पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ?
मी कविंना विचारले की न्यूनगंड असू नये असा काही बोध अभिप्रेत आहे का ? संवादातून लक्षात आले की कविच्या बाल कवितेचा उद्देश बोध नव्हे केवळ रंजन होता. तरीही मला बोध विषयक प्रश्न पडलाच आणि त्याला वेगळे कारण म्हणजे दिवाकरांची (१८८९-१९३१) एक हि नाट्यछटा ज्यात पशुपक्षांमधील भेद ईश्वर निर्मित वास्तव आहे प्रत्येक पशु पक्षाचा काही उत्तम गूण आहे असे दाखवत मानवातील जातीभेदाचे सरळ सरळ समर्थन आहे - त्यांच्या त्या नाट्यछटेवरची टिका कधी वाचनात नाही आली. इतर पशुपक्षातील भेदावरून मानवातील जन्माधारीत विषमतेचे समर्थन वस्तुतः तार्कीक उणीवेचे ठरते.
मी उल्लेखीलेल्या प्रस्तुत बालरंजन कवितेत वर्णित पशुपक्षांच्या भेदाचा जातीवादाच्या समर्थनार्थ अनाहुत वापर होण्याची शक्यता जातीभेद न मानणार्या व्यक्तीसाठी खटकणरी असू शकते. म्हणून मी कवि महोदयांना त्यांच्या कविते मागची भूमिका विचारून घेतली. तर कवितेतील त्या त्या पशुपक्षांना त्यांच्या सतत तेच ते करण्याचा कंटाळा आला आहे म्हणून ही रंजनात्मक बाल कविता असे ते म्हणाले. पशुपक्षातील नैसर्गीक भेदावरून जन्मजात जातीवाद लादू इच्छिणार्या भूमिकेला, न कळत छेद देणारी कविची भूमिका मला रूचली. कि एखादा प्राणी भले त्याच्या वैशिष्ट्यात उत्कृष्ट असेल पण त्याला त्याचा कंटाळा येऊन दुसरे काही करावे वाटू शकते. मी भले एखाद्या गुणात भले राजहंस असेल पण त्या भूमिके पेक्षा मला दुय्यम जमणरी असेल पण माझे मन बगळ्याची दुसरी भूमिका करावी म्हणते तर तसे करण्यचा मला अधिकार असला पाहीजे. आता मोडकळीस चाललेली जन्माधारीत जात व्यवस्था मनुष्यांचा नेमका हा अधिकार नाकारू पहात होती सोबत सन्मानही नाकारत होती आणि अशास्त्रिय होती. स्वगुणांनी आणि कर्तव्यांनी झळाळून निघावे हे ठीक पण तुम्हाला हवे ते करता आले नाही की कतृत्व दाखवण्यासाठी मनही लावता येत नाही. पण दुसरेच करत राहीलो तर स्वतःतील सर्वोत्तम गुणांना न्याय देणेही होत नाही.
मी व्यक्तीशः गीता वाचली तशी ज्ञानेश्वरी चाळली पण वाचलेली म्हणता येत नाही. गीतेची बाकीची उत्तमता स्विकारली तरी चातुर्वण्याचे समर्थन खटकणारे आणि अशास्त्रिय वाटत रहाते. त्या बाबत उर्वरीत ज्ञानेश्वरीतील नेमकी भूमिका मला ठाऊक नाही. पण पसायदान उदात्तता गाठताना या तिढ्या पासून स्वतःला वेगळे करते. स्व-धर्म शब्दात आधुनिक रिलीजन हा अर्थ अभिप्रेत नाही तर तत्कालीन चांगले गूण आणि कर्तव्य हा गृहीत धरला तर 'स्वधर्म सुर्ये पाहो' ही शुभेच्छा ज्ञानेश्वर माऊली देतातच पण ते तिथे लादत नाहीत त्याच्या सोबतची पसायदानातील ओळ 'जो जे वांछिल तो ते लाहो' ज्याला जे हवे त्याला ते मिळू दे असेही म्हणत समतोल साधते. आणि सबंध प्राणीजातीसाठी. म्हणजे एखाद्याला सद्य कामाचा कंटाळा आला असेल नवे काम नवे शिक्षण मिळवायचे असेल तर पसायदान त्यासाठी प्रोत्साहन देते . आणि पसायदानातील हा समतोल वेगळा आणि उल्लेखनीय वाटतो. त्या बालकवितेबद्दल विचार करताना पसायदानातील आठवलेल्या दोन ओळी समाधान देऊन गेल्या. इति लेखन सिमा
*दिवाकर (१८८९-१९३१)
* पसायदान
#(कवि महोदयांशी व्यनिने निरोप पाठवला तर, कदाचित, मी चर्चा करु इच्छित असलेला छिद्रान्वेषणात त्यांना रस नसल्यामुळे किंवा सवड नसल्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स आला नाही म्हणून त्यांच्या कवितेच्या ओळी आणि नाव देण्याचे टाळले आहे)
💬 प्रतिसाद
(4)
प
पैसा
Sat, 11/18/2017 - 16:23
नवीन
पसायदान ही वैश्विक प्रार्थना म्हणायला हरकत नाही. त्या काळातल्या संतांच्या गोष्टी पाहिल्या तर त्यांनी जातीभेद मोडीत काढला होता असेच दिसून येते.
- Log in or register to post comments
स
समयांत
गुरुवार, 11/30/2017 - 08:18
नवीन
फार उत्तम विश्लेषण. पसायदानातील ओळी जातिभेदाविरुद्ध प्रत्यक्ष सामोरे गेले नसले तरी, व्यापक अर्थाने आजच्या कालाहून पुढे त्यात प्रकटन झाले आहे. खरंच 'जो जे वांछील तो ते लाहो' हे तरी अजून स्वप्नवत वाटतं आजही!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 12/02/2017 - 13:48
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 12/01/2017 - 11:50
नवीन
'जो जे वांछील तो ते लाहो' ..
तसेच
'जो जे वांछील तो ते/त्यावेळी खाओ प्राणिजात' ...
- Log in or register to post comments