Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्तृत्व किर्लोस्करांचे (महाराष्ट्रदिन लेखमाला)

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Tue, 05/03/2016 - 03:38  ·  लेखमाला
लेखमाला
अर्थविश्व, व्यवसायविश्व आणि मराठी माणूस हा तसा पहायला गेला तर दशकानुदशके वादाचा मुद्दा आहे. बहुतांशवेळा ह्या चर्चेचा शेवट उसासे टाकून "मराठी माणूस म्हणजे ना, नोकरी करणार, सकाळी ९.०० ते ६.०० दुसर्‍यांच्या हाताखाली राबणार किंवा तिन्ही पाळ्यांमधे काम करुन दुसर्‍याचे खिसे भरणार" वगैरे छाप वाक्यांनी होत असतो. जितके वेळा ह्या काथ्याकुटामधे भाग घेतलाय तेवढ्या वेळा समोरच्याला खांद्याला धरुन गदागदा हलवून सांगावंसं वाटतं, "अरे मित्रा, तू खूपचं नकारात्मक आणि मराठी माणसाला कमी लेखणारं बोलतो आहेस. अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी शून्यातुन सुरु करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभा केलाय. कुठल्या जगात वावरतोयस बाबा तू?". समोरची असेल तर...असो. मराठी उद्योगविश्वामधे डी.एस.के. चे दीपक कुलकर्णी, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे आनंद देशपांडे, गरवारे इंडस्ट्रीजचे आबासाहेब गरवारे, चितळे बंधूंचे भास्कर गणेश चितळे, कोलते पाटील डेव्हलपर्सचे राजेश पाटील, सकाळ ग्रुपची सुरुवात करणारे ना.भि.परुळेकर, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, किर्लोस्कर ग्रुपचा पाया घालणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, केसरी टूर्सचे केसरी पाटील, वीणाज वर्ल्डच्या वीणा पाटील, कामत रेस्टॉरंट्सची साखळी वाले विठ्ठल कामत, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे दादासाहेब फाळके अशी किती नावं घेऊ आणि किती नको? सगळी आडनावं मराठीचं आहेत ना ही? ही यादी फक्तं प्रातिनिधिक स्वरुपाची आहे, ह्यापेक्षा कितीतरी जास्तं प्रमाणामधे मराठी लोकं यशस्वीपणे व्यवसायामधे आहेत. कठोर परिश्रम, अपयश आलं तरी खचून न जाता त्यावर यशस्वीपणे मात करणार्‍या ह्या सगळ्या लोकांचा प्रवास हा सोपा नक्कीचं नव्हता. ह्यामधलं एकन एक नाव स्वतंत्र लेखच नव्हे तर स्वतंत्र लेखमालेचा भाग आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त असणार्‍या ह्या लेखमालेमधे आज किर्लोस्कर ग्रुपची सुरुवात करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्करवाडीची उभारणी, ग्रुपची वाटचाल आणि अफाट कष्टांनी मिळवलेलं यश ह्यांची तोंडओळख करुन द्यायचा प्रयत्न करणार आहे. . आंतरजालावरून साभार लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जाहीर केलेलं पोस्टाचं तिकीट एल.के. किर्लोस्कर अर्थात लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ ला बेळगाव मध्ये झाला. सुरुवातीपासुन त्यांचा ओढा यांत्रिकी वस्तू (मेकॅनिझम्स), चित्रकला ह्यांच्याकडे होता. यांत्रिकी वस्तू सुट्ट्या भागांमधे उघडून (Dismantle करुन) ती वस्तू कशी काम करते ह्याविषयी ते सतत उद्योग करत असतं. अर्थात आधुनिक भाषेमधे रिव्हर्स इंजिनिअरिंग. चित्रकलेच्या प्रेमापोटी वडिलांचा विरोध पत्करुन त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स ला प्रवेशही घेतला होता. त्यासाठी त्यांचे वडील बंधू रामण्णा ह्यांनी मदत केली होती. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधे दोन वर्षं काढल्यानंतर त्यांना काही प्रमाणात रंगांधळेपणा (Partial Color blindness) असल्याची बाब लक्षात आली आणि दुर्दैवानी त्यांना जे.जे. मधलं चित्रकलेचं शिक्षण सोडावं लागलं. खचून न जाता त्यांनी तिथेचं मेकॅनिकल ड्राफ्ट्समनच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. मूळच्या यांत्रिकी वस्तूंच्या आवडीमुळे त्यांनी त्यामधे विशेष प्रावीण्यही मिळवलं. त्याचं सुमारास तत्कालीन व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्युट आणि आता वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात V.J.T.I. मध्ये मेकॅनिकल ड्रॉईंग शिक्षकाच्या जागेसाठी मुलाखती चालू होत्या. लक्ष्मणरावांनी मुलाखतीमधे यश मिळवून V.J.T.I मध्ये नोकरी मिळवली. अल्पावधीतचं ते विद्यार्थी आणि इतर शिक्षकवर्गामधे प्रोफेसर किर्लोस्कर ह्या नावाने प्रसिद्ध झाले. प्रोफेसरसारखी मानाची नोकरी मिळवल्यानंतरही लक्ष्मणरावांची यांत्रिकीविषयी असणारी मूळची आवड अजिबात बदललेली नव्हती. V.J.T.I च्या यंत्रशाळेमधल्या तत्कालीन आधुनिक यंत्रसामुग्रीचं काम कसं चालतं, त्याची दुरुस्ती वगैरे लक्ष्मणरावांनी अल्पावधीमधेचं शिकून घेतली. अमेरिकन फाउंडरी सोसायटीच्या नियतकालिकांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. जमेल तेवढी माहिती त्यांनी त्या काळामधे शिकून घेतली. ह्याच वेळी त्यांच्यामधला उद्योजक गप्प होता का? अजिबात नाही. ह्या काळामधे त्यांनी मुंबईहून सायकली विकत घेऊन त्या बेळगावमधे वडील बंधू रामण्णा ह्यांच्या मदतीने विकायचा व्यवसाय चालू केला. नुसती सायकल ते विकत नसत तर ज्यांना सायकल चालवायला जमत नसे त्यांच्याकडुन अल्प मोबदल्याच्या बदल्यात त्यांना सायकल चालवायलाही शिकवत असत. Sell them tools first and get paid for teaching them how to use it. :) हे वाक्य इतर वेळी स्वार्थी माणसाच्या बाबतीत मी वापरतो. मात्र किर्लोस्करांच्या बाबतीत हे वाक्यं मी अतिशय शुद्ध हेतूने वापरतो आहे. त्यांचा जसा ह्या सायकलविक्री आणि विक्रीपश्चात चालक शिकवणीचा व्यवसाय वाढत गेला तसं त्यांनी ह्या सायकलच्या मूळच्या इंग्लंडमधल्या कंपनीशी थेट करार केला. किर्लोस्कर ब्रदर्स ह्या नावाने स्वतःची सायकल एजन्सी बेळगावमधे स्थापन केली आणि त्याच नावाने स्वत:ची लेटरहेडही (मराठी शब्द सुचवा - उद्योगपत्रिका कसा वाटतो?) छापली. V.J.T.I मधल्या प्रोफेसरपदाच्या नोकरीत १८९६-१८९७ च्या सुमाराला अडथळे आले. भारतीय असल्याच्या नावाखाली गोरी चमडी मॅनेजमेंटने त्यांना बढती नाकारली गेली. बढती नाकारली गेल्याने लक्ष्मणराव दुखावले गेले आणि त्यांनी सरळ नोकरीचा राजीनामा दिला आणि ते बेळगावमधे परतले. पुढची काही वर्ष त्यांनी मिळेल तो व्यवसाय केला. युरोपातून पवनचक्क्या विकत घेऊन त्या भारतामधे विकल्या, औंधच्या राजघराण्याच्या कुलदैवताच्या मुर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंग करुन मुलामा चढवून दिला, लोखंडाच्या आणि लाकडाच्या खिडकीदरवाज्यांच्या चौकटी बनवून त्या गृहनिर्माण व्यावसायिकांना विकल्या. औंधचे राजेसाहेब (श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी) त्यांच्या इलेक्ट्रोप्लेटिंगच्या कामावर प्रचंड खुश झाले होते. त्यातून त्यांचे सुपुत्र श्री. बाळासाहेब पंतप्रतिनिधी किर्लोस्करांना मुंबईमधे असल्यापासून ओळखत होते. हा माणूस कामाचा आहे, दिलेलं काम हा माणूस जबाबदारीने पार पाडणार हे त्यांनी बरोबर हेरलं होतं. आपला देश कृषीप्रधान आहे. इथे शेतीच्या उपकरणांची बाजारपेठ प्रचंड प्रमाणामधे उपलब्धं होऊ शकेल हा विचार लक्ष्मणरावांच्या मनामधे आला. बाहेरुन उपकरणं आणून इकडे विकण्यापेक्षा आपण स्वतःच त्यांची निर्मिती का करु नये ह्या विचाराने त्यांना पछाडलं. १९०१ च्या सुमारास त्यांनी छोट्या प्रमाणावर कडबा-कुट्टी कापायच्या यंत्रांची निर्मिती सुरु केली. त्याची योग्य प्रमाणात विक्री झाल्याने त्यांच्यासमोर नवीन लक्ष्यं उभं राहीलं ते म्हणजे ओतकाम (Casting) करुन बनवलेल्या लोखंडी नांगराच्या फाळांचं उत्पादन करण्याचं. उत्पादन सुरु करायचं म्हणलं की लाख अडचणी समोर आ वासून उभ्या रहातात आणि त्यातली सर्वात मोठी म्हणजे भां-ड-व-ल ही. सगळी सोंगं आणता येतात पण पैश्याचं आणता येतं नाही. किर्लोस्करांनी त्याकाळी बाँबे बँकिंग कॉर्पोरेशनकडे १०,००० रुपये भांडवली कर्जाची मागणी केली. पण त्यांच्याकडे पुरेसं तारण नसल्याने त्यांची मागणी बँकेने फेटाळून लावली. अश्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आले ते साक्षात औंधचे महाराज आणि गिंडे आडनावाचे एक श्रीमंत गृहस्थं. गिंडेंनी किर्लोस्करांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना काही भांडवली मदत केली. औंधच्या महाराजांनी १०,००० रुपये भांडवल आणि ३२ एकर जमीन किर्लोस्करांच्या हवाली केली आणि किर्लोस्करांच्या पंखांमधे गरुडभरारी मारायचं सामर्थ्य आलं. ह्या जमिनीमधे लक्ष्मणराव आणि रामण्णांनी किर्लोस्करवाडी वसवायसाठी अपार मेहेनत घेतली. फक्तं २५-३० कामगारांची घरं त्यांनी वाडीमधे वसवली. एका बाजूला फाउंडरीमधे ओतीव नांगरांच्या फाळांची निर्मिती चालू केली. उत्पादन तर चालू झालं, पण विक्रीच्या नावाने ठणठणाट होता. तत्कालीन शेतकरी हा अंधश्रद्धाळू असल्याने लोखंडी नांगर जमिनीमधे विष कालवेल पासून अनेक गैरसमजुतींमुळे नांगराचे फाळ काही विकले जाईनात. उत्पादनानंतर जवळ जवळ दोन वर्षं एकही नांगर विकला गेला नाही. नंतरच्या काळामधे मात्र वर्षभरात जवळजवळ २००-२५० नांगर विकले जाऊ लागले. मात्रं ह्या दोन वर्षांनी लक्ष्मणरावांची सत्वपरीक्षा पाहीली. ह्यानंतर मात्रं किर्लोस्करवाडी, किर्लोस्कर ब्रदर्स आणि लक्ष्मणरावांनी मागे वळून पाहीलचं नाही. व्यवसायावरची सगळी कर्जं बघता बघता फेडली. . आंतरजालावरून साभार पहिला ओतकाम करुन बनवलेला किर्लोस्कर नांगर (आयसोमेट्रिक कन्सेप्ट ड्रॉईंग) १९०३ मधे लक्ष्मणराव आणि राधाबाईंना पहिली अपत्यप्राप्ती झाली. शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर. शंतनुराव किर्लोस्करांचं पाचवी पर्यंतचं शिक्षण औंध संस्थानाच्या शाळेमधे झालं. मॅट्रिकच्या परिक्षेमधे सगळ्या विषयात त्यांना ९०% च्या पुढे गुण होते, पण जर्मनमधे मात्रं ते पास झाले नाहीत. त्यांना तर पुढे जाउन MIT (USA) मधून यंत्रअभियंत्याचं शिक्षण घ्यायची इच्छा होती. मॅट्रिक झाल्याशिवाय तिकडे प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे शंतनुराव किर्लोस्कर सरळ अमेरिकेमधे गेले आणि तिकडे जाउन Chauncy high school ह्या MIT च्या पहिली पायरी समजली जाणार्‍या हायस्कूलमधे प्रवेश मिळवला. परत अभ्यास करुन जर्मन व इतर विषयांमधे त्यांनी दैदिप्यमान यश मिळवलं आणि स्वतःचा MIT मधला B.Sc in Mechanical Engineering अभ्यासक्रमामधला प्रवेश निश्चित केला. . आंतरजालावरून साभार शंतनुरावांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जारी केलेलं पोस्टाचं तिकिट १९२० च्या सुमाराला किर्लोस्कर ब्रदर्स ह्या कंपनीला लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर (त्याकाळी ते शिक्षणासाठी अमेरिकेमधे होते. त्यांचे चुलत बंधु माधवराव किर्लोस्करही त्यांच्याबरोबर होते. माधवरावांचं अमेरिकेमधे असतानाचं दुर्धर आजाराने निधन झालं), शंकरभाऊ किर्लोस्कर, शंभुअण्णा जांभेकर वगैरे पार्टनर्सनी मिळून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ह्या नव्या नावाखाली खरेदी केली. हे सगळे पार्टनर्स कंपनीमधल्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडू लागले. १९२६ च्या सुमाराला शंतनुराव मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि प्रचंड अनुभव घेउन भारतात परतले. शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी किर्लोस्करांच्या उद्योगाला नवी चालना दिली (ह्याकामी त्यांना त्यांच्या भावंडांची म्हणजे प्रभाकर, राजाराम आणि रवी किर्लोस्करांचीही मदत झाली असणार. त्यांच्या नक्की योगदानाविषयी माझ्याकडे माहिती उपलब्धं नाही. कोणाकडे असल्यास त्यांनी ती माहिती प्रतिसादामधे लिहावी. प्रतिसादकर्त्याच्या परवानगीने ती लेखामधे योग्य जागा शोधून लिहीन.) १९२८ च्या सुमारास फक्तं नांगरांच्या फाळ व कडबाकुट्टी यंत्रांवरुन किर्लोस्करांनी सुमारे ४० वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीपूरक यंत्रांची निर्मिती चालू केली, ज्यामधे २० वेगवेगळ्या प्रकारचे नांगर, १० हँडपंप्स ह्या उत्पादनांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्या नांगरांच्या डिझाईन्सनी शेतीच्या कामांमधे प्रचंड गतिमानता आली हे पूर्वी तेचं नांगर नाकारणार्‍या शेतकर्‍यांनी मान्यं केलं. शंतनुरावांचा विवाह दरम्यानच्या काळामधे यमुताई फाटक ह्यांच्याशी झाला. यमुताई ह्या त्या काळच्या अत्यंत कर्तृत्ववान स्त्रियांमधे गणल्या जात असतं. पुढच्या काळामधे यमुताईंनी गरीब व असहाय्य महिलांसाठी महिला उद्योग लिमिटेड नावाखाली कारखाना चालू केला. संपुर्ण कारखाना महिलांच्याचं सहभागावरती चालवला गेला. १९४६ मधे दुसर्‍या महायुद्धा नंतरच्या औद्योगिक मंदीच्या काळामध्ये शंतनुरावांनी किर्लोस्करांच्या यशस्वी उद्योगांना डिझेल आणि इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीची ताकद दिली. पुण्यामधे किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि बंगळुरुला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीचे कारखाने त्यांनी सुरु केले. पुण्यामधला कारखाना चालू करताना त्यांना लाल फीत आणि भूसंपादनातील अडचणींचा बराचं त्रास सहन करावा लागला. पण शंतनुरावांनी जिद्दीने हाताशी घेतलेला प्रकल्प मार्गी लावला. ब्रिटिश ऑईल इंजिन्स लिमिटेड च्या सहकार्याने चालू झालेला हा कारखाना वर्षाला १०,००० डिझेल इंजिन्सची निर्मिती करायला लागला. आधी म्हणल्याप्रमाणे हा विषय एका लेखाचा नसून एका मोठ्या लेखमालेचा आहे. त्यामुळे वरच्या लेखामधे फक्तं महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. ह्याखेरीज किर्लोस्कर ब्रदर्सच्या अचिव्हमेंट्सचा गोषवारा खालच्या मुद्द्यांमधे वाचालच. ०१. एशिया मधे १९५० डिझेल इंजिनांची निर्मिती करणारा जपानखालोखालचा सर्वात मोठा कारखाना ०२. १९५८- १९६० प्रचंड मोठ्या आर्थिक संकटावर मात करुन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि स्वीडन ह्या देशांशी भारतामधून इंजिन निर्यातीचे प्रचंड मोठे करार ०३. १९६० एका देशाच्या वापरासाठीची स्पेशल पर्पज प्रचंड मोठी २०० इंजिनांची मागणी यशस्वीपणे पूर्ण करुन, ती ऑर्डर एअरलिफ्ट करुन वेळेमधे पूर्ण करणारी देशातली सर्वात मोठी निर्यात कंपनी ०४. १९६२ मधे किर्लोस्कर कमिन्स लिमिटेडची पुण्यात स्थापना. ०५. १९६५, किर्लोस्कर गृपने ४०००० चं मनुष्यबळ १५ कंपन्यांमधे मिळून ओलांडलं. थोडक्यात ४०,००० घरं रोजगारात आणली. ०६. १९६९, सर वॉल्टर पकी प्राईझनी किर्लोस्कर ग्रुपला सन्मानित करण्यात आलं. (Most outstanding organization in field of Production Engineering) ०७. १९७० पुढच्या दशकामधे ड्युट्झ इंजिन्सबरोबर करार करुन भारतामधे ट्रॅक्टर्सची निर्मिती सुरु केली. १९७०-२०१० च्या प्रगतीवर एक स्वतंत्र लेख टंकायचा विचार आता मनामधे आलाय. जमेल तसा टंकेनच. एवढ्या प्रगतीच्या चढत्या आलेखामधे लक्ष्मणराव, शंतनुराव आणि यमुताईंनी आपलं सामाजिक भान कधीचं सोडलं नाही. किर्लोस्करवाडीमधे लक्ष्मणरावांनी अस्पृश्यता निर्मुलन केलेलं होतं. शंतनुरावांनी दिव्यांगासाठी, मानसिकरीत्या दुबळ्या लोकांसाठी संस्था चालू केली. यमुताईंनी वर लिहिल्याप्रमाणे महिलांसाठी महिला उद्योग चालू केले. अशा अनेक उपक्रमांमधून किर्लोस्करांनी सामाजिक भान बाळगलं. अश्या ह्या महान उद्योग घराण्यास, त्यांच्या कर्तृत्वास, त्यांच्या सामाजिक जाणिवेस मानाचा मुजरा. त्यांच्या उद्योगांची कारकीर्द अशीचं दैदिप्यमान राहो ही प्रार्थना.

वाचनखूण लावा
| 36342 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 36342 views

अ
अजया Tue, 05/03/2016 - 05:46 नवीन
महाराष्ट्र दिनासाठी अगदी यथोचित लेख.आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/03/2016 - 06:00 नवीन
उत्तम लेख. किर्लोस्करांच्या कार्याबद्दल आधी माहिती होतीच पण आता अजून तपशीलवार समजले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/03/2016 - 06:06 नवीन
मात्र किर्लोस्करांची कारकिर्द ऐतिहासिक ठेव्यासाठी मात्र हानीची ठरली. औंध संस्थानच्या ताब्यात कित्येक किल्ले होते, बर्‍याच किल्ल्यांवर सुस्थितीतल्या तोफा होत्या. तेव्हा असलेल्या लोखंडाच्या चणचणीमुळे पंतप्रतिनिधींनी आपल्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांवरील तोफा वितळवून त्यांचे लोखंड तयार करण्यासाठी त्या किर्लोस्करांच्या हवाली केल्या आणि एका ठेव्याची अपरिमित हानी झाली.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 05/03/2016 - 06:27 नवीन
पण त्या राष्ट्रकार्यासाठीच वापरल्या गेल्या. मला वाटतं पंतप्रतिनिधींनीही असाच विचार केला असावा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/03/2016 - 06:29 नवीन
हो. पण मला मात्र हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 05/03/2016 - 10:52 नवीन
त्याकाळच्या कितीक तोफा आता उरल्या आहेत. किर्लोस्करांनी वापरल्या म्हणुन त्याचे सोने तरी झाले नाही तर गंजुन भंगारातच विकल्या जायच्या त्या एवीतेवी
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/03/2016 - 15:19 नवीन
कित्येक गडावरच्या तोफा गंजत पडलेल्या आहेत. कितीतरी ढासळून जंगलात बुजल्या आहेत. तोफांचा वापर झाला हे चांगला झाला
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/03/2016 - 06:13 नवीन
लेटरहेड अधिपत्र. विणाज वर्ल्ड नाहि वीणा वर्ल्ड. बाकी लेख ओके. भारतात टोयोटा सोबत किर्लोस्कर ना?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/03/2016 - 08:59 नवीन
अरे ते वीणाज (Veena's) अश्या अर्थाने वापरले आहे. भारतामधे टोयोटा, ब्रिटिश ऑईल इंजिन्स, कमिन्स वगैरे कंपन्यांबरोबर किर्लोस्करांचे व्यवसाय आहेत/ होते. :) बाकी थॅंक्स.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/03/2016 - 06:14 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 05/03/2016 - 06:17 नवीन
शाळेत असताना 'लोखंडी नांगराचा जन्म' या धड्यामुळे लक्ष्मणरावांबद्दल आणि किर्लोस्कर घराण्याबद्दलच अतोनात आदर वाटला होता. या लेखामुळे तो दुणावला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/03/2016 - 06:17 नवीन
विषय एका लेखाचा नसूनही सर्वसमावेशक केला गेला आहे.एका कर्तुत्ववान पिता पुत्रांचा समाजाप्रती उत्तर्दायीत्वाचा/औद्योगीक आलेखाचा धांडोळा आवडला. लेखमाला वाचक नाखु
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 05/03/2016 - 06:29 नवीन
+#₹@x तुम्ही लिहित का नाही नियमितपणे?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 05/03/2016 - 07:11 नवीन
याला म्हणतात कर्तुत्व. पण हेच किर्लोस्कर पुढे अंबानी, बिर्ला वगैरे का नाहि बनु शकले? मराठीपण आडवं आलं का ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/03/2016 - 09:03 नवीन
किर्लोस्कर हे अंबानी आणि बिर्ला ह्यांच्याच तोडीचे उद्योजक आहेत. लक्ष्मणराव आणि शंतनुराव ह्या दोघांच्याही काळामधे खुली अर्थव्यवस्था नव्हती तरी त्यांनी एवढी प्रगती साधली. रिलायन्सच्या अनिल आणि मुकेश अंबानींच्या बहुतांश काळामधे खुली अर्थव्यवस्था प्रगतीसाठी उपलब्धं होती हा फरकही लक्षात घेणेबल आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 05/03/2016 - 19:58 नवीन
किर्लोस्कर अग्रणी उद्योजक आहेतच... पण राजकीय फ्रंटवर "ये अंबानी के एजंट है" अशी बिरुदावली मिरवणारे धेंडं बघता निदान आपला बारामतीकर जाणता राजा किर्लोस्करांचा एजण्ट नसुदे पण किमान 'एकाच नावेतले प्रवासी' म्हणण्याइतपत किर्लोस्करांची कीर्ती असायला हवी होती :)
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 05/03/2016 - 07:20 नवीन
लेख प्रचंड आवडला.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/03/2016 - 07:47 नवीन
महाराष्ट्राच्या उद्योग जगताची महती सांगणारा.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 05/03/2016 - 08:14 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Tue, 05/03/2016 - 08:16 नवीन
कप्तानराव छान लेख. कष्टाने माहिती जमवलेली दिसून येत आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/03/2016 - 08:21 नवीन
जब्रा
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Tue, 05/03/2016 - 08:24 नवीन
खूप आवडला लेख. अजून कर्तृत्ववान मराठी माणसांच्या कहाण्या येऊ दयात. शेठ वालचंद हिराचंद, जमनालाल बजाज हे मराठी नव्ह्ते पण महाराष्ट्राचेच होते ना ? त्यांच्यावर पण लेख लिहीला तर दुधात साखर.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/03/2016 - 08:38 नवीन
लेख आवडला.मराठी माणूसवगैरे बद्दल बिगरमराठी य लोकांची आपल्याबद्दलची मतं ऐकून घ्यायची तयारी मराठी माणसात नसते. ( त्याचं मत हे त्याचं असतं यापेक्षा त्याने आमच्यासारखंच मत दिलं नाही तर कानाखाली आवाज काढू ही प्रवृत्ती असते).हमो मराठे लिखित एक माणूस एक दिवस या पुस्तकात फिरोदिया वाचा.शोभा डे कधिकधी परखडपणे मराठीतच बोलते पण ऐकूस घेण्याची तयारी नसते.जाऊ दे . कॅप्टन लेख आवडला.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 05/03/2016 - 08:54 नवीन
कप्तान साब औंधची यमाई देवी हे आमचे कुलदैवत (का कुलदेवी?) आहे इथे कैक वेळ जाणे झाले आहे तरीही हे प्लेटिंगचम् पहिल्यांदाच ऐकण्यात आले बघा! बाकी लेख एकदम आवडला हे वेगळे सांगणे न लगे किर्लोस्करवाड़ी हे अमेरिकन (नंतर जापानीज) फॅक्टरी टाउनशिप संकल्पनेवर आधारीत शहर आहे, ह्याची प्रेरणा (बहुतेक) डिअरबॉर्न, मिशिगन, संयुक्त संस्थाने अमेरिका येथील फोर्ड मोटर कंपनीचा अवाढव्य कारखाना अन टाउनशिप हे होते, वाड़ीच्या आत रहिवासी भाग अन फॅक्टरी तर आहेच त्याच्याशिवाय एक मल्टी होल गोल्फ कोर्स, हेलीपेड, मंदिरे, प्रार्थमिक अन माध्यमिक शाळा, एक थिएटर अन क्रिकेट स्टेडियम सुद्धा आहे, ह्या स्टेडियम वर गावस्कर वगैरे मंडळी येत असल्याची आठवण आमचे थोरले मामा कायम सांगतात.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/03/2016 - 09:00 नवीन
किर्लोस्करवाडी भारतामधली तिसरी इंडस्ट्रियल टाउनशिप होती. टाटानगर आणि अजुन एकाचं नाव आठवत नाही.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 05/03/2016 - 09:10 नवीन
जमशेदपूर म्हणजेच टाटानगर काय?
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 05/03/2016 - 09:40 नवीन
हो, तिसरी वालचंदनगर असेल..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 05/03/2016 - 11:16 नवीन
साकची हे मूळ गाव. जमशेदपूर हे टाऊनशिपचं नाव आणि टाटानगर हे रेल्वे स्टेशनचं नाव.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 05/03/2016 - 15:31 नवीन
औंधची यमाई देवी हे आमचे कुलदैवत +१ आमची पण कुलदेवी आहे .
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/03/2016 - 09:04 नवीन
सर्वांचे आभार्स :)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 05/03/2016 - 09:23 नवीन
आवडला लेख :)
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/03/2016 - 09:26 नवीन
फार आवडला लेख! अजून लिहा.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Tue, 05/03/2016 - 09:28 नवीन
लेख आवडला औंधची यमाई देवी हे आमचे कुलदैवत (का कुलदेवी?) आहे इथे कैक वेळ जाणे झाले आहे तरीही हे प्लेटिंगचम् पहिल्यांदाच ऐकण्यात आले बघा!>>> +१ वर्षात एकदा तरि किमान जाउनही इतक्या वर्षांने याबद्दल कळल आज :(
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Tue, 05/03/2016 - 09:28 नवीन
लेख आवडला औंधची यमाई देवी हे आमचे कुलदैवत (का कुलदेवी?) आहे इथे कैक वेळ जाणे झाले आहे तरीही हे प्लेटिंगचम् पहिल्यांदाच ऐकण्यात आले बघा!>>> +१ वर्षात एकदा तरि किमान जाउनही इतक्या वर्षांने याबद्दल कळल आज :(
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 05/03/2016 - 09:29 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 05/03/2016 - 09:49 नवीन
अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी कै.लक्ष्मणरावांनी मुद्दाम अमावास्येला या कारखान्याची सुरुवात केली होती. कांही दिवसांत मुसळ्धार पावसाने शेड्स मोडून पडल्या, यन्त्रसामग्री चिखलाने खराब झाली. लोक म्हणाले, '' पहा म्हणून अमावास्येला सुरुवात करू नये!'' त्यांचे म्हणणे खोडून काढत त्यांनी कारखाना पुनः उभारला आणि मग इतकी प्रगती केली की मागे वळून पाहिले नाही.आठवीच्या बालभारतीत हा धडा वाचल्याने आमची अमावास्या आणि मुहूर्त वगैरे बाबत अंधश्रद्धा दूर झाली होती हे आठवते. शंतनुराव किर्लोस्करांचे आत्मचरित्र निव्वळ ग्रेट आहे! प्रत्येक अभियंत्याने वाचावेच इतके प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/03/2016 - 09:54 नवीन
शंतनुरावांचे आत्मचरित्र - http://www.kirloskar.com/site/pages/downloadfile/cactus-and-roses.pdf
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/03/2016 - 09:51 नवीन
समयोचित लेख.. आधी म्हणल्याप्रमाणे हा विषय एका लेखाचा नसून एका मोठ्या लेखमालेचा आहे. त्यामुळे वरच्या लेखामधे फक्तं महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. चिमण - लेख अजुन तपशीलवार लिहिता आला असता. मात्र लेखमाला लिहिण्याचे ठरवत असलास तर ही सुंदर सुरूवात आहे. तसे काही ठरले नसल्यास मी पुढचा एक भाग लिहू काय?
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/03/2016 - 10:52 नवीन
विचारायचे (औपचारीक) नसते. लिवा बिन्धास. मोदक-चिमण ओळखीतला नाखु
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/03/2016 - 11:51 नवीन
लेखमाला लिहायचा विचार नाही. तु लिहु शकतोय्स.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/03/2016 - 11:12 नवीन
माहितीपूर्ण लेख! सध्या किर्लोस्कर समूहाची काय परिस्थिती आहे? न्यूमॅटिक बंद आहे असे ऐकून आहे. कमिन्समध्ये आता किर्लोस्करांचा हिस्सा नाही हेही वाचले आहे. किर्लोस्कर प्रेस सुरू आहे का? किर्लोस्करांच्या आता फारच थोड्या कंपन्या सुरू आहेत असे ऐकून आहे. त्यांच्याप्रमाणे गरवारेंच्यासुद्धा पेंट्स, शिपिंग, नॉयलॉन इ. कंपन्या बंद झाल्याचे वाचले आहे. हे खरे असेल तर दुर्दैवी आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/03/2016 - 11:27 नवीन
लेख खुण जतन केली आहे, व्यवसायाशी अटॅच आणि डिटॅच वेळीच होता आले पाहीजे, स्कुटर उत्पादन करताना राहुल बजाजांचा मुलगा एक छान वाक्य बोलला होता वाक्य नेमके आठवत नाही पण व्यावसायिक निर्णय भावनात्मकेतेसाठी थांबवून चालत नाही. त्याच वेळी श्रीगुरुजी म्हणतात तसे सद्य स्थिती आणि व्यावसायिक आव्हाने याबद्दल किर्लोस्करांच्या नव्या पिढीने अधिक माहिती शेअर करण्याचा विचार करावयास हवा असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 05/03/2016 - 11:12 नवीन
थोर माणूस. सुंदर लेख.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 05/03/2016 - 11:33 नवीन
किर्लोसकरांचे पंप आणि व्हॉल्व जगप्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 05/03/2016 - 13:23 नवीन
चांगला लेख.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 05/03/2016 - 14:37 नवीन
क्या बात! काय झकास लेख लिहिला आहे! महाराष्ट्र दिनाला अप्रस्तुत आहे, पण मराठी उद्योजकांच्या / उद्योगांच्या र्‍हासाबद्दलही तपशीलवार लेखन व्हायला पाहिजे. ओगले, किर्लोस्कर, गरवारे, तिरोडकर, वगैरे. अशा प्रकारचं लेखन फक्त युनायटेड वेस्टर्न बँकेविषयी झाल्याचं आठवतं आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 06/23/2017 - 12:21 नवीन
अशा प्रकारचं लेखन फक्त युनायटेड वेस्टर्न बँकेविषयी झाल्याचं आठवतं आहे.
कुबेरांनी आण्णासाहेब चिरमुल्यांवर लोकरंगमध्ये लिहिलेला लेख सोडून काही वाचलं नाहीये याबद्दल.. कुठे वाचायला मिळेल याबद्दल
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 06/23/2017 - 14:22 नवीन
युनायटेड वेस्टर्न बँक: उदय , उत्कर्ष आणि अस्त अरुण गोडबोले http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5151721047692910275
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 06/23/2017 - 14:31 नवीन
आभार्स आबा..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/03/2016 - 16:39 नवीन
अतिशय सुरेख लेख!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा