फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टळावे हि नम्र विनंती . .
* ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात दिला आहेच .
दोन एक वर्षांपूर्वी महाभारतातील प्रक्षिप्त भाग या विषयावर चर्चा केली पण रामायणावर तशी चर्चा धागा काढण्याची इच्छा असूनही मुहूर्त लागला नव्हता . आणि आत्ताही मिपा ब्रेकच्या आधी बरेच चर्वीत चर्वण झालेले असताना पुन्हा तोच विषय घ्यावा का या बद्दल संभ्रमात होतो पण , अधिजनुक शास्त्र आणि रामायण विषयक धाग्यावर काही प्रतिसाद दिसले आणि इचछा असो अथवा नसो येते वर्ष रामायण चर्चेत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे काही वेगळ्या मुद्यांच्या अंगाने सुरवात करावी असा मानस आहे.
वाल्मिकी रामायणावर तसे एक श्लोकी रामायण हि रचले गेले आहे पण त्यातही किमान स्वरूपाच्या कथानकापेक्षा अधिक मजकूर येतोच. एक व्यक्ती (राम ) त्याच्या पत्नी सोबत अरण्यात गेला असताना त्याच्या पत्नीस कुणा दुष्टाने जबरदस्ती पळवून नेले. त्या व्यक्तीने त्या दुष्टयाचा माग काढला आणि त्या दुष्टयाच्या तावडीतून धैर्य, शौर्य , युक्ती आणि संघटन कौशल्य दाखवून सोडवून आणले. इथे, पळवल्या गेलेल्या व्यक्तीचे नाते पत्नीचे आहे पण नवरा संकटात असेल मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणणार्या सावित्रीची कहाणी असतेच किंवा इतर नात्यांच्या संरक्षणासाठी असीम शौर्य दाखवलेली अनेक उदाहरणे असू शकतील.
‘संकटातील प्रियजनांचे संरक्षण आणि त्यांना सोडवून आणणे ‘ या बेसिक उद्दिष्टात काय चुकीचे आहे ? मग या विषयावरील एखादी कहाणी प्रत्यक्षात घडलेली असो अथवा नसो त्याने फारसा फरक पडू नये. आई, वडील, मोठा भाऊ यांच्या बद्दल आदर आणि त्यांच्यासाठी त्याग करण्याची तयारी यातही वावगे काही नसावे किंबहुना हे रामायण कथेची समृद्धी अथवा महत्वाचे आकर्षण असावे.
यात जोडीला , जोडीदार निष्ठा हि समाजाच्या मोठ्या कदाचित बहुसंख्य घटकांना भावत असावी, या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंगाने दृष्टिकोणांची समृद्धता वाढवण्यास थोडा फार वाव असू शकतो का हा विविध बारकाव्यांच्या चर्चेचा प्रश्न असावा .
अर्थात जोडीदार निष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कितपत आड यावी या बद्दल आग्रही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मतवाद्यांची मतांतरे असू शकतात पण ह्या मंडळीनी सहसा जोडीदार निष्ठेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि मान्य करण्यास हरकत नसावी .
तर एकूण या रामायण कथेच्या बाबतीत जवळपास अर्धा डझन प्रकारचे आक्षेप असावेत पण बहुतेक सर्व आक्षेप उपरोक्त नमूद कथेच्या समृद्ध बाजूवर कितपत लागू पडतील -आणि ते कथेतील फापटपसाऱ्या बाबत किती - या बद्दल वाटणार्या साशंकतांचा एक एक करून उहापोह करणे या लेखमालेचा उद्देश आहे.
एक आक्षेप असा येऊ शकतो कि हि उपरोक्त मूल्य विषयक समृद्धता इतर मार्गाने अथवा इतर कथानकाने साध्य करता येऊ शकणार नाही का ? त्यासाठी रामायणच का हवे . माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून मूल्यांचे सामाजिक अभिसरण हि एखाद्या उद्यानासाठी लागणाऱ्या वनस्पती बिया पेरून लागवड करण्या पासून मग उद्यान उभारावे तशी अत्यंत दूरगामी प्रक्रिया आहे . (मूल्यांचे सुयोग्य सामाजिक अभिसरण झाले तर दारा शिकोह आणि शहाजहान वर जी वेळा आली ती येणे टळण्यात मदत होते का ) .
तुमच्या परिसरातील वृक्षांच्या केवळ नकोशा फांद्या कापण्या ऐवजी संबंध वृक्ष कापण्या सारखे आहे किंवा बाळाच्या न्हाऊ घातलेल्या पाण्या सोबत बाळ टाकून देण्याचा विचार कारण्या सारखे आहे . नवे कथानक उभारून त्याआधारे सामाजिक अभिसरण करण्यापेक्षा आहे ते कथानक सुधारणा करून सादर करणे अधिक तर्कसुसंगत होणार नाही का ? जंगल उद्यानांसारखे दिसत नाही म्हणून त्याची साफ सफाई करणार कि संबंध जंगल नेस्तनाबूत करण्याचा विचार करणार ?
तुम्हाला माझा वरचा मुद्दा पटला असेल तर पुढील आक्षेपांकडे जाऊ अर्धा डझन आक्षेपा पैकी तीन आक्षेप मागच्या शतकातील भारतातील तीन वेगवेगळ्या व्यक्ती कडून येतात. त्यांच्या आक्षेपांची चिकित्सा त्यांना आधी टोपण नावे देऊन करू आणि खरी नावे नंतर पाहू. यात पहिले भारताच्य ; ‘त ; प्रदेशातले ‘प’ नावाचे टीकाकार, ‘म’ प्रदेशातले ‘आ’ नावाचे टीकाकार आणि ‘ उ ‘ प्रदेशातले ‘ सा ‘ नावाचे टीकाकार . या पहिल्या लेख विभागात पहिल्या दोघांच्या मोजक्या आक्षेपांची चर्चा आहे, तिसर्या महोदयांच्या आक्षेपासाठी वेगळा लेख पुढच्या भागात असेल आणि उर्वरीत आक्षेपांबद्दल चर्चा त्या पुढील भागातून करण्याचा मानस आहे.
या तिघांपैकी ‘त ; प्रदेशातले ‘प’ नावाचे टीकाकार, ‘म’ प्रदेशातले ‘आ’ नावाचे टीकाकार व्यक्तिगत जीवनात ‘ क्ष ‘ या कारणाने दुखावले आहेत. आणि ‘क्ष ‘ या कारणासाठी त्यांना रामायणाच्या फापटपसाऱ्यातील काही भाग वेगवेगळ्या कारणांनी अंशतः: जबाबदार वाटतो. पण समस्या अशी आहे कि त्यांची टीका संबंधित टाकाऊ फापटपसाऱ्या पर्यंत मर्यादित आहे कि संबंध उद्यानच मोडीत काढण्यापर्यंत पुढे जाते आहे हे अभ्यासणे सयुक्तिक असू शकते का ?
‘त ; प्रदेशातले ‘प’ नावाचे टीकाकार, यांची आक्षेपांची यादी तशी मोठी आहे पण मुख्य आक्षेप दोन आहेत . पहिला, ‘अपहरण झालेल्या ,संकटातील प्रियजनांचे सोडवून आणणारा तुमचा जो कथा नायक (राम ) आहे ते त्याने एकट्याने नव्हे तर ‘उ’ प्रादेशियानि ‘त’ प्रदेशियावर केलेले अन्याय्य आक्रमण आहे. (याला ‘आ’ वंशीयांनी ‘द्र ‘ वंशीयांवर केलेला अन्याय असाही रंग देण्याचा या आक्षेपात प्रयत्न आहे) .
आता पहा ‘ र ‘ नावाचा कथा नायक बर्यापैकी एकटा (म्हणायला त्याच्य सोबत त्याचा भाऊ आहे आणि आपण अगदीच दोघे मिळून हे काम तडीस नेऊ शकता नाही म्हणून ‘द्र ‘ प्रदेशातील स्थानिकांसोबत साटंलोटं करून उभी केलेली फुटकळ सेना आहे . आणि त्याने ‘त’ प्रदेशावर आक्रमण केलेच नाही ते त्याने त्यापलीकडे असलेल्या ‘ल ‘ प्रदेशात आक्रमण केले. तेही स्वतः:चे प्रियजन सोडवून घेण्याच्य मर्यादित उद्देशाने. पण आता ‘त ‘ प्रदेशातील ‘प’ रावांना ते आपल्याच प्रदेशावर इतिहासात झालेले मोठे आक्रमण वाटते. खरेतर एका माणूस आला तुमचा प्रदेश ओलांडून पलीकडच्य प्रदेशात अडकून पडलेली त्याची बायको सोडवून घेऊन गेला . या पलीकडे जाऊन या ‘ र ‘ नावाच्या कथा नायकाने आपले प्रियजनांस सोडवण्याचे साठी फारतर त्याच्या मार्गात आलेल्या दोन राजाना परास्त केले . पण या राजाना परास्त केल्या नंतर त्यांच्याकडून कोणतीही खंडणी इतर लूट असे काहीही केलेले नाही . तिथे आपले अधिकारी नेमलेले नाही ज्या राजाना परास्त केले त्यांच्या भावांच्या हातात सत्ता सुपूर्त केली , एका राजसत्तेकडून अन्याय्य अपहरण झालेली आपली प्रियजन व्यक्ती वापस मिळवली आणि निघून गेला.
कालच मिपावर एका विनोद वाचला , एक विरोधीपक्ष नेता ग्रामीण भागात राजकीय प्रचार करत असतो , त्याच्या प्रचार फेरी दरम्यान लाइटच्या खांबावरची एक लाईटची वायर त्याच्या अंगावर पडते . तो विरोधी पक्ष नेता आडवा पडून ‘सरकारने मुझे इलेक्ट्रिक शॉकसे मार डाला ‘ म्हणून ओरडावयास लागतो . त्याचा कार्यकर्ता त्याच्या नेत्यांच्य कानात हळूच सांगतो , ‘सरजी जादा नौटंकी मत करो, इस देहात मे गये दो दिनसे इलेक्रीक करंट नही है , और आप भी अच्छेसे जिंदा भी हो. ‘
आता आपण ‘त’ राज्यातील ‘प’ टीकाकार महोदय आणि त्यांच्या अनुयायायांकडे कडे वापस येऊ.' त' राज्य म्हणजे तामिळनाडू आणि ‘प’ म्हणजे आदरणीय पेरियार हे आपल्यापैकी बहुतेकांनी आतापर्यंत ओळखलेच असेल. आता आदरणीय पेरियार महोदयांचा एका मुद्दा असा कि सुग्रीव आणि बिभीषणाकडून रामाने फितुरी करवली . वालीवर मागून केलेला वार नैतिक नव्हता. आता मी काय म्हणतो, मग काय रावणाने राम नसताना सीतेला पळवणे हा पाठी मागून केलेला वार नाही का ? रावणाच्या या कृतीचे समर्थन काय तर शूर्पणखेवर झालेला अन्याय. शूर्पणखेवर राम लक्ष्मणाने अन्याय केला असेल तर राम लक्ष्मणाशी आधी त्यांना चुका लक्षात आणून दे, नाही ऐकले तर युद्ध करून त्यांना पकडून घेऊन जाऊन त्यांना जाब विचार, शासन दे . युद्धात त्यांच्याशी जिंकता नाही आले तर एकवेळ मागूच्या दाराने केले केलेले कृत्य समजता येऊ शकते, दुसरे असे कि शूर्पणखेची एक कथा अशी कि तिने सीतेला संपवण्यासाठी सीतेवर हल्ला केलेला असतो आणि तिचा हल्ला परतवताना लक्ष्मणाने तिला केलेले शासन योग्यही असू शकते. पण शेवटी हा शूर्पणखा ते वाली, या मुख्यकथेचा केवळ फापट पसारा आहे. कदाचित प्रक्षिप्त किंवा काल्पनिक पैकी काहीही असू शकेल , किंवा खरेही झाले असेल. पूर्ण एपिसोड मध्ये शूर्पणखेचे थट्टा कुरुपीकरण, वालीचा पाठी मागून केलेला वध, या आदर्श गोष्टी नक्कीच नाहीत. पण या कथेला उत्तरप्रदेशीयांनी तामिळनाडूवर अथवा आर्यानी द्रविडांवर केलेले राजकीय आक्रमण म्हणून रंगवणे तर्कसुसंत असणारे आहे का ? किंवा अतिशयोक्तीपूर्ण नाही किंवा कसे .
समजा राम लंकेत आणि रावण उत्तर प्रदेशात जन्मले असते, तर रामाने सीतेला परत मिळवण्यासाठी रावणावर उत्तर प्रदेशात हि हल्ला केलाच असता. त्याचा उद्देश केवळ सीतेला परत मिळवणे होता त्या कथेत प्रादेशिक अन्याय वाचण्यासारखे, किंवा लिहिले त्या पेक्षा अधिक काही वाचण्यात भूषणावह काय आहे ? या लेखासाठी केलेल्या वाचना दरम्यान, शोधगंगावर तामिळनाडूतील रामायण प्रभावाबद्दल अलीकडील एका प्रबंध वाचनात आला. त्याने तामिळनाडूतील संगम साहित्यात रामायण कथेतील उल्लेखाचे दाखले आणि तामिळनाडूतील अगदी पहिल्या दुसर्या शतकापासूनची रामायण लोकप्रियता दाखवून दिली आहे आणि तामिळनाडूतील लोकप्रियतेची अंधश्रद्धा म्हणून का होईना लोकप्रियतेची स्वतः पेरीयारही नोंद घेताना दिसतात. एकवेळ महाभारतातल्या अश्वमेधा दरम्यान बिभीषणाकडून खंडणी घेऊन जाणार्या पांडव बंधू सहदेवा बद्दल तक्रार नोंदवली तर अंशतः: आणि अंशतः:च समजता येते, अंशतः:च एवढ्यासाठी कि तामिळ राज्यकर्तेही इतिहासात जगाच्य इतर भागात राज्य विस्तार करून आलेच आहेत. तुमचा राज्य विस्तार योग्य आणि पांडवांचा किंवा रामाचा ना केलेला राज्य विस्तार वाईट असे काही नसावे. आर्य स्थानिक असोत वा बाहेरचे ५ हजार वर्षांच्या सहवासात दोन देऊन दोन घेऊन (मग राजकीय असो अथवा सांस्कृतिक) केव्हाचेच झाले असणार आहेत. त्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातले अयोग्यास अयोग्य म्हणण्यास मुळीच हरकत नाही, हरकत आहे ती न्हाऊच्या पाण्यासोबत बाळालाही ढकलण्याच्या तात्विकते बद्दल . वाजवी विरोधाला आक्षेप नाही, आक्षेप आहे तो त्यातील अवाजवी अंशाला .
पेरियारांचा दुसरा आक्षेप आमची तामिळनाडूची भोळीभाबडी अंधश्रद्धा जनता तिच्यावर रामायणाच्या माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण झाले आहे. इथे आक्षेप , शूर्पणखा राम लक्ष्मणाकडे काम मोहित होऊन मोकळेपणाने जाते; आमची रामायण पूर्व तामिळ संस्कृती (स्त्री) अशी मोकळी होती तिच्यावर रामायणोत्तर संस्कृतीतील शुचिता लादून सांस्कृतिक आक्रमण झाले आहे. आता एका उदाहरणावरून सरसकट निष्कर्ष काढणारी बरीच मंडळी असतात. सर्वच रामायण कथा आणि उपकथांबद्दल रामायण खरेच झाले का , झाले असेल तरी वाल्मिकींपर्यंत ते नेमकेपणाने पोहोचले का त्यांनी नेमके पणाने पोहोचवले का आणि इतरांनी आणलेल्या प्रक्षिप्तताच्या शक्यता आहेतच . किंवा रामायणात कथेत असे झालेही असू शकते. पण मुख्य म्हणजे हि कथा तुमच्या प्रदेशातील तुमच्या भाषेचयाही अनेक पिढयांनी बहुतांश प्रमाणात स्वीकारताना हे सर्व लॉजिक त्यांच्याही डोक्यात आले असेलच ना ? पण स्त्री - आणि पुरुष जगाच्या कुठल्याही पाठीवरील असोत , अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादींची कितीही इचछा असली तरीही ‘जोडीदार निष्ठेस ‘ बहुतांश जनतेने बहुतांश काळ अधिक महत्व दिले असावे. आजही अमेरिकेत अध्यक्ष ट्रंपाने विवाह झालेल्या मॉडेलशी एका निष्ठ राहावे म्हणून स्वतः:ला आवडूनही दुसरी मॉडेल ट्रम्पपासून दूर जाण्याचा विचार करते . कंगना राणावत विवाहित पुरुषांच्या मागे लागलीच कशी असा आक्षेप घेणाऱ्या स्त्रियांची बहुसंख्या असते , किंवा इथे मिपावर सुद्धा एखाद्या धाग्यात बहुतांश सदस्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी तडजोड करूनही ‘जोडीदार निष्ठा पाळावी ‘ या मताचे दिसतात ते केवळ रामायणाच्या प्रभावाने नव्हे तर जोडीदार निष्ठेच्या तत्वांच्याही काही सकारात्मक बाजू असतात म्हणून . बाकीच्या जगभर रामायणाचा प्रभाव नसला तरी कमी अधिक प्रमाणात जोडीदार निष्टेची अपेक्षा करणार्यांचे प्राबल्य राहिले आहे, या साठी केवळ रामायणाला जबाबदार धरता येते असे नसावे . पण मिथक नॅरेटिव्हजने सामाजिक विचारांच्या दिशा बदलू शकतात हे हि अंशतः: मान्य करावे लागते . त्यासाठी रामायण कथा अनेक लेखकांनी अनेक वेळा बदलली तशी नवी सकारात्मक मूल्ये जोडून आजून एखादे लेखन करण्यात वावगे नसावे. पेरियारांचा समकालीन दुसरा एखादा तामिळी लेखक सीतेला त्याच्या नाटकातून चंचल स्वभावाची दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा तो प्रयत्न सीतेचा उपहास न करता आपल्या कथानकातून रंगवलेल्या चांचलतेचा आदर करता असेल तर तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यातावादी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहातो आणि मग शूर्पणखेच्या चंचलतेचा उपहास राम लक्ष्मणाने का केला असा प्रश्न विचारता येतो . पण राम लक्ष्मणाने उपहास केला म्हणून आम्ही सीतेचा चरित्र चंचल रंगवून उपहास करतो हे एका चुकीने दुसरी चुक क्षम्य होते म्हणण्यासारखे आहे. - इथे आक्षेप आहे तो त्यांच्या लेखन स्वातंत्र्यावर नाही, आक्षेप आहे तो , अप्रत्यक्षपणे दुसर्या स्त्रीची हेटाळणी उपहास करण्याची स्वतः: तली पुरुषी हौस, दुसर्या एखाद्या लेखकाने भागवली म्हणून मीही भागवतो या वृत्तीला. आणि अशा समकालीनांच्या द्वेषमूलक लेखनाचे अविचारीपणे द्वेषमूलक समर्थन केल्या गेलेल्या तथाकथित पुरोगामी वृत्तीला; आणि बारकावे नीट पणे ना हाताळता, चुकार फसव्या पुरोगाम्यांची बाजू आंधळे पणे उचलू धरू इचछीत 'तथाकथित' स्त्रीवाद्यांना.
जन्माधारित आणि लिंगाधारित सामाजिक विषमता आणि वर्चस्ववाद निषेधार्हच होते त्या गोष्टीचा आपल्या संस्कृतीत शिरलेल्या अशा चुकीच्या अडगळीला दूर करण्याचे प्रयत्न वाजवी आणि समर्थनीय असतात त्यांचे कौतुकच आहे. पण आपल्या टीकेस अवाजवीपणा जोडणे हे दुसर्याने चुक केली म्हणून, मी हि चुका करतो म्हणण्यासारखे म्हणून टीकेस पात्र व्हावयास हवे किंवा कसे .
पेरियार आणि त्यांच्या अनुयायांची भूमिका या दोन आक्षेपापाशी ना थांबता हिंदी भाषेस अवाजवी विरोधापर्यंत पोहोचताना दिसते. पंजाबी लोकांनी हिंदी अथवा उर्दूचे भाषिक म्हणवून स्वतः:ची नैसर्गिक भाषेपासून स्वतः:स दूर ठेवणे जसे चुकीचे आहे तसेच दुसऱ्या बाजूस उत्तर भारताचा ऐतिहासिक बागुलबुवा निर्माण करून हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिक्षणापासून आपल्या नागरिकांना वंचित ठेवणे चुकीचे आहे. त्यांच्याच सोबत केवळ मराठी बंगाली गुजराथी उडिया नव्हे तर मल्याळम तेलगू कन्नड या दाक्षिणात्य भाषांसोबत, हिंदी अनेक दशके शिकवूनही हिंदीचे भाषिक आक्रमण मर्यादितच आहे. मराठी बंगाली गुजराथी उडिया नव्हे तर मल्याळम तेलगू कन्नड या कोणत्याही भाषा हिंदी भाषेमुळे संपलेल्या नाहीत .
हा विषय संपण्यापूर्वी पेरियार महोदयांची अजून एकदा आठवण करणे क्रमप्राप्त असेल पण त्यापूर्वी इतर टीकाकारांकडे वळणे प्रस्तुत असावे . असो .
आता येऊ ‘म’ प्रदेशातले ‘आ’ नावाचे टीकाकार, ‘प’ प्रमाणेच ‘क्ष ‘ कारणाने ते दुखावलेले आहेत . त्यांना खुपणारे “जन्माधारित आणि लिंगाधारित सामाजिक विषमता आणि वर्चस्ववादाचे ‘क्ष’ हे कारण खरेच समजून घेण्यासारखे आणि वाजवीच आहे . रामायणातील शंबुकावरील अन्याय हा समान संधीच्या तत्वांचा भंगच असतो . पण खरेतर एका कोळी समाजातल्या माणसाने ‘क्षत्रिय ‘ राजा संबंधी कथा लिहिली या कथेत ‘ब्र’ समाजाची राजकारभार करणारी व्यक्ती परास्त केली गेलेली दाखवली आहे म्हणजे किमान पक्षी रामायणाची मुख्य कथा ज्या अर्थी कुणी ‘ब्र ‘ समाजाचा आहे म्हणून त्याच्या नकारात्मक गोष्टी माफ करताना दिसत नाही. त्या अर्थी ‘ब्र’ला अधिक उजवे ठरवत इतर सामाजियांवर अन्याय दाखवणारी उपकथा प्रक्षिप्त असण्याची मोठी शक्यता असू शकते . या प्रक्षिप्ततेच्या शक्यतो कडे ‘म’ प्रदेशातले ‘आ’ नावाच्या टीकाकाराचे भावनेच्या भरात दुर्लक्ष होते हे समजतात येते.
मला पडणारा प्रश्न ; रामायण कथेतील “‘ संकटातील प्रियजनांचे संरक्षण आणि त्यांना सोडवून आणणे ‘, आई, वडील, मोठा भाऊ यांच्या बद्दल आदर आणि त्यांच्यासाठी त्याग करण्याची तयारी आणि काही हद्दी पर्यंत जोडीदार निष्ठा या समृद्धीकडेही सरसकट दुर्लक्ष करून , ग्रंथातील फापटपसार्यावर टीका करताना वैचारीक वार करताना, त्यांच्याही नकळत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वार होता नाहीएना असा प्रश्न पडतो.
पांडू पुत्र असोत अथवा दशरथ पुत्र असोत, ग्रंथ म्हणतात त्या प्रमाणे त्यांची संततीत दैवी आशीर्वाद असतील अथवा नसतील , भारतीय संस्कृतीतील मूळ तत्व ज्याच्य क्षेत्रात म्हणजे ज्या पित्याला संतती झाली ती त्याची समजली जाते मग खरा पिता कुणीही असो. हेटाळणी आणि उपहास करणार्यांना कशाचेही उपहास करता येतात, पण इथे शुचितेचा आग्रह सौम्य करत अशी संतती अत्यल्प प्रमाणात का होईना स्वीकारली जाते, अत्यल्प प्रमाणात का होईना स्त्रीच्या स्वल्प आकांक्षा अप्रत्यक्षपणे का होईना पूर्ण होतात. दुसरी कडे हीच संस्कृती विवाहबाह्य संततीचे केवळ अधिकाराचा नाकारता नाहीतर समाजातून स्त्री आणि संततीला बहिष्करताना दिसते.
जेव्हा अशा सामाजिक बहिष्काराचे निषेध करणारे तुम्ही पुरोगामी अग्रणी आहात, तेव्हा जे काही अत्यल्प स्वातंत्र्य होते त्याचा उपहास अथवा हेटाळणी तुमच्या तत्वात कशी बसू शकते, हे समजून घेणे जरासे कठीण जाते. त्याच प्रमाणे एखाद्या प्राण्यावर अन्याय करू नये हे ठीक पण पाळीव प्राण्याला इजा ना करता त्याच्या सोबत कोण कसे राहिले, झोपले यांच्या अनावश्यक चौकश्या एखाद्या पुरोगामी व्यक्तीस का पडाव्यात? ज्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या सोबत हि भूमिका अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी पुरोगामी व्यक्तीस कठीण का जावी ? विरोध आणि टीका यथायोग्य प्रमाणात व्हावयास हव्यातच, पण त्यांनी यथायोग्यतेचे प्रमाण ना सोडण्याबद्दल सजगता तुम्हाला तुमच्या विरोधकांकडूनही आदरास पात्र बनवू शकते, पण तीच काळजी नाही घेतली तर, आपले तर्क कुणी ना कुणी, कधी ना कधी खोडणार असते.
शिवाय व्यक्ती आणि शब्द पूजेस उत्सुक तुमचे अनुयायी, त्यांच्या लाडक्या झालेल्या तुमच्या प्रतिगामी निष्कर्षांना कवटाळत स्वैराचाराचे चुकीचे आरोप करता स्त्रीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत तिला आणि तिच्या संततीला सामाजिक बहीष्कारतेत ढकलण्यास मोकळे होऊ शकतात . मग पुरोगामित्वाच्या नावा खाली वेचलेल्या आपल्या आयुष्याला आणि मांडणीला अर्थ तो काय राहिला ? या मुद्यावर पेरियार आणि ‘उ’ प्रदेशातील ‘सा ‘ किमान त्यांच्या स्वतः:च्या तत्वांची आठवण दिल्यावर तरी हा विचार अधिक मोकळे पणाने स्वीकारू शकले असते असे काहीसे वाटते .
जेव्हा तुम्हाला एखादा दुसरा धर्म त्यात शिरलेल्या टाळण्या जोग्या गोष्टी टाळून स्विकारता येऊ शकतो, तेव्हा सध्याची संस्कृती सुद्धा त्यात शिरलेल्या टाळण्या जोग्या गोष्टी टाळून का स्विकारता येऊ शकत नाही ? पण खरे म्हणजे तोही प्रश्न नाही, तुम्ही ज्या कोणत्या प्रदेश भाषा आणि तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करता तेथील तत्वज्ञान आणि व्यवहार अधिक तर्कसुसंगत आणि अधिक उदार कसा राहिला याचा प्रयत्न करण्याचा असावा किंवा कसे.
मी लेखाच्या सुरवातीसच भावना दुखावलया जाणाऱ्यांनी पुढे वाचू नये अशी सूचना लिहिली तरी, व्यक्ती आणि शब्द पूजा करणार्यांना झेपेलच असे नाही म्हणून ‘म’ प्रदेशातील ‘ आ ‘ यांचा आणि त्यांच्या अनुयायांचा मन;पूर्वक आदर करून, पुढील टीकाकारांच्या टीकेची चिकित्सा करण्याकडे लेखाच्य दुसऱ्या भागाकडे जाऊया .
ज्यांना लेखाच्या पुढच्या भागा पूर्वीचे माझे मत संक्षेपात जाणून घ्यायचे आहे, त्यांच्या साठी : एखादा प्राचीन ग्रंथ जो काळाच्या ओघात विकसित होत समाजावर प्रभाव निर्माण करत आला आहे त्याची जागा अचानकपणे अजून काही तरी भरून काढू शकेल कि नाही हे सहज सांगता येणारे नसावे. एखादा ग्रंथ अथवा तत्वज्ञान सरसकट मोडीत काढून नवे उभारू असे स्वप्न बघत, इतर नव्या तत्वज्ञानाचा शोध घेऊन तिथले चांगले वाईट पुन्हा चिवडत बसण्या पेक्षा आपल्या आहे त्या ग्रंथ आणि तत्वज्ञानाची मनमोकळी चिकित्सा करावी, टाळण्यास योग्य अंशाची खात्री झाली कि तसे अंश टाळून अथवा ग्रंथाच्या सोबत संबंधित टीका जोडून या पैकी अधिक श्रेयस्कर असलेला मार्ग निवडून पुढे जावे. तसेही रामायण महाभारत ग्रंथानी ते अनेक पद्धतीने पुन्हा पुन्हा लिहिले सांगितले जाऊ शकतात या बद्दलची स्वतः:ची लवचिकता पुरेशी सिद्ध केलेली आहे असे म्हणता यावे. असो लेखाचा पुढचा भागही जवळपास तयारच आहे तर पुढच्या भागात लवकरच भेटूया.
💬 प्रतिसाद
(15)
आ
आनन्दा
Wed, 04/04/2018 - 11:58
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/04/2018 - 19:52
नवीन
दखन घेतल्या बद्दल अनेक आभार
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 04/04/2018 - 14:03
नवीन
आपला फाफट"मुक्त" लेखाचा संकल्प, माझ्या या प्रतिक्रियेमुळे, जर फाफट"युक्त" झाला असेल, तर होणाऱ्या अवांतराबद्दल क्षमस्व,
परंतु एक लेख वाचनात आला,
लेख: The cultural impact of HBO's 'Game of Thrones'
What really counted was the “cultural buzz” and the social conversation that the show was able to inspire.
“Without the show, I think the pop culture impact of GoT (“Game of Thrones”) is marginal at best,” Eric Regan, creator of the GameofThrones.tv fan site, told Metro.
.
.
the reason why the show appeals to so many people is because human dramas like “Game of Thrones” appeal on a primal level to all people.
रेफ ;https://www.metro.us/entertainment/the-cultural-impact-of-hbo-s-game-of-thrones/tmWmcA---84l5tCmWJdHiM
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/04/2018 - 19:49
नवीन
या शो बद्द्ल बाकी माहित नाही, पण आपल्या प्रतिसादाच्या मतितार्थाशी बर्या पैकी सहमत. अनेक आभार
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 04/05/2018 - 06:02
नवीन
माझा मिपावरील खलील लेखं आपल्या वाचनात आला का ?
त्या लेखाची नाळ, माझ्या या वरील प्रतिक्रियेशी जुळते का ?
https://www.misalpav.com/node/30922
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 04/05/2018 - 08:22
नवीन
ठिक, आत्ता चाळले, तुम्हाला काय सुचवायचे आहे ते बहुधा लक्षात येत आहे पण अंशतः दखल नंतरच्या दुसर्या एखाद्या धागा लेखातून घेईन , आणि अंशतः उत्तर कदाचित इथेही देईन पण कदाचित विलंबाने.
मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 04/04/2018 - 17:09
नवीन
रामायणाचा उद्देश समाजावर प्रभाव टाकण्याचा नसावा. समाजाने तो ग्रंथ,त्यातले त्यांना आवडणारे भाग आपले मानले.त्यावर चिकित्सा करणारा मी कोण?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/04/2018 - 19:37
नवीन
१) कदाचित आधी चिकित्सा केलेल्या असंख्यांपैकी एक, -अशी चिकित्सा अगदी रामायणातूनच सुरु होते ? उदा. रावण मारीच संवाद- मागच्या शतकातला एक भारतीय महामानव टिका करा पण अनुल्लेखाने मारु नका म्हणाला त्यांच्याच सारखा कुणी एक. एखादा ग्रंथ काही मांडणी करत असेल तर त्यावर टिका हि तशी जुनी परंपरा आपण सारे चिकित्सक त्या परंपरेचे पाईक असतो.
चिकित्सेमुळे कथा पुन्हा पुन्हा वाचली जाते, चिकित्सेचे आव्हान नसेल तर माझ्यासारखी ललित लेखनाला कधी हात न लावणार्या व्यक्ती कडून कथा वाचन घडले असते का याची शंकाच आहे.
मूळ लेखनाचा उद्देश कलेसाठी कला रंजनासाठी कला अथवा प्रबोधनासाठी कला काहीही असो त्याच्या आस्वाद घेण्याच्या ज्या काही अनेक पद्धती असतील त्यातलीच टिकाही सुद्धा एक असू शकते का
२) मूळ व्यक्ती घटना प्रसंग प्रत्यक्षात घडला असेल तर इतर असंख्य लेखन पर्याय सोडून याचीच दखल लेखकास का घ्यावी वाटली असेल ? समजा की मूळ प्रसंग प्रत्यक्षात घडलेले नाहीत काल्पनिक आहेत कदाचित मूळ छोटे लेखन कलेसाठी कला होते , मूळ लेखकाचा उद्देश प्रबोधनाचा नसेलही, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरल्या शिवाय का त्याचा प्रसार झाला ?, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरता वापरता ज्या प्रक्षिप्तता जोडल्या असतील त्यांचे उद्देश्य काय असू शकतात ? समाजावर एका कलाकृतीचा शतकोन शतके प्रभाव पडला हे वास्तव कसे झाकता येईल ? आणि मग समाजावरील पडणार्या
प्रभावाच्या इष्टानिस्।टतेची चिकित्सा का रास्त नसते किंवा इतरांनी केलेल्या चिकित्सेच्या प्रभावाची इष्टानिस्।टतेवर भाष्य का होऊ नये ?
३) माझ्या व्यक्तीगत मतानुसार प्राचीन भारतीय लेखनापैकी बर्यापैकी लेखन राजकुमाराम्साठी चातुर्यकथा लेखन या स्वरुपातही झाले असावे , अशा चातुर्यकथा लेखनाचे उद्देश संबंधीतांच्या प्रबोधनासाठीच नसावेत का ? दुसरे असे की बर्यापैकी प्रक्षीप्त लेखन प्रबोधनासाठी आणि फिल इन द गॅप टू एक्सप्लेनन अ रिझन अशा स्वरुपानेही जोडले गेले असू शकते रामायण महाभारतात प्रबोधनार्थ संवादाम्ची अनेक उदाहरणे असावीत . वाल्मिकी रामायणाचे समांतर भावंड दशरथ जातक हे तर अगदी प्रबोधनासाठी लिहिले गेले हे चक्क चक्क दिसते दशरथ जातक आपण वाचले आहे का ? असो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 04/04/2018 - 19:51
नवीन
पग यांचा प्रतिसाद सुद्धा अप्रत्यक्ष पणे आपल्या मुद्द्याशी संबंधीत असावा. मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/05/2018 - 01:52
नवीन
महाभारतावर बरीच टिका झाली आहे आणि होत राहील तसं रामायणावर करताना जरा अवघड वाटतं. धार्मिक पवित्रपणा जोडला गेल्यामुळे.
रामायणात प्रक्षिप्त काय हे कसे शोधणार? फारतर अमुक एक भाग वेगवेगळ्या लेखकाचा आहे हे शैलीवरून काहीजण मांडतील.
कथानकात काही आक्षेप घेतल्यास - अहो ते रूपक आहे असं उत्तर मिळेल. किंवा तसं झालं खरं म्हणतात. लक्ष्मण का गेला एकटा? उर्मिलेला का नाही बरोबर नेलं? नेलं असतं तर जावाजाव भांडल्या असत्या का? पुन्हा सत्वपरीक्षा, पत्नीत्याग हेसुद्धा त्याकाळात होतं? चमत्कार घडू शकणाय्रा काळात परीट हे जनतेचं उदाहरण पार कलियुगात आणतं.
-
दशरथ आख्यान नाही वाचलं.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 04/05/2018 - 08:25
नवीन
@ कंजूस, आपण काय म्हणू इच्छिता ते बहुधा लक्षात आले. मला वाटते माझा तयार असलेला दुसरा लेख या बैठकीत संपवलेले उत्तम, आपणास त्यानंतर एखाद दोन दिवसात सविस्तर उत्तर देईनच. अनेक आभार
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 04/05/2018 - 10:12
नवीन
म्हणजे बरेच लोक यावर भाष्य करायचे टाळतात. परंतू सध्या हाताशी असलेलं साहित्य,पोथी, वगैरेतून रामायण मांडण्याचे काम ग वि केतकरांना ज्ञानकोश लेखांच्या निमित्ताने करावेच लागले आणि रोष ओढवून घ्यावा लागला. ( बुद्धाचरित्राबद्दलही तसेच झाले.)
रामायणातील एक दुवा म्हणजे मारुतीने हिमालयातून (उत्तराखंड भाग) संजिवनि वनस्पती श्रीलंकेत( डोंगराच्या तुकड्यासह) नेली ती तिकडेच( कँडीला) वाढली. त्या सरकारने तो वनभाग संरक्षित करून टाकलाय. कारण तिथल्या सर्वच वनस्पती चोरीला जातील या भितीने.
श्रीलंकेतले लोक एक ठराविक उत्सवासाठी बिहार भागात जातात म्हणे. काहितरी बिहार आणि श्रीलंकेचा संबंध नक्कीच असावा.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 04/05/2018 - 10:15
नवीन
संबंध = बौद्ध धर्म
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 04/05/2018 - 11:21
नवीन
आपणास श्रीधर व्यंकटेश केतकर असे म्हणायचेआहे का?
की माझेच काही चुकतेय? कारण ग. वि.केतकरांच्या साहित्यसेवेबद्दल मला फारशी माहिती नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 04/07/2018 - 19:27
नवीन
कदाचित थोडेसे अवांतर आहे. पण ज्या लोकांना उद्देशून काही सकारात्मक चर्चा व्हावी म्हणून तुम्ही लिहीत आहात ते यातले १% सुद्धा वाचणार नाहीत. मूलनिवासी ब्लॉग हा त्यांच्या दृष्टीने इतिहासावर शेवटचा शब्द आहे. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यास ते वैयक्तिक अपमान करायला मागेपुढे बघत नाहीत. मिपा संपादक मंडळ त्यावर काही कारवाई करताना दिसत नाही. कारण तेच जाणोत.
येणारे दिवस काय वर्षे, सगळा काल अशाच उथळ लोकांचा आहे. तसल्या मतांचे खंडन करणे मी तरी सोडून दिले आहे. मात्र ते मनावर न घेता तुम्ही लिहीत आहात याबद्दल तुमचे खरोखर कौतुक. हल्लीच अशा एका प्रकरणात ज्येष्ठ मिपाकर शरद यांना अतिशय मनस्ताप झाला होता. तुमच्यावर ती वेळ न येवो.
- Log in or register to post comments