Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मराठी बोला

स
साहना
गुरुवार, 05/17/2018 - 03:07
💬 46 प्रतिसाद
मुंबईतीलआमच्या बिल्डिंग मध्ये एक हॉल `तेलगू समाजा`ने भाड्याने घेतला. त्या भागांत अनेक तेलगू लोक राहत असल्याने आणि बहुतेक उच्चशिक्षित असून त्याची मुले इंग्रजी शाळांत जातात आणि त्यांना तेलगू लिहायला वाचायला येत नाही. ह्या हॉल मध्ये एक प्रकारची सायं शाळा चालवायचा त्यांचा इरादा होता जिथे लहान मुलांना तेलगू भाषा, गीते शिकवली जातील, वृद्धांना येऊन चकाट्या पिटायला मिळतील आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करता येईल असा त्यांचा इरादा होता. सर्व काही सुरळीत झाले. त्यांनी कायद्याला अनुसरून मराठी, इंग्रजी भाषेतील फलक लावला आणि त्याच बरोबर भाला मोठा तेलगू भाषेतील फलक सुद्धा लावला. दर संध्याकाळी आता इथे गर्दी जमायची तेलगू भाषेंत थोडा गोंगाट वगैरे व्हायचा पण कुणालाही त्रास झाला नाही. एक दिवस मला कुणाचा तरी फोन आला. मी कुठल्या तरी मराठी संघटने तर्फे बोलत असून आपल्या कार्यालयावर कन्नड भाषेतील बोर्ड आपण स्वतःहून काढून टाकावा नाहीतर परिणाम भोगायला लागतील इत्यादी इत्यादी. मी त्यांना तो फलक पूर्ण पणे कायदेशीर असून मराठी भाषेतून सुद्धा लावला आहे आणि वर कुणाच्याही धमक्यांना घाबरून मी काहीही करणार नाही असे सांगितले. वर आपण येऊन भेटा आपल्याला नक्की काय समस्या आहे हे समजून आम्ही सामोपचाराने प्रकरणावर पडदा पडू असे सुचवले. (ह्या माणसाला काही पैसे वगैरे भेटतील असे वाटले कि काय ठाऊक नाही). दुसऱ्या दिवशी आमच्या घरी सुमारे १५ लोक आले. गाड्या, दुचाकी इत्यादी. मुंबईत मराठीच बोलली गेली पाहिजे असा आमचा आग्रह आहे असे त्यांनी सांगितले. मी सुद्धा आपला उपक्रम स्तुत्य असून मी होऊ शकेल तो हातभार लावीन असे सांगितले. मग तो कन्नड बोर्ड का काढून टाकत नाही? असा पुढून सवाल आला. तेलगू बोर्डाने मराठी भाषेला धक्का पोचत नाही आणि सादर बोर्ड मराठीत सुद्धा आहे असे मी सांगितले. त्यावर "पण महाराष्ट्रांत मराठी भाषेचं काय काम ?" असे काही जणांनी विचारले. मग मी सुद्धा गुगली टाकली. "बोर्ड कायदेशीर असल्याने मी त्यांना तो काढायला लावू शकत नाही. पण विनंती जरूर करू शकते. त्याचवेळी आपण त्यांच्यावर दबाव टाकला किंवा जबरदस्ती केली तर मालक म्हणून प्रॉपर्टीचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे पोलिसांना वगैरे मला बोलवावे लागेल. पण आम्ही तडजोड करूयात. आपण विनंतीपूर्वक एक पात्र तेलगू समाजाला पाठवा. त्यांना मी मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी जवळच्या मराठी शाळेला देणगी द्यायला मी सांगते आणि त्यांच्या प्रत्येक रुपयाला मी माझ्या पदराचा रुपया मॅच करिन त्याच वेळी ह्या संपूर्ण फंड उभारणीचे श्रेय आम्ही तुम्हाला देऊ." ही तडजोड ऐकून मंडळी थोडी विचारात पडली. पण मी पुढे बोलती झाले. "पण त्याच वेळी मराठी भाषेवरील आपले प्रेम निर्भेळ आहे आणि तात्विक आहे हे सुद्धा तुम्हा सर्वाना सिद्ध करावे लागेल. त्यासाठी मी आणि आपण सर्व पुढच्या गल्लीतील मशिदीत जाऊ आणि तेथील मुहर्रम कमिटीला (त्या दिवसातून मुहर्रम होता), मुह्हर्रमचे सर्व बोर्ड उर्दू ऐवजी मराठीतूनच असावेत आणि उर्दू ह्या भाषेचे महाराष्ट्रांत काहीही काम नाही असे जाऊन लिखित स्वरूपात पत्र देऊया. पुढच्या गल्लींत ४ मशिदी होत्या." इथे मात्र सर्व मंडळींचे चेहरे पांढरे फत्तक पडले. "उगाच जातीय तेढ कशाला निर्माण करायची?" एकटा टवाळ बोलला. "उर्दू सुद्धा भारतीय भाषा आहे आणि मुस्लिम समाजाची भाषा आहे" दुसरा धिम्मी बोलला. "मग तेलगू काय रशिया मधून आली आहे का ? " त्यांच्यातीलच एक पोरटा बोलला. नेता मंडळीने त्याच्याकडे वटारून पहिले आणि तो गांगरला. "त्याचे बोर्ड फक्त मोहरम पुरते आहेत." नेत्याने टोंन बदलत म्हटले. ह्यावर मी उठून त्यांना हात जोडून नमस्कार केला. "आपले मराठी प्रेम खोटे असून जे घाबरतात त्यांनाच दटावयाचे ह्या न्यायाने चालू आहे. मराठी अस्मितेत आम्ही शिवाजी किंवा संभाजी सारख्याना थोर मानतो. दरोडेखोरांना नाही. " असे म्हणून मी त्यांची बोलवण केली पण पुढे ऐकू आले माझ्या प्रश्नाने त्यांच्या ग्रुप मध्येच फूट पडली. शब्दांकन : माझे. मूळ अनुभव आमच्या आत्याचा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16987 views

💬 प्रतिसाद (46)
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/17/2018 - 04:30 नवीन
लेख आणि त्यातील विचार उद्भोदक वाटले.
  • Log in or register to post comments
श
शाली गुरुवार, 05/17/2018 - 04:48 नवीन
मस्त! 'मराठी बोला, मराठी लिहा' ही चळवळ मराठी लोकांसाठीच चालवली पाहीजे पहिल्यांदा. किती लोक मराठीत सही करतात? समोरचा भैय्या, अण्णा मोडक्या तोडक्या का होईना पण मराठीत बोलत असतानाही आपण का हिंदी बोलतो? मी तर एक मराठी रिक्षावाला आणि मराठीच प्रवाशाला एकमेकांसोबत हिंदी बोलताना पाहीले आहे. समोरच्याला येत नसेल मराठी तर जरुर हिंदी इंग्रजी वापरावी. ऊगाच मराठीचा हेकेखोरपणा करु नये.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 05:27 नवीन
आंतरजालावर मोघलाना शिव्या घालणारे गल्फमध्ये नोक्री करुन दिनार छापत असतात. मातृभाषेचा आग्रह करणारे लेख लिहिणारे पिढ्यानपिढ्या इंग्रजी माध्यमात शिकत असतात. हिंदू धर्म / संस्कृती वगैरेच्या महानतेवर लिहिणारे आम्रिका हॉस्ट्रेलिया स्विझरलंड वगैरे ठिकाणी बसलेले असतात. ( त्यामुळे अशा लोकांना फाट्यावर मारावे)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 06:55 नवीन
अपरिहार्यता , तात्कालिक आकर्षण, तात्कालिक हित संबंधातून घेतलेले व्यक्तिगत कृती चुकीच्या असल्यातरी तात्विक भूमिका वेगळ्या असणारे विरोधाभासही असू शकतात . मुख्य म्हणजे तुम्ही अमूक करता म्हणून तमूक मांडणी करण्यास अपात्र आहात असे सरसकटीकरण अप्रत्यक्ष व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ठरु शकावे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 15:14 नवीन
ही कारणे मान्य असतील तर इतर लोकही हीच कारणे असल्याने इतर भाषा वापरत असतील. मायबोलीवर एक लबाड गृहस्थ असाच वाद घालत होता, हाच विषय .. तुझे व मुलांचे शिक्षण कोणत्या भाषेत झाले हा प्रश्न विचारला तर तो गायब झाला.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 15:35 नवीन
ही कारणे मान्य असतील तर इतर लोकही हीच कारणे असल्याने इतर भाषा वापरत असतील.
शक्य आहे ना ! पण त्याने भूमिकेची तर्कसुसंगतता हि स्वतंत्र असावी या अंडरलाईन्ड तत्वात फरक पडत नाही . दहा व्यापारी त्यांच्या अपरिहार्यतेने किंवा तात्कालीक आकर्षणाने वीजेची चोरी करतात पण वीजेची चोरी करु नये हे तत्व प्रामाणिक पणे कबूल करतात , त्यांचे पाहून दहा आणखी लोक तत्सम कारणांनी वीजेची चोरी करतात पण आता ते वीजेच्या चोरीचे समर्थन करु लागले आहेत आणि नंतर दोघेही एकमेकंकडे बोट दाखवतात. अंडर लाइन्ड बरोबर तत्व कोणते ? वीजेची चोरी करु नये हे तत्व सहसा बरोबर ठरावे, कारण नाहीतर वीज उत्पादन आणि वितरणात गुंतवण्यासाठी पैसा शिल्लक रहाणार नाही, आणि एक दिवस सारी व्यवस्था कोलमडून पडेल .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 15:53 नवीन
वीज चोरीचे उदाहरण इथे चुकीचे वाटले. कारण इतर भाषेचा वापर करणं. ही चोरी नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 05/17/2018 - 22:43 नवीन
माझ्या मते स्वतः विजेची चोरी करणार्यांना इतरांना सल्ले द्यायचा अधिकार अजिबात उरत नाही. जबरदस्ती करण्याचा अधिकार तर शून्य. स्किन ईन द गेम
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/18/2018 - 04:45 नवीन
आपण दोघेही, हा प्रतिसाद 'रयत' या प्रतिसादाला जोडून वाचावा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 15:39 नवीन
भाषेच्या बाबतीत 'रयत' हा घटक केंद्र स्थानी असावा की नको ? रयतेशी साधला जाणरा प्रत्येक संवाद त्यांच्या स्वभाषेत साधला जाणे आदर्श स्थिती आहे की परकीय भाषेत संवाद साधणे आदर्श स्थिती आहे. परकिय भाषेचाच वापर हिच आदर्श स्थिती असती तर मराठी भाषेत कळफलक बडवण्याचे कष्ट अनेकांनी घेतले नसते .
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 07:03 नवीन
भारतीय भाषांनी आपल्या सर्व उच्चारणांना दाखवता येईल इतपत बदल करुन देवनागरी लिपी वापरावी असे माझे व्यक्तीगत पण आग्रही मत आहे (की होते ? कारण टेक्नॉलॉजी ज्या वेगाने पुढे चालली आहे. कुणी कोणत्याही लिपीत काही लिहिले असले तरी तात्काळ तुमच्या भाषेत मिळण्यासारखी टेक्नॉलॉजी प्रत्येका पर्यंत पोहोचणे फार दुरची गोष्ट नसावी)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 05/17/2018 - 10:12 नवीन
भारत इने नेनु असा व्यापक विचार बाळगला पाहिजे
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 10:17 नवीन
मस्त लेख ग साहने. बेगडी प्रेम असणार्या ह्या दोन्ही पक्षनेत्यांची मुले मात्र बोंबे स्कॉटिश ह्या महागड्या इंग्रजी शाळेत गेली होती.
हिंदू धर्म / संस्कृती वगैरेच्या महानतेवर लिहिणारे आम्रिका हॉस्ट्रेलिया स्विझरलंड वगैरे ठिकाणी बसलेले असतात.
त्यात अयोग्य आहे असे नाही कारण ईतर धर्मांबद्दल महानतेने लिहिणारे भारतात बसलेले असतातच. धार्मिक्/भाषिक तेढ निर्माण करू नये एवढीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/17/2018 - 14:11 नवीन
माहितगार,
भारतीय भाषांनी आपल्या सर्व उच्चारणांना दाखवता येईल इतपत बदल करुन देवनागरी लिपी वापरावी असे माझे व्यक्तीगत पण आग्रही मत आहे
याचंच एक उपमत म्हणजे ज्या मराठी भाषिकांना इतर भाषा येतात त्यांना त्या त्या भाषा देवनागरीत लिहावयास उद्युक्त केले पाहिजे. पूर्वीच्या काळी बडोद्याचे मराठी भाषिक गुजराती देवनागरीत लिहायचे. मोडी लिपी मराठी व गुजराती दोन्हींसाठी वापरायचे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 15:40 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/17/2018 - 14:32 नवीन
राजकारण्यांच / दरोडेखोरांच बेगडं मराठी प्रेम दाखुन दिल्या बद्धल अभिनंदन ! माझा अनुभव... हल्लीच मुंबइत मी कोलाबा भागात अत्तर घेण्यास गेलो होतो... तिथे त्या दुकान काही अरबी स्त्रिया बसल्या होत्या. विक्रेता त्यांच्याशी अरबीतुन बोलत होता. मी त्याच्याशी मराठीतुन बोलण्यास सुरुवात केली असता त्याने ही कोणती भाषा ? असा चेहरा केला. महाराष्ट्राच्या राजधानीत व्यवसाय करताना त्याला अरबी येत होती पण मराठी नाही हे कळुन मला फारच वाईट वाटले ! हीच गोष्ट अजमलच्या शोरुम मध्ये सुद्धा मला अनुभवायला मिळाली... मराठी राजकारण्यां बरोबरच मराठी लोक सुद्धा मराठीच्या अधोगतीला जवाबदार आहेत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 14:49 नवीन
महाराष्ट्राच्या राजधानीत व्यवसाय करताना त्याला अरबी येत होती पण मराठी नाही हे कळुन मला फारच वाईट वाटले
कुलाब्यात/कफ परेड्मध्ये जे लहानाचे मोठे झाले त्यांच्यापैकी किती लोकांना मराठी येत असेल ह्यावर शंका आहे. पण ह्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? त्याचे मराठीशिवाय चालत असेल. स्थानिक भाषा शिकणे केव्हाही फायद्याचे..पण सक्ती नको असे आमचे मत. पेडर रोड्,वरळी,जुहु तारा, वांद्रे(पश्चिम)... येथे अगदी हजारो/लाखो नागरिकांना मराठी येत नसेल ह्याची खात्री आहे..
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 15:20 नवीन
जे मराठी लोक इतर देशात काम करत असतील त्यांचेही असेच होत असेल ना ? पुर्वीच्या काळी राजेमहाराजानी लोकल संस्कृतीच्या नावाने बुरजे उभारुन जन्तेला त्यात बंदिस्त केले , ते त्याना भोई , पट्टेवाले, भालदार चोपदार मिळावेत म्हणून . आज हीच भूमिका राजकारणी करत आहेत. ह्यांची बुरजे आजही आपण पूजत बसायचे का?
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 05/17/2018 - 22:44 नवीन
चाबूक बसावा अगदी त्या प्रकारचा कमेंट आहे. अव्वल !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/17/2018 - 17:28 नवीन
कुलाब्यात/कफ परेड्मध्ये जे लहानाचे मोठे झाले त्यांच्यापैकी किती लोकांना मराठी येत असेल ह्यावर शंका आहे. पण ह्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? त्याचे मराठीशिवाय चालत असेल. माई तुझी शंका रास्तच आहे, परंतु अरबी येते पण ज्या राज्यात ते व्यवसाय करतात तिथली राज्यभाषा त्यांना येत नाही यामुळे मला वाईट वाटले, [मी मराठी आहे यामुळे ते विशेष वाटले.] हेच तो व्यापारी गुजरात मध्ये असता तर तो गुजराती मध्ये नक्कीच बोलला याची खात्री आहे. :) मराठी माणसं त्यांच्या भाषेतुन व्यवहार करणे टाळतात / मराठीला प्राधान्य देत नाहीत म्हणुनच असे अनुभव येतात. आता मराठी माणसांनीच विचार करावा... नाही का ? बाकी तुमच्या ह्यांना खालचा व्हिडियो पहायला नक्की सांगा हं...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/18/2018 - 07:49 नवीन
व्हिडियो पाहिला रे बाणा. चांगले विचार आहेत. पण कोणतीही भाषा शिकण्यासाठी वेळ लागतोच.. सध्याच्या काळात तेवढा वेळ असणारे आहेत किती? एखाद्या अमराठी युवकाने 'मला रोज १ तास मराठी शिकायचे आहे.. मराठी माणसांनी मदतीला यावे' असे म्हंटले तर किती नोकरदार मराठी पुढे येतील शिकवायला? की मग तेव्हा 'तुम्ही आमच्या राज्यात आला आहात.. तुमचा प्रोब्लेम आहे' असे म्हणणार?" मराठीचा खरोखरच आग्रह धरायचा तर तो समाजातल्या उच्च स्तरावरून चालू होऊ दे असे ह्यांचे मत. म्हणजे रतन टाटा,बिर्ला, अमिताभ बच्चन.. मोठे स्टॉक ब्रोकर्स, उद्द्योगपती....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/20/2018 - 04:45 नवीन
मराठीचा खरोखरच आग्रह धरायचा तर तो समाजातल्या उच्च स्तरावरून चालू होऊ दे असे ह्यांचे मत. म्हणजे रतन टाटा,बिर्ला, अमिताभ बच्चन.. मोठे स्टॉक ब्रोकर्स, उद्द्योगपती.... माई तुमच्या ह्यांना सांगा कि मराठी मागे पडली ती मराठी लोक मराठी माणसांशी सुद्धा हिंदीत, इंग्रजीत बोलु लागली म्हणुन आणि तिला प्राधान्य देण्याचे त्यांनी बंद केले म्हणुन ! बाकी उच्च स्तरावरचे म्हणता तर "मराठी माणसांनी मराठीचाच आग्रह" धरला तरच तिथेही बदल सहज होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरी मम्मी नु पसंद नहियो तू... ;) :- SUNANDA SHARMA | SuKh E | JAANI |
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 05/20/2018 - 07:48 नवीन
माईसाहेब तुम्ही उत्तरभारतात राहून पहा. पटणा ,लखनौ सारखी मागास शहरे सोडाच पण बंगलोर , चेन्नई , हैदराबाद सारख्या शहरातही स्थानीक भाषाच वापरतात. हे उत्तरभार्तीय मुंबईत येवून हिम्दीतच बोला असा माज करतात. मात्र बंगलोर मधे कानडीत बोलतात तेथे तेथले नागरीक स्थानीक भाषेचाच आग्रह धरतात मराठी लोक आपल्या भाषेचा आग्रह नाही धरणार तर मग दुसरे कोण करायचे हे काम मराठी बोलायचा आग्रह धरा. सुरवातआपणच करायला हवी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/30/2018 - 03:28 नवीन
हरीभाऊ बोला काय म्हणताय? मोदींचा लाभार्थ्याशी मराठीतून संवाद

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Weeknd, Kendrick Lamar - Pray For Me (Lyric Video)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/18/2018 - 04:48 नवीन
बेगडीपणा बद्दल चर्चा चालू आहे, पण बेगडी नसणारे मिळत नाही तो पर्यंत , बेगडीपणावरचे अवलंबित्व शिल्लक रहात असावे .
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 05/18/2018 - 16:40 नवीन
मराठी भाषेच्या बाबतीत मुंबईची स्थिती थोडी वेगळी आहे. ती मराठी माणसाच्या आर्थिक समृद्धीशी निगडित आहे. मराठी माणसाकडे (तुलनेने) पैसा कमी असल्यामुळे मुंबई शहरात घर घेणे त्याला शक्य होत नाही. कुलाबा,कफ परेड, पश्चिम वांदरे वरळी दादर येथे मराठी वस्ती फक्त झोपडपट्ट्या आणि अति जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती इथेच आहे. या लोकांची खरेदीशक्ती कमी असल्यामुळे बाजार त्यांच्यावर अवलंबून नाही. बाजारातील विक्रेते त्यांच्या पुढे पुढे करीत नाहीत. त्यांच्या भाषेत बोलून त्यांना आपलंसं करून त्यांना माल खरेदी करायला उद्युक्त करण्यइतका वेळ त्यांच्यामागे घालवावा असं विक्रेत्यांना वाटत नाही कारण तो वेळ वाया जाणार हे त्यांना माहीत असतं. आज मुंबईत मराठी माणूस उपयुक्त अशा कुठल्याच व्यवसायात ठाम उभा नाही. कुठल्याही स्थानिक कोर्टात जा. तुमचे काम स्वस्तात करून देणाऱ्या उत्तरप्रदेशी लोकांचे मोहोळ तुमच्या मागे लागते. इस्त्रीवाले, दूधवाले, भाजीवाले, फळवाले, रिक्षावाले, ओला उबरवाले हे सर्व उप्र बिहारचे. कष्ट करून एका पिढीत ते समृद्ध झाले आहेत. त्यांची क्रयशक्ती सामायिकरीत्या मोठी असते आणि त्यांची खरेदीविक्री आपापसातच सवलतीच्या भावात होत असते. मोठ्या आणि अतिमोठ्या व्यापारउदीमात गुजराती मारवाडी पहिल्यापासून ठाण मांडून आहेत. ते आपल्या घरगुती नोकरांशी ज्या मराठीत बोलत असत त्याच मराठीत मराठी खरेदीदारांशी बोलण्याचा प्रयत्न करीत. पण आताशी त्यांचे घरगुती नोकरही उडिया किंवा झारखंडचे असतात. मुंबईतील जागांच्या अव्वाच्यासव्वा किंमतीमुळे अगदी शिक्षणक्षेत्रातही मराठी माणूस उरलेला नाही. मुंबईचे मराठीपण उरले आहे आणि इतरांसमोर ' मराठी संस्कृती' म्हणून पुढे येते आहे ते दहीहंडी , गणपतिउत्सवातला धागडधिंगा आणि अलीकडे भगवे फेटे, तलवारी, नथनऊवारीसह निघणाऱ्या शोभाफटफटीयात्रा यांतून.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/18/2018 - 17:40 नवीन
यात भरीस भर म्हणून मराठी लोकंच आपापसांत भांडणे करतात
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 05/18/2018 - 20:40 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Fri, 05/18/2018 - 19:21 नवीन
आधी आपण मराठी माणसेच आपल्या भाषेची किती मोडतोड करतो? १. मराठीतील कित्येक समर्पक शब्दांची जागा हिंदी नाहीतर इतर कुठले तरी शब्द घेताहेत. काही वर्षांपूर्वी 'सर्व शिक्षा अभियान' नावाचे फर्मान निघाले. त्याने काय झाले, तर मोहीम हा शब्द जाऊन त्याच्या जागी 'अभियान' आले! आता पाहावे तर मोहीम हा शब्द कुणी वापरीतच नाही. 'शिवाजी महाराज सुरतेच्या अभियानावर गेले' असले मराठी आता ऐकायचे दिवस आले. सो मी तुला बोललो..' ह्यातला 'सो' हा काय प्रकार आहे? तो 'so' हा आहे! आता तो रूढ झाला आहे, इतका की कुणालाही खटकत नाही. २. बोललो! ह्या शब्दाने सांगणे, विचारणे, म्हणणे, गाणे, ह्या सर्वांना मोडीत काढले आहे. काही काळापूर्वी रस्त्याने जात असता माझ्या जरा पुढे दोन मुलांचा एक संवाद कानावर पडला, तो ऐकून मी मागेच थांबणे पसंत केले. तो संवाद असा: मी तिला बोललो तू गणपतीत गाणं बोलणार का, तर ती बोलली, मी नाय बोलणार, तर मी बोललो का, तर ती बोलली मी गावी जाणार आहे या वर्षी. ही अतिशयोक्ती नाही! ३. मराठी सिरिअल्समधील पात्रेदेखील ह्यात मागे नाहीत. 'मी व्रत ठेवलं आहे' असे वाक्य मी ऐकले आहे. (व्रत घेतात/ करतात, हे आमच्या गावीही नाही.) बाकी, बोललो इत्यादी तर नेहमीचेच. ४. वृत्तपत्रीय लिखाणही तसेच. 'पोलीस शिपायाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला' असे वाचण्याचे आता दिवस आले आहेत. मराठी जाहिरातींची तीच कथा. एखादी निर्दोष जाहिरात वाचनात आली तर त्या आनंदाप्रीत्यर्थ एक वडा अधिक खावा अशी परिस्थिती. आणि आम्ही दुकानांच्या पाट्या मराठीत लावा असा आग्रह धरणार! मग, चक्क 'लावण्या' अशी पाटी एका साड्यांच्या दुकानावर वाचायची वेळ येते. (विचारांती लक्षात आले की, मूळ पाटी 'लावण्य' अशी विंग्रजीत असणार; खळ्ळ-खट्याक वाल्यांच्या विनंतीवरून त्याचे मराठीकरण केले गेले, त्या बिचार्याला लावण्य आणि लावणी/ लावण्या ह्यातला फरक काय माहीत? असा सर्व आनंदी-आनंद आहे. आपले सगळे मराठीप्रेम तोंडी लावण्यापुरतेच.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/18/2018 - 20:05 नवीन
बाकी सहमत पण काही मुलींचं नाव लावण्या असते ते कसे लिहायचे? बरोबर उच्चारानुसार अक्षरे लावण्याचे काही नियम नाहीत का मराठीत?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/18/2018 - 20:11 नवीन
आणि मराठी असल्याचा "गर्व"सुद्धा असतो
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 05/19/2018 - 03:04 नवीन
मराठी भाषा बदलते आहे याची मला व्यक्तिश: फारशी खंत वाटत नाही. भाषा आणि संस्कृतीमध्ये बदल अटळ असतात. उलट मला ग्रामीण किंवा शहरी मराठी बोलींमधले शब्द प्रमाण मराठीत आले तर आवडेल. कासार, सुतार, तांबट, बुरुड घिसाडी शेतकरी अशा सर्व व्यावसायिकांमध्ये व्यवसायानुरूप अनेक खास शब्द वापरले जातात. आज अनेक कसबे आणि हुन्नर व्यक्त करण्यासाठी प्रमाण मराठीत शब्द नाहीत. टर्निंग, फिटिंग, मोल्डिंग पॉलिशिंग अशा अनेक व्यवसायाधिष्ठित शब्दांसाठी एकतर आपण सरळ इंग्लिश शब्द वापरतो किंवा संस्कृतकडे वळून मराठी भाषा अधिक क्लिष्ट करून ठेवतो. अस्सल देशी किंवा तद्भव शब्दांमध्ये थोडेफार बदल करून पर्यायी शब्द प्रमाण मराठीत वापरले जाऊ शकतात. हे शब्द वापरण्यात लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. पण जोपर्यंत शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नाही तोपर्यंत त्यातून निर्माण होणाऱ्या शब्द- भाषा - संस्कृती इत्यादि व्यवहारालाही प्रतिष्ठा नाही असे हे चक्र आहे. या बाबतीत गुजराती लोकांकडून धडा घ्यावा. सध्याच्या प्रगत आर्थिक व्यवहारातील बहुतेक प्रक्रियांसाठी गुजरातीत शब्द आहेत. तसेच इतर कसब/ हुनर यातल्या व्यवहारासाठीसुद्धा आहेत. मग भले या भाषेला ज्न्यानपीठ पुरस्कार कमी का मिळालेले असेनात. अभिजन मराठी, बहुजन मराठी हे भेद राहाणारच. पण ते मराठी भाषेच्या समृद्धीच्या आड येऊ नयेत. ते इंक्लूझिव असावेत , एक्स्क्लूझिव नकोत. मराठी समाजाने भाषेत आणि संस्कृतीत सर्वसमावेशकता स्वीकारावी असे वाटते. ता. क. : मिपावर सांप्रत ग्रामीण मराठीचा जो जोरदार प्रवाह वाहू लागला आहे तो मला दिलासा आणि आशादायक वाटतो. आपल्या मातीतच खतपाणी आणि पोषण शोधण्याची आणि व्यक्त होण्याची एक धडपड या दृष्टीने त्याकडे पाहाता येईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/19/2018 - 08:05 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/19/2018 - 08:07 नवीन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 05/20/2018 - 07:50 नवीन
माझी मदत करशील का गर्व आहे मला मराठी असण्याचा. या दोन्ही वाक्यात काय चूक आहे असे कोणालाच वाटत नाही गर्व हा शब्द मराठीत चांगल्या अर्थाने वापरला जात नाही
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 05/19/2018 - 08:54 नवीन
मराठी लोकांच्या खरेदी शक्ती बद्द्ल लिहले गेले ते संपुर्ण खरे नाही. आज काल मॉल मधे आजुबाजुला खुप वेळा मराठी बोललेली ऐकु येते. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय " मधे मात्र मराठी माणसाच्या खरेदी शक्ती बद्दल जे कही दाखावले आहे ते अतिशयोक्ती आणि न्युनगंडाचे प्रदर्शन होते. असे चित्रपट मुंबई च्या पार्श्वभुमीवर दाखवुन आपण आपली किंमत कमी करतोय. आपणच आपल्या बद्दल असे दाखवुन इतरांसाठी चुकीची प्रतिमा निर्माण करतो मग इतर लोक त्या प्रतिमेचा आपल्याला हिणवण्यासाठी गैर वापर करतात.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 05/19/2018 - 13:50 नवीन
आजच्या लोक॑सत्तातील हे वाक्य बघा: "या विवाहसोहळ्यात प्रियांकाचा शाही अंदाज पाहायला मिळाला. फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस ...." हा हवामानाचा 'अंदाज' आहे, की सट्टेबाजारातला, अंदाजपत्रकातला, का 'अंदाजपंचे दाहोदरसे' मधला ? तसेच हल्ली त्याने मला मदत केली च्या ऐवजी 'माझी' मदत केली असे सर्रास लिहीले-बोलले जाते.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 05/19/2018 - 14:45 नवीन
आजकाल मराठी सेलेब्रिटीज सुद्धा मुलाखत देतांना मधूनच हिंदी शब्द वापरतात.. ' यांच्या कडून मला मागणी आली आणि मी तुरंत उत्तर दिलं ' अशा टाईप ची विचित्र भाषा. काही अभिनेत्री बोलतात मराठी पण अविर्भाव मात्र 'मराठी इज सो डिफिकल्ट नो ?' असा असतो. बरं मग हिंदी तरी चांगलं शुद्ध असतं का? तर नाही तेही नाही. म्हणजे काहीच धड नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/19/2018 - 15:43 नवीन
इतकी वर्षे पौरोहित्याचा व्यवसाय करणारे गीर्वाणवाणी वापरतात. ती मात्रुभाषा नक्कीच नाही. आणि आता इतर लोक त्यांच्या व्यवसायाला इतर भाषा वापरु लागले की म्हणे भाषेची हानी होते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/19/2018 - 18:08 नवीन
मंगूश्रीपंत, संस्कृतमुळे मराठी शुद्ध राहते हे तुम्हांस ठाऊक नाही काय? इतके अज्ञान बरे नव्हे. आमच्या माहितीतले एक मराठी हौशी नट संवाद खणखणीतपणे म्हणता यावेत म्हणून अथर्वशीर्ष दररोज म्हणतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/19/2018 - 19:00 नवीन
म्हणजे पुरोहिताने नटाने त्यांच्या व्यवसायासाठी पूरक म्हणून संस्कृत वापरली तर चालते, इतरांनी त्यांच्या व्यवसायास इतर भाषा वापरल्या तर तोबा तोबा !
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 05/19/2018 - 19:01 नवीन
म्हणजे पुरोहिताने नटाने त्यांच्या व्यवसायासाठी पूरक म्हणून संस्कृत वापरली तर चालते, इतरांनी त्यांच्या व्यवसायास इतर भाषा वापरल्या तर तोबा तोबा !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/19/2018 - 22:25 नवीन
संस्कृत कोणीही वापरलेली चालते -गा.पै.
  • Log in or register to post comments
ए
एमेण्टल Wed, 05/30/2018 - 06:14 नवीन
कितीही डोक्यावर घेतली तरी संस्कृत ही बोली भाषा बनू शकत नाही. ती एक धार्मिक वा साहित्यिक भाषा आहे. ती समृद्ध आहे, तिचे व्याकरण प्रगत आहे. पण ती मराठीला पूरक आहे. मारक होऊ शकत नाही. मराठी लोक संस्कृत कशासाठी वापरतात? धार्मिक विधी, मंत्र, मेघदूत, रघुवंश सारखे साहित्य, सुभाषिते. फार तर एखादा उत्साही कधी तरी मंत्रीपदाची वा तत्सम शपथ घ्यायला संस्कृत वापरेल. पण अशा प्रकारे वापरल्या गेलेल्या भाषेची मराठीसारख्या बोलीभाषेबरोबर कुठलीही स्पर्धा असू शकत नाही. उलट संस्कृतातले काही मातब्बर शब्द मराठीत वापरले तर लोकांवर त्याचा चांगला प्रभाव पडतो. संस्कृत ही मराठी भाषेची वरिष्ठ भाषा आहे. अगदी आई नसली तरी मोठी बहिण म्हणता येईल. याउलट हिंदी, गुजराथी, तमिळ वगैरे भाषा अनेकदा मराठीवर आक्रमण करताना दिसतात. मराठी येत नाही, हिंदी वा अन्य भाषा बोला असे मुंबईत कितीतरी वेळा ऐकू येते. संस्कृत बोला असे चुकूनही ऐकू येत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/31/2018 - 08:52 नवीन
मिपावरच मुद्दाम मोडतोड आणि हेतुपुरस्सर अशुद्ध मराठी लिखाणाचा पुढाकार व प्रोत्साहन पाहिले असल्याने मराठी वाचवायची टिकवण्यासाठी जबाबदार नक्की कोण याचा अजूनही शोध चालूच आहे अखिल मिपा "खिजगणतीतही नसलेला वाचक ,संवादक मिपाकर संघाचा किरकोळ सदस्य"
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/31/2018 - 15:47 नवीन
आम्हाला अपेक्षीत दर्जाचीच मराठी लिहा बोला, तरच मराठी भाषेचा आग्रह धरा अन्यथा नाही !
बाकी भारतात आणि उर्वरीत जगात भाषेचा आग्रह धरले जाताना , त्यांचे सर्व भाषक त्यांच्या त्यांच्या प्रमाण बोली आणि प्रमाण लेखन पद्धती प्रत्येक जण १०० % अमलात आणल्यावरच इतरांशी भाषिक आग्रह धरतात असे काही आहे का ? समांतर तुलना करायची तर, समाजसुधारणा झाल्या शिवाय ब्रिटीशांपासून राजकीय स्वातंत्र्य नको म्हणण्यासारखे आहे. कितपत लक्षात येते आणि अशी चुकीची तर्कहीन गल्लत किती करायची ज्याचे त्याने ठरवावे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा