घरी कधी जायचं?
रस्त्यांवरून फिरताना,
मजेमजेत धावताना
खिदळत असतो, उधळत असतो आम्ही
थकून जेव्हा बसतो
तिथेच, बाजूला एखाद्या झाडाखालच्या दगडावर
माझ्या मांडीवर बसून सानुली माझी
करते चाळा माझ्या शर्टाशी
डाव्या हाताचा अंगठा तोंडात तसाच ठेवून
माझ्याकडे मान तिरपी करत पाहते आणि विचारते
अंगठा तेवढ्यापुरता तोंडातून काढत,
"बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
मी हसतो, लगेच दोन्ही हातांनी तिला उचलून घेतो
गुदगुल्या करीत तिला खांद्यावर टाकतो
खळखळून तिच्या हसण्याने प्रश्न वाहून गेलेला असतो
मग आम्ही जातो बागेत
बरीच गर्दी असली तिथे जरी
हिरवळीवर एक कोपरा धरून आम्ही बसतो
पण, मिनीटभरच, कारण...
पुन्हा सुरू होते पळापळी
सुपारीच्या झाडाभोवती,
खालून वर जाणाऱ्या पायऱ्यांवरती
झाडून सगळ्या बेंचभोवती
मग थोड्या वेळाने घसरगुंडी दिसते, झोकाही असतो
ती मनसोक्त खेळून घेते
मी बाजूला एका कट्ट्यावर बसतो
तिच मन भरल्यावर ती येते. माझ्या दोन गुडघ्यांवर चापटा मारत म्हणते,
"बाबा, घरी ज्यायच्य मला!"
मी झटकन उडी मारतो खाली
उचलून तिला घेत गरगर फिरवतो
पुन्हा तिच्या गरगरण्यात प्रश्न हरवलेला असतो
मी तसाच तिला खांद्यावर ठेवीत
बागेतून बाहेर पडतो आणि शिरतो मंदीरात
साईबाबाच्या... चकाचक फरश्या
संगमरवरी बांधकाम, टेपवर जोरजोरात वाजणारी देवांची गाणी
तिला वाजवायचा असतो देवळातला घंटा
तिला खूप आवडत मोठा आवाज करायला
मग तिला उचलून घेतल्यावर
पोटभर वाजवून घेते ती, मीही तिला वाजवू देतो
आजूबाजूचे पाहतात माझ्याकडे त्रासिक नजरेने
पण आम्ही आपल खेळण्याच्या मूडमध्ये आहोत अजूनही
मी तिथेच एका खांबाला टेकून खाली बसतो
माझ्या सानुलीची अजूनही पळापळ चालूच असते
पंधराएक प्रदक्षिणा झाल्यावर ती माझ्याकडे येते
पुन्हा तोच प्रश्न, "बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
मी तिला जवळ घेतो, कुरवाळत विचारतो
"आपण आईश्क्रीम खावूया...मग घरी ज्यावू हां बाळा!"
हे बोलताना का कोण जाणे आईसक्रीम खायच्या आधीच माझा घसा थंड झालेला असतो
पुढे काही बोलताच येत नाही
मंदिरातून बाहेर पडल्यावर जाणवते
अंधार वाढायला लागलाय, रस्ता निर्मनुष्य व्हायला लागलाय
सानुली माझी एव्हाना कडेवर आलेली असते
मान माझ्या खांद्यावर टाकून ती निवांत पडलेली असते
मी रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत राहतो
अचानक त्या शांततेचा भंग होऊन तिचा आवाज येतो
"बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
- संदीप चांदणे
कवितेतल्या बाबाकडे घरच नाही ही एक शक्यता असू शकते.आइस्क्रिम खाणे आणि ज्या ज्या जागांवर बाबा मुलीला घेऊन फिरत आहेत यावरून... "घरी वाट पहात असणारे कोणी नसावे"... हे कारण मनात आले होते. कविच्या मनात काय होते हे कवीच सांगू शकेल म्हणा !