Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/17/2015 - 22:02
💬 34 प्रतिसाद

Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

  • ‹ गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)
  • Up
  • गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७ ›
मागिल भाग.. " बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????" पुढे चालू... ================================= हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही. .............................................. कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं. त्यामुळे शहरी वहानांची घरघर इथे नसली तरी,घरातल्या माणसांची नोकराचाकरांची ती वर्दळ..,सकाळी सकाळी खराट्यानी जमिन-झाडली जाण्याचा तो आवाज, गोठ्यात (असल्या तर..) त्या गाईं वासरांचे ते-हंम्म्मु..हम्वॉssssआणि रेड्या/म्हैशींचं-अंव्यां..डुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!, निरनिराळे पक्ष्यांचे आवाज..हे सगळं सहज कानी पडत असतं..त्यामुळे येथे तशी वेगळी जाग आणण्याचे प्रयोजन फार पडतच नाही. आणि इथे तर काय ,हे तर आख्खं लगीनघरंच होतं.त्यामुळे पहाटे चारा'पासूनच लगबग. मला त्या दिवशी पहिली जागंही पहाटे चारा'लाच आली,तेंव्हा बाजुच्या एका रिकाम्या केलेल्या गोठ्यात बल्लवाचार्य मंडळी त्यांच्या पूर्वरंगात आलेली होती.... गुलोपचा मंदप्रकाश आणि लाकडी फल्यांवर वांगी आणि बटाटे कापण्याचा खट खट खट खट असा एक एकं-सुरी आवाज आत मधून-बाहेर येत होता.मी त्या आवाजानी जागा झालो खरा,पण पुन्हा त्याच एकं-सुरी तालात, काहि सेकंदात जो झोपलो,तो आमच्या महान मित्रानी किश्यानी जागं करेपर्यंत! . यावेळी मात्र किश्यानी मला सुखद धक्का दिला. मला अगदी साग्रसंगीत उठविण्यात आले. नवरदेव आत्मराज...उठा उठा ..हे शब्द कानी आले.आणि मी, हा किश्याचाच काहितरी चावट्पणा असणार ,अश्या विचारानी डोळे किलकिले केले,तर माझ्या समोर ती साक्षात वेदोनारायणांची जोडगोळीच हे शब्द बोलत उभी. श्रीराम आणि जयराम.आणि त्याच भल्या पहाटे अंगण्याच्या एका बाजुला आमच्या काहि मित्र मंडळींसह पलिकडे आसन टाकुन संध्यावंदन करत बसलेला, हेमंतादादा आणि माझा पाठशाळेतला जिगरी यार-सुर्‍या...,असे दोघेही दिसले. मग मात्र मी ,ती कमी मिळालेली झोप वगैरे विसरून खरच प्रफुल्लित होऊन उठलो. ही चारंही लोकं येऊ शकणार नाहि..असं मला कळल्यानी मी थोडा नाराज होतोच. पण व्यवसायव्यवस्थासम्राट किशोरबुवा सहाय्यक'पुरोहित पुरवकर,..यांनी रात्रितल्या रात्रित फोन फिरवून..यांना आणतं केलेलं होतं.(आणि तसाही मी ते आले नसते,तर नाराज होणार असलो,तरी रागावणार मात्र नव्हतो. अहो, सगळ्या भटजींनी जर स्वतःच्या व्यवसायातल्या/नात्यातल्या/मित्रत्वातल्या, सगळ्या लग्नांना हजेरी लावायची ठरवली,तर लग्न-लावायला एक तरी पुरोहित-उपलब्धं राहिल का???... असो! ;) ) मग सगळ्या दोस्त मंडळींनी माझा ताबा घेतला.मग श्रीराम आणि जयरामनी, अंघोळीच्या वेळी मला खास त्यांच्या कडनं आणलेलं,कसलसं उटणं आणि एक दोन अत्तरं,असं सगळंच्या सगळं अंगाला लावायला घेतलं. बरं लावलं तर लावलं,पण त्याचं सूख सरळ तरी अंगी-लागणार होतं का? तर नाही! किश्या हरामी, मला छळण्याचा एकंही चान्सं सोडत नव्हता.जसं जयरामनी अत्तर आंगाला चोपडलं,तसा किश्यानी मागुन माझ्या कानांजवळ "चल..सूट रे आत्मुंदा..झाली.., ही वेळ आली...बकरा काटावयाला,साक्षात दुर्गा आली..." अशी बासरी-वाजवायला सुरवात केली. आणि पुढे म्हणजे चावट्पणाचा कहर केला. एरवी मी कित्तीही सामान्य मनुष्य असलो,तरी मला तो बांगड्यांचा आवाज, पैंजणांची रुमझुम, आणि लाडिक हलका स्त्रीस्वर, हे काहि सेकंदांपेक्षा जास्तवेळ आणि ते ही कानांजवळून ऐकू येत राहिले,तर सर्वांगाला आतून नको इतक्या असह्य गुदगुल्या होतात. आणि हे सर्व नी...ट ठाऊक असलेला हा किश्या, मुद्दाम लाडिकपणे बाईचा आवाज काढून ते गीत विडंबीत-गात होता,आणि एका हातात चार बांगड्या आणि कुणाचं तरी पैंजण आणून..त्यानी त्यावर ठेका धरत होता. मला मेली कधी ती एकदाची अं घोळ संपते असं झालं होतं. आणि तेव्हढ्यात तिथे विहिरीजवळ काकू आली,आणि किश्याच्या पाठीत एक कचकन धपाटा घालून... "किश्या..हलकटा, हो वरती तिकडे घराकडे...चावट माणूस कुठचा!" ..असं म्हणून त्याला हकलंलन. श्रीराम आणि जयरामनी , 'मला सगळी राजेशाही सेवा-घ्यायला(च) लावायची' ,अश्या किश्यानीच सोडलेल्या आज्ञे बरहुकुम माझं त्याच अंघोळीच्या दगडावर अंग पुसायला घेतलं. मग काकूनी आणलेलं मस्तं जाड वेलबुट्टीदार काठाचं स्पेशल मद्रासी धोतर आणि वरती त्याच टैपचं उपरणं असं तिथेच नेसून.. मी श्रीरामनी आणलेल्या (कर्नाटकी..)लालचॉकलेटी डार्क कुंकवाचा टिळा-करुन...घराकडे रवाना झालो. तिकडे सदाशिवदादा आणि हेमंतादादा, विधींची अगदी फुल्ल तयारी लावूनच बसलेले होते. अंगणाच्या मांडवात इतरंही काहि नातेवाइक मित्रमंडळी थांबलेली होती. एका कोपर्‍यात दोन खुर्च्यांवर गुरुजी आणि सखाराम काकाचं गप्पा..चहा असं सगळं चालू होतं. आणि मग काहि वेळातच काकाच्या नियोजीत कार्यक्रम पत्रिकेतले...ते विधी सुरु झाले. मांडवात आइ वडिलांसह वैजू आणि तिच्या चारपाच मैत्रिंणींचं आगमन झालं. आणि मग तो कन्यादानाचा पर्यायी विधी सुरु झाला. एरवी कन्यादानाच्या विधीमधे वधुवरं आणि वधुचे आइवडिल अशी चारच लोकं असतात. पण इथे माझेही आईबाबा जोडले गेले होते. मग मला हिचा हात, पाणिग्रहणाच्या श्टाइलनी धरायला लावून.. ,आधी सदाशिवदादा हेमंतादादाचे (पर्यायी..)मंत्र झाले.,मग काकानी कडेनी, "हे वधुवरा... आजपासून तुम्ही परस्परांना एका शरीरासारखं स्विकारत आहात..तुमच्यामधील आत्मभाव जाऊन त्याजागी एकात्मभावाची प्रतिष्ठापना होऊ दे अशी आंम्ही सर्वजणं त्या विवाहप्रधान दैवताकडे ,लक्ष्मी नारायणाकडे प्रार्थना करतो..." असं तिनवेळा म्हणवून तो नवंविधी पार पाडला. पुढे मग सूत्रवेष्टण(कंकणबंधन)-मणिमंगळसूत्र-विवाहहोम इत्यादी विधी थोडे फार बदल वजा जाता ,आमच्या पारंपारिक पद्धतीनेच पार पडू देण्यात आले. आणि मग सप्तपदीला मात्र पुन्हा काकानी त्याच्या स्वतःच्या मतीने रचलेली सप्तपाऊली गायली...आंम्हा दोघांनाही त्या तांदुळाच्या पुंजिकांवर एकत्र चालवले गेले. प्रथमपदी होते सुरु सह-जीवना ते द्वितीयपदी येता जाणिवा जागृती दे तृतीयपदी येता संपू दे आत्मंभावं चतु:पदी होता जन्मू दे प्रीतीभावं पंचःपदी या रे गृहस्थाश्रमी या षट्पदी मिळू दे पूर्णता होऊनी त्या सप्तपदी आली ती घडी मीलनाची एकस्वं होऊ दे ही,भेट दोन्ही जिवांची आजुबाजुनी उपस्थित सर्व मंडळीकडून... काहिंचे कुतुहलानी, काहिंचे तिरपे कटाक्ष टाकत..,काहिंचे शंकेखोर मुद्रांनी, तर काहिंचे स्वागतोत्सुक चेहेर्‍यांनी आमच्या ह्या विवाह नवंविधींचं, अगदी पूर्ण चित्री-करण चाललेलं होतं. एकतर हे सर्व विधी,त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी होता होताच लोकांना कळत होते. त्यातंही विधींचे अर्थ ऐकत बसा..ही लोकांसाठी काळानुरूप निर्मिलेली प्रोफेशनल-सोय, खुद्द पुरोहितांच्या विवाहांमधे नसतेच. असण्याचे कारणंही नसते. पण तरिही आज या अदलाबदलीच्या धर्मविधींची कारणं, तिथल्यातिथे स्पष्ट होणं गरजेचं रहाणार आहे..हे काका नीट जाणून होता. तसेही तो स्वतः लावत असलेल्या लग्नविधींचा प्रकार हा असल्याच टाइपचा होता..पण तो सर्वच्या सर्व, पारंपारिकांना सहन होणारा नव्हे याचीही त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच ते एक्सट्रा अपडेटेड व्हर्जन टाळून , आज केलेलं हे सॉफ्ट व्हर्जनंही काकानी लोकांच्या बरच गळी उतरवलं. त्यात गुरुजिंशी जाहलेल्या,त्या रात्रीसंवादाचाही महत्वाचा वाटा होताच. मग तासादिडतासात हे विधी अवरल्यावर सगळी लोकं आमंत्रणात कळविलेल्या वेळेला जमली,की मग सरळ मंगलाष्टकं होवून हा कार्य क्रम पूर्णत्वाला न्यायचा.., असं पुढील नियोजन असल्यामुळे,सर्व जणं काहि तासांकरिता विश्रामावस्थेत गेले. मला मात्र का कोण जाणे ? , आता हा मधला दोन तासांचा कालावधी असह्य वाटू लागला. एकतर किश्यानी आमच्यावर अशी टाइट फिल्डिंग लाऊन ठेवलेली होती...की आदल्या दिवसापासून आंम्ही एकमेकांशी नीट बोलणे तर सोडाच एकमेकाकडे पाहूहि शकलेलो नव्हतो.. या किश्याखेळीचं कारण पारंपारिक श्रद्धेशी असण्याचा संबंध नव्हताच...पण हा चावट्ट माणूस तिच्या आणि आमच्या मित्रमैत्रिणमंडळा बरोबर त्यांना पटवून..असे ठरवून बसलेला होता...की आपण लग्नातली जी मंगलाष्टके म्हणणार आहोत...त्याच्या भावंजागृतीचं काम..या जाणिवपूर्वक केलेल्या ताटा-तुटीनी (?) साधलं जाणार आहे. ( दुष्ट.... :-/ ) आता यामागची पूर्णछळयोजना न कळण्याइतके बालवयीन कोणीच आमच्या त्यांच्या मंत्रीमंडळात...,आपलं ते हे...मित्रमंडळात नव्हते! पण त्यातली मजा या सगळ्यांनी घ्यायचीच ठरवलेली होती,त्यामुळे मला एकंही फितुर-मिळे ना! ( :( ) एकदोन वेळा मी तो चक्र व्यूह तोडायचा प्रयत्न केला..पण कुठे घराबाजुच्या तिची खोली असलेल्या,वळचणीच्या खिडकिकडून हाक मारायला जावं , तर आधी आवाज तिचा यायचा आणि जवळ गेल्यावर हॉरर शिनेमात जसा भस्सकन अचानक भुताचा चेहेरा समोर येतो...तशी तिच्या जागी तिची कुणितरी मैत्रिणच खिडकितून हडळीसारखं तोंड काढायची. त्यांच्या घरात शिरायची तर मला जणू काही बंदिच केलेली होती. ( :-/ ) मग माझे गड फोडायचे एकदोन प्रयत्न निष्फलीत झाल्यावर मी सरळ काकाच्या शेजारी मांडवातच जाऊन बसलो..म्हटलं, ह्याचा मूड पाहून आपण ह्याच्याकडूनच काहितरी तोड काढू...पण तेव्हढ्यात चमत्कार जाहला. आणि किश्याच्या बायकोनी मला, हताला धरून..., "चला हो भावजी आत जरा..., तिच्या आज्जीला तुम्हाला पुणेरी पगडी घालायची आहे.." असं सांगून किश्याच्या देखत मला घरात नेलं. मी आत मागच्या पडवीत गेलो..तर आज्जीहि नाही आणि पगडीही नाही...आणि नुसत्या मोकळ्या पडवीत..त्या एकदोन भाज्या चिरणार्‍या कामकरणी वजा जाता... मी एकटाच!,अशी अवस्था पाहुन मि ही चक्रावलोच. म्हटलं...,हिच्या त्या महान मैत्रिणी..मला कोंडूनबिंडून ठेवतायत की काय इथे ?... मंगलाष्टकांना जाइपर्यंत! पण तेव्हढ्यात मला पडवीकडेच्या कोपर्‍याकडून आवाज आला... "आत्मू......!" . मी तिकडे पहातो,तर तिथे नुसतेच तिन चार भलेमोठ्ठे कोकम शिरपा'चे प्ल्याश्टिकचे ड्रम ठेवलेले होते. मला नक्की कळेच ना,आवाज कुणाचा? आणि कुठनं येतोय! मग मी,सुकडींच्या ढिगाखाली दडलेलं फुरसं शोधायला (हतात काठी घेऊन..) पुढे सरकावं(ब्याट्री घेऊन!..),तसा मी त्या ड्रमांच्या दिशेला (भीत..भीत) गेलो...मागच्या त्या दोन्ही कामकरणी तोंडाला पदर लाऊन जाम हसत होत्या. आणि मी जसा जवळ गेलो,तशी त्यातल्या एका कामकरणिनी "आला गो... जवल तुज्या आला.." म्हणून हाळी-टकलीन,तशी त्या ड्रमामागून वैजूच बाहेर आली. मी तिचा तो माफक नटलेला अवतार पहायचं सोडून,आधी एक सेकंद दचकलोच! म्हटलं, "अगं काय गं हे? मला काय, 'भ्भो..' करायला लपवलीवतीस की काय?" तर माझ्याशी बोलायचं सोडून (माझा दचकलेला चेहेरा आठवित..) आधी हसतच राहिली मिनिटभर. ( :-/ ) आणि मग मी, "तू एकटीच आहेस? की अजुन तुझ्या मैत्रिणीही दडून बसल्येत त्या ड्रमांमधे!? " असं विचारल्यावर तर ती आणि त्या दोन कामकरणी आणखिनच हसत सुटल्या. आणि मग हसता हसता...हतानीच, 'नाही..नाही' अशी अ‍ॅक्शन करत ही बया माझ्याशी बोलायला लागली. ती:- "काहि नाही रे, मी कालच ठरवल होतं..तुझ्या त्या किश्याला हरवायचं! म्हणून..मग त्याच्याच बायकोला ती आज्जीची ट्याक्ट सांगून मी त्याच्या देखत तुला आत आणवलं!" मी:- "बाप रे...! अगं ..,पण असल्या साध्या प्रसंगाला,इतकी युद्धनीती कशाला?" ती:-"मग???? आपल्याला साधं भेटू पण का नै देत म्हणून???" मी:- "अगं....लग्नांमधे मित्रमैत्रिणी असे छळातात..मजा करतातच..त्यात काय एव्हढं?" ती:- "हो....तुझी प्रोफेशनल...वाक्य नको टाकुस माझ्यावर!" मी:-"अगं प्रोफेशनल कसलं? साधं सरळ आहे हे..आणि जरा द्यावं की छळू त्यांना..आपलीच मित्रमंडळी ना ती!?" ती:-"हो का? आणि मग तू का मगाशी खिडकिकडून आलावतास...सांग?" मी:-".............................." ती:-"आय्या गं रामा....तू लाजतोस???" मी:-"ए.....लाजलो वगैरे नाही हं...उत्तर नै सुचलं मला. " ती:-"बरं..बरं..! कळलं मला काय ते.पण आता आपण परत जाऊ...नायतं सगळे शोधत येतील इकडे..." असं म्हणून ही पडवीतून आतल्या माजघराच्या दिशेनी गेली सुद्धा.. मागे त्या कामकरणी आमचा हा शीतंप्रेमसंवाद ऐकून अजुनंही हसत होत्या. मी मात्र त्यांच्या नजरेला नजरंही न देता...आगा काहि घडलेची नाही..अश्या आविर्भावात परत बाहेर आंगणात आलो. जाताना किश्याच्या बायकोनी रीतसर मला पगडी चढवून पुरावानशीन करूनच बाहेर सोडलं. पण त्या पगडीमुळे,त्या आंगणमांडवात माझा भाव एकदम वाढला...आणि उपस्थित असलेल्या बर्‍याच लोकांच्या देखत मी एखाद्या श्यालिब्रिटी सारखा ;) चालत चालत आमच्या शेजारील.."उतारु" घरात जाऊन विसावलो. पण विसावतोय कसला? मला ते "आय्या गं रामा!"....सारखं सारखं आठवत होतं...आणि....असो! ...मग तिथे मला आई आणि काकूनी एकंदर ताब्यात-घेऊन, हेमंतादादानी आणलेला एक भारीपैकी नेहेरुशर्ट घालयला दिला. आणि ती पगडी आणि मुंडावळ्या...यांसह,एकंदर 'तयार' करायला घेतलं. पण जश्या त्या मुंडावळ्या बसल्या, तसा मात्र मी कॅज्युअल मोड सुटून खरोखरीच विवाह मोड मधे आलो. चित्रविचित्र उत्सुकता मनात दाटू लागली.आता इथुन पुढच्या काहि वेळानंतर ,आपण खरच 'आपले' असणार नाही,ही भावना मनात घर करू लागली. आणि याच अवस्थेत तिकडे बसलो असताना... किश्या,सुर्‍या,जयराम,श्रीराम,हेमंतादादा इत्यादी माझी सर्व मित्र मंडळी खोलित शिरली. मग सगळ्यांनी मिळून मला ठिकठाक करायला घेतले. किश्यानी मुंबैहुन आणलेला कसल्यातरी भारी वासाचा स्प्रे माझ्या कपड्यांवर फवारला. जयरामनी आणि श्रीरामनी मला, एका खुर्चीत..."दादा..बसं हिते!" असं सांगून बसवलं. आणि आमच्या तिकडल्या त्या पारावरच्या न्हाव्यासारखा...एक चार इंची आणि तेव्हढीच उंची असलेला,असा आरसा हातात देववून..माझ्या चेहेर्‍याला कसल्याश्या ग्गार कागदानी पुसून..त्यावर एक कसलासा लेप लाऊन ,वर चंदनाची पावडर लावली. नंतर परत तो लालचॉकलेटी डार्क-कुंकवाचा कोरून लावलेला टिळा-झाला. आणि मग एकदा सर्व काहि ठिकठाक-झाले आहे अशी खात्री पटल्यावर ,हेमंतादादानी..."आत्मू...आई बाबांना नमस्कार कर.." अशी अज्ञा केली. आणि मग मी रितसर नमस्कार करून,मित्रमंडळासह मांडवाकडे चालता झालो. पाटावर हुबे ठाकल्यानंतर एका बाजुला काका आणि दुसर्‍या बाजुला चक्क गुरुजी अंतरपाट धरून उभे राहिले. मला अत्यंत विचित्र वाटायला लागलं. मी काकाला तसाच डोळ्यांनी खुणवू लागलो.."की...अरे गुरुजींना काय उभं केलसं तू???" ...म्हणून!. तर मला त्यानी उघडपणे "आज ते तुझे गुरुजी नाहीत,माझा मित्र आहे तो!" असं बजावून त्यानी मला गप्प-केलन. मला अत्यंत राग येऊन डोळ्यात अश्रू आले. पण गुरुजींनीच मला , "आत्मू...आजच्या दिवस काकाचं ऐकायचं...हं.वेडा आहेस काय, अश्या वेळी चिडायला आणि रडायला?" असं म्हणून शांत केलं. तेव्हढ्यात समोरच्या बाजुनी ही आणि हिच्या कंरंवंलेल्या-मैत्रिणी आल्या. मग हिला पाटावर स्थानाधीत करणे झाले. आणि काकानी आमच्या उभयता हाती लग्नमाळा देऊन,त्याच्या निसर्गदत्त खणखणीत स्वरात "सुमुहुर्त...सावधान..."अशी सुरवात केली "सुमुहुर्त...सावधान..." भारतभू ही सांस्कृतीकं जजनी,मांगल्य ती लेवुनी आली आज प्रेमभरेत हृदये,आशिर्वचा घेऊनी होवो संस्कृती-जात एक मिळण्या,तुम्हा उभयता खरी त्याचे तोरणं भूषवो ही भरता,कुर्यात सदा मंङंगलम्....सुमुहुर्त सावधान... पुढे गुरुजी... म्हणता.. धर्मंही प्रतिगामी त्यास-धरिता,अपुला-असे..,हे स्मरा निती एकं प्रधान हेतू करता,होइलं तो..ही-बरा! आपुल्या या घरट्यातलेच जिवं हे,नांदो सदाही सुखे त्यांचे सौख्यंही त्याच तेथं-रमणे...म्हणवा तयाही मुखे... सुमुहुर्त सावधान... पहिल्या दोन मंगलाष्टकातच,मांडवातल्या मंडळींची वदने,-हा आता सवाल जबाब रंगतो की काय? मंगलाष्टकांच्या ऐवजी??? म्हणुन काहिशी सुन्नावस्थेकडे जाऊ लागली. अर्थातच हे सर्व ..तिथे असलेल्या सदाशिवदादाच्या कडव्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. मग त्यानीच तात्काळ ब्याट हातात घेऊन... पुढे..."गंगा सिंधु सरस्वती चं यमुना...." अशी एकदम पारंपारिक सुरवात केल्यावर मंडळी एकदम सुखावली. मग हिच्याकडच्या एकदोन बायकांनी आपापले गळे-मोकळे करून घेतले. त्यातंही तिच्या मावशीनी एक मंङगलाष्टक तर अत्तीशय सुंदर म्हटलं. पण ते शब्दशः इतकं भावपूर्ण होतं,की त्यामुळे वैजूच काय...?,तिच्या मैतरणीहि...एकंदरीत आसवांनी भिजल्या. आणि त्यातलं शेवटचं... "स्वानंदे तुजला निरोप देता डोळेही पाणावले" ..हे ऐकुन तर मि ही गहिवरलो! अहो..मुलिच्या बापाच्या सगळ्या भावंभावनांचा परिपाकं होता हो त्यात. आणि नेमकी त्याच भावनेनी माझ्या मनात परत..., 'एक मुलगी स्वतःचं केवळ कुटुंबच नव्हे..तर कुळं-संस्कृती सोडून,आपल्या घरी येणे...हे सामाजिक अन्यायाचे द्योतक आहे की काय???'... असल्या सा'मासिक प्रश्नांची मालिका, ऑन-होऊ लागली. पण कडेनी माझ्या चेहेर्‍यावरून, 'हे सर्व' चाललेलं..माझ्या मनकवड्या मित्रानी..सुर्‍यानी न ओळखलं असतं,तरच नवल होतं. मग पटकन त्यानी ब्याट हतात घेतली आणि..."मधुर मधुर वाद्ये,वाजती मोदंदायी..." हे सुंदर आशयपूर्ण मंङगलाष्टक म्हणून..,एकंदर माहौलच बदलवून टाकला. मग माझ्या लाडक्या काकुने त्यावर, "प्रीती वाचुनी ना प्रपंच फुलतो,हे सत्य ध्यानी धरा आदर्शाप्रत पोहचवा घरंकुला,नीती सदा आदरा सांभाळा कुलंकिर्ती धन जे,माता पित्यांनी दिले त्यांचे श्रेय्य सुखप्रद तुम्हा,कुर्याद्वयोर्मंड्गलम्" हे त्याहुन सुंदर,आणि सहजीवनाचा खरा उपदेश करणारं मंङगलाष्टक, तिच्या निसर्गदत्त आर्तस्वरलयीनी गायलं, आणि मला खरा आशिर्वाद दिला. आणि मग मात्र किश्या...अचानक कुठेसा गायब झालेला होता तो...कसलसं लहानसं चिटोरं घेऊन..शेवटच्या पाच ओव्हर खेळायच्या अभिनि'वेषातच आत-शिरला...आणि एकदम ऊंच आवाजात-" आत्मू हा बायकोहुनीच बुटका,असला तरी ..ते असो! वैजूही.. तरी त्यास नीट धरुनी,फोटो..त सावरून बसो...आंम्ही ही..कालंपासुनी जरी,केलीच ताटा-तुटं..,तरि-ही पगडि.. घालण्यास जाउनी,झाली आत्मूची भेटं" असं एक अत्यंत शब्द बं-बाळ परंतू खट्याळ रसात न्हाऊन काढणारं...मं-गलाष्टक-टाकुन,आपण-आल्याची जोरंदार सलामी दिली. त्यामुळे अख्खा मांडव काहि क्षण खदखदून गेला. मग मात्र पुढे त्यानी, सकलं वरदं झाल्या,देवता या मुहुर्ती उधळि उभय शिर्षी,अक्षता होसं पूर्ती गजरं करिती वाद्ये,दूरं झाला दुरावा शुभदं विधि विधिंन्ने,भेटती जीवं जीवा हे पारंपारिक अस्सल विवाहपूर्ती मंङगलाष्टक...अश्या परिणाम कारकतेनी-टाकलं,की ती मंङगलाष्टकांची आख्खि म्याच..त्याच्याच खिश्यात गेली. आणि मग अगदी अर्धातास यथासांग चालंलेली मंङगलाष्टकं..एकदम काका आणि गुरुजींनी "यावद्वीचीस्तरंगान्वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया। यावच्चाकाशमार्गे तपति हिमकरो भास्करो लोकपालः॥ यावद्वज्रेंद-नीलस्फटिक-मणिशिला वर्तते मेरूशृंगे। तावत्वं पुत्रपौत्रै: स्वजन परिवृतो जीव शंभो:प्रसादात्॥....सा...वधा..न!"...हे समाप्तीपद जोरात-सोडून..ती मंङगलाष्टकं-एक्सप्रेस मुक्कामी फलाटावर घ्यायला सुरवात केली..मी मात्र किश्याचा खेळ सुरु झाल्यापासून, कंटाळायला लागलो होतो..आणि कडेनी काका मला..."हं...आत्म्या, लोकांना करतोस की नै नेहमी याच अंत:पटामागे-उभं...,मग आज तू...!" असं म्हणून हसून हसून माझी कळ काढत होता. आणि जसं शेवटच्या ओव्हरचा "तदेवं लग्नं सुदिनं तदेव.." चा चेंडू पडल्याचं जाणवलं...तसा मी (हतात लग्नमाळ धरुन धरुन दुखावलेल्या खांद्यांसह...) सुटकेचा नि:श्वास सोडला. आजुबाजुनी टाळ्यांचा कडकडाट झाला..आमच्या परस्पर माळा घालणे..इत्यादी सर्व काहि अवरले. आणि मग पुढे काहि वेळातच ..म्हणजे मुख्यतः आंम्ही दोघे निवांत झाल्यावर , दोन्ही आंगणांना जोडून तयार केलेल्या त्या भोजन मांडवात...आलेले आणि थकंलेलेंही सारे भो जनं ,जेवण्यास जाऊ लागले. तसाही पुढे तो वधुवरांना भेटण्याचा कोणताही कार्यक्रम काकानी वगळलेला होताच.आणि मलाही तो नकोच होता. 'आलेल्या लोकांना आपल्यापर्यंत मुद्दाम येऊन आशिर्वाद द्यायला कसले लावायचे???...आपण मांडवात ते बसले असतील ,तिथे जाणं आणि हवा त्यांना नमस्कार करून आशिर्वाद घेणं...हेच सर्वस्वी अधिक उचित!' - ही काकाची आणि माझिही मनोधारणा असल्यामुळे,तो तास दिडतासाचा सगळा सोहळा ,आमच्या आज्जिच्या भाषेत सांगायचं म्हणजे,आंम्ही एकदम "कटाऊट" करून टाकलेला होता. त्यामुळे त्या स्पेशल खुर्च्या मांडणं आणि त्यावर फोटुवाल्यांना आवश्यक त्या पोझ-टाकत बसणं, हे सगळच रद्दबातल झालेलं होतं. तसाही हे मंङगलकार्य स्मरणात रहाण्यापुरते..फोटो मारायला..काकानी त्याच्या संघटनेतला एक फोटोग्राफर पकडून आणलेला होताच. तो त्याला सांगितलेले फोटो एका बाजुनी हवे तसे मारत होता. आणि त्यातच सप्तपदी नंतरचे, झाल/सुनमुख/नामलक्ष्मीपूजन हे आचाराचे-तयार झालेले विधीहि (काकाआज्ञेनुसार..)करायचे नव्हतेच. शाहीपंगत वगैरे डामडौलंही नव्हता. त्यामुळे सगळ्यांची जेवणे आवरून ,लोकं जायच्या बेताला आल्यावर, त्यांचे निरोप होता होता..आमची दोन्ही घरच्यांकडची एकच शेवटची पंगत्,त्याच आंगण्यात लागली. फक्त किश्याशास्त्री व्यवस्थापककर..,यांनी आमची मित्रमंडळींची एकपंगती...चांगली लांबलचक म्यानेज करून, त्याच्या बरोब्बर मध्यभागी आमची दोघांची आसनव्यवस्था-केली होती. हेतू स्पष्ट्च होता..आंम्हाला मनसोक्त चिडवता यावं! मग जेवणं सुरु झाली..आणि मला अज्जिब्बात इंट्रेस नसलेला.."उखाणे" , नावाचा महाभयंकर प्रकार सुरु झाला. आणि इथे किश्याच्या जोडीला सुर्‍याही आला. दोघांनी मेल्यांनी...स्वतःची जेवणे सोडून्,उखाण्यांचाच घास-घ्यायचा चंग बांधला होता. मग सर्वात आधी मला , उखाणा-घ्यायला लावण्यात आला. मी आपला भाजीत भाजी...आजी माजी...ह्याची त्याची...अशी शोधाशोध करायला लागलो,तर काकानी मागच्या लैनीतून माझ्यावर.."आत्मू....अरे ते दुसर्‍यांची लग्ने लावताना,त्यांना सुचवितोस...तसले काहितरी आयत्यावेळचे ..घे...कि आता!" असा बाँम्ब टाकुन, माझी पुरती कोंडी करून टाकली. मग मी आपला "रायगडचा आंबा,गोव्याचा काजू..आणि वैजूचं नावं घ्यायला,मी-कशाला लाजू?" असं म्हणून ...एकदाची-मान टाकली. हिनी मात्र, "कंठात शोभतो रत्नहार्,हातामधे कंकण..." ..अशी पहिली ओळ खरोखरी आलंकारिक घेऊन्,पुढे..."आत्मारामी घर माझे,आत्मारामी आंगणं" अशी माझी नको इतकी तारीफ करवणारी माळ त्यात टाकली. पण उपस्थितांचा त्यालाही कौतुकपूर्ण प्रतिसाद मिळाला. पण किश्या आणि सुर्‍याला मात्र, हे सगळं ग्गो...गोड चाल्लेलं बघवत नव्हतं. (दुष्ट मेले.. :-/ ) . मग आधी किश्यानी "वैजू दे गं आत्म्याला तू,गुलाबजामूनचा घास,आत्म्या...खरच देत्ये..ती...तो...,आता तरी हास!" . असा फास माझ्या गळ्याभोवती टाकलाच. मग सुर्‍याला सुरसुरी आली.. आणि त्यानी "आत्मूवरती मित्रमंडळी खातात भलताच खार, कारण..पहिल्याच फटक्यात आत्मूचा..सरळ उडाला बार" असं म्हणून मला गुर्जिंदेखत ठ्ठार केलन मेल्यानी. पंगतीतली माझ्या गुरुजी आणि काकूसह जेवणारी लोकंच काय?,पण त्या वाढणार्‍या बाया मुलि देखिल...हसून हसून लोळायच्या शिल्लक राहिल्या होत्या. मला सारखा प्रश्न पडे,की गुरुजी इथे असताना...हे दोघे, असे चावटपणा कसे करु शकतात?. पण नंतर काकानी(च) यांना 'अभय' दिलय आज..हे कळल्यावर मला काकाचाच जास्ती राग आला. यावर कडी की काय..म्हणून काकानी चक्क काकूलाच उखाणा घ्यायला लावून..."आंम्हाला ऐकू दे की आमच्या मित्राचं नाव उखाण्यातून...तेंव्हा आंम्ही कुठे होतो?- ते ऐकायला..." असा तिला बरोब्बर-अडकवणारा आग्रह केला. आणि सगळी पंगत..'काकूच आता चिडतेबिडते की काय?' अश्या मुद्रेनी काकूकडे पाहू लागली. पण काकूनी आंम्हा अत्रंगी,चिडखोर,भोळ्या,लबाड,भांडखोर.., अश्या सर्व प्रकारच्या मुलांना, पाठशाळेत इतकी वर्ष काहि असच सांभाळलेलं नव्हतं!...तिथे काकाला सांभा़ळून घ्यायला ,ती काय हरणार होती होय? मग काकुनी सगळ्यांना , "हे पहा..,माझं जेवणंही आटोपलय..म्हणुनंही..आणि आता या वयात एव्हढ्ढास्स्सा उखाणा वगैरे घेऊन्,मी तुंम्हा तरुण पोरापोरींचा आणि सखाराम भावजींचा मान कशाला कमी करु? ..मी आपली एक जुन्या ठेवणीचं गाणच गाते,त्यालाच हवा तर उखाणा समजा!." असं म्हणाली. आणि काकुचं गाणं..म्हटल्यावर..मग नाकारेल कोण? आधी काकूनी गायलेलं मंङगलाष्टक सगळ्यांच्या स्मरणात होतच. मला तर मनातून या निर्णयाचा आनंदच झाला. कारण काकूचं गाणं..म्हटल्यावर...,याच्या इतकी चिरस्मरणीय आनंदाची ही लग्नभेट , माझ्यासाठी दुसरी कोणती असणार होती? आणि काकूनी गाणं तरी कोणतं निवडावं...? ज्याच्यामधे तिच्या त्यागंपूर्ण ,आणि तरिही प्रीतीमय केलेल्या संसारी जीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं होतं..,-असच!. काकूनी आलाप घेऊन सुरवात केली... "आं...sss... मुरलीधर..घनःश्याम सुलोचनं..मी मीरा तू...माssझे जीवनं...." या भक्तिरसंपूर्ण गाण्याच्या..,पहिल्या ओळिपासून माझं मन तर एकदम, शालेय जीवनातल्या त्या लवकर सकाळी उठण्याच्या त्रासात, जो रेडिओचा प्रभातंगीतांचा सुखद सहवास असायचा , त्या काळात गेलं. कारण हे गीतंही प्रथम त्याच कार्यक्रमात कित्येकदा ऐकलेलं! त्यामुळे त्या आठवणी आधी जाग्या झाल्या..पण पुढे पहिलं कडवं झाल्यावर..,परत काकूनी धृवपदात..ती "घनःश्याम सुलोचनं.." या शब्दातली..."घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं" ही जागा,इतकी भावपूर्ण फिरत टाकुन घेतली..की,आधी वाहव्वा म्हणणारे आंम्ही सगळे,पुढील गाणं जिवाचा कान करून ऐकू लागलो. तुझ्या मूर्तीविणं..या डोळ्यांना,कृष्णसख्या रे..काहि दिसे ना। एकंतारी त्या..सुरात माझ्या,तुझेच अवघे..भरले चिंतन..॥..मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं श्यामल तनुचा..तवं देव्हारा,भू ज्योतिला..माझ्या थारा।चिंतनात मी..रमते तुझीया,सोबत करं..टाळांची किणंकिणं..॥मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं विषासंही तू .. अमृत केले,या वेडिला.. जीवन दिधले।हे उरलेले ..जीवीत माझे,तुला मुकुंदा..करिते अर्पण..॥...मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं...मी मीरा तू...माssझे जीवनं....,मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं..,मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं.............. काकूच्या गऴ्यामधे काय जादू होती ? मला कधिही कळली नाही. पण ती, तिच्या सुराच्या पहिल्या स्पर्शानीच ऐकणार्‍याला या-ऐहिकाच्या, पार पलिकडे नेऊन ठेवायची. काकानी गुरुजिंच्या मैत्रीचा फायदा उठवुन,चेष्टेपरि चेष्टा केली खरी..पण काकूनी त्यावर हे गाणं गायलं,आणि त्या चेष्टेचंही सोनं करून दाखविलं. गुरुजी देखिल भावंपूर्ण मनानी सगळं गाणं तल्लीन होवून ऐकत होते. एरवी, या पाठंशाळेसाठी वाहिलेल्या त्यांच्या रखरखीत जीवनात,असं एखादं गाणं, त्यांच्याही वाट्याला कधी आलं होतं? आणि येणारंही होतं.? ...ह्या पुढे?. ज्या माणसांनी, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी स्वतःचं जीवन जगण्याचं एकंदरीतच सोडलेलं असतं..त्यांच्यासाठी आमच्या काकासारख्या कुण्यातरी माणसाच्या अगर प्रसंगाच्या अनुषंगानीच हे काहि क्षण आत्मंसुखाचे येत असणार. एरवी अश्यांना असली सुखं-प्राप्त करवून देण्याचा विचार, आपणा स्वार्थी माणसांच्या चिंतनात तरी येत असेल काय??? या विचारानी माझं मनं पुन्हा थोड्या अपंराधी भावनेत गेलं. आणि त्याच क्षणी माझ्या मनानी असा निर्णय घेतला,की आयुष्यात जर का अश्या त्यागपूर्ण हेतूनी काहि करायची वेळ आली..तर गणपति आधी मी माझ्या गुरुजी आणि काकुची मनात पूजा करीन..आणि मगच त्या कामाला सुरवात करीन. नाहितर आपल्या सारख्याच्यात हे बळं यायचं तरी कुठून? काहि क्षण,या गांभिर्यपूर्ण.., परंतू तरिही एका निस्सिम आनंदात गेले. आणि मग आंम्ही सगळेच जणं 'परतीला निघणे' या मोडमधे गेलो. मग मात्र किश्या आणि सुर्‍या - दोघेही, सगळ्यांच्या सामानाच्या पिशव्या/ब्यागा त्या आमच्या मिनीट्रकात नेऊन लावणे. गुरुजी, काकू आणि सदाशिवदादासाठी स्पेशल रिक्षाचा इंतजाम करणे. आणखि कुणाकुणाच्या परतीच्या वाटेवरच्या प्रवासाच्या काय काय अडचणी असतील..तर त्या मार्गी लावणे. असल्या कामांच्या पाठीमागे गेले. आणि एकदाची ती सर्व आवराआवरी होऊन. आमच्या गाड्या सुटायच्या बेताला आल्या. किश्या सुर्‍या आणि माझी बाकिची सर्व मित्र मंडळी..त्यांच्या आणलेल्या वाहनांनी परतीला फिरली..आणि मग मला मात्र तो, मनाला जड होणारा- 'मुलिच्या पाठवणीचा प्रसंग' , नको नको म्हणता..आधीच, सारखा अंगावर येऊ लागला. आमच्या त्यांच्या गावात, अगदी कोकणातल्या भाषेत बोलायचच..तर खरोखर, हाकेचं अंतर होतं. पण शेवटी घराच्या अंतरापेक्षा-अंतरणारं घरं..,हा त्या नवंविवाहितेच्या मनाचा परिक्षा पहाणारा घटक अडवा येणार असतो ना? मग तो परिस्थिती पालटेपर्यंत तरी...यायचा चुकणार थोडाच? तो आलाच शेवटी. आंम्ही सगळे जणं काकानीच दिलेल्या ऑर्डर बरहुकुम, भराभरा त्या मिनीट्रक मधे बसायला लागलो..आणि मांडवाच्या कडेनी ही...हिची आई..बाबा..काका आत्या मावश्या मैत्रिणी असे सगळेजणं रडवेले झालेले, आमच्या ट्रकापर्यंत आले. आणि मग माझ्या आईनी स्वतः पुढे होऊन, हिच्या आईला.."हे पहा...आता काळ बदललेला आहे..सून वगैरे म्हणायचं ते नात्यापुरतं...मी हिला सांभाळणार..ती माझ्या मुलिसारखीच की नाही? सांगा बरं. ? " असं बोलून खरच तो,पाठवणी करणार्‍या वधुमातेचा भार..,हलका केला. मग ट्रकात चढता चढता,पुन्हा हिला उद्देशून..हिच्या आईनी , "जरा शांत डोक्यानी रहा तिकडे गेल्यावर...कुणी एक म्हणालं,तर लगेच दोन म्हणायला जाऊ नको..(आता..!) " असे काहि शेवटचे उपदेश केले . ही पण सारखे डोळे पुसत..आईच्या दर वाक्यानंतर.."हो!"...."हो!"..असं करत होती. आणि ट्रक निघाल्या नंतर घराकडे जाता जाता...मंङगलाष्टकं संपल्या संपल्या, जो आंम्ही दोघांनिही पहिला नमस्कार गुरुजी आणि काकुला केला होता..त्यानंतरच्या गुरुजिंनी दिलेल्या आशिर्वादाचं, मी मनात चिंतन करित होतो..
॥दंपत्यो: अविच्छिन्ना प्रीतीरस्तु॥
"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो. ======================================================== (काहि काळापुरती...) विश्रांती.... मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)
भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३० भाग- ३१ भाग- ३२ भाग- ३३ भाग- ३४ (विवाह विशेष...-१) भाग- ३५ (विवाह विशेष...-२)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16619 views

💬 प्रतिसाद (34)
ह
हाडक्या Tue, 03/17/2015 - 22:44 नवीन
मस्तच हो गुर्जी..!! :) ही विश्रांती काही काळापुरतीच असो अशी आशा.. :) अजून अनुभव ऐकण्यास उत्सुक..
  • Log in or register to post comments
ज
जुइ Wed, 03/18/2015 - 00:25 नवीन
खुप आवडले :-)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 03/18/2015 - 01:03 नवीन
खूप छान. लग्न झालें. आता पुढचे अनुभव वाचण्यास उत्सुक...
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Wed, 03/18/2015 - 01:44 नवीन
गुरूजी सुरेख हो. छोटीशीच राहू द्या विश्रांती आणि अजुन पुढे लिहा. खुप सुंदर झाली आहे ही लेखमाला :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 03/18/2015 - 02:49 नवीन
विवाहविशेष लेखन अगदी सुरेख झालेय. हे साधे लग्नच बरे वाटतेय. खूपच छान लिहिलयत. आता तुम्ही थोडी विश्रांती घ्याच गुर्जी! तुमच्या हिरविनीचे आणि माझ्या साबंचे माहेरचे नाव एकच असल्याने मला आपल्या त्याच डोळ्यासमोर येत होत्या.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 03/18/2015 - 18:02 नवीन
आवो !! अत्ता फुडे तर खरी "मज्जा" येणाराय... विश्रांती नका घ्यायला नका सांगू
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/18/2015 - 04:22 नवीन
जबरी हो बुवेश. छानच लिहिताय. पुस्तक काढाच.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 03/18/2015 - 04:27 नवीन
खुपचं मस्तं. डोळ्यासमोर जिवंत उभं राहिलं सगळं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/18/2015 - 04:37 नवीन
मस्त. :)
अश्या त्यागपूर्ण हेतूनी काहि करायची वेळ आली..तर गणपति आधी मी माझ्या गुरुजी आणि काकुची मनात पूजा करीन..आणि मगच त्या कामाला सुरवात करीन.
हे खूप आवडलं.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 03/18/2015 - 04:40 नवीन
तुमच्या लेखनात वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/18/2015 - 06:47 नवीन
कौतुकाचे सगळे शब्दच संपले आहेत या लिखाणापुढे, फारच मजा आली वाचताना. एक विनंती आहे ते "मधुर मधुर वाद्ये,वाजती मोदंदायी" संपुर्ण वाचायला मिळेल का? बर्‍याच दिवसांनी त्याची आठवण झाली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/18/2015 - 06:57 नवीन
@"मधुर मधुर वाद्ये,वाजती मोदंदायी" संपुर्ण वाचायला मिळेल का?>> का नाही? अवश्य!
मधुर मधुर वाद्ये,वाजती मोदंदायी वधुवर करि माला,घेऊनी सज्ज होई जवळ जवळ आली,ही घडी मीलनाची मुदित उदित प्रेमे,भेट दोन्ही जिवांची...सुमुहुर्त सावधान!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/18/2015 - 07:01 नवीन
(काहि काळापुरती...) विश्रांती...
हे बरं केलंत, मला वाटलं आता 'कथानायक' हनीमूनला कुठे गेले ते पण लिहीतात की काय !! ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/18/2015 - 07:12 नवीन
व्वाह! फारच सुंदर-प्रतिसाद दिलात. मण....भरून आलं अगदी!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 03/18/2015 - 07:29 नवीन
@सुड 'कथानायक' हा शब्द """"""""""""""""""कथानायक""""""""""""""""""" असा लिहावा ही नम्र विनंती. =))
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 03/18/2015 - 07:31 नवीन
हे किशा गडकरी आणि सूर्या गावडे मिपावर पण आहेत का हो
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/18/2015 - 07:33 नवीन
@हे किशा गडकरी आणि सूर्या गावडे मिपावर पण आहेत का हो >> Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 03/18/2015 - 11:57 नवीन
हाहाहाहा!!!
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Wed, 03/18/2015 - 15:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/19/2015 - 10:03 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 03/18/2015 - 07:31 नवीन
बाकी हाही भाग एकदम बुं गा ट
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 03/18/2015 - 09:55 नवीन
वाह !!!!!!!
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 03/18/2015 - 11:03 नवीन
हा लेख म्हणजे आदर्श विवाहाचेच उदाहरण . आजकाल बॅचलर पार्टीच्या नावाखाली मित्रमंडळी कुठे तरी ढाब्यावर जाउन जो धुमाकुळ घालतात त्यांनी या लेखातुन काही बोध घ्यावा .
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 03/18/2015 - 15:40 नवीन
उघडल्यावर बराच मोठा वाटला हा भाग, पण वाचायला सुरूवात केल्यावर मग एका दमात वाचून काढला. ललित लेखन जबराट लिहिता राव बुवा तुम्ही. त्या किशा न सुर्याच्या टोमण्यांकडे लक्ष नका देऊत. ;)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/18/2015 - 15:47 नवीन
गुरुजी तुम्ही लिहिता पण छान आणि भाषाही ओघवती आहे. ओघा ओघात लग्न पण करून टाका. उडवा बार. लोकांची लग्नं किती दिवस लावणार?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 19:03 नवीन
सुंदर मालिका ! पुस्तक काढाच याचं !!!
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 03/18/2015 - 20:38 नवीन
छानच झालीय पूर्ण मालिका. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 09:21 नवीन
सर्वप्रथम..या लेखमालेच्या सर्व वाचक,प्रतिसादक्,सहभागितांचे मनापासून धन्यवाद. आणि याच भागातलं हे गीत (मुरलीधर घनःश्याम सुलोचन..)आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी लावतो. ========================================================== मी जेंव्हा ही लेखमाला लिहायला घेतली. तेंव्हा असं वाटलं होतं.की ४/५ भागात हे संपेल. फार तर दहा भाग होतील. कारण,त्यावेळी फक्त एक कथानायक निवडून त्याला मध्यवर्ती करून ह्या व्यवसायाचं अंतरंग खुलवावं.यातल्या गमतीजमती सांगाव्या,एव्हढाच माफक उद्देश होता. पण तो ही पूर्ण होता होता,१७ भाग झाले. पुढे काहि लिहिण्याचं माझ्या मनातंही नव्हतं. परंतू एकेदिवशी माझ्या नगरच्या वेदपाठशाळेतल्या,सोलापुरी मित्राचा फोन आला..(ह्ये बेणं मारवाडी ब्राम्हण हाय्,आणि...अट्टल गोडखाऊ आहे येक नंबरच! :D ) "पर्‍या आबे, काय करतोय बे...?,मी पर्वा यायलोय पुण्याला. तू हाएस ना? ..त्ये गेल्या वेळेसच्या ठिकाणी रबडी खायला जाऊ की बे..." . आणि झालं मग! . माझा पाठशाळेचा अख्खा नॉश्टेलजिया भायीर आला. नगरच्या शाळेपासून ते पुण्याच्या पाठशाळेपर्यंत सगळी फिलिम डोळ्यापुढे सरकायला लागली. आणि तिच्याबरोबर माझ्या अजोळी म्हणजे,हरिहरेश्वरला..अगदी लहानपणी मे महिन्यात सुट्टीला गेलेलो असतानाचा 'वे.मू.सितारामका जोशी ' यांचा आंगणात २ विद्यार्थांना संथा देतानाचा सीनंही त्यात मिसळला... ह्या सगळ्याची मिळून एक गोळी तयार झाली,आणि ती वेदपाठशालीन जीवन चित्रीत होण्यात रुपांतरीत झाली. मग मी मनात उभारलेल्या ह्या कोकणातल्या वेदपाठशाळेला..पुण्यात व्यवसाय करत असतानाचे ,कोकणातल्याच इतर पुरोहित मित्रमंडळींचे सांगितलेले अनुभवांचे खांब येऊन जोडले गेले. त्यात मी स्वतः अगदी पहिली दुसरी पासून ..दर मे महिन्याची सुटी,ही अजोळी हरेश्वरला यथेच्छ उपभोगली असल्यामुळे...त्या मनाच्या भट्टीत भाजल्या गेलेल्या अस्सल विटांच्या आपोआप भिंती झाल्या. मी ज्या ज्या पाठशाळांचे शिकविणारे अध्यापक-गुरुजी पाहिले होते,त्यांची ती सगळी पद्धती रहाणीमान्,विचार/आचार,संस्कृती त्यात आली. आणि माझ्या कथेतले मुख्य गुरुजी,काकू,सखारामकाका .. ही पात्र तर कोकणभूमीमधल्या सर्वप्रकारच्या माणसांचं एकत्रित संस्करण आहे..असं समजलं तरी चालण्यासारखं आहे. फक्त त्यांचा आत्मा, जो त्यात जाणवत गेलेला आहे,तो मात्र मला लहानपणापासून माझ्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात भेटलेल्या जवळच्या व्यक्तिविशेषांचाच आहे. अश्या पद्धतीची माणसं,हा कोकणाच्या लालमातीचाच संस्कार आहे,असं मी म्हटलं तर फार अतिशयोक्ती होणार नाही. :) तरिही आठरावा भाग लिहिताना त्याच्यापुढे, वेदपाठशाळेचं इतकं संपूर्ण चित्रण घडेल..अशी माझ्या मनाला अजिब्बात कल्पना नव्हती. पण त्या १८ आणि १९व्या भागात,मला जो काहि अतीशय उत्साह वाढवित नेणारा,आणि मनाला आशिर्वाद देणारा प्रतिसाद मिपाकरांकडून मिळाला,त्यातल्या वाक्यावाक्यामुळेच तर मी पुढे इतका लिहित गेलो... :) याकरिता त्या सर्वांचे, आज ही छोटी विश्रांती घेताना, मनःपूर्वक आभार... मी ह्या लेखमालेत कोकण हाच प्रांत कसा काय निवडला? आणि मी स्वतः कोकणातल्या एकाही पाठशाळेत शिकलो ,अगर गेलो नसलो,तरी हे चित्रण इतकं चांगलं कसं उमटलं? असा प्रश्न मला इथे व्य.नि.तून..आणि फेसबुकावरील असलेल्या माझ्या काहि क्लायंट्स कडूनंही विचारला गेलेला आहे.. त्याचं उत्तर इतकच की कोकणच्या लाल मातीवर माझं जबरदस्त प्रेम आहे. आजंही मला जर कुणी पुण्यातला व्यवसाय सोडून कुठे जाऊन स्थिरावलेलं अवडेल? असं विचारलं,तर माझ्या नकळत मी कोकणाचं नावं घेइन,इतकी त्या लालमातीची आणि तिथल्या निसर्गाची ,माणसांची माझ्या मनावर गडद दाट छाया पसरलेली आहे. म्हणूनच मला जरं का कुणी देवाचं पर्यायी नाव आजंही विचारलं , तर मी ते कोकण असं सांगतो. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 03/19/2015 - 09:37 नवीन
फोटो दिवेआगर की हरेश्वरचा?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 09:51 नवीन
@ दिवेआगर की हरेश्वरचा?>>> हरेश्वर. माझ्या मामाच्या घराशेजारून , मागे समुद्रावर जाणाय्रा वाटेचा.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 03/19/2015 - 10:00 नवीन
भावं विश्व ही मालिका फार छान झाली आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/19/2015 - 14:51 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. या स्मायल्या पेँट आर्ट वापरून ते फोटो अपलोड करून मीच बनवल्या आहेत {पण माझी चित्रकला चांगली नाहीयै}.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 15:09 नवीन
आइल्ला! :-D लै भारी :-D
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 03/19/2015 - 15:25 नवीन
लग्नाचे एवढे सुंदर वर्णन आजगायत कधी वाचले नव्हते. वाचताना असे वाटले एखादा सिनेमा बघतो आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा