सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.
एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?
प्रसंग दुसरा.
एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला. तिचे अंग काळ्या दगडाने घासा...आईच्या नावाला कलंक लावणारी बाई हे करून बघते ...त्या पोरीचे सगळे अंग सोलवटून निघते . वेदनेने तो ओरडू लागते ..
कोणीतरी शहाणी शेजारीण पोलिसांना बोलावते आणि या मुलीची सुटका होते.
प्रसंग तिसरा.
एक तरूण आपल्या आईला आणि सक्ख्या भावाला भोसकून मारून टाकतो . जवळजवळ ५० वेळा हा आपल्या आईला भोसकतो. त्याच्या मनाप्रमाणे त्याला मालमत्ता मिळाली नाही म्हणून.
प्रसंग चौथा.
एका आजारी आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या वयस्कर नाट्य दिग्दर्शिकाला देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेला तरूण. या आजारी माणसाच्या वृद्ध पत्नीला डोक्यात एक जड वस्तू घालून मारून टाकतो .त्या या तरुणाला सारखे खायला देत नाहीत म्हणून …
फक्त उदाहरण म्हणून ह्या नुकत्याच घडलेल्या घटना ….
अजून अश्या किती असतील कुणास ठाऊक ?
अश्या कितीतरी घटना तुम्ही वाचल्या असतील. माझ्या मनात जे विचार आले तेच तुमच्या मनात आले असतील.
कोठून येतो हा इतका अमानुषपणा ? या आणि अश्या किती तरी बातम्या.सर्व समाजामध्ये हा क्रूरपणा वाढतो आहे का काही अपवादात्मक लोकांमध्ये हा अवगुण दिसू लागला आहे ?. मनुष्याचे जीवन इतके स्वस्त झाले आहे का ?
मी काही मानसशास्त्रज्ञ नाही किवा समाजशास्त्रीय विद्वान नाही पण या दोन्ही विषयांचा विद्यार्थी म्हणून मला जे जाणवले ते आपल्या समोर मांडतो आहे.
१.० या किंवा अश्या गुन्ह्यामागे मूळ कारण काय असावे ?
प्रत्येक गुन्ह्यामागे महत्वाच्या तीन कारणांपैकी एक असते असे म्हणतात . दारू,पैसा आणि स्त्री . वर दिलेल्या उदाहरणात सुद्धा यातीलच एक कारण सहज दिसून येते. पण एक दोन उदाहरणे सोडता हे सर्व गुन्हे पूर्व नियोजित पद्धतीने केलेले नसून ,तिथल्या तिथे क्षणिक रागाच्या भरात झालेले दिसतात. किवा या गुन्ह्यामुळे आपल्याला काय शिक्षा होईल आणि त्यातून कसे सुटू याचा सखोल विचार झालेला दिसत नाही . मला हे हवे आहे ..मग कोणत्याही मार्गाने ते मला मिळाले पहिजे ….. इतकाच विचार झालेला दिसतो ...किवा काय व्हायचे ते होऊ दे अशी बेफिकीर वृत्ती सुद्धा काही ठिकाणी दिसून येते.
ही तीन कारणे वर वर दिसत असली तरी या मागची मूळ कारणे(Root Causes) काय असावीत ?
ही मूळ कारणे शोधताना या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उपस्थित करायला हवा .
माणूस पहिल्यापासून असा क्रूर होता का आत्ताच तो असा झाला आहे ?
पूर्वी सुद्धा अश्या घटना अश्याच घडत होत्या पण त्या आपल्यापर्यंत येत नव्हत्या इतकेच. आज मात्र आजकालच्या दूरदर्शन, भ्रमण ध्वनी ,आंतरजाल,वर्तमानपत्रे आणि इतर साधना मुळे अश्या घटना आपल्याला ताबडतोब समजत आहेत इतकाच फक्त फरक आहे.+१ आणि त्याच सहज उपलब्ध असलेल्या माध्यमांमुळे गुन्हे सहजी बाहेर येऊ शकतात त्याच सहज उपलब्ध असलेल्या माध्यमांचा गुन्ह्यांविरुद्ध शिक्षण व गुन्हेप्रतिबंधक दबाव आणण्यासाठी सकारात्मक उपयोग होऊ शकतो.