Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खानदेश सफर

त
त्रिवेणी
Tue, 02/17/2015 - 08:47
💬 55 प्रतिसाद
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं ! अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार ! अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार ! निरक्षर असुनही जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असलेली खानदेश कन्या. अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी एक साधी शेतकरी महिला. तसेच ना धो महानोर शेती, माती, पाणी, पीक आणि निसर्गाशी नाते जपणारे कवी अशा मातीशी जोडलेली, निसर्गाशी जोडलेली, रोजचे जीवन काव्य रूपात आपल्या समोर उभे करणारे खानदेशचे हीरे. या अशा माझ्या खानदेशची मला जमेल तशी सफर सगळ्यांना घडवने कधी पासून मनात होते. तर मंडळी जसे शक्य होईल तशी माझ्यापरीने सुरवात करते. दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्ट्यांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खानदेश. अगदी प्राचीन काळापासून तर आतापर्यंत खांडववन, सेऊणदेश, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा वेगवेगळ्या नावांनी हा भूप्रदेश ओळखला गेला आहे. 'कान्ह देश'पासून खान्देश शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. या भागाची कृषी संस्कृती खाद्य संस्कृती वेगळी आहे. येथे प्राचीन परंपरा आहे. अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी बरोबरच जळगाव जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेली पाटणादेवी, मुक्ताईनगर, चांगदेव, कोथळी, मनुदेवी, उनपदेव, रामेश्वर अशी अनेक तीर्थस्थळे, पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांची बर्‍याच लोकांना माहिती नाही. गहू हे मुख्य अन्न असलेली उत्तरेकडचा भाग तसेच तांदूळ हाच मुख्य अन्न घटक असलेला दक्षिण भाग यांच्या मधोमध असलेल्या आपल्या महाराष्ट्रात चौरस खाद्यसंस्कृती आहे. आणि ही खाद्यसंस्कृती ही आपल्या रोजच्या जेवणात आपण आंगीकरली आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्याप्रकारची फळं, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने नटलेली आहे. पोळा आणि अक्षयतृतीय हे दिवाळी इतकेच महत्वाचे सण प्रत्येक खानदेशी माणसाच्या जिवाहळ्याचे. पोळा हा पोळा हा सर्वच खानदेशी शेतकरी बांधवांचा सण. तर अक्षयतृतीयेला जावयाचा मान. ह्या सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी खीर, आंब्याचा रस, हरभर्‍याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, नागलीचे पापड, कुरडय़ा कांद्याची भजी असा भरगच्च बेत ठरलेला असतो. मातीचे खापर चुलीवर ठेवून पुरणाचे सारण भरून तळहातावर रूमाली रोटीसारखी केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी किवा मांडे. अक्षयतृतीयेला जावयाला याच मांड्यांचा पाहुणचार असतो. आम्हा खान्देशी मंडळींना तिखटाचे वावडे नाहीच. अगदी भाकरी किंवा पोळीवरही आम्ही तेल, तिखट व मिठ घालून खातो. तसाच अजून एक पदार्थ – दाळ बट्टी/ बाटी. ज्या प्रमाणे भरीत पार्टी होते तशीच खानदेशात बट्टी चे जेवण ही कोणी टाळत नाहीत. मस्त शेतात एक मोठा खड्डा करून त्यात गोवार्‍यांवर भाजलेल्या खरपुस बट्ट्या एका कापडाने पुसून गवराण तुपात बुडवून मग डाळीबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुखच. यालाच काहीजन रोडगा असे म्हणतात. ठसकेबाज शब्दसंपदा असलेली आणि ऐकायला गोड अशी अहिराणी भाषा, कष्टमय जीवनशैली आणि तितकीच अस्सल गावरान व झणझणीत शेवभाजी व वांग्याचं भरीत, ही खानदेशची खाद्यसंस्कृती. हिरव्या वांग्याच भरीत हे सुद्धा आमचे जीव की प्राण. रोजच्या जेवणात मसालेदार, तिखट व चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. "वांग्याचं भरीत आणि शेवभाजी म्हणजे खानदेश' असं समीकरणच आहे .नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जळगाव जिल्ह्यातील बामणोद, भालोद, ममुराबाद, असोदा, भादली येथे या वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरांतील माती व वातावरण भरताच्या या विशिष्ट वांग्यासाठी पूरक आहे. तूर व कपाशीच्या काड्यांवर खरपूस भाजलेली वांगी, कांद्याची हिरवीकंच पात, लसूण, लवंगी मिरच्यांचा हिरवा ठेचा आणि तेलाचा सुयोग्य वापर करून तयार केलेलं चटकदार भरीत केळीच्या हिरव्या पानावर पाहताच भूक नसणाऱ्यालाही सपाटून भूक लागते. p मला अजुनही आठवते लहान असताना हट्टाने सुकलेल्या काड्या कोलोनीत कुठे मिळतात का हे शोधायला जात असे नाही मिळाल्या की कामाला असलेल्या आजीची रवानगी काड्या शोधायला पाठवत असे. वडिलांची बदली काही वर्ष सवखेडा नांदेड या गावी झाली होती तेव्हा बँक बंद होण्याआधी काही वेळ तिथले स्नेही काड्यांवर भाजलेले वांगे पाठवत असत कारण कितीही झाले तरी कड्यांची चव गॅसवर येत नसे. जिभेला आलेला तिखटपणा कमी करण्यासाठी देशी साजूक तुपात तयार केलेला रव्याचा दराबा आणि गुळापासून बनवलेली गोडीशेव हा रास्त उतारा.. या दिवसात शेवभाजी व भरताच्या या खानदेशी मेनूचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर-पुणेकर जळगावच्या नातेवाइकांकडं हक्कानं येतात; तर मुंबई-पुण्याकडे असलेल्या आप्तांकडं जळगावकरांच्या वाऱ्या वाढतात. या प्रत्येक वारीत जर त्यांच्याबरोबरच्या सामानाची तपासणी केली तर त्यात भरताची वांगी, कांद्याची हिरवीकंच ताजी पात, शेवभाजीसाठी लागणारी जाड तिखट शेव आणि या दोन्हींना लज्जत आणणारा खास मसाला नक्की सापडेल. होळीला खांदेशात बहुताश घरातून फुणके, कैरीचे पन्हे आणि लाडवे असतात. फुणके- म्हणजे मिश्र डाळींचे मुटके. लाडवे- हे गव्हाच्या पीठाचे छोटे छोटे शेंगोळ्या वळून खडखडीत वाळवून गुळाच्या पाकात शिजवलेला पदार्थ.(याचा फोटो होळीच्या वेळा देईन). त्याच प्रमाणे हिवाळ्यात हिरव्या मिरच्यांची दाणे कूट घालून पातळ भाजी केली जाते. हिवाळ्यातील अजुन एक आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कळण्याची भाकरी. ज्वारी किवा बाजारी+ अकखे उडीद समप्रमाणात घेवुन केलेली भाकरी त्याबरोबर मिरचीचा झणझणीत ठेचा. तसेच काळ्या उडीद डाळीची पातळ भाजी हे सर्व हिवाळा स्पेशल खानदेशी पदार्थ आहेत. patodya bhaji पातोड्याची भाजी modak मसला मोदक भाजी क्रमश:

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13910 views

💬 प्रतिसाद (55)
प
पैसा Fri, 02/20/2015 - 09:35 नवीन
झक्कास लिहिलंय!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 02/20/2015 - 09:35 नवीन
मी, आरोही.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 02/20/2015 - 09:40 नवीन
मोदक भाजी
  • Log in or register to post comments
र
राशी Tue, 02/24/2015 - 15:19 नवीन
क्या बात!.. खुप छान!
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Tue, 02/24/2015 - 19:25 नवीन
आम्ही खान्देश चेच , त्यामुळे अधिक माहिती लिहिणे आवश्यक वाटते. पुरणपोळीसाठी जी हरभर्‍याची डाळ शिजत घालावी लागते , तिचे डाळ शिजविल्यानंतर चे वरवरचे पाणी काढुन त्याची मसाले घालून रस्सा बनविला जातो. त्याला आम्ही " रश्शी " म्हणतो. पुरणपोळीच्या जेवणात , भाताबरोबर हीच रश्शी वरुन टाकतो आणि मजेत खातो. त्यादिवशी भातावर वरण नसते. शेणाच्या पेटत्या गोवरींवर , निखारा तयार झाल्यानंतर भाजलेल्या बट्ट्या खायला खूपच खरपूस लागतात. पण आता मुंबई सारख्या शहरात गोवर्‍या आणुन त्यावर बट्टया भाजणे शक्य होत नाही . आता बट्ट्या तशाच घडवितो आणि कढईत मंद आचेवर तुपात तळून घेतो. अशा बट्टया आणि त्यावर तुरीच्या डाळिचे वरण , वर साजुक तुपाची धार, मग काय ? त्यापुढे पंचपक्वानाचे जेवण सुद्धा फिके वाटते. अशा ह्या जेवणानंतर , पाणी खुप प्यावेसे वाटते.तहान खूप लागते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा