आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा, इ इ इ मानवी संकल्पनांवर होणारे वादविवाद
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा.
वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून...
(अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्या बेरकी माणसाने त्याला फसवले
किंवा
(आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्या बेरकी माणसाने त्याला फसवले
असाच जास्त दिसतो.
याप्रकारे, असुरक्षित मनस्थिती असलेल्या एखाद्या भ्रष्ट नास्तिक माणसालाही दुसर्या एखाद्या चलाख आस्तिक/नास्तिक माणसाने फसवणे सहज शक्य आहे, नाही का? त्याचा धर्म अथवा श्रद्धा यांच्याशी ओढून ताणून संबंध लावल्यासारखेच दिसत आहे. धर्म किंवा श्रद्धा यांच्याबद्दल वेगवेगळी मते असणे योग्य आहे पण अयोग्य प्रकारे त्यांचे समर्थन अथव खंडन करणे नक्कीच निषिद्ध असते.
या लेखातला, लेखकाचा मूळ हेतू योग्य आहे असे जमेस धरूनही, लेखातच दिलेल्या मजकूरावरून त्या उदाहरणामध्ये...
(अ) त्या साधूला कोणी धर्ममार्तंड समजणे किंवा तसा दावा करणे,
(आ) फसलेली व्यक्ती धार्मिक व्यक्ती आहे आणि एक लखपती उद्योजक असून तिने केवळ अंधश्रद्धेने त्या साधूला पैसे दिले असे समजणे,
(इ) आणि त्या दोघांमधला व्यवहार केवळ धर्मिक/अंध-श्रद्धेवर अवलंबून झाला होता, असे समजणे
हे काही फार मोठ्या विचारशक्तीचे लक्षण आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल, यात शंका नाही ! अशी बाळबोध गृहितके धरून पोलिस जर अश्या केसेस सोडवायला लागले तर 'कालचा गोंधळ बरा होता' अशी परिस्थिती निर्माण होईल ! मला वाटत नाही की तसे होईल !
***************
माणसात आणि (आपल्याला सर्वात जवळ असलेल्या चिंपॅझीसह) इतर सर्व प्राण्यांत एक फार महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे... संकल्पना (किंवा साध्या शब्दांत आपल्या मनातली गोष्ट दुसर्याला पटेल अश्या प्रकारे) सांगण्याची पात्रता... याला साध्या इंग्लिशमध्ये "स्टोरी टेलिंग" असेही म्हणतात. माणसांचा विशेष समजल्या जाणार्या आस्तिक/नास्तिक, देव/धर्म/जात, राज्य/राष्ट्र/संस्था या सर्व संकल्पना आहेत आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेले नियम, भौगिलिक सीमारेखा, ध्वज, राष्ट्र/संस्था यांच्या घटना (constitution)/ प्रघात/मिशन/व्हिजन/पॉलिसी/प्रोसिजर, इ इ इ सर्वच संकल्पना आहेत... हे सर्व इतर प्राण्यांमध्ये शक्य नाही, फक्त माणसांतच शक्य असते. त्याच स्टोरी टेलिंगच्या बळावर माणसे एकत्र आणता येतात आणि त्यांच्याकरवी काम करवून घेता येते, केले गेले, केले जात आहे आणि भविष्यातही केले जाईल. या संकल्पनांच्या अभावात माणूस आणि इतर प्राण्यांतला फरक खूपच कमी होईल. मुख्य म्हणजे, या संकल्पना वेळेबरोबर बदलत गेलेल्या आहेत... विकसित होत आहेत.
गंमत अशी आहे की, (वर्तमानपत्र किंवा मिपासारख्या इतर) माध्यमांत मानवी व्यवहारसंबंधी गंभीरपणे लेख लिहितानासुद्धा...
(अ) मानवी व्यवहारांसंबंधीचे (ह्युमन बिहेवियर) शास्त्रिय ज्ञान असणे आवश्यक असते
किंवा
(आ) सबळ पुरावे (केवळ आपल्याला "खरे वाटणारे" आणि म्हणून ठासून सांगितलेले ठोकाताळे नव्हे) आवश्यक असतात
आणि विशेषत:
(इ) जनमानसात रुजलेल्या बर्यावाईट समजूती दूर करताना त्यांच्या जागी भौतिक आणि मानसिक अश्या दोन्ही स्तरांवर परिणामकारक ठरणारा पर्याय देणे आवश्यक असते, कारण, संकल्पनेच्या अभावात माणसाची अवस्था एका असुरक्षित गोंधळलेल्या प्राण्याप्रमाणे होते
हे तथाकथित विचारवंत विसरतात आणि केवळ वादविवादाचे धनी होतात. म्हणजे त्याचा प्रयत्न फायदेशीर ठरण्याऐवजी उलटतो (counter productive होतो).
त्यातही, सर्वात महत्वाचे म्हणजे, अयोग्य समजूती दूर करताना, भावनेच्या भरात वाहून जात, बळेच ओढून ताणून सत्याचा विपर्यास करणारी उदाहरणे देण्याने, आपणच आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करत असतो आणि आपल्या विचारशक्तीबद्दल दुसर्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत असतो (व ही कृती अत्यंत अशास्त्रिय असते) हे सहजपणे विसरले जाते.
आपल्याला शास्त्रिय आणि समतोल विचाराचा समजाणार्याने, प्रथम सर्व तथ्यांचे सर्व दिशांनी प्रामाणिकपणे विष्लेशण करून मगच त्यावरून निष्कर्ष काढणे अपेक्षित असते. प्रथम निष्कर्ष ठरवायचा आणि मग तथ्यांना त्याच्या दिशेने हवे तसे वाकवायचे हे निषिद्ध असते... तसे करण्याला फारतर सोईस्कर राजकारण म्हणता येईल, शास्त्रिय विचार नक्कीच नव्हे आणि समाजकारण तर नव्हेच नव्हे. पूर्णविराम.
***************
मी स्वतःला अज्ञेयवादी समजतो. मला स्वतःला यनावालांसारख्या समाजसुधारणेचे व्रत घेतले आहे असा दावा करणार्या व्यक्तींबद्दल बर्यापैकी आदर आहे आणि मी सुद्धा माझ्या वकुबाप्रमाणे ते जमेल तसे करतो. मात्र, तसे करताना, चुकीची उदाहरणे / ओढून-ताणून बनवलेल्या कथा / एखाद्या प्रसंगाचे स्वतःला सोईस्कर असे ओढून-ताणून बनविलेले विश्लेषण, इत्यादी कटाक्षाने टाळतो. कारण, तसे केल्याने, केवळ आस्तिकच काय पण अशिक्षित मंडळींनाही त्यांच्यातला विसंवाद सहजपणे समजतो. सर्वसामान्य लोक बर्यापैकी हुशार असतात, ते तो विसंवाद सांगतिलच असे नाही, किंवा सांगायला गेले तर त्यांना शास्त्रिय पद्धतिने प्रतिवाद करता येईलच असे नाही. पण, त्यामुळे आपल्याला शिकविण्याचा आव आणणारी व्यक्ती भोंदू आहे असा त्यांचा ठाम (व योग्य) ग्रह होत जातो आणि त्यांचे स्वतःचे (कदाचित चुकीचे) मत अधिक पक्के होत जाते.
हे सर्व समजून-उमजून मगच आपले म्हणणे योग्य रितीने मांडणार्या व्यक्तीच आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतील. तसेही, चुकीच्या पद्धतीने केलेले शास्त्रिय कामाची अशास्त्रिय कामातच गणना केली जाईल. असे करण्याने, योग्य रितीने सामाजिक काम करणार्या इतर लोकांच्या कामावरही बोळा फिरविला जातो, ते वेगळेच.
मानवी संकल्पना आणि त्यांचे योग्य रितीने विष्लेशण करणारी शास्त्रे सद्या खूप विकसित झालेली आहेत आणि त्यांच्या कक्षा दिवसेदिवस विस्तारत आहेत. मानवी व सामाजिक व्यवहारांत आणि विकासात, मानसशास्त्र आणि मानवी संकल्पना यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा विचार न करता समाजाचा विकास करणे हे अंधारात दगड मारण्यापेक्षा फार वेगळे नाही. या वर्षाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार "behavioral economics" या विषयासंबंधिच्या संशोधनाबद्दल दिला गेला आहे, यावरून हे म्हणणे अधोरेखित व्हावे.
यासाठीच, आपल्या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी समाजसुधारणेचे व्रत घेतलेल्या व्यक्तींनी...
(अ) मानवी मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे
आणि
(आ) समाजसुधारणेच्या प्रयत्नांमध्ये वापरलेली साधने (उदाहरणे, इ) आणि विष्लेशणासाठी वापरलेली पद्धत, प्रामाणिक व शास्त्रिय असणे आवश्यक आहे
मानवी जीवनाचा विकास, मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीवर मानली गेलेली अनेक संशोधनपर पुस्तके व असंख्य शोधनिबंध आहेत. त्यातील, सर्वसामान्यांसाठी कळायला तुलनेने सोपी, रोचक भाषाशैलीत लिहिलेली व मला आवडलेल्या काही पुस्तकांची/लेखकांची नावे खाली देत आहे...
The Third Chimpanzee : Jared Diamond
The God Delusion : Richard Dawkins
The Extended Phenotype : Richard Dawkins
Selfish Gene : Richard Dawkins
The Blind Watchmaker : Richard Dawkins
The Greatest Show On Earth : Richard Dawkins
Unweaving the rainbow : Richard Dawkins
Sapiens, A brief history of Humankind : Yuval Noah Harari
हा विषय वाचायला-समजायला आयुष्य पुरे पडणार नाही... मात्र, वरच्या पुस्तकांपासून चांगली सुरुवात करता येईल.
यातील काही लेखकांच्या व्हिडिओ क्लिप्स यु ट्युबवर उपलब्ध आहेत... त्या बघणे ज्ञानार्जन करण्यास उपयोगी तर आहेतच पण त्यांत "आपले मत जडजंबाळ शास्त्रिय भाषा न वापरता... आणि मुख्य म्हणजे आपला गर्व व दुसर्याबद्दलचा तिरस्कार यांचे हिडिस प्रदर्शन न करता... प्रभावी पद्धतीने कसे मांडावे" याचा वस्तूपाठही बघायला मिळेल.
खरी समस्या यनावालांकडून दुखावले जाणे ही आहे??? खरे दु:ख खालीलप्रमाणे आहे हे ध्यानात येईल तो सुदिन असेल... १. (याच नव्हे तर त्यांच्या बहुतेक सर्व लेखनात) स्पष्ट असलेली अनेक उदाहरणे टाळून, त्याऐवजी चुकीची उदाहरणे वापरून व त्यांची ओढूनताणून केलेली चुकीची विश्लेषणे करून यनावाला सतत त्यांचा स्वतःचाच मूळ हेतू पराभूत करत आहेत आणि २. हे करण्याने, ते स्वतः कुचेष्टेचे धनी होत आहेत... हा योग्य नसला तरी त्यांचा स्वत:चा निर्णय असू शकतो पण ३. असे करताना, ते इतर साधनशुचिता पाळून प्रामाणिकपणे समाजबदल करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांच्या योग्य कामावरही बोळा फिरवित आहेत... हे योग्य नव्हे आहे... आणि याबाबत त्यांच्यावर टीका करण्याचा हक्क इतरांना जरूर आहे. हे वरचे सगळे यनावालांसारख्या प्राध्यापकाला पुरेपूर माहित असायला हवे आणि आहे असेच दिसते. कारण ते फक्त त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हजर होतात. पण, त्यांच्याशी सहमत नसलेल्या, पुरावे व विश्लेषणांसह असलेल्या प्रतिसांदांवर, एखादीही प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेत नाहीत... अशी एकेरी व एकदिशा कृती समाजसुधारणा करण्याचा दावा करणार्या व्यक्तीला परवडणारी नाही.आता पहा, मी आस्तिक आहे काय? तर आहे, पण त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन पण ठेवून जगात डोळसपणे वावरतो. आस्तिकतेमधील विसंगती मला चटकन दिसते, आणि तशीच नास्तिकतेमधील देखील. माझा बुद्धीवादी स्वभाव मला एकिकडे आस्तिकतेकडे ओढत असतो, तर बुद्धीअगम्य अनुभव आस्तिकतेकडे.यावरून, तुम्ही अज्ञेयवादी आहात ! :) माझ्या मते, मानवाच्या सद्य आकलनशक्तीचा "विकास आणि सीमा" पाहता, मानवाने अज्ञेयवादी असणेच जास्त योग्य, शास्त्रिय आणि प्रामाणिकपणाचे आहे.पण यनावाला दुसऱ्याला शिकवायचा दावा करंत नाहीयेत.१. ???!!! तुम्ही यनावालांचे "मूळ लेखन" आणि "मुख्यतः त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर असलेले त्यांचे अत्यंत कमी संख्येचे प्रतिसाद" परत नीट वाचणे जरुरीचे आहे, इतकेच सुचवतो ! त्याचबरोबर... २.(अ) आपल्या मताच्या खरेखोटेपणाबद्दल शास्त्रिय प्रक्रियेने मत बनवता आले पाहिजे आणि (आ) ते मत बनवताना वापरलेल्या साधनशुचितेची खात्री करण्याइतपत तरी पात्रता आणि प्रामाणिकपणा त्याच्यात असायला हवा...हे तर कोणत्याही माध्यमात लिहिणार्या कोणत्याही लेखकाने स्वतःची किमान पत राखण्यासाठी पाळले पाहिजे, नाही का ?