आपल्यातला कुणीही मी
आपल्यातला कुणीही मी
कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.
अन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.
आदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही.
जगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का?
मी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात मूठभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय? जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.
असो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का?
💬 प्रतिसाद
(7)
ज
ज्योति अळवणी
Fri, 12/22/2017 - 21:05
नवीन
प्रयोजन नाही समजले. असो!
- Log in or register to post comments
च
चंद्रकांत
Sun, 12/31/2017 - 18:23
नवीन
आभार!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sat, 12/23/2017 - 03:42
नवीन
काही सुंदर वाक्यांची पेरणी करून वाचनीय झालेला आहे.
Sandy
- Log in or register to post comments
च
चंद्रकांत
Sun, 12/31/2017 - 18:26
नवीन
आभार!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/26/2017 - 06:18
नवीन
लेख आवडला.
- Log in or register to post comments
च
चंद्रकांत
Sun, 12/31/2017 - 18:24
नवीन
आभार!
- Log in or register to post comments
च
चंद्रकांत
Sun, 12/31/2017 - 18:25
नवीन
आभार!
- Log in or register to post comments