नरहरी सोनार हरीचा दास
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.
यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे
स्वमताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व
संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी शिव आणि विष्णू ही
एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी ’हरिहरैक्यां’ची समन्वयवादी भूमिका
घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा
भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून
नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा.
ज्ञानेश्वर माऊलींनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची
अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे
पूर्ण केली. ते प्रारंभी कट्टर शिवोपासक होते. ’कटिसूत्र’ प्रसंगानंतर
ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू
यांच्यामधील अभेद जाणवला.
ज्या ’कटिसूत्र’ (कडदोरा) प्रसंगानं नरहरी महाराजांना शिव आणि
विठ्ठल यांच्या मधील अभेद जाणवला, त्या ’कटिसूत्र’ प्रसंगाचं /
अख्यायिकेचं आकलन आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं नरहरी
महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींची हरिहरैक्याची भूमिका का स्वीकारली,
याचा उलगडा होईल. ही घटना/ आख्यायिका अशी आहे -
देवगिरीच्या एका सावकारानं विठ्ठलमूर्तीला ’कटिसूत्र’ (कडदोरा) अर्पण
करायचं ठरविलं व ते काम त्यानं नरहरी महाराजांकडे सोपविलं.
महाराज कट्टर शैव असल्यानं ते विठ्ठल मंदिरात जात नव्हते. विठ्ठल
मूर्ती दर्शन त्यांना निषिद्ध वाटत होतं. त्यामुळं त्यांनी त्या सावकारालाच
मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप आणायला सांगितल. त्यानुसार नरहरी
महाराजांना त्या सावकारानं माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी
त्यानुसार ’कटिसूत्र’ तयार केलं. पण ते चार बोटं सैल झालं.
मग, सावकाराने महाराजाना स्वत: माप घेण्याविषयी आग्रह केला.
पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून स्वत: नरहरी महाराजांनी
डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्तीच्या ’कटिसूत्रा’चं माप घेऊ लागले.
तेव्हा विठ्ठलमूर्ती ही शिवमूर्ती आहे, असं त्यांना जाणवलं.
तेव्हा डोळ्यांवरील पट्टी काढल्यावर पुन्हा ती विठ्ठलमूर्तीच असल्याची
प्रचिती त्यांना आली. त्यामुळं ’हरी’ आणि ’हर’ हे एकच आहेत,
हे चिरंतन सत्य त्यांना जाणवलं. त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात.
शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥
धन्य ते संसारी, नर आणि नारी । वाचे ’हर हरी’ उच्चारीती ॥
नाही पैं भेद, अवघा मनीं अभेद । द्वेषाद्वेष- संबंध उरी नुरे॥
सोनार नरहरी न देखे द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरूप ॥
भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी
महाराजांच्या उपलब्ध अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग
इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी
धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं.
असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती
अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्ट्य नि वेगळंपण सिद्ध केलं आहे.
आपला व्यवसाय व संसार चांगल्या प्रकारे करीत असताना नरहरी
महाराजांनी आत्मचिन्तन केलं नि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी त्यांना कशाची प्रचिती आली ?
जग हे अवघें सारें ब्रह्मरूप । सर्वांभूती एक पांडुरंग ॥
अणुरेणुपर्यंत ब्रह्म भरियेलें । सर्वांघटीं राहिलें अखंडित ॥
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें । कवतुक दाविलें मायाजाळ ॥
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ । परब्रह्मीं खेळे अखंडित ॥
अखंडित वस्तु हृदयी बिंबली । गुरुकृपे पाही नरहरी ॥
ही जाणीव म्हणजेच ज्ञानदेवांनी ’ज्ञानेश्वरी’त प्रतिपादिलेला
’चिद्विलासवाद’ होय. नरहरी महाराज हे नाथ सांप्रदायी असून
त्यांना प्रत्यक्ष गहिनीनाथांनीच अनुग्रह दिला होता असे परंपरा
मानते.
कौटुंबिक पार्श्वभुमी -
श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५
श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी बुधवार रोजी प्रात:काळी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर आईचे नाव सावित्रीबाई
असे होते. पंढरी येठेच ते सोनार कामाचा व्यवसाय सचोटीने
करीत असत. उत्तम कारागीर म्हणू त्यांची ख्याती होती. घरात
परंपरागत शीव उपासना होती व घरातच शीव मंदिरही होते.
रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि
नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांच्या पत्नीचे नाव
गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
संसार करता कराताच संत समागम, नाम चिंतन करत त्यांनी
परमेश्वराची प्राप्ती करुन घेतली.
नरहरी महाराजांनी शके १२३५ माघ वद्य तृतिया सोमवार
इसवी सन १२८५ रोजी पंढरपुर येथेच समाधी घेतली.
आजही पुंडलीकाचे दर्शन घेवून आपण विठ्ठल मंदिराकडे
जावू लागलो की मंदिराजवळच डाव्या बाजूला नरहरी
महाराजांचे समाधी मंदिर आपल्याला पहायला मिळते.
- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१
💬 प्रतिसाद
(3)
H
hitesh
Sat, 02/07/2015 - 06:07
नवीन
छान.
देवा तुझा मी सोनार.
ही एक त्यांची लोकप्रिय रचना आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 02/07/2015 - 06:17
नवीन
https://m.youtube.com/watch?v=dj8kRwfUPFI
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 02/07/2015 - 06:40
नवीन
१२० वर्षांचे होते?
- Log in or register to post comments