Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/12/2015 - 10:56
💬 27 प्रतिसाद

Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

  • ‹ गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९
  • Up
  • गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३१ ›
मागिल भाग..यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.! पुढे चालू.... ============================= तर असं हे आमचं प्रतिवार्षिक अनुष्ठान. आमच्या निरनिराळ्या गमती जमती, गुरुजिंचे आणि त्यांच्या आलेल्या मित्रांचे वादविवादांचे नाना प्रकार..धर्म अधर्माच्या चर्चा..आणि एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने कसा करावा? याचं आंम्हाला एक प्रकारचं प्रशिक्षण.., असं सर्वकाहि देऊन संपायचं. नंतर दुसर्‍याच दिवशीपासून पुन्हा आमचे आपले पाठशाळा एके पाठशाळा सुरु व्हायचे. आमच्या बॅचचं शिक्षणंही एव्हाना निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण झालं होतं.मी आणि माझ्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेकदा मनात अशी इच्छा व्हायची की..सदाशिव दादा बरोबर पंचक्रोशित काहि पौरोहित्याच्या कामाला जाता यावं.(प्रॅक्टीस म्याच सारखं!).आणि ते ही फक्त अनाध्यायाच्या ,म्हणजे सुट्टीच्या दिवशी! आणि संपूर्ण धर्मार्थ!... म्हणजे दक्षिणाहि नको,दानंही नको..काहिच नको..फक्त प्रॅक्टीस मिळावी. ही इच्छा! कारण सदाशिवदादा या पौरोहित्याच्या कामामधे अत्यंत तरबेज माणूस होता. यजमानांशी फक्त कार्यक्रम-ठरविणे ,इतकेच नाही..तर एकावेळी मोठमोठ्या अनुष्ठानांसाठी अगदी गावा तालुक्या राज्या बाहेरूनंही पन्नास ते पाचशे संख्येपर्यंत सहाय्यकपुरोहित गुरुजि बोलाविणे,त्यांच्या टीम पाडणे.कुणी त्यात राजकारण केले,तर आपण सवाई राजकारण करणे.असल्या बाबतीत तो अगदी निष्णात्त तयार होता. सदाशिवदादाचा एरवीचा तापटपणा आणि बराचसा माणूसघाणेपणा , हा ह्या पुरोहितपणाच्या व्यवसायाच्या स्टेजवर किंवा स्टेज'ला कुठे पळून जायचा .??? , हे आंम्हाला, स्वतः कामात पडेपर्यंत कळलेलं नव्हतं...मग पुढे स्वतः जेंव्हा त्यात मरायला लागलो तेंव्हा त्यातले सगळे स्वर्ग(नरकांसह!) आंम्हाला दिसायला लागले. आणि त्यांकडे अपरिहार्यपणे जाताना वाटेत कराव्या लागणार्‍या तडजोडीही आंम्हाला कळायला लागल्या.आणि त्यासाठिच कसं शांत वागायचं..हे ही हळुहळू कळायला लागलं. पण तोपर्यंत आंम्हाला ते एक कोडेच होतं. :) शिवाय गुरुजिच नेहमी सदाशिवदादाच्या चिडकट स्वभावामुळे,त्याला सांगायचे-
"अरे सदाशिव ..यजमानाच्या घरात पाय ठेवण्यापूर्वी आपला स्व-भाव, (धर्मविषयक) श्रद्धा,मतं,धोरणं,शास्त्र..हे सर्व, आपला शर्टं जसा काढून बाहेर खुंटीला टांगतो..तसं काढून-टांगुन ठेवायचं आणि मगच त्याच्या घरात प्रवेश करायचा असतो. हे केलस...,तर तू खरा पुरोहित! आणि हा नियम साक्षात ब्रम्हदेव जरी पौरोहित्यास भूतलावर-उतरला, तरी त्यालाहि पाळावा लागेल. नाहितर त्याच्यात कित्तीहि ब्रम्ह-असलं,तरी त्याला कोणताहि यजमान-देव सुद्धा म्हणायचा नाहि. मग गुरुजि म्हणणं..लांबच! क्का....य???"
हे सूत्र कानात तेल घातल्या प्रमाणे मेंदूपर्यंत जाऊन रुळलेलं होतं. सदाशिवदादाच्याहि आणि आमच्याहि. :) ................ पण आमची सदाशिवदादा बरोबर कामाला जाण्याची इच्छा,कित्तीही प्रामाणिक असली,तरि गुरुजि या गोष्टीच्या एकदम विरोधी! कारण.."शिक्षण काळामधे विद्यार्थ्यांना कामांसठी बाहेर पाठविणे,अगर-नेणे..म्हणजे पाठशाळेचा आत्म उद्धारासाठी कारखाना करणे होय!" असं त्यांचं एकदम १०० डिग्री कडक मत होतं. आंम्हाला यातला खरा-अर्थ तेंव्हा कळायचा नाही. पण एकदा मी सदाशिव दादाला विचारलं त्यासंबंधी..तेंव्हा तोच असं म्हणाला की, दादा:- "अरे आत्मू..बरोबर आहे त्यांचं. एकदा तुम्हा मुलांना कामे-यायला लागली,कि सुट्टीत घरी गेल्यावर तुम्हांला कामांना जाण्याचा मोह पडणार नाही,याची खात्री काय? आणि आजवर ज्या ज्या पाठशाळांनी हा नियम मोडला,किंवा पाळलाच नाही..त्यांच्या शाळाहि टिकल्या नाहीत्,त्यातले पाठंही टिकले नाहीत,आणि विद्यार्थिही! काय समजलास? मी:- "हो! बरोबर." दादा:- "अरे .., हा बरोबर चूकचा प्रश्न नव्हे..अरे गाढवा, पाठशाळा शिक्षणं शिकवायला उघडायच्या की हमाली शिकवायला?" मी:-(घाबरत..घाबरत) "शिक्षण. पण शिकताना,ते ही शिकायला मिळालं..तर चांगलच नाही का रे दादा?" दादा:- "होsssss!!!?, आलीsssशिंग आलीss?,कानसुलित हव्येsss??? मी:- "............. :( " दादा:- "माझ्यासमोर ही असली रडवी तोंडं करू नको..मी मंजे काय तुझी काकू नव्हे..तिथे चालव तुझ्या ह्या ट्रिका! आणि हवे असेल तर ये एकदा माझ्याबरोबर..दाखवतो तुला त्या टेंबवलितल्या बुट्ट्या खविसाची पाठशाळा! मी:-(उपरण्यानी डोळे पुसता पुसता...) :D :D :D दादा:-अरे मेल्या ते आंम्ही धंद्यात-पडल्यावर त्याला ठेवलेलं नाव आहे..हसू नको..तू ही ठेवशील हो तुझ्या सहकार्‍यांस अशीच नावं!...तर सांगतोय काय मी..तो बुट्ट्या एके दिवशी आपल्या गुरुजिंकडे आला आणि स्वतःच्या सारख्याच भंपक आवाजात गुर्जींना "आंम्हाला पाठशाळा काढण्यात तुमचं मार्गदर्शन हवय!" असं म्हणाला. गुर्जी त्याला लहानपणापासून ओळखायचे. म्हणून त्यांनी लगेच त्याला "याचा पहिला आणि शेवटचा असा एकमेवं नियम..लिहून घे हवं तर! शैक्षणिक कालावधीमधे एकाहि विद्यार्थ्याला बाहेरकामांना पाठवायचेंही नाही..न्यायचेही नाही..आणि स्वतःही जायचे नाही! आहे तुझी तयारी???" हे ऐकवलं. आणि खाड्डकन तोंडात बसल्या सारखा तो आल्यापावली परतला. मी:- "मग????" दादा:- " मग काय व्हायचं? अगदी रागारागात काढलन पाठशाळा,आणि जरा शिकले विद्यार्थी ,की ने बाहेर हमालीला..,असा धोशाच लावलन नॉनश्टॉप..मग दरदोन वर्षाला पाठशाळेत नवं रिक्रूट लागायला-लागलं. अरे जिथे पाठ'च नाही,तिथे शाळा कुठची रहाणार? विद्यार्थी ह्याच्याच बरोबर जरा तयार झाले,कि कशाला बघतायत याचं आणि शाळेचं तोंड? मी:- "पण ते त्यांचे गुर्जिच ना काहि झालं तरी!" दादा:- "अरे गुरुजि कसला तो..? जो विद्यार्थी घडवतो,तो गुरुजि!..हा मेला आत आणून बडवतोच नुस्ते!,घडवतो काय? शष्पं!? पाठशाळेची बैलशाळा करून टाकलन हो अगदी. आणि घरचे कामगार म्हणजे धंद्याला स्वस्तात उपलब्ध! हे नाही का? मग नंतर ती पोरे,हा व्यवहार अनुभवल्यावर..याची मान ठेवतील का कापतील? सां...ग?" मी:- "....................." दादा:- "जाऊ दे. तुला हे सगळं अत्ता कळायचं नाही. तू आपल्या त्या ग्रामपंचायती जवळ ती पाटी वाचतोंस ना? नेहमी!" मी:- "कोणती?" दादा:-"अरे कोणती कोणती काय? तिथे ती पाटी नसते हिरवी..सदर कामाचे स्वरुपः- अमुक तमुक पर्यटन विकास अधिनियम अंतर्गत...असं कायसं लिहिलेलं असतं,आणि त्या खाली ठळ्ळक अक्षरात अजुन एक शब्द असतो.. रो.ह.यो. मी:- हां..हां .. रो..ह..यो..! मंजे त्या मद्राशी पिच्चर मधल्या आय्योय्यो सारखं! दादा:- (क्कप्पाळावर हात मारत!) "तुझी शिनेमा आणि गाणि जात नैत हो अजुन आत्म्या. एकदा फटकवायला हवाय पुन्हा तुला. अरे गद्ध्या, रो.ह.यो. मंजे..रोजगार हमी योजना!.. तेच चाल्लय हो याच्या शाळेचं! सगळे कामगार त्याच योजनेत राबवतो तो खविस. प्रत्येक विद्यार्थ्याला, रोज ग्गार वाटेल.. इतक्या पैश्यांच्या हमीची त्याची ती योजना.चला जाऊ द्या...आलं बघ ते दळण-न्यायच्या बेताला...उचल त्या पिशव्या आणि लाव सायकलीला." तेंव्हा हे सारं रामायण ऐकून,मलाहि काहि सगळच कळालेलं होतं असं नव्हे.पण.., सदाशिवदादा एव्हढा पोटतिडकिनी बोलतोय,म्हणजे नक्कीच त्याचं बरोबर असणार्,असा एक अंदाज मी माझ्या मनाशी बाळगला होता. आणि पुढे तसच निदर्शनालाहि आलं. मी पुण्या मुंबई सारख्या शहरात,हे काम करत असताना,असल्या काहि गुरु-जनांनी.. असे ठेवलेले विद्यार्थीही पाहिले. आणि नंतर याच विद्यार्थ्यांनीहि त्या गुरु-जनांना स्वतःच्या व्यवसायात बोलावून कड्क शब्दात ठेऊन-दिल्याचंही पाहिलं. त्यामुळे..., "व्यवस्था जुनी असो अगर नवी..,तिची मूल्य बरी असोत अथवा वाइट..,पण तिच्या भोवतीचे शिस्त आणि नियम हे जर मूळ हेतूच्या विरोधि(च) राबविले गेले.. तर व्यवस्था घाणच पैदा करते. हे अगदी निर्विवाद सत्य आहे," हे कळलं. आणि मग,त्यात आणि ह्यात अगदी प्रामाणिकपणेच परिक्षण करून पहायचं झालं..तर "चांगली माणसे कुठेही चांगलीच रहातात,आणि वाइट माणसे वाइट! बाकि कार-भार,तिथेही आणि इथेही.. बराचसा सारखाच असतो." एव्हढच एक अपं-वादात्मक सत्य निदर्शनाला येतं.हे ही दिसलं. पण तरिही गुरुजिंवरच्या श्रद्धेनी असो,अगर सदाशिवदादाच्या व्यावसायिक अनुभवांनी असो,त्या काळत मनावर जी मूल्यं बिंबवली ती बिंबवलीच.त्याचा परिणाम एव्हढाच झाला,कि आंम्ही स्वत:च्या व्यवसायतंही व्यावसायिकता पत्करली असली,तरी माणुसकी आणि सदाचार कधिही गमावून बसलो नाही. मग आंम्ही बंगल्यात राहो,अथवा झोपडीत! ................................ नाहि म्हणायला एकदाच मी ६ दिवस, एका स्पेशल वॉर म्हणायला लागावं अश्या परिस्थितल्या कामाला गेलो होतो. ते ही गुरुजिंच्या आज्ञेमुळेच. कारण शेजारच्या गावातल्याच एका गृहस्थाकडे ह्याच बुट्ट्या खविसाच्या टोळितल्या एकानी,ऐन सिझनला नवव्या'दिवसाच्या पासून अंत्येष्टी कार्याला , (दुसर्‍या कामाच्या..)अतीदक्षिणेच्या मोहानी- "मला नाहि जमणार" असं सांगून सरळ दांडी मारलेली होती..आणि त्या माणासाच्या अगदी तरुण वयात गेलेल्या मुलाचे दिवसच अडणार होते.. असा तो सर्वार्थानी जड प्रसंग होता. त्यामुळे अश्या खरोखर मदतीच्या प्रसंगी गुरुजि त्यांना नाकारणं शक्यच नव्हतं. फक्त आंम्हा कोणालाहि अश्या प्रसंगीसुद्धा कामाला पाठवताना,अट एकच असायची .."दान,दक्षिणा काहिही द्यायची नाही..प्रेमापोटी दिली,तरि देखिल स्विकारलि जाणार नाहि.जे काहि दान करायचं,ते तुमच्या रामाच्या देवळात करा." हे सहा दिवस मात्र मलाहि अगदी जड गेलेले होते. एकतर त्या खविसाच्या टोळितल्या ज्या कुणि पुरोहितानी असा दगा दिलेला होता, त्याचावर मी हि मनातून रागावलेलो होतो.आणि दुसरीकडे ह्या घरामधे अत्यंत दु:ख्खद आणि काहिसं भयप्रद वातावरणंही होतं. त्यालाहि कारण तोच अडेलतट्टू होता. त्यानी या यजमानाला, "तुमच्या घरात एका पंचविशितल्या माणसाचं निधन झालेलं असल्यामुळे..तो अपमृत्यु आहे. म्हणून या निमित्तानी तुंम्हास महामृत्युंजय शांति करावी लागेल..दिवसाचं कार्य संपल्यावर लगेच" असा गळ टाकून ठेवला होता. त्यामुळे ती लोकं त्याही चिंतेत! शिवाय त्यातल्या कुणा एका चाणाक्ष काकूला, "यातलं नेमकं खरं काय?" हा मूलभूत प्रश्न पडलेला. यामुळे व्हायचं असं कि नवव्या दिवसापासून काम करत असताना, अनेकदा ही मंडळी त्या दु:ख्खद अवस्थेतून या प्रश्न भयामुळे माझ्यावर काहिशी चिडत. मी माझ्या बुद्धिनी त्यांना काहि उत्तर द्यावे..तर मला 'गुर्जि मला काय म्हणतील?' आणि 'ते त्यांना बरोबर वाटेल का?' ही चिंता . शेवटी मी आपलं हात जोडून माझ्या कठिण समय येता कामास येणार्‍या-सखाराम काकाचं स्मरण केलं..आणि मग मला असं बळ आलं,की साक्षात ब्रम्हदेव जरी समोर आला..तरी मी त्यालाहि उत्तर देऊ शकेन. शेवटी देवरूपि असिद्ध काल्पनिक शक्ति काय? किंवा प्रत्यक्ष-मनुष्यस्वरूपी कल्पना भक्ति काय? दोन्हीकडे तत्व वेगळं असलं,तरी व्यवहार एकाच स्वरुपाचा घडत असतो! आणि मग तो प्रसंग आला! (दहाव्याच्या दिवशी दुपारची वेळ...) काकू:- "अहो भटजी..?" मी:- "काय हो काकू?" काकू:-"अहो मला जरा एक शंका आहे." मी:-"विचारा." काकू:- "आज हा कावळा देखिल कधि नव्हे तो झटकनि शिवला, अगदी आमच्या पुतण्यास पिंड सुद्धा ठेऊ-दिलन नाही. मग तरिही तुमच्या त्या आधी येऊन पळालेल्या भटाच्या म्हणण्यानुसार ती शांति कराविच लागेल काय??? नै.., म्हणजे अगदी तुमच्या कर्मसिद्धांता प्रमाणे गेलं..तरीहि त्याचा हा जन्म पुरा झालेला होता. हीच अटकळ खरी ठरते ना? मग साप चाऊन मेलेला माणूस अपमृत्युतलाच होत असला,तरी तो (त्याचा आत्मा)असंतुष्ट होऊन चिडला,तर त्या सापासच आणि त्याच्या कुळासच मारेल. घरातल्यांना कशाला? मुक्त होइपर्यंत आत्म्याला माणसे ओळखू येण्याइतकी बुद्धी असते..हे जर गृहीत धरलं,तर त्याला सापहि ओळखू येइलच-त्याला चावलेला! हे ही गृहित धरायला हवेच की? मग कशाला हवि शांति?" मी:- "हे पहा काकू..तुम्हि जे उत्तर धर्मन्याय्य गणितानी काढलत.तेच मी तुम्हाला साध्या भाषेत सांगणार होतो. तर तुम्हाला जे कळलय..ते बाकिच्याना कसं कळावं हा खरा प्रश्न आहे." (मी आता मनानी पूर्णपणे सखारामकाका झालेला होतो,फक्त विचार त्याचे आणि शब्द माझे एव्हढाच काय तो फरक! :) ) काकू:- "होय बाबा..इतरांना कुणि समजवावे हाच प्रश्न आहे. पण मग तूच सांग ना आमच्या ह्या लोकांना.आणि सोडव ह्या व्यापातून. शिवाय तुमच्या तोंडचं..ते आमच्यापेक्षा अधिक 'खरं' नै का?" (ही काकू खौटच होती मेली! :-/ ) मी:- "होय.तसच आहे. बोलवा सगळ्यांना." (सर्व जण आल्यावर..) मी:- .."तुम्हाला आधि येऊन गेलेल्यानी जे काहि सांगितलं होतं..त्यावर तुमचा विश्वास आहे का?" सगळे:- ............................ मी:- "जर तुमचा,त्या पुरोहितानी सांगितलेल्या गृहितावर.. विश्वास असेल,आणि तो काहि केल्या जाणारच नसेल.तर तुम्हाला ती शांति त्याच्याकडूनच करावी लागेल. परंतू..जर तुम्हाला मी इथून पुढे जे काहि सांगणार आहे,ते सांगितल्यावर त्यावर विश्वास बसला,आणि तुम्हि निश्चिंत झालात्,तर मग तुम्हि खरोखरच मुक्त असाल..तुमच्या मुलाच्या झालेल्या आत्म्याप्रमाणे!" सगळे:- ............... मी:- "आज ज्या प्रमाणे अगदी झर्रदिशी कावळा पिंडाला शिवला,ते पाहू जाता तो त्याचा हा जन्म अगदी आनंदानी पूर्ण करून गेलेला आहे.हेच उत्तर मला त्यातून दिसतं. आणि अश्या प्रसंगी जो सर्पदंश, हे त्याच्या आपल्या समजाप्रमाणे असलेल्या अपमृत्युस कारणीभूत ठरलेलं कारण आहे..ते हि या कावळा झटकन शिवण्यानी नाहिसं होतं.आणि त्याहिवरं जर असा अपमृत्यूत्वात गेलेला माणूस कुळाचा विनाशच करत असेल..तर तो त्या सर्पाच्या कुलाचा आणि त्या सर्पाचा प्राधान्यानी करेल. हा ही त्या उत्तराचा पुढचा भाग खरा मानावा लागतो." सगळे:- (समाधानी चेहेर्‍यानी होकारत असता... दिवंगत मुलाचे वडिल..) "पटतय खरं तुम्हि म्हणता ते (ही) !" मी:- धन्यवाद. आता हे जर का पटत असेल्,तर माझा या समस्येवर एकच निर्वाळा असा..कि तुम्हाला ही सदर शांति आणि त्याच बरोबर तो पुरोहितही पुन्हा कधिही पहाण्याची वेळ येऊ नये. परमेश्वर नावाची शक्ति आपल्या मनात बळ देत आहे,आणि ती न्यायी आहे यावर आपला विश्वास आहे,तोवर आणखि कशाला कुणाला भ्यायला हवे? सगळे:- (अतिशय शांत झालेले असताना...पुन्हा वडिल बोलतात..) मी तुला आता गुरुजि म्हणणार नाही.. मला एकच सांग मुला, असले प्रश्न विचारायचा हा प्रसंग नाही,पण आता विचारल्याशिवाय रहावत नाही,म्हणून विचारतो..रागावू नकोस हो. पण..,तुझ्यासारखि बुद्धी, तुमच्या बाकिच्या भटजींना कधि येणार रे? मी:- ( काहिसा भावूकपणे..) काका , हे मी सांगू शकणार नाही. पण मला माझ्या गुरुजिंनी जे काहि संस्कार केलेले आहेत्,त्यानुसार अशी कार्य करताना..मी आपणासारख्यांना असंगत उत्तरे कधिही देणार नाही. देऊ शकणार नाही. (सगळे स्वस्थ चित्तानी उठतात..) ................................................. पुढे मी पाठशाळेत आल्यावर हे सर्व गुरुजिंच्या कानावर घातलच. तेंव्हा गुरुजि मात्र त्या पहिल्या पुरोहितावर अजिबात चिडले नाहीत. मला हे अत्यंत अनाकलनीय होतं. मीहि या गुरुजिंच्या वर्तनावर नाराजच होतो.. रात्री झोपंही नीट येत नव्हती..पण जेंव्हा सकाळी उठून स्नानाला चाललो होतो,तेंव्हा ती मनतली धुसफुस गुरुजिंनी माझ्या देहबोलिवरुनंही पकडली आणि वाडीतून मला... "अहो आत्माराम...या जरा इकडे " अशी खणखणीत हाक दिली. मी ही काहिसा घाबरूनच तिकडे गेलो. गुरुजि:- अरे आत्मू... तो माणूस आपल्यातला असो,नाहितर आणखि कुणातला..पण तो असा वागतो,याचं कारण सर्वप्रथम तो ही एक माणूसच आहे.हे ध्यानात घ्यायला हवे. मी:- पण गुरुजि,त्याच्याकडून घडलेला प्रमाद तर फक्त पैश्याच्या लालसेनी घडला आहे.तरिही त्याला तुम्हि माफ करता.??? गुरुजि:- मी माफ केलेलं नाहि..फक्त त्याला समजून घेतलेलं आहे..कळ्ळं? मी:- ............. गुरुजि:- अरे आत्मू बाळा... एखाद्याला खरोखरच माफ करायचं असेल ना?,तर त्याला आधी समजूनंही घ्यावं लागतं हो! तरच आपण-त्याला माफ करु शकतो..नाहितर नुसते साफच करावयाचे असेल..तर समजुतदारपणा हवा कशाला??? ते काम आपल्यातला तत्वनिष्ठ ,(आणि म्हणूनच व्यवहारभ्रष्ट-असलेला..)रागंही करू शकतोच कि!? मी:- .................. गुरुजि:- अरे आत्मू तुला कळायला हवं असेल ना? तर ह्या आपल्या वाडीतल्या विहिरिकडे पहा..तिच्यामधे वर असणार्‍या नारळाच्या झावळ्यांपासून ते नारळांपर्यंत सगळ्यांची प्रतिबिंबेही पडतात,आणि कधि कधि तर प्रत्यक्ष तीच बिंबेही येऊन पडतात. पण म्हणून या विहिरिनी कधी त्या झाडाला गिळायचा प्रयत्न तरी केलेला तुझ्या पाहण्यात आलेला आहे का? मी:-(काहिही कळलेलं नव्ह्तं..तरिही..) नाहि! गुरुजि:- नारळाच्या झाडाला त्याचा असा स्वतःचा एक निसर्गधर्म आहे..आणि विहिरिला तिचा! मी:- पण मग नारळाच्या झाडाला शिक्षा कोण करणार??? गुरुजि:- ह्हा ह्हा ह्हा.. आहो न्यायशास्त्री आत्माराम..आपण फार फार तर शिक्षेची कल्पना करायची असते. आपल्या मनाच्या समाधानास्तव.ती देण्याचं काम आपलं नव्हे! मी:- मग कुणाचं? गुरुजि:- कधि तो केलन तर वरती बसलेला देवच करतो,आणि त्यानी नाहि केलन तर त्याच माणासाचं कर्म त्याला आपल्यापेक्षा अधिक शिक्षा देऊनच या इहलोकातून सोडवतं. मी:-(अपादमस्तक गहन शंकेनी..) असं कसं पण गुरुजि..? गुरुजि:- ह्हा ह्हा ह्हा ह्हा... माला भारी हसवतोयस रे आत्मू तू आज! अरे हुशार मुला.. तूला जर का चोरिच करायची सवय असेल, तर पोलिसात गेलास तरी पैसे खाऊन तू तेच करणार... मी:- क्का...य? गुरुजि:- चोरी! मी:- ह्ही ह्ही ह्ह्ही! गुरुजि:- हां...आता कसा हसलास? जवळचं उदाहरण नाहि ना रे दिलं मी? मी:- नाहि! पण तरिही गुरुजि, पुन्हा 'मला' शिक्षा कुठे मिळतीये त्यातनं? गुरुजि:- तुझा "म" भारीच मोठ्ठा आहे हं आत्मू..तो कमी कर जरा..नायतर अयशस्वी राहशील जीवनात! अरे शिक्षा होते ना, ती त्याच्या वागणूकिने तो आत्मबहिष्कृत होण्यापासून..ते... अशा लोकांना ताब्यात ठेवणार्‍या/बदलविणार्‍या सामाजिक योजना जेंव्हा येतात ना..त्यानी! आणि सरते शेवटी कायद्यानी सुद्धा...! मी:- म्हणजे त्या औरंग्यासारखं का हो? शेवटी तो हि तीळ तीळ-तुटून मेला..असं सखाराम काका म्हणातो! गुरुजि:- व्वा! आत्मारामपंत..! मोठ्ठेच झालात हो आज! चला..., आता आज समुद्रावर आंघोळिला चला माझ्याबरोबर..म्हणजे तुंम्हासहि तुमच्या सखारामकाका सारखेच लाटा अंगावर घेण्याचे बळ मिळेल. ............................ मला तेंव्हाच काय?, अगदी आजंही हे सर्व समजायला जड जाणारच असणार आहे. याची मलाहि जाणिव आहे.पण पुन्हा गुरुजिंची गणितं अगदी अपवाद वगळता कध्धिही म्हणजे कध्धिही फेल गेलेली नव्हती,हा जो मला-मिळालेला एक विश्वास होता.त्याआधारे मी हे जाणू शकतो,की नियतीधर्मा पेक्षा समाजधर्म नक्कीच मोठा असतो. फक्त तो जेव्हढा याबाबतीत सशक्त होत जाइल्,तेव्हढं हे फळ आपल्याला अधिकाधिक खणखणीत आणि वाजवून मिळेल. ================================ क्रमशः..... मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11554 views

💬 प्रतिसाद (27)
ए
एस गुरुवार, 02/12/2015 - 11:10 नवीन
या लेखमालेतील प्रत्येक लेख वाचकांसाठी मेजवानी तर असतेच, शेवटचा परिच्छेद तर कळसाध्याय म्हणावा असा असतो. फारच छान!
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ गुरुवार, 02/12/2015 - 11:24 नवीन
+१ शेवटचा परिच्छेद म्हणजे खरच भारी अस्तो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 02/12/2015 - 11:31 नवीन
+२.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/13/2015 - 18:40 नवीन
+३ समाजधर्माची झूल पांघरून स्वार्थ साधला जातो, हीच तर मानवतेची खरी शोकांतिका आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/12/2015 - 13:53 नवीन
+१ अगदी हेच आणि असेच म्हणतो. बुवांच्या मार्मिक लेखणीचा फ्यान.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ गुरुवार, 02/12/2015 - 11:23 नवीन
>>मला तेंव्हाच काय?, अगदी आजंही हे सर्व समजायला जड जाणारच असणार आहे. अगदी खराय !! अशावेळी विश्वासच उपयोगी पडतो, फक्त विश्वासार्ह कोणी मिळवा लागतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/12/2015 - 11:30 नवीन
@फक्त विश्वासार्ह कोणी मिळवा लागतो.>> क्या बाssत! *YES*
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 02/12/2015 - 11:27 नवीन
व्वाह. फार सुंदर लिहिताय गुर्जी. आधीचे काही भाग वाचायचे राहिलेत. तेही वाचते आता.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/12/2015 - 11:52 नवीन
ज्जे बात!!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/12/2015 - 11:53 नवीन
अ प र ती म :)
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 02/12/2015 - 11:54 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/12/2015 - 12:05 नवीन
नावातला आत्मा काढला असला तरी लिखाणात मात्र तो शाबुत आहे बरका. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/12/2015 - 12:10 नवीन
@नावातला आत्मा काढला असला तरी लिखाणात मात्र तो शाबुत आहे बरका. >>> =)) अहो, तो असायचाच मेला! :-D मरेपर्यंत जाइल कसा????? =))
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 02/12/2015 - 12:23 नवीन
व्वा, काय बोललात पण! :-))
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/12/2015 - 12:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 02/12/2015 - 12:20 नवीन
या बात! मस्तच!
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 02/12/2015 - 13:15 नवीन
मालेतले इतर सर्व लेख आवडले होते; हाही आवडला.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 02/12/2015 - 13:51 नवीन
मध्येच गुर्जी , "समजलास काय बेंबट्या" म्हणतील असे वाटले . ईतके सही लिहले आहे !
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी गुरुवार, 02/12/2015 - 16:40 नवीन
गुरुजी, तुमच्या लेखनबुध्दीला मनापासून प्रणाम.तुमच्या लिखाणाची मी हि फॅन आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/12/2015 - 17:13 नवीन
@गुरुजी, तुमच्या लेखनबुध्दीला मनापासून प्रणाम. >>> मन:पूर्वक धन्यवाद हो! :)
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. गुरुवार, 02/12/2015 - 17:19 नवीन
अतिशय आवडला आहे हा भाग. आणि तुमची सगळी जमजावण्याची हातोटी ही काका आणि गुरुजींकडून कशी मिळाली ते कळतयं
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/13/2015 - 07:12 नवीन
स्वॅप्स,राजाभाउ,प्रमोद देर्देकर @या लेखमालेतील प्रत्येक लेख वाचकांसाठी मेजवानी तर असतेच, शेवटचा परिच्छेद तर कळसाध्याय म्हणावा असा असतो. फारच छान>>> त्याच काय आहे ना? कि मी तसा जन्मजात भटजी प्रवृत्तीचाच माणूस आहे. असं आता मला लक्षात यायला लागलेलं आहे. त्यामुळे ,शेवटी प्रसाद दिल्याशिवाय बरं वाटत नाही... ही तिकडली सवय बहुधा इकडे-आलेली आहे.शेवटाला, संपूर्ण पूजेचं आपण काहितरी नीट संक्षेपित फलित लिहिलं नाही..तर लेख संपवलाच जात नाही,सारखं काहितरी कमीकमी आणि अपूर्ण असल्यासारखं वाटतं. बेचैनी होते सगळी साली! :( ================================================================== मधुरा देशपांडे @व्वाह. फार सुंदर लिहिताय गुर्जी. >> धन्यवाद हो. @आधीचे काही भाग वाचायचे राहिलेत. तेही वाचते आता. >> हम्म्म. जरूर वाचा. :) ================================================================== राही @मालेतले इतर सर्व लेख आवडले होते; हाही आवडला.>> धन्यवाद. :) ================================================================== कपिलमुनी @मध्येच गुर्जी , "समजलास काय बेंबट्या" म्हणतील असे वाटले . ईतके सही लिहले आहे !>>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा! ... त्यांची छाप माझ्यावर रहाणारच आहे. :) ================================================================== निमिष ध. @अतिशय आवडला आहे हा भाग. आणि तुमची सगळी जमजावण्याची हातोटी ही काका आणि गुरुजींकडून कशी मिळाली ते कळतयं>>> *YES*
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/13/2015 - 07:49 नवीन
अप्रतिम सुरु आहे लेखमाला
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Fri, 02/13/2015 - 10:16 नवीन
बापरे ... भवविश्व चे तब्बल ३० भाग झाले ... कित्येक वाचायचे राहुन गेले ... आता सारे शोधुन वाचले हवेत ... बाकी खुप सुरेख लेखन ... :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/13/2015 - 13:04 नवीन
सुरेख लेखन !! प्रांजळ पणे सारे अनुभव कथन केलेले आहेत हे फार आवडले . अवांतर : न पटलेल्या गोष्टीविषयी व्यनितुन चर्चा करु :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 02/13/2015 - 20:03 नवीन
एखाद्याला खरोखरच माफ करायचं असेल ना?,तर त्याला आधी समजूनंही घ्यावं लागतं हो! तरच आपण-त्याला माफ करु शकतो..नाहितर नुसते साफच करावयाचे असेल..तर समजुतदारपणा हवा कशाला??? ते काम आपल्यातला तत्वनिष्ठ ,(आणि म्हणूनच व्यवहारभ्रष्ट-असलेला..)रागंही करू शकतोच कि!?
क्या बात है
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 02/16/2015 - 08:48 नवीन
गुर्जींना कुर्निसातच. :) अगदी आतलं लिहत आहात.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा