काहूर !!!
काहूर !!!
प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल .
दिनू तसा प्रामाणिक माणूस .त्याच्या आयुष्या बद्दल अधिक काय सांगणारा .लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे छत्र हरपले . एकट्या म्हाताऱ्या आजीने, लोकांच्या घरी मोल मजुरी करून दिनूचा कसाबसा सांभाळ केला. गरिबीमुळे दिनूला एकवेळचे भोजन देण्याची मारामार तिथे त्याला चांगले शिक्षण कुठले देणारा ? कुठल्याशा नगरपालिकेच्या शाळेत दिनूला लिहिण्या वाचण्याचे जुजबी शिक्षण मिळाले होते. जसा दिनू १७-१८ वर्षाचा झाला,तसे आजीने ओळखीने दिनूला अण्णांच्या भांड्याच्या दुकानात कामाला लावले. कालांतराने त्याचे एक गरीब मुलीशी लग्नही लावून दिले .वंशपरंपरेने चालत आलेली १०x१० ची भाडयाची जुनाट पडकी खोली, मागे सोडून आजीने स्वर्गवास पत्करला. त्या नंतर मात्र दुकानदार अण्णा व घरात थोडेफार शिवणकाम करून संसार हातभार लावणारी त्याची पत्नी सरू, ह्याचाच काय तो त्याला आधार होता .एकंदरीत काय, अण्णांनी दिलेला अल्पसा पगाराचे व सरुनी मिळवलेले शिवण कामाचे थोडेफ़ार पैसे ह्या तुटपुंज्या कमाई वर त्यांचा गृह प्रपंच चालला होता .त्यात सात-आठ महिन्या पूर्वी त्याला एक मुलगी देखील झाली होती .गरिबी, कष्ट या सर्व गोष्टी असून देखील दिनू मात्र सदोदित आनंदी असायचा .
रोज सकाळी घरातून सायकलवर टांग टाकून अण्णांच्या दुकानात हा पोहचला कि मग अण्णांनी फक्त दुकान उघडायचे .मग दारात सडा घालण्या पासून ते दुपारी व रात्री दुकान बंद करण्याची सर्व च्या सर्व जबाबदारी दिनू वर असे .तसे अण्णांचे पण वय झाले होते . कधी कधी अण्णांच्या नातवंडांना शाळेत सोडून ये, दुपारी बँकेत जाऊन आण्णांचे पैसे काढून आण, या सारखी अनेक घरगुती कामे देखील, त्याला कधी कधी करावी लागत असे.
दुपारी एक वाजता जेवणासाठी अण्णा दुकान बंद करीत असत, मग सायकलवर टांग टाकून दिनकरराव घरी परत येत असे . त्याला बघितल्या वर त्याची लहान मुलगी जोर जोरात आवाज करीत उसासे टाकायला लागे, दिनू मोठया मायेने तिला उचलून घेत असे व तिच्या बोलात आपले मोठे स्वर मिसळून तिलाही खेळवत असे .सरुने तयार केलेले अन्न तो मोठ्या कौतुकाने खाल्यावर, तीन वाजे पर्यंत पथारीवर गाढ झोपून जात असे .तीनला उठला कि मग परत आठ -नऊ वाजे पर्यंत दुकानात जाऊन, तो कामात रमलेला असे.आशी एकंदरीत दिनकररावांची दिनचर्या चालू होती.
आज जेवणाची सुट्टी झाल्यावर अण्णांनी दिनूच्या हातात एक चेक दिला आणि म्हणाले "दिनू ! हा पाच हजाराचा चेक आहे बघ.हे पैसे तेवढे बँकेतून काढून आण. पैसे व्यवस्थित मोजून घे, अन दुपारी कामावर आलास कि मला दे ," हे अण्णांचे नेहमीचेच सुट्टी झाल्या नंतरचे काम, दिनकररावांसाठी काढून ठेवलेलेच असायचे .दिनू तसाच चेक घेऊन ,जवळ असणाऱ्या सहकारी बँकेत गेला .आज पैसे काढण्या साठी बँकेत खूपच गर्दी होती. दिनूने आपल्या कडील चेक संबधीत क्लार्क कडे दिला व टोकन घेऊन तो नंबराच्या प्रतीक्षेत बाजूला उभा राहिला .तब्बल अर्ध्या तासांनी त्याचा नंबर आला तसा तो लगबघीने खिडकी पाशी गेला व आतील कॅशियर बाईंच्या कडून त्याने पैसे घेतले . आज बँकेत इतकी गर्दी कि पैसे मोजण्या साठी त्याला कुठे जागाच ही दिसेना .त्यात हि अण्णांची अमानत ,कुणी पैसे मारले तर काय करणार .शक्य तो बँकेत पैसे चुकीचे देत नाहीत असा विचार करून त्याने सर्व पैसे खिशात घातले व घरी गेल्यावर मोजू, असा विचार करून त्याने सायकल वर टांग मारली व घरी आला.
