नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ
नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ
सुमारे ३० वर्षे आधी नाशिक (गांधीनगर) येथून विमानांचे घरगुती (डोमेस्टीक) उड्डाणे होत होती. मी लहान असतांना एनडीसीसी बँकेच्या जुन्या इमारतीत (सीबीएस जवळील) इंडीअन एअरलाईन्स चे बुकींग काउंटर बघीतले होते. गांधीनगर धावपट्टी ही इंडीयन आर्मीच्या ताब्यात होती आणि अजूनही (२०१८) वापरात आहे. मी स्वतः कंपनीच्या कामानिमीत्त तेथे भेटी दिलेल्या आहेत. ही धावपट्टी कमी आसनी विमान उतरण्यायोग्य आहे. गांधीनगर विमानतळ हा नाशिक शहरातच आहे. त्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी शेअर रिक्षानेदेखील जाता येथे. गांधीनगर हे नाशिक पुणे रस्त्यालगतच आहे.
जुन्या काळी - जेआरडीच्यां काळात - किंवा जेआरडींंनी त्यांनी उडवलेली विमाने कोणतीही धावपट्टी नसतांना त्यांनी लहान विमाने एखाद्या मोकळ्या शेतात तसेच समुद्र किनार्यावर विनासायास आणि नेहमी उतरवलेली आहे किंवा उडवलेली आहेत. (त्यांच्यावरील पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख आहे.)
ओझर - नाशिक विमानतळाची हवाईपट्टी देखील सैन्याच्याच (किंवा एच ए एल कंपनी - तपशील तपासावा लागेल -) जागेवर आणि ताब्यात आहे. ओझर विमानतळ नाशिकपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे थेट जाण्यासाठी नाशिकमधून स्वतंत्र वाहनाची सोय करावी लागते.
काही कारणामुळे गांधीनगर येथील विमानउड्डाणे बंद झाली. बहूदा कमी प्रवासी किंवा एअर इंडीयाने बंद केल्यामुळे बंद झाली असावी. पण तो काळ तीस वर्षांपुर्वीचा होता. सामान्य माणसाला विमानप्रवास हा मौजेखातर केला गेलेला प्रवास वाटायचा. आता ३० वर्षांनंतर हवाई वाहतूकीत अमुलाग्र बदल झालेत. सामान्यांना विमानप्रवास गरजेचा वाटू लागला आणि तो त्यांच्या आवाक्यातही आला.
वरील पार्श्वभुमी लक्षात घेता कुणीही सामान्य माणूस विचार करेल की असे असतांना विमानसेवेसाठी नाशिकहून ओझर विमानतळावर का जावे?
भारतीय सैन्य, एच ए एल कंपनी, एअरपोर्ट अॅथोरटी ऑफ इंडीया आणि सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांमध्ये हवाई धावपट्टीबाबत कोणताही समन्वय करार नसतांना सन २०१२ च्या दरम्यान ओझर येथे विमानतळाची इमारत बांधायला घेतली. नाशकातील एक मोठे मंत्री आणि सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे ही विमानतळाची इमारत बांधायला सुरूवात झाली. मोठा विचित्र प्रसंग आहे पहा. म्हणजे तुमच्या घराजवळ येण्यासाठी कोणतीही सुविधा नाही - रस्तादेखील नाही आणि लांबच्या रस्त्यावर देखील येण्याजाण्याची परवानगी नाही अन तुम्ही घर बांधतात असा प्रकार झाला हा. त्यात सार्वजनीक बांधकाम खाते अन मोठे मंत्री. मोठा योग होता. कसेही करून हवाई वाहतूक नाशिकसाठी चालू करायचीच हा अट्टहास चांगलाच होता. अरे पण मग गांधीनगर हवाई धावपट्टी उपलब्ध होतीच की! आणि तसेही ओझर येथून विमानउड्डांनासाठी हवाई धावपट्टी भारतीय सैन्याने लगेच उपलब्ध करून दिली असे नाही. त्यासाठी मोठ्या मिनतवार्या कराव्या लागल्या. मग त्याच मिनतवार्या गांधीनगर धावपट्टीसाठी का नाही केल्या गेल्या? दोन्ही धावपट्या तर सैन्याच्याच ताब्यात आहेत ना? आणि जी काही विमाने उडवायची होती ती कमी आसनीच होती. अगदी जंबो विमानांची गरज नव्हती. तेवढे प्रवासी देखील उपलब्ध नव्हते.
दोन एक वर्षात विमानतळाची इमारत उभी राहीली. तिचा वापर सुरू झाला नव्हता. कारण धावपट्टी सैन्य वापरू देत नव्हते. देखणी इमारत धुळ खात राहीली. HAL ही इमारत ताब्यात घेत नव्हते. का घ्यावी? त्या इमारतीपासून काही उत्पन्न नसेल तर कुणी ताब्यात का घ्यावी? सर्वसामान्य माणूस इतका विचार करू शकतो तर ज्यांनी विमानतळाची इमारत बांधली ते असा विचार का करू शकले नाही? तुम्ही जर इंटरनेटवर "खराब विमानतळे worst airport terminal" असे शोधल्यास अनेक विमानतळे अशी सापडतील की तेथे इमारत नाही किंवा आहे ती इमारत बस स्थानकापेक्षा जास्त चांगली नाही. म्हणजेच सार्वजनीक बांधकाम खात्याला आणि शासनाला विमानतळ म्हणजेच विमानसेवा असे वाटू लागले होते. प्रवासी विमानसेवेचा लाभ घेतो. ते त्याला महत्वाचे असते. इमारतीत तो काही मुक्कामाला थांबलेला नसतो. म्हणजेच विमानसेवा महत्वाची विमानतळाची इमारत नव्हे.
याच दरम्यान सार्वजनीक बांधकाम खात्याचा मोठा इंजिनिअर हुद्याचा अधिकारी निवृत्त झाला. अन त्याच्या निरोपसमारंभाची पार्टी या इमारतीत झाली. मोठे डीजे वैगेरे लावले गेले. शेजारच्या गावातल्या लोकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. अजूनही धावपट्टी उपलब्ध झाली नव्हती. मग HAL ने ही इमारत वार्षीक रू. १/- भाड्याने त्याब्यात घेण्याचा सोपस्कार पार पडला. धावपट्टी उपलब्ध झाली. पण विमानांचे काय? कारण कोणतीही विमाने उड्डाण कंपनी ओझरला विमानसेवा द्यायला उत्सूक नव्हती. पुरेशी प्रवासी उपलब्ध नव्हते. ओझर विमानतळ अडचणीचे होते. तेथे जाण्यासाठी नाशिकहून अर्धा ते पाऊण तास लागतो. कारण हायवेपासून आत आहे. तेथे जाण्यासाठी सार्वजनीक प्रवास सेवा उपलब्ध नाही. त्यानंतर मग मुंबई पुणे येथे उड्डान. मुंबईला गेल्यास डोमेस्टीक एअरपोर्ट मुख्य कामाच्या ठिकाणापासून दुर आहे. सामान्यतः मुंबईला काम हे सचिवालय, फोर्ट चर्चगेट, विधानभवन आदी ठिकाणी असते. म्हणजे मुंबईला पोहोचल्यावरही पुन्हा खाजगी प्रवास आहेच. मग नाशिकहून मुंबईचा विमानप्रवास हा अडचणीचा ठरू लागला. रस्तेवाहतूकीने उलट लवकर पोहोचू अशी परिस्थिती आहे.
त्यात परत शासनाचा उडान योजनेने ओझर विमानतळ जोडले गेले. पण उड्डाणे काही निट सुरू झाली नाही. ओझरहून मुंबई, पुणे उड्डाणे झाली पण ती काही टिकली नाही. सातत्य राहीले नाही. ओझरहून पुणे, मुंबई सोडले तर इतर ठिकाणी जास्त प्रवासी उपलब्ध होणार नाही. आणि ओझर विमानतळावर जाणे अडचणीचे आहे.
विमानप्रवास आता चैनीची बाब न राहता गरज बनली आहे. एखाद्या राजधानी रेल्वेच्या भाड्यापेक्षा कमी भाड्यात विमानप्रवास होवू शकतो. नाशिक- मुंबई, पुणे, शिर्डी, सुरत, इंदूर या कमी अंतर विमानसेवेच्या दरम्यान खाणे पिणे शक्य नाही - गरजही नाही. विमानाला लागणारे इंधन हे रॉकेलच्या दरात भेटते. छोटी विमाने, आवश्यक सेवा असणारी विमानतळे भले मग ती ए.सी. नसेना का किंवा एखाद्या बस स्थानकासारखी दिसली तरी चालतील. दक्षिण आफ्रिकेतील अनेक अविकसीत देशांत विमानसेवा चांगली आहे. लोकं अगदी लुंग्या घालून प्रवास करतात, बाजारहाटातल्या पिशव्या घेवून डोमेस्टीक विमानात प्रवास करतात. थोडक्यात आपल्याकडे प्रवाशांना कमी पैशात विमानसेवा देवून विमानसेवेची सवय लावायला हवी. वरील ओव्हरहेड टाळता येवून कमी पैशात विमानप्रवास शक्य आहे.
प्रवाश्यांना प्रवास महत्वाचा असतो. इमारती, सेवा, सुविधा त्यांचा दर्जा ही बाब दुय्यम आहे हे सत्य आहे. प्रवासी सेवेबाबत एकदा तक्रार करतील अन उडून निघून जातील. पण विमान उड्डाणे महत्वाची आहेत. शेवटच्या परिच्छेदातील मागण्या आणि पुन्हा गांधीनगर - नाशिक येथील धावपट्टी वापरात आणणे जोपर्यंत पुर्ण होत नाही तो पर्यंत नाशिकहून विमानउड्डाणे शक्य नाही असे माझे ठाम मत आहे. शासकीय व्यक्ती, पुढारी यांनी प्रत्येक कामात - केवळ विमानतळ-विमानसेवा नव्हे - थोडी कल्पकता, सामान्यांचा विचार आदी गोष्टी केल्यास कोणतेही काम कठीण नाही.
- पाषाणभेद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing