे स्वताच दिलेली आहेत. त्यामुळे अधिक चर्चा करण्यासारखे काही नाही. बाकी औरंगजेब सस्मजून घ्यायचा असेक तर जदुनाथ सरकारांचे पुस्तक जरुर वाचा असे सुचवेन.
मुळात आदिलशहाचे मुसेखान, फत्तेखान, अफझलखान, सिद्दी जोहर या सर्वांना या मातीत पराभव पत्करावा लागला. तर मोगलांचे शाहिस्तेखान, बहादुरखान, दिलेरखान या सर्वांना पराभवाचे तोंड पहावे लागले. स्वता औरंगजेबाला आग्राप्रकरणात मानहानी सहन करावी लागली. जे मोगल सरदार महाराष्ट्रावर चालून आले त्यातील बहुतेक मराठी मातीत कायमचे गाडले गेले.
थोडे फार यश मिर्झाराजे जयसिंगाला मिळाले. पण त्यांनी शिवाजी राजांचा पुर्ण पराभव केला असे मला वाटत नाही. "जेव्हा सर्वनाश येतो, तेव्हा अर्धो त्यजति पंडीत" या न्यायाने शिवाजी महाराजांनी तह केला. त्यातही २३ किल्ले दिले. हे कराताना मिर्झाराजांना आणि पर्यायाने मोंगलांना अक्षरशः मामा बनविले. मुख्य म्हणजे राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड हा स्वराज्याचा गाभा स्वताकडेच राखण्यात यश मिळवले. दक्षिण मोहीम करुन महाराजांनी मुत्सदीगिरीचा एक नमुना औरंगजेबाला दाखविला. राज्याभिषेकापर्यंत आदिलशाही बरीच कमजोर झाली होती. कुतुबशाह तर मित्र झाला होता. तेव्हा महाराजांचे पुढचे लक्ष्य उत्तर पर्यायाने औरंबजेब असणार हे नक्की होते. तेव्हा औरंगजेबाला सुखनैव राज्य करायचे असेल तर हे दक्षिणेकडचे मराठी राज्य कायमचे बुडवायला लागणार होते. त्यातच औरंगजेबाचे भावी वारस आझम असो किंवा अकबर हे बंडाचा झेंडा केव्हा उभारुन मराठ्यांना मिळतील याची खात्री नव्हती. अश्या परिस्थित मराठ्यांनी बुर्हाणपुरजवळचा अशीरगड ताब्यात घेतला असता तर उत्तरेच्या मैदानी प्रदेशात आक्रमण करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. कोणत्या सरदारावर भरोसा ठेउन त्याला दक्षिणेत पाठवावे अशी परिस्थिती उरलेली नव्हती.
त्यात रायगडावर राज्याभिषेक करुन शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर मोठा पेच निर्माण केला होता. कारण आता नेता उरला नाही तरी त्या सिंहासनासाठी तरी जनता लढणार हे नक्की होते आणि झालेही तसेच.
शिवाय राजवटी बुडवने हे अतिशय आवश्यक धर्मकार्य औरंगजेबाला नक्कीच करायचे असणार.
अखेरीस नाईलाज होउन वृध्वत्वाकडे झुकलेला औरंगजेब दक्षिणेत उतरला.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:40
नवीन
दक्षीणेत पाठवायला खात्रीलायक असं कोणि उरलं नाहि म्हणुन शेवटी आलमगीर स्वतः आला हे शक्य आहे. पण आपण मुघल साम्राज्याचं उद्याचं मरण आज ओढवतोय अशी पुसटशी जरी कल्पना त्याला असती तरी त्याने कदाचीत वेगळा निर्णय घेतला असता. त्याच्या धर्मप्रेरणा, योजना, मिटीगेशन प्लॅन्स... नक्की काय कॉम्बीनेशन त्याच्या निर्णयाला कारणीभूत असावं...
- Log in or register to post comments
म
मनो
Sun, 06/17/2018 - 20:31
नवीन
एक गोष्ट इथल्या चर्चेत आली नाही ती लिहितो.
अवरंगझेब हा काही दक्खनमध्ये उतरणारा पहिला राज्यकर्ता नव्हता. याउलट असे म्हणता येईल की असे करणारा तो शेवटचा दिल्लीचा राजा होता.
अल्लाउद्दीन खिलजी याने 1300 च्या सुमारास देवगिरी आणि नंतर वारंगल इथे लुटालूट करून ही परंपरा चालू केली. त्यानंतर काही वर्षातच तुघलक सुलतान मुहम्मद याने राजधानीच देवगिरीस हलवली. तो प्रयोग फसून काही वर्षातच ती दिल्लीला परतला.
मोगल घराण्यात अकबराने नगरचा किल्ला घेऊन दक्षिणेत पाऊल टाकले. त्या आधी राजपुताना, माळवा आणि गुजरात हे ताब्यात घेऊन त्याने दक्षिणेचा मार्ग सुरक्षित केला होता.
शहाजहान स्वतः दक्षिणेत येऊन दौलताबादच्या वेढ्यात निझामशाही संपुष्टात आणण्यासाठी उतरला होता.
त्यामुळे असे म्हणता येईल, की औरंगझेब एक परंपरेचे पालन करत होता, हा काही एक आयसोलाटेड निर्णय नव्हता.
इतर सर्वाना कुठे थांबायचे आणि परतायचे हे कळले, औरंगझेब नाही, हा भाग निराळा ...
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 06/17/2018 - 21:50
नवीन
मुस्लीम सम्राटांनी क्रमाने दक्षीणेत पाय पसरले. त्याचाच पुढील टप्पा औरंगझेबाने गाठला. शिवाय दक्षीणेत फायन कारवाई करणं अत्यावष्यक देखील झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणजे आलमगीराची स्वारी.
तख्त काबीज केल्यानंतर औरंगझेब राजधानी सोडुन मोठ्या मोहिमांवर इतरत्र कुठे गेल्याचे संदर्भ आहेत काय बघायला लागेल. कि दक्षीण मोहीम स्पेशल केस होती...
- Log in or register to post comments
म
मनो
Mon, 06/18/2018 - 00:05
नवीन
शहाजहानच्या मृत्यूपर्यंत औरंगझेबाला दिल्ली सोडणे शक्य नव्हते, कारण उघड आहे. त्यानंतर इराणचा बादशाह हिंदुस्तानवर हल्ला करणार अशी अफवा होती. अफगाणिस्तान मध्ये बंडाळी चालू होती. त्यासाठीच तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास असताना त्यांना आणि रामसिंग याला तिकडे पाठवायचे ठरत होते. नेतोजी पालकर उर्फ महम्मद कुलिखान याला तिकडेच तैनात केले होते. यानंतर रामसिंगला आराकान म्हणजे आसामच्या मोहिमेवर पाठवले होते.
छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर काही काळाने शहजादा मुहम्मद अकबर याने बंड केले. आपले सैन्य थोडे असतानाही न डगमगता औरंगझेबाने राजपुतान्यात त्याचा पराभव केला. अकबराने छत्रपती संभाजीराजांकडे आश्रय घेतल्याने त्याच्या पाठलागावर असलेला औरंगझेब दक्षिणेत उतरला.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 01:52
नवीन
अकबराच्या मागावर औरंगझेब दक्षीणेत उतरला असावा. इंट्रेस्टींग. पण हे कारण इतर कारणांच्या मानाने थोडे दुय्यम वाटते.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 06/19/2018 - 04:34
नवीन
For fully five years, Akbar stayed with Sambhaji, hoping that the latter would lend him men and money to strike and seize the Mughal throne for himself. But at that time, Sambhaji was engaged in uncovering the conspiracy against him. After which, he was engrossed in wars against Siddhis of Janjira, Chikka Dev Rai of Mysore, Portuguese of Goa and Aurangzeb. In September 1686, Sambhaji sent Akbar to Persia.
In Persia, Akbar was said to pray daily for the speedy death of his father, which alone would give him another chance to wrest the Mughal throne for himself. On hearing of this, Aurangzeb is said to have remarked, "Let us see who dies first. He or I!" As it turned out, Akbar died in 1706, one year before his father's demise. He died at the town of Mashhad in Persia.
https://en.m.wikipedia.org/wiki/Muhammad_Akbar_(Mughal_prince)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 06/19/2018 - 08:48
नवीन
या ओळीत नमुद केलेला महाराणा कोण ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 06/19/2018 - 10:00
नवीन
ह्या ( औरंगजेबापुत्र) अकबराची पोरे राजपुतानी सांभाळली.
मराठ्यायंचे पोर औरंगजेबने सांभाळले.
औरंगजेबाचे पोर संभाजीराजनी सांभाळले.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 06/19/2018 - 10:24
नवीन
;) ते ठिके, कदाचित अशाच काही कारणाने छ. शाहू महाराज सुरक्षीत राहीले असतील.
पण बाकी प्रश्न आणि उत्तर मॅच झाले नाही.
- Log in or register to post comments
म
मनो
Wed, 06/20/2018 - 17:05
नवीन
जोधपूर महाराणा अजीतसिंग, जसवंतसिंगाचा मुलगा.
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Sun, 06/17/2018 - 22:01
नवीन
औरंगझेबाने अफझलखानाचा तडाखा ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/18/2018 - 01:59
नवीन
बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिव-छत्रपतीमधे याचा उल्लेख आहे. औरंगझेब दक्षीणेचा सुभेदार असताना त्याची आदीलशहाशी जुंपली होती. अफझलखानाने त्याल ऑलमोस्ट घेरलं होतं. औरंगझेब कैदच व्हायचा, पण त्याने आदिलशाही सर-सेनापतीला सेफ पॅसेज देण्याची विनंती केली. जर आपल्या इभ्रतीला धक्का लागला तर आदिलशहाल दिल्लीपतींच्या क्रोधाचे धनी व्हावे लागेल अशी धमकिही दिली. आपल्या राजाचे हित लक्षात घेऊन सेनापतीने औरंगझेबाला सेफ पॅसेज दिला. अफझलखानाने याची तक्रार आदिलशहाकडे केली. परिणामस्वरुप, सेनापतीला जीव गमवावा लागला.
मिपाकर या माहितीत काहि चु.भू. असल्यास करेक्ट करतीलच :)
- Log in or register to post comments
श
शेखरमोघे
Tue, 06/19/2018 - 04:23
नवीन
औरन्गजेबाची दक्षिणेतली मोहीम सम्भाजीराजान्च्यानन्तर इतकी लाम्बेल याची सुरवातीला त्यालाच कदाचित कल्पना आली नसेल. राजाराम आटोक्यात आल्याची (किन्वा सम्पल्याची) थोडीशी आशा दिसत असतानाच ताराबाईमुळे (आणि सन्ताजी/धनाजी मुळे) मोहीम लाम्बतच राहिली. जीवितहानी टाळण्याकरता मोन्गलाना रिकामे करून दिलेले किल्ले, त्यान्ची पाठ वळताच ताराबाईच्या राजकारणामुळे पुन्हा परत ताब्यात येत राहिले. रिता होत गेलेल्या दक्षिणेतल्या खजिन्यात भर टाकण्याकरता उत्तरेतून येणारी रक्कम वारन्वार मराठ्याना लुटता आली. भरमसाठ वाढलेली आणि ऐशआरामाची सवय लागलेली फौज पटपट हलवणे औरन्गजेबाला कठिण होत गेले. औरन्गजेबाची गादी चालवणारा - धर्माकरता किन्वा राज्याच्या वाढीकरता दक्खनची स्वारी फत्ते करू शकणारा कर्तबगार वारसही कोणी दिसत नव्हता. अशा रीतीने सगळ्याच बाजूनी औरन्गजेब दक्षिणेत सम्पला.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 06/19/2018 - 10:22
नवीन
संभाजी राजांनंतरचा मराठ्यांचा तसेच भारताचा इतिहास कोणत्या पुस्तकांत वाचायला मिळेल ?
तसेच संभाजी राजांचे कोणते चरित्र सर्वाधिक प्रामाणिक आहे ? छावा की आणखी कोणते ? मला अभिनिवेश /निंदा/स्तुती ई टाळून फक्त 'ऐतिहासिक घटनांचे वर्णन आणि विश्लेषण' असलेली पुस्तके वाचायला आवडतील.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 06/19/2018 - 10:45
नवीन
१९७६ साली हिमालयातली निसर्गचित्रे रंगवायला इंदूरातून मी गेलो, त्या वेळी दोन-चार दिवसांसाठी म्हणून दिल्लीत राहिलेलो मी राहता राहता आजतागायत का रहात आलो, हे मला अजूनही कळलेले नाही. असा मी औरंगजेबाबद्दल काय लिहीणार ? माझ्या मध्यमवर्गीय साध्याश्या जीवनातही बेचाळीस वर्षे कशी निघून गेली कळले नाही. औरंगजेबासारख्या महान बादशहाची, स्वतः हाताने टोप्या विणून त्यातून गुजराण करत परमदयाळू अल्लाने त्याला नेमून दिलेले काम करता करता सत्तावीस वर्षे कशी निघून गेली हे त्यालाही कळले नसावे.
- Log in or register to post comments
व
वाचक
Tue, 06/19/2018 - 15:04
नवीन
"आजवर कधीही धारवाडला न आलेला मी, नोकरीच्या निमित्तने धारवाडला आलो, आणि आता, इतक्या वर्षांनन्तर, जायला (दुसरे) एकही ठिकाण उरु नये अशी सगळी ठिकाणे पुसली गेली... नाही म्हणायला माझ्या आईवडीलांचे लग्न धारवाडलाच झाले होते, हा एक योगयोग..."
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 06/19/2018 - 16:59
नवीन
मलाही पडलेला प्रश्न.
मला वाटतं औरंगजेबाची उत्तरेतील सत्ता बऱ्यापैकी स्थिरावली होती. आणि धर्मांध औरंग्या अख्खा भारत मुस्लिम करन्याची स्वप्ने पाहत दक्षिणेत उतरला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यामागे हिंदूंवर जरब बसून धर्मांतर व्हावे हा त्याचा हेतू होता. त्या मुळेच त्याने 27 वर्षे दक्षिणेत घालवली. मागे कोणीतरी उल्लेख केल्याप्रमाणे धर्मांधता हीच त्याला 27 वर्षे महाराष्ट्रात रोखू शकली.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 06/20/2018 - 19:45
नवीन
अमरेंद्र ,
अतिशय योग्य प्रतिसाद,
ईतके जालिम राज्यकर्ते असताना देखिल उत्तर भारताच्या कंपॅरिझन मध्ये दक्षिण भारतात खुपच कमी "हिंदु लोकांच" "मुस्लिमी करण" झालेल आहे. टिपु सुलतानने "हिंदु लोकांच" "मुस्लिमी करण" करण्यासाठी बराच खुन खराबा केलेला होता !!
जर औरंगजेबला महाराष्ट्रातुन पुढे जाऊ दिल असत तर आताची परिस्थीती वेगळी असती.
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 06/27/2018 - 13:35
नवीन
रोचक चर्चा! :-)
मला महत्त्वाचे वाटणारे काही मुद्दे -
औरंगजेबाचा साधारण उद्देशः
- दक्षिण हिंदूस्थानातील हिंदूराज्यांचे इस्लामीकरण
- आदिलशाही, निजामशाही आणि मराठ्यांचे होऊ शकणारे संगनमत तोडणे [हा शंभूराजांचा प्रयत्न होता, पण त्यात यश आले नाही]
- मराठ्यांचे राज्य खालसा करून परत मुघलांचा धाक कायम करण्याची संधी [शिवरायांच्या नावाचा प्रभाव पुसण्याचा प्रयत्न]. तसा त्याने पणच केला होता म्हणे.
- ईराण आणि तुर्कस्थानच्या शहांच्या तुल्यबळ असण्याची किर्ती मिळवणे
घोडचूकः
- आदिलशाही आणि निजामशाही नेस्तनाबूत करून शंभूराजांचा वध केल्यावर, उण्यापुर्या ६ वर्षांच्या कालावधीत औरंगजेबाला जेता म्हणून परत जाण्याची संधी होती पण ती त्याने साधली नाही. तसे झाले असते, तर त्याला उजळ माथ्याने परत जाता आले असते. पण शेवटचा घाव घालून शत्रूला संपवण्याचा मोह नडला... मराठ्यांचा अभूतपूर्व लढा त्याच्या कल्पनेबाहेरचा होता. आणि पराभूत म्हणून स्वतः औरंगजेबच परत गेला तर पुढे त्याच्या सरदारांना तो कोणत्या तोंडानं बोलणार? तो परत म्हणूनच जाऊ शकला नाही.
या औरंगजेबाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात रामचंद्रपंत अमात्यांचे नाव अगत्याचे वाटते. प्रत्यक्ष लढायांशिवाय खालील योजनांच्या मुळाशी तेच होतेत.
- सरदारांना एकत्रितपणे चढाई न करता गनिमी काव्याने वेगवेगळे लढण्याला प्रोत्साहन देणे
- खर्च भागवण्यासाठी मुघलांच्या मुलुखात स्वार्या करण्याला प्रोत्साहन देणे
- तह करून किल्ला मुघलांच्या ताब्यात देणे व डागडुजी करून रसद भरून झाली की परत जिंकून घेणे
या योजना मुघलांच्या विरुद्ध चांगल्याच सफल झाल्यात हे वेगळे सांगायला नको.
असो. मला वाटणारा महत्त्वाचा मुद्दा हा की शेवटी औरंगजेब आपल्या कारस्थानात सफल झाला काय?
माझ्या मते होय.
- आपण जिंकू शकत नाही असे पाहून, मराठ्यांमधे फूट पाडून दोन वेगळ्या गाद्या होण्याला कारणीभूत औरंगजेब.
- छत्रपतींनी औरंगजेबाला दिलेल्या वचनाखातर, दिल्लीवर झालेल्या ईराणच्या दोन स्वार्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी मराठ्यांनी दोन प्रयत्न केले. पहिल्या वेळेस थोरले बाजीराव गेले. दुसर्यावेळेस पानीपत झाले. कारणीभूत? अप्रत्यक्षरित्या औरंगजेब. पानीपतानंतर उण्यापुर्या साठ वर्षात मराठी सत्ता संपली यातच काय ते येते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/27/2018 - 18:48
नवीन
पानिपतास औरंगजेब कारणीभूत असू शकत नाही. कारण पानिपतच्या वेळेस मराठे भारतातील सर्वादगीक समर्थवान होते. मराठ्यांच्या सीमा अफगाण राज्यांना भिडल्या होत्या. त्यामुळे हे युद्ध बादशहाच्या रक्षणापेक्षा मराठे देशासाठी लढले होते.
- Log in or register to post comments