आधुनिक दृष्टिकोनातून रामायण
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना.
आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे.
माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम. दोघांनी मिळून मूळ संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. (आपल्यासारख्या ज्यांना संस्कृत अजिबात वाचता येत नाही त्यांच्यासाठी देखील ते उपलब्ध आहे. त्याचं मूळ संस्कृत काव्य व वाक्य बाय वाक्य मराठीत अनुवाद 'विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे' यांनी प्रकाशित केला आहे.)
वाचकांच्या प्रतिक्रिया मी आप्पांपर्यंत पोहोचवीनच आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत.
आधुनिक दृष्टिकोनातून रामायण
आधुनिक दृष्टिकोनातून रामायणाचा विचार करायचा म्हणजे शास्त्रीय दृष्टीनं. धार्मिक अगर श्रद्धाळू दृष्टीनं विचार करतांना कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट कृतीवर अगर एखाद्या घटनेवर “असं का?” असा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची योग्यायोग्यता ठरवता येत नाही. फक्त शास्त्रीय दृष्टिकोनांत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं.
रामायणाबद्दल पहिला प्रश्न हा आहे की हा इतिहास आहे की वाल्मीकि ऋषींच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली कथा आहे? अर्थात हा इतिहास असो अथवा कल्पित कथा असो, त्यामध्ये त्या काळच्या राजे लोकांचं, तसंच सामान्य लोकांचं जीवन वास्तववादी पद्धतीनं रंगवलेलं आहे. त्या काळच्या समाजपद्धती, धार्मिक प्रथा, रूढी अशा सर्व गोष्टींवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. असं सर्व असूनही वाल्मिकींनी ती अत्यंत रंजक केलेली आहे.
साहित्यिक कृति म्हणूनही तिच्याकडे पाहिलं तरी सर्व जगातल्या विद्वानांनी तिला वाखाणलं आहे. त्या कथेत मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे पहायला मिळतात. प्रेम, द्वेष, राग, लोभ, तिरस्कार अशा विविध अगदी टोकाच्या भावना बघायला मिळतात.
शास्त्रीय दृष्टीनं बघायचं तर अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या भूगोलाचं आणि त्यांत राहणार्या वेगवेगळ्या समाजांचं सविस्तर चित्र लेखकानं कसं रंगवलं याचं आश्चर्य वाटतं. कारण त्याकाळी सर्वत्र वन पसरलेलं, रस्ते नाहीत, दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत, एकट्यादुकट्यानं प्रवास करणं अत्यंत धोक्याचं, अशा सर्व अडचणींवर मात करून राम, सुग्रीव व त्याचे वानरसैन्य यांच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला सोडवतो हे सर्व चित्र विलक्षण आहे यात शंका नाही.
रामायणाची कथा सर्वांनाच उत्तम माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण त्यातल्या विविध घटना आणि विविध व्यक्तिमत्वं ही मात्र अभ्यासण्यासारखी आहेत.
पहिली कथा त्रटिकेची : विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणाला घेऊन वनातून जात असतांना पहिली गाठ त्राटिकेशी पडते. त्राटिका ही राक्षसीण अत्यंत सामर्थ्यवान आणि भयंकर जुलमी. तिनं वनावर पूर्ण ताबा मिळविलेला. तिला तोंड द्यायची कोणाचीही छाती नव्हती. पण राम धनुर्विद्येत अत्यंत पारंगत आणि बलवान म्हणून तिला ठार मारू शकत होता. तरीसुद्धा वीर पुरुषांनी स्त्रीला ठार मारायचं नाही हा दंडक. अशा वेळेला विश्वामित्र ऋषी रामाला सांगतात की ही स्त्री असली तरी समाजाची अत्यंत घातक शत्रू आहे. तिचा नाश करण्यात पाप नाही. याचा अर्थ असा की “कोणतेही तत्व पालन करतांना ते समाजाच्या कल्याणाच्या आड येत असेल तर त्याचा वेगळा विचार करावयाचा” असं ऋषी सांगतात. तत्वाचे अवडंबर माजविणार्या लोकांना हे उत्तम उत्तर आहे असं म्हणावंसं वाटतं.
श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो.
सर्वसाधारणपणे समाजात गाजलेली कथा अहिल्येची. (तिला सती अहिल्या असंही कधीकधी संबोधलं जातं.) या अहिल्येला “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” म्हणजे आदरणीय व पवित्र स्त्रियांच्या यादीत तिला बसवण्यात आलेलं आहे. तिची खरी कथा काय आहे?
अहिल्या ही एक असाधारण सुंदर तरूण स्त्री. तिचे पती गौतम ऋषी हे एकदा नदीतीरी स्नानाला गेलेले असतांना इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्येकडे येतो व मला तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे असं सांगतो. हा गौतम ऋषी नसून इंद्र आहे हे अहिल्येच्या लक्षात येतं पण तरीही देवराजाशी रत होण्याचा मोह तिला पडतो आणि ती त्याला संमती देते. समागम झाल्यानंतर “मी कृतार्थ झाले” असं समाधान व्यक्त करते म्हणजे हे आपण काही पापकर्म करतो आहोत असं तिला वाटत नाही. इतकंच नाही तर हे गौतम ऋषींना समजू नये म्हणून इंद्राला “तू आता इथून जा” असे सांगते. पण तिच्या व त्याच्या दुर्दैवाने इंद्र पळून जाण्याच्या आतच गौतम ऋषी परत येतात. काय घडलं हे त्यांच्या लक्षांत येतं, व ते त्या दोघांनाही शाप देतात. अहिल्येला ते “याच आश्रमांत तू वायू भक्षण करून अदृष्य व निराहार अशी राहशील, राम वनात येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल” असा शाप देतात आणि हिमालयात तपश्चर्येकरता निघून जातात. मात्र सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे “तू शिळा होशील” असा शाप तिला देत नाहीत.
वास्तविक अहिल्येने व्यभिचाराचं पाप केलं होतं आणि ते आपल्या पतीपासून दडवण्याचाही प्रयत्न केला होता. असं असूनही गौतम ऋषींनी तिला मर्यादित काळापर्यंतचीच शिक्षा दिली आणि नंतर तिचे समाजात पुनर्वसन व्हावे अशी व्यवस्था केली. तिला आयुष्यातून उठवलं नाही. आजचा समाज अशा स्त्रीकडे अशा उदार दृष्टीने पाहील का?
दुसरी गोष्ट. अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?
रामायणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुग्रीव. सुग्रीव हा वानरांचा राजा. त्याची त्याच्या वानरसेनेवर अत्यंत जरब होती असं दिसतं. सीतेच्या शोधाकरिता वानरांचे वेगवेगळे गट करून त्यानं चारही दिशांना पाठवले होते. त्यात हनुमान, जांबुवंत वगैरेंचा गट दक्षिण दिशेला पाठवला होता. त्या गटानं सारी दक्षिण दिशा पालथी घातली तरी त्यांना सीतेचा शोध लागला नव्हता. शेवटी निराश होऊन दक्षिण किनार्यावर ते बसले असतांना त्यांच्यात बोलणं निघालं की सीतेचा शोध न लावता आपण परत गेलो तर सुग्रीव आपणां सर्वांना ठार मारील. तेव्हा परत जाण्याऐवजी आपण इकडेच जीव देऊ. हनुमान, जांबुवंत यांच्यासारख्यांची ही स्थिती. यावरून सुग्रीवाची सर्व सैन्यावर किती जरब होती हे दिसून येते.
अर्थात त्या गटाच्या सुदैवाने तिथे जटायूचा भाऊ संपाती त्यांना भेटला. त्यानं त्यांचं आपसातलं बोलणं ऐकलं आणि त्यानंच रावणानं सीतेला पळवून लंकेत नेऊन ठेवल्याची माहिती त्यांना दिली. ती महिती मिळाल्यामुळे हनुमान लंकेत गेला व सीतेला प्रत्यक्ष भेटून तिची माहिती घेऊन आला. पण या गटाला जर संपाती भेटला नसता तर ते परत सुग्रीवाकडे जायला भीत होते हे उघड आहे.
असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती त्यामुळे त्याची व रामाची समस्या एकच होती. रामाची व सुग्रीवाची भेट होण्याला कारण एक कबंध ठरला. राम लक्ष्मण अरण्यातून प्रवास करीत असतांना कबंध त्या दोघांवर धावून गेला म्हणून रामानं बाण मारून त्याला ठार केलं. त्याला जाळून टाकतांना त्यातून एक सुंदर पुरुष बाहेर पडला व त्यानं रामाला “सुग्रीवाची व तुझी समस्या एकच आहे म्हणून तू सुग्रीवाला भेट” असा सल्ला दिला. मग रामाची सुग्रीवाशी भेट झाली तेव्हां रामानं वालीला मारण्याचं वचन सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवानं सीतेला शोधून काढण्याचं. वाली हा प्रचंड शक्तिमान असल्याचं सुग्रीवानं रामाला सांगितलं तेव्हा रामानं एका प्रचंड राक्षसाचं शरीर वनात पडलेलं होतं ते आपल्या पायाच्या अंगठ्यानं उचलून कित्येक योजनं दूर फेकून देऊन सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याविषयी खात्री करून दिली होती.
त्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे, सुग्रीवानं वालीला आव्हान देऊन द्वंद्वयुद्धाला बोलावलं. त्यांचं युद्ध चालू असतांना रामानं झाडाआड उभं राहून वालीला बाण मारला व तो खाली पडला. तो मरणासन्न असतांना त्यानं रामाला विचारलं “तू स्वतःला न्यायी राजा समजतोस. मी सुग्रीवाशी युद्धात गुंतलेला असताना तू झाडाआडून मला बाण मारलास हा न्याय झाला का? आणि मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू मला मारावंस?”
त्यावर उत्तर म्हणून “तू सुग्रीवाची बायको पळविलीस म्हणून मी तुला शिक्षा केली. सुग्रीवानं मला मदत मागितली म्हणून मी तुला मारलं. शिवाय मी माणूस आहे व तू वानर म्हणजे पशू आहेस. माणसाला पशूंची शिकार करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी तुला मारण्यात अन्याय केला असं होत नाही.” हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.
रामानं वालीला मारल्यामुळे सुग्रीवाला आपली बायको परत मिळाली. त्याचं काम झालं. त्यानं आता रामाला मदत करावयाची. पण आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रावणाविरुद्धची मोहीम आता आपल्याला सुरू करता येणार नाही असं सांगून सुग्रीव रामाच्या संमतीनं आपल्या राजधानी - किष्किंधेला परत गेला. तिकडे तो आपल्या बायकांच्यात इतका रमला की पावसाळा संपला तरी रामाकडे जाण्याचं तो पूर्ण विसरून गेला. शेवटी रामानं लक्ष्मणाला त्याला बोलावण्याकरता त्याचेकडे पाठवलं. त्यावेळचा प्रसंग लक्ष्मण, सुग्रीव व सुग्रीवची पत्नी तारा या तिघांच्या स्वभावावर उत्तम प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण स्वभावानं अत्यंत संतापी. पूर्वी दशरथानं रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलेलं त्याच्या कानावर गेलं तेव्हा तो दशरथाला ठार करायला निघाला होता. रामानं त्याला वाटेत अडवून शांत केलं होतं. आता सुग्रीवच्या वर्तनाचा त्याला राग आला होता. तो सुग्रीवाला बोलवायला गेला त्यावेळी सुग्रीव आपल्या बायकांच्यात पूर्ण रमून गेला होता. लक्ष्मण आला आहे ते कळताच तो खूप घाबरला. आपण रामाला दिलेलं वचन मोडल्याची त्याला आठवण झाली. लक्ष्मण संतापी आहे, आता तो आपलं काय करील कोणास ठाऊक! अशी भीती वाटून तो स्वतः बाहेर न येता त्यानं आपल्या पत्नीला - ताराला “ बाहेर पाठवलं. तारानं बाहेर येऊन लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला मुत्सद्दी सल्ला दिला. “अरे लक्ष्मणा, माणसंसुद्धा दिलेलं वचन विसरतात. सुग्रीव हा तर वानर आहे. तो विसरला तर त्यात आश्चर्य काय? पण तो आता जागा झाला आहे. तो तुमचं काम करील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. सुग्रीवाजवळ असंख्य वानरांची फौज आहे. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला सीतेला शोधून काढता येणार नाही. त्यामुळे तू त्याच्याशी सबूरीनं बोल. त्याला एकदम टाकून किंवा रागावून बोलू नकोस.” लक्ष्मणाला शांत केल्यानंतर सुग्रीव व लक्ष्मण रामाकडे गेले.
त्यानंतर सुग्रीव आपल्या वानरांना चारी दिशांना पाठवतो त्यावेळी तो विविध बेटांचं वर्णन करतो व तिथे काय काळजी घ्यावयाची याच्या सुचना आपल्या वानरांना देतो. त्यानं वानरांना पाठवलं त्यात जावा, सुमात्रा, जंबुद्वीप या आजच्या नावांचा उल्लेख येतो. त्यावेळी राम त्याला विचारतो, "या आर्यावर्ताच्या बाहेरच्या बेटांची इतकी सविस्तर माहिती तुला कशी?" त्या वेळी सुग्रीव रामाला सांगतो की ज्यावेळी वालीचं आणि त्याचं भांडण झालं आणि वाली त्याच्या मागे लागला त्यावेळी तो या बेटांवरून त्या बेटावर पळत होता त्यावेळी त्याला या बेटांची व प्रदेशाची माहिती झाली. आपल्याला आज आश्चर्य वाटतं की ही जर कल्पित कथा असेल तर वाल्मीकि ऋषींना या सर्व भागाची इतकी सविस्तर माहिती कशी?
त्यानंतर हनुमान सीतेला शोधून काढतो. त्यानंतरच राम वानरांचं सैन्य घेऊन रावणाच्या लंकेवर हल्ला करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे सर्व वानरसेना भारताच्या दक्षिण दिशेला प्रवासाला निघते त्या वेळी रामानं या प्रवासात सर्व सैन्याची कशी काळजी घ्यायची, रात्रीच्या वेळी कांही वानरांना पहार्याच्या कामावर ठेवावयाचे, रावणाचे हेर आजूबाजूला फिरतील त्यांच्यापासून सावध राहाणं इत्यादी अत्यंत वास्तववादी सूचना व अर्वाचीन इतिहासात सैन्य इकडून तिकडे जात असताना काय काय करावं लगलं असेल याची वास्तववादी जाणीव करून देणारा आहे.
सेना समुद्रापर्यंत आली. आता समुद्र कसा पार करावयाचा हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी आपल्यामध्ये नल नावाचा वानर आहे व तो सेतू बांधण्यातला तज्ञ आहे असे वानरांनी रामाला सुचवले. त्याप्रमाणे सर्व वानरांनी झाडं, शिळा, दगड इत्यादी साधनं गोळा करून नलाला आणून दिली व त्यानं त्यांच्या सहाय्यानं सेतू बांधला. आता हे सर्व प्रत्यक्षात कसं घडलं असेल? भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे खुद्द वाल्मीकि रामायणांत दगड पाण्यावर तरल्याचा उल्लेख कुठेही नाही.
हल्ली हल्ली काही लोकांनी या समुद्रात मधे उभं राहून फोटो काढून ते प्रसिद्ध केले आहेत. मात्र व्हॉट्सअॅपवर काहीही होऊ शकतं. त्याबद्दल न बोलणं बरं.
राम रावणाचं युद्ध संपतं. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण अशोकवनातून सीतेला घेऊन येतो. त्यानंतर राम सीतेला म्हणतो, "मी रावणाला शिक्षा केली. त्याच्या कैदेतून तुला सोडवलं. पण तू परपुरुषाकडे राहिलेली असल्यामुळे तुझ्या पावित्र्याबद्दल खात्री देता येत नाही. तेव्हा तू हवं तिकडे जाऊ शकतेस." हे शब्द कानावर पडताच सीतेला काय वाटलं असेल? तिच्या कोणत्या अपराधाकरता तिला ही शिक्षा मिळावी? राम रावणाला मारील, आपल्याला त्याच्या कैदेतून सोडवील आणि आपण रामाबरोबर आनंदानं अयोध्येला जाऊ अशा कल्पनेत असलेल्या सीतेवर हे शब्द अगदी वज्रासारखे कोसळले असतील. तिनं अग्निप्रवेश करायचं ठरवलं पण अग्निनं स्वतःच रामाला ग्वाही दिली की "सीता पवित्र आहे. तू तिचा स्वीकार कर."
पुराणकाली स्त्रियांना फार मानानं वागवलं जात असे असा काही लोकांचा दावा आहे. ते अजिबात खरं नाही. सीतेसारखीला ही वागणूक, मग सामान्य स्त्रियांचं काय? अग्नीच्या आश्वासनामुळे सीतेचा स्वीकार झाला व ती बहुमानानं अयोध्येला गेली खरी. पण पुन्हा अयोध्येच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली. रामानं एका धोब्याचं बोलणं ऐकलं. धोबी म्हणाला, "माझ्या बायकोच्या चरित्र्याबद्दल मला शंका आली म्हणून मी तिला घराबाहेर काढली. सीता तर इतके महिने रावणाच्या कैदेत राहिलेली. रामानं तिचा परत कसा स्वीकार केला?" हे ऐकून राम पुन्हा अस्वस्थ झाला. शेवटी त्यानं लक्ष्मणाला सांगितलं, "हिला वनांत सोडून ये. मला जास्त काही विचारू नकोस." लक्ष्मणानं त्याप्रमाणे सीतेला वनात नेऊन सोडलं. सीतेला जाताना कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे तिला लक्ष्मणानं वनात सोडल्यावर तिचा धीरच सुटला. तिनं लक्ष्मणाला विचारलं, "या भयंकर अरण्यात मी एकटी कुठे जाऊ?" लक्ष्मणाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यानं तिला सोडतांना इतकीच काळजी घेतली होती की तिला त्यानं वाल्मीकि ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ सोडलं, हेतू हा की आश्रमात जे कोणी असतील ते तिला आत घेऊन जातील आणि ती सुरक्षित राहील.
आणि तसंच झालं. वाल्मीकींचा एक शिष्य बाहेर आला असतांना त्यानं तिला पाहिलं आणि तो तिला आश्रमांत घेऊन गेला. त्यावेळी सीतेला दिवस गेलेले होते याचाही रामानं विचार केला नाही. थोड्याच दिवसांत लव आणि कुश तिच्या पोटी जन्माला आले.
आश्रमात सीतेचे पुत्र लहानाचे मोठे झाले. वाल्मीकींनी त्यांना सर्व तर्हेचं शिक्षण दिलं. त्याच काळात त्यांचं रामायण काव्य लिहून पुरं झालं होतं. ते त्यांनी त्या मुलांच्याकडून पाठ करून घेतलं व उच्च स्वरांत (आपल्याकडे पोवाडे गातात तसे) म्हणायला शिकवलं. मग त्यांना ते गाण्याकरिता अयोध्येला पाठवलं. हेतु हा होता की राम स्वतः ते केव्हातरी ऐकेल. त्याप्रमाणे रामानं एक दिवस ते ऐकलं. ‘ती मुलं कोण?’ असं विचारलं. पण वाल्मीकि ऋषींनीं पढवल्याप्रमाने आपण रामाचीच मुलं आहोत हे त्यांनी रामाला सांगितलं नाही. रामानं त्यांना ते काव्य राजदरबारात म्हणायला सांगितलं. सगळ्या दरबारानी ते ऐकलं. तेच जगप्रसिद्ध 'रामायण'.
आप्पा गोडबोले
वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत."राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charlesमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles