उन्माद
- डॉ. सुधीर रा. देवरे
देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!
जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्घोाषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?
राजकारणातून नक्की कोणतं समाजकारण केलं जातं? राजकारण हे सामाजिक कामाचं व्रत आहे का? राजकारणाचा समाजकारणाशी संबंध तरी उरला काय? राजकारणाला प्रचंड व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी? जात- धर्म धोक्यात आल्याच्या घोषणा देणारे लोक आपलं माणूसपण कुठं गहाण ठेवतात! मानव असण्यापेक्षा विशिष्ट जाती-धर्माचं असणं अस्मितादर्शक ठरू शकतं का?
घरांपासून चालत्या वाहनांपर्यंत दिसणार्याव रंगीबेरंगी झेंड्यांत अशोकचक्राचा तिरंगी कुठं आहे? (वर्षांतून दोन वेळा सरकारी कार्यालयांवर वाजत गाजत फडकवण्यासाठी राखीव ठेवण्यात आला का?) व्होटबँक वाढते म्हणून दिवसाढवळ्या भर रस्त्यांवर निर्लज्जपणे माणूस मारण्याचे थेट प्रयोग सुरू आहेत!
देशातला मतदार म्हणून नव्हे, देशाचे नागरिक म्हणून... लोकहो जागे व्हाल? लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! आपल्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!बलात्कार, भ्रष्टाचार इ. गुन्हे अत्यंत घृणास्पद आहेत व या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. परंतु हे प्रकार फक्त आताच घडत आहेत का? "देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला?" हे प्रश्न जितके सध्याच्या काळासाठी समर्पक आहेत तितकेच ते भूतकाळासाठीही समर्पक आहेत. भूतकाळातही हे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत होते . आताही होत आहेत. एक अपवाद आहे तो म्हणजे उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार. तो मात्र मागील ३-४ वर्षात काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे. मग आताच हा प्रश्न का पडावा? या गुन्ह्यांचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. परंतु देश रसातळाला गेला आहे असे म्हणणे म्हणजे एकदम टोकाची भूमिका वाटते कारण भूतकाळातही हे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतच होते व तरीसुद्धा अजूनपर्यंत देश रसातळाला गेलेला नाही. गुन्हेगारांच्या समर्थनासाठी रस्त्यावर झुंडी उतरणे हे सुद्धा आज नव्याने होत आहे असे नाही. हे प्रकार पूर्वीही होत होते, आताही होत आहेत आणि भविष्यातही होत राहतील. ज्याप्रमाणे देशात सर्वत्र आलबेल होते व २०१४ पासून देश असहिष्णु झाला हा जावईशोध काही जणांना अचानक २-३ वर्षांपूर्वी लागला, तसेच देशात काहीतरी कधीही न घडलेले भयंकर असे काहीतरी होत आहे हा शोधही लागला आहे.जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्घोाषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?ही गुन्हेगारी कृत्ये पूर्वीही होत होती आणि आताही होत आहेत. पूर्वीच्या तुलनेत त्यात काही खास वाढ/घट झाली आहे असे दिसत नाही. बाकी धार्मिक चिन्हे अंगावर मिरविणे याविषयी बोलायचे तर जवळपास सर्वधर्मीय अशी चिन्हे मिरवित असतात. हिंदू तिलक वगैरे लावतात, मुस्लिम स्त्रिया बुरख्यात असतात तर पुरूष दाढी व आखूड पायजम्यात असतात, ख्रिश्चन क्रॉस असलेली चेन वापरतात, सर्व शीख पुरूष पगडी घालतात. त्यामुळे एखादा विशिष्ट धर्मच असे करतो असे नाही. मुळात जात-धर्म टिकल्याने देशाची लोकशाही कशी धोक्यात येईल?लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! आपल्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!ही वाक्ये वाचून हसू आले. ज्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सुरू आहेत व ज्यामुळे आजतगायत लोकशाही धोक्यात आलेली नाही, ती लोकशाही अचानक कशी धोक्यात आली आहे? लोकशाही धोक्यात एकदाच आली होती व तो काळ होता १९७५-१९७७. या कालखंडात आणीबाणी लादून लोकशाहीला तुरूंगात बंदिस्त केले होते. यामागे कोणत्याही धार्मिक टोळ्या, उन्मादी, बलात्कारी इ. नसून तत्कालीन राजवट होती. या कालखंडाव्यतिरिक्त इतर काळात लोकशाही धोक्यात आल्याचे दिसत नाही. म्हणजे लोकशाही धोक्यात आली होती किंवा भविष्यात येऊ शकेल ती राजवटीमुळे, धार्मिक समूहांमुळे नाही. २०१५ मध्ये तथाकथित विचारवंतांनी असहिष्णुतेचा जसा कांगावा केला होता तसाच हा लेख आहे. अर्थात असा कांगावा करण्यामागे सहिष्णुतेविषयी काळजी, लोकशाहीविषयी कळकळ, गुन्हेगारांविषयी चीड इ. कारणे नसून खरे कारण पूर्ण वेगळे आहे आणि म्हणूनच उच्चरवात कांगावा सुरू आहे.