जसा तो घरी आला, तसे त्याने खिशातले सर्व पैसे बाहेर काढले व मोजून पाहिले .पाहातो तर काय !!! ते दहा हजार रुपये होते . त्याने परत परत पैसे मोजून पाहीले, तर ते दहा हजार रुपयेच होते. अरे !! अण्णांनी तर मला पाच हजार रुपये काढून आणायला सांगितले होते आणि हे दहा हजार कुठून आले. कांहीतरी घोटाळा झाल्याचे त्याच्या लक्षात आले .त्या कॅशियर बाईने चुकून मला पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये तर दिले नसतील ना !! जेवण करून नंतर बघूया असा विचार करून त्याने आपले जेवण कसेबसे आटपले व नेहमी प्रमाणे बाजूच्या पथारीवर तो विचार करीत पहुडला. त्याचे गोंधळलेले मन त्याला अनेक प्रश्न विचारु लागले.त्यातील एक मन म्हणू लगले की, हे जादा आलेले पैसे, आपण त्या बाईना परत नेहुन द्यावे लगणार. तसे दुसरे मन म्हणू लागले की, तसे बघितले तर पैसे मोजून देण्याची जबाबदारी हि त्या कॅशियर बाईचीच आहे .मी थोडेच तिला दहा हजार रुपये दे म्हणून सांगितले होते .आमच जरा काय चुकू दे, हे साहेब लोक,हे चालणार नाही, हे बरोबर नाही, इथे नविन सही आणा ,पुढल्या खेपे पासून पैसे देणार नाही, अशा अनेक गोष्टी तुम्हाला सुनावतील. बर त्यांना पगारतरी काय कमी असतो होय .आण्णाच्या दुकानात सकाळी आठ वाजल्या पासून रात्री नऊ वाजे पर्यंत राबतोय, पण एक दिवस खाडा केला, तर आण्णा एक दिवसाचा पगार कट करुन घेतोय आणि त्याच्या घरातली काम वेगळीच.त्याच्या मनात चांगलेच काहूर माजले. "दिनकर राव, हि संधी आता सोडू नकोस.यात तुझ्यावर कांही पण आरोप येणार नाही .आता अस कर, आण्णाला पाच हजारच दे . अन मग बघू पुढे काय होईल ते".आता मात्र ह्या विचाराची पक्की उचल दिनूच्या मनात चांगलीच रुजली होती. एकाच मानवी देहात राहणारी हि दोन भिन्न मने, मोठ मोठ्या व्यक्तीना देखील काबूत ठेवता येत नाहीत . आनेक जग जिंकणाऱ्या महत्वकांक्षी सम्राटांनचा देखील, याच दोन विसंगत मना मुळे पराजय पत्करावा लागला, मग दिनू तरी कोण ? सागरातील एक छोटा बिंदू .रोज घरी आल्यावर आपल्या लहान मुली बरोबर खेळणारा हा गडी, रोज पत्नी बरोबर दोन चार गप्पा गोष्टी करणारा हा दिनू , आज हे सगळच मात्र विसरून गेला होता . महत्वाचे म्ह्णजे ह्या सर्व घटना त्याने आपल्या बायको पासून लपवून ठेवल्या होत्या . "आहो !! आज काय कामावर जाणार आहे कि नाही? घड्याळात बघा, चांगले साडे चार वाजलेत . सरूने त्याला चांगलेच खडसावले तसे तो लगबगीने उठला .त्याने एका खिशात पाच हजार रुपये अन दुसऱ्या खिशात पाच हजार रुपये ठेवले व तो सायकल वरुन दुकाना कडे निघाला .
विचार करीत, तो रस्त्या वरून जात असताना, एका चारचाकी गाडिवाल्याने दिनूच्या सायकलच्या मागे जोरात ब्रेक मारला ." अहो ,भाऊ ! सायकल जरा व्यवस्थित चालावा कि.जोरात ब्रेक मारला नसता तर सरळ गाडी खाली आला असता". त्या चारचाकी वाल्याच्या बरळण्या कडे दुर्लक्ष करून त्याने आपली सायकल बाजूला घेतली . आपली मनस्थिती बरोबर नाही हे दिनूच्या लक्षात आल्यावर ,त्याने सायकलचे हँडल हातात धरले व तो पायी चालत, दुकानात पोहचला .
"आरे दिन्या,आज काय बँकेत फार गर्दी होती वाटत ? पैसे काढून आणलास कि नाही ?" असे आण्णा म्हणताच दिनूने पटकन खिशातले पाच हजार रुपये काढून आण्णांच्या हातावर ठेवले व साशंक नजरेने तो आण्णांच्या कडे पाहू लागला . आण्णांनी ते पैसे मोजून पहिले व बरोबर आहेत म्हणत त्यांनी ते पैसे गल्ल्यात ठेऊन दिले .दिनकर रावांनी आता आपल्या नेहमीच्या कामाला सुरवात केली .एक दोन गिराईक दुकानात आधीच आली होती .त्यांना हवी असणारी भांडी दाखविण्यास दिनूने सुरवात केली .आज त्याच चित्त कांही कामात लागेना .कधी एकदा घड्याळात आठ वाजतात आणि मी दुकान बंद करुन घरी जातो, असे त्याला झाले होते .
घरी येताना वाटेत लागणाऱ्या बिर्याणीच्या गाड्या मधून बिर्याणीचा घमघमाट वास सुटलेला होता. रोज गाड्या सभोवती बिर्याणी खाणाऱ्या लोंकाची गर्दी बघून, आपण देखील बिर्याणी खावी, असे त्याला खूप वेळेस वाटायचे, पण खिशाला परवडायला नको !! . पण आता काय, आपल्या कडे पैसे आहेत ,मग परवडायची भाषा कशाला. दिनूने चांगला दोन प्लेट बिर्याणी वर ताव मारला .घरी आला तसे सरूने आधीच त्याच्या साठी जेवण तयार करून ठेवले होते .आज बिर्याणीवर ताव मारल्याने ,आपली तब्येत बरी नाही .आपण आज काय जेवणार नाही, अशी थाप त्याने सरूला मारली .असे कधी होत नाही, असा विचार करून सरूला देखील याचे आश्चर्य वाटले .बाजूला झोपलेले बाळ आपले वडील आले आहेत या आनंदाने त्याच्या कडे पाहून जोर जोरात हात पाय हलवू लागले, दिनूचे मात्र लक्ष त्याच्या कडे जाईना .या फुकटच्या मिळालेल्या पैशाचे आपण काय करायवे हाच विचार त्याला सतावू लागला .या पैशातून आपण बायकोला आणि मुलीला घेऊन आपल्या गावच्या देवीला जाऊन येऊ या काय? .नको रे बाबा! हा तर लबाडीचा पैसा ,देवा धर्माला कसा काय खर्च करणार. नाहीतर सरळ आपण सरूला एखादा जिन्नस करावा, पण बँक वाले उद्ध्या घरी आले अन पैसे मागू लागले, तर नको ते लचांड आपल्या मागे लागायच. अनेक विचारांचे ढग त्याच्या मनात जमू लागले. .आती विचाराने त्याचा जीव व्याकुळ झाला .रात्र भर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही . डोळे जड झाले होते.आज कामावरच जाऊ नये ,असे सारखे त्याला वाटू लागले पण कसे बसे आवरुन तो कामावर गेला .
आज दुपारच्या सुट्टी नंतर, अण्णांनी त्याला जवळ बोलवून घेतले व विचारले " अरे ,दिनू , आज बँकेतून कुठल्या तरी माणसाचा फोन आला होता बघ .चुकून जादा पैसे तुमच्या कडे आले आहेत का ? असे कांहीतरी विचारीत होता .आपल्या चेकच्या मागे, जादा नोटा दिल्या असल्याचे लिहले आहे ,असे कांही तरी तो सांगत होता .मी मात्र त्यांला ठाम पणे सांगून टाकले .असे कांहीही जादा पैसे आम्हाला मिळाले नाही आहेत .तसे कांही असते तर आम्हच्या माणसाने मला लगेचच जादा पैसे आणून दिले असते" . हे ऐकल्यावर दिनुच चेहरा एकदम कळा ठिक्कर पडला .हि कांहीतरी संकटाची घंटी आपल्या साठी वाजली आहे ,हे त्याच्या लक्षात आले .अण्णांचे नजर चुकवून तो कांहीही न बोलता कामाला लागला . त्या नंतर अण्णांच्या टेबलावरचा फोन थोडा देखील वाजला कि ,दिनूच्या हृदयाचा ठोका चुकायचा आणि अण्णांचे संभाषण जसे चालू होत असे, तसे ते आपल्या कडे पाहत तर नाहीत ना , याची तो खात्री करून घेत असे . दर वेळी फ़ोन वाजला कि तो बँकेतूनच तर आला नाही ना आसे त्याला उगीचच वाटायचे. फार चिंतीत अवस्थेतून दिनू रात्री घरी परत आला ,सरूने पुढे वाढलेले अन्न त्याने कसेबसे खाल्ले व स्वतःचे शरीर अंथरुणावर झोकून दिले .काल झालेल्या जागरणा मुळे त्याला कधी डोळा लागला हे कळालेच नाही .
" आहो साहेब ,हा सरळ पणाने कबूल होणार नाही ,याच्या घराची चांगली झडती घ्या, मगच कळेल याने पैसे कुठे लपवून ठेवले आहेत ते .नाहीतर दोन काठ्यांचे तडाखे पार्श्वभागावार बसले कि मग बघा ,कसा पोपट सारखा बोलेल;. मुकाट्याने पैश्याच काय केलेस ते सांग, नाहीतर आमच्याशी गाठ आहे" असे म्हणत एका पोलिसाने दिनूच्या कॉलरला हात घातला व त्याला घराच्या बाहेर ओढू लागले. तसा पोलिसांना घाबरून दिनू " नाहीss नाहीss ,सांगतो सांगतो, म्हणत पोलिसांच्या समोर मोठ्याने रडू लागला व जोर जोरात ओरडत झोपेतून जागा झाला .त्याला दरदरून घाम फुटला होता . त्याच्या ह्या ओरडण्याने, सरू देखील घाबरून उठली .लहान बाळ त्याच्या या दंग्या मुळे जोर जोरात रडू लागले . सरूने बाळाला पटकन जवळ घेतले व दिनूला पिण्यासाठी पाणी आणून दिले .हे सर्व आपण झोपेतच बडबडत होतो, ह्याची त्याला आता जाणीव झाली होती ." धनी दोन दिवस म्या बघतेय ,तुमच्या ह्या वागण्यात कांहीतरी खोट वाटती .काय झालं ते मला खर खर सांगा, अन हे रडण आधी थांबवा बघू . आता मात्र दिनूला आपल्या मनातले पाप बायकोला सांगितल्या शिवाय गत्यंतर नव्हते . त्याने झालेला सर्व प्रकार सरूला सांगून टाकला व तो खाली मुंड्डी घालून रडू लागला .
"धनी, आपण गरीब जरूर असू ,पण आपल्या आनंदी संसाराला, या पापाच्या पैश्याची काय बी गरज नाही .आपण दोघ नवरा बायको आपल्या प्रपंच्या साठी आणखीन जादा काम करू अन पैसे मिळवू, मात्र या विषारी मोहात, तुम्ही अडकू नका .उद्याच्या उद्या सकाळी जाऊन त्या बँकवाल्याचे पैसे परत करा, अन या आजारातून मुक्त व्हा बघू " त्यालाही सुरुच म्हण एकदम पटल. तिच्या मांडीवर झोपलेले बाळ त्याच्या कडे घाबरून पाहत होते .अशा अवस्थेतील आपला बाप, त्याने या पूर्वी कधीच पहिला नव्हता .दिनूने पटकन त्याला उचलले अन आपल्या उराशी कवटाळले.
💬 प्रतिसाद
(4)
प
पद्मावति
Fri, 02/09/2018 - 10:56
नवीन
कथा आवडली.
- Log in or register to post comments
श
शलभ
Fri, 02/09/2018 - 11:24
नवीन
छान आहे कथा.
- Log in or register to post comments
J
Jayant Naik
Sat, 02/10/2018 - 05:40
नवीन
मी सुध्दा शिकाऊ कथालेखक आहे. अभ्यास म्हणून आणि आवड म्हणून कथा वाचतो. तुमची कथा सुंदर आहे. असेच लिहीत राहा .
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Sat, 02/10/2018 - 17:39
नवीन
आवडल लेखन तुमच. लिहीत रहा.
- Log in or register to post comments