दहशतवाद म्हणजे काय?
तर दहशतवाद काय असतो हे समजुन घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. उदा. एक नवरा असतो आणि त्यांची एकुलती एक बायको असते. (सगळ्याची एकुलती एक बायको आणि एकुलता एक नवरा असतो, हