Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शिवमानसपूजा

श
शरद
Fri, 11/10/2017 - 02:31
💬 7 प्रतिसाद
शिवमानसपूजा आपण घरी देवाची पूजा करतो तेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे देवाला अंघोळ घालतो, गंध लावतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो, घंटा वाजवतो एखाद दुसरे स्तोत्र म्हणतो. व हे सर्व आपल्या सोयिस्कर वेळेनुसार.करतो. खरी पंचाईत होते जेव्हा आपण सहली निमित्त बाहेरगावी जातो व एखाद्या देवळात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा. तेथे ह्यापैकी काहीच शक्य नसते. अशा वेळी काय करावे ? आद्य शंकराचार्यांनी तुमची सोय करून ठेवली आहे. मानसपूजा. ईश्वराला बाह्योपचाराची अपेक्षा नाही. हे सर्व तुम्ही केवळ मनातल्या मनातही करू शकता. क्से ? बघा. रत्नै:कल्पितमासनं हिमजलै: स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदांकितं चन्दनम् ! जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च् धूपं तथा दीपं देव् दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् !!१ !! हे देवा, मी माझ्या कल्पनेनेच तुझ्यासाठी रत्नक्जचित आसन मांडले आहे. थंडगार पाण्याने स्नान घालतो आहे नानाविध रत्नांनीसजवलेले दिव्य वस्त्र हे पशुपति, तुझ्यासाठी आनले आहे. कस्तूरीगंधयुक्त चंदन,जुई, चाफा, बेलाचे पान यांनी गुंफलेला फुलांचा हार, धूप, दीप, हे सर्व पूजासाहित्य मी अगदी मनापासून कल्पनेनेच आणिले आहे. हे देवा, त्याचा स्विकार कर. सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे धृतं पायसम् भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् ! शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बुलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरू !!२!! नवरत्नजडित असे हे सोन्याचे ताट, त्यात तूप घातलेली खीर, दुधादह्यासहित बनवलेले पंचामृत, केळे, सरबत तू खाव्या म्हणून, नाना प्रकारच्या भाज्या आणि कापराने सुगंधित केलेले पाणीसुद्धा आणिले आहे. मी अतिशय भक्तीने स्वत: तयार केलेला हा विडा, हे देवा, तू ग्रहण कर. छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदंकाहलकला गीतं च नृत्यं तथा ! साष्टांगं प्रणति:: स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो !!३!! तुझ्या डोक्यावर छत्र, दोन्ही बाजूला ढलणार्‍या चवर्‍या, पंखा, चकचकित आरसा, वीणा, मृदंग, भेरी यांची साथ असलेले तुझे भजन आणि नृत्य, अनेक प्रकारची तुझी स्तोत्रे, तुला घातलेला दंडवत, हे सारे ज्यांत आहे अशी ही मी मनापासून सादर केलेली काल्पनिक पूजा, देवा, तू तिचा स्विकार कर. आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति: ! संचार: पदयो: प्रदिक्षणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् !!४!!: अरे देवा, तूच तर माझा आत्मा, माझी बुद्धी म्हणजे माता पार्वती, माझे प्राण म्हणजे तुझे सोवती आहेत तर माझे शरीर हेच तुझे घर आहे. माझ्या इंद्रियांनी घेतलेले सारे भोग ही तुझी पूजा तर माझी निद्रा ही तुझ्यासाठी लावलेली समाधीच ! मी जिथे जिथे जातो तो माझा संचार ही तुझी प्रदक्षिणा होवो. माझी वाणी हे तुझे स्तवन व माझे प्रत्येक कृत्य तुझीच आराधना आहे रे ! करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ! विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो !!५!! माझे हात, पाय, वाणी, कान, डोळे यांच्याकडून, शरीराने वा मनाने केलेल्या कुठल्याही कृतीतून, कळत नकळत, काही अपराध घडला असेल तर हे दयानिधे, मला क्षमा कर. हे करुणासागर शंभो, महादेवा, आपला जयजयकार ! श्रीमत् शंकराचार्य या निष्कांचन संन्याशाने आपल्या आराध्य देवतेची पूजा बांधली ती सम्राटाला साजेल अशी व आपले भाग्य हे की ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना उपलब्धही करून दिली मानसपूजा आपण मनातल्या मनात म्हणू शकता वा आजूबाजूला थोडी गर्दी असेल तर मोठ्यानेही म्हणू शकता. लोक आदराने हा भक्त संस्कृतचा पंडित आहे अशा भावनेने आपल्याकडे पाहतील. ते सोडा. महत्वाचे हे की थोड्या वेळात, कुठलाही वशिला नसतांनाही, बिनखर्चात आपण पूजा केयाचे समाधान मिळवू शकता. आणि प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पूजा असल्याने ती नक्कीच ईश्वराला पोचत असणार. ( हे झाले शिवमानसपूजेसंबंधी. आता श्रीमत् शंकराचार्यांची क्षमा मागून समजा तुम्ही विष्णूच्या मंदिरात असाल तर ? तेथे शिवमानसपूजा म्हणणे थोडे अनुचित वाटेल. मग असे करावेव कां ? पहिल्या श्लोकात "पशुपते" च्या ठिकाणी "रमापते ", चौथ्या श्लोकात ’गिरिजा" च्या ऐवजी "धनदा";"शंभो" ऐवजी "विष्णो" व शेवटच्या श्लोकात "श्रीमहादेव शंभो":ऐवजी "श्रीरमावर विष्णो" असा थोडासा फरक करून " विष्णूमानसपूजा " म्हणावी ?) शरद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2996 views

💬 प्रतिसाद (7)
आ
आनन्दा Fri, 11/10/2017 - 02:46 नवीन
कस्तूरीगंधयुक्त चंदन,जुई, चाफा, बेलाचे पान यांनी गुंफलेला फुलांचा हार, धूप, दीप, हे सर्व पूजासाहित्य मी अगदी मनापासून कल्पनेनेच आणिले आहे. हे देवा, त्याचा स्विकार कर.
याचे काय? बाकी शंकराचार्यांनी विष्णुमानसपूजा रचली नाहीये? ते तर शैव वैष्णव ऐक्याचे उद्गाते ना?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/10/2017 - 05:28 नवीन
आचार्यांच्या रचना खूप लयबद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Fri, 11/10/2017 - 05:38 नवीन
वरची सर्वशिवमानसपूजा आद्यशंकराचार्यांची आहे असे तुम्ही गृहीत धरलेले आहे. त्याला काही आधार आहे काय? आद्यशंकराचार्यांपासून आजपर्यंत ४ प्रमुख पीठेच विचारात घेतली तर काहीशे शंकराचार्य होऊन गेले आहेत. त्यापैकी कोणाचीहि ही कृति असू शकेल. कोणीतरी माहितीअभावी अथवा पूज्यभावनेतून त्याला आद्यशंकराचार्यांचे नाव चिकटवले आणि ते 'गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः' ह्या नियामानुसार चालत राहिले आहे अशीहि शक्यता डोळ्याआड करता येत नाही. संस्कृत पद्यनिर्मितिकारांची ही सवयहि प्रख्यात आहे की आपलेच पद्य कोणातरी प्रसिद्ध लेखकाच्या नावाने खपवायचे. तेहि येथे घडले असेल ही शक्यता दृष्टीआड करता येत नाही. अन्यथा 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः' ह्या अद्वैताचा आणि ज्ञानमार्गाचा आयुष्यभर प्रचार करणारे शंकराचार्य सगुण मूर्तींची पूजाअर्चा करण्यात आपली बुद्धि वापरतील हे पटायला अवघड वाटते. अशाच प्रकारचे विचार दिवंगत प्राध्यापक कृ.श्रीअर्जुनवाडकर ह्यांनी 'PANEGYRICS ON ŚIVA GROUP ASCRIBED TO SHANKARA: A CRITIAL STUDY' ह्या आपल्या निबंधामध्ये व्यक्त केले आहेत. हा निबंध भांडारकर संस्थेच्या नितकालिकाच्या ८५व्या संग्रहामध्ये (२००४), तसेच http://www.jstor.org/stable/41691944 येथे पाहता येईल.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 11/10/2017 - 06:19 नवीन
आचार्य ते रमण महर्षी सगळेच अद्वैत मताचा आणि ज्ञानमार्गाचा आयुष्यभर प्रचार करणारे सत्पुरूष इष्टदैवत प्रयोग आणि सगुण भक्तीचे (चित्तशुद्धीचा राजमार्ग या स्वरूपात) उघडपणे प्रतिपादन करताना दिसतात. भक्तीला ज्ञानमाता मानताना दिसतात. या गोष्टी त्यांच्या मूळ तत्वज्ञानाच्या विरोधात नसून पूरक आहेत अशा प्रकारचा त्यांचा दृष्टीकोन दिसतो. या संदर्भात डेव्हिड गॉडमन यांचा एक लेख वाचनीय आहे: https://ramana-maharshi.weebly.com/the-unity-of-surrender-and-self-enquiry.html
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 11/10/2017 - 08:55 नवीन
चांगला लेख चांगली चर्चा
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 11/11/2017 - 08:08 नवीन
मी काय म्हणतो, हिंदुत्वाची इतकी सुंदर कन्सेप्ट आपण इतर ठिकाणी आपल्याच धर्मात लागू करू शकू का? म्हणजे साक्षात सांबास जर मानसपूजा मंजूर असेल तर आपण यज्ञकाम, हवन वगैरे करताना 'मानस हवी' अर्पण करू शकू का? म्हणजे 'हे देवा....... मी सोबत शुद्ध तूप, गोरस, गोमय, पंचामृत वगैरे कल्पनेतच आणून वाहतोय, त्याचं हवी अर्पण करतोय, त्याचा तू स्वीकार कर' वगैरे असं? किंवा लग्नात मुंजीत, अक्षता म्हणूज धान्य नासाडी करण्यापेक्षा किंवा फुले कुस्करण्यापेक्षा जर मंगळाष्टकांच्या अगोदर गुरुजींनी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जर देवास आवाहन करून 'मी उत्तम हळद कुंकू मंडित अक्षता कल्पनेत आणून वऱ्हाडी मंडळीस वाटल्या आहेत, अन ते तुला त्या अर्पण करीत आहेत' असं म्हणून वऱ्हाडी मंडळीला फक्त अक्षता फेकायची ऍक्शन करायला सांगितले तर ते शास्त्रसंमत असेल का? म्हणजे शंकराचार्यांनी सुचवलेला मार्ग म्हणजे असावं असं आपलं माझं म्हणणं...तुमचं मत समजून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 11/15/2017 - 10:44 नवीन
.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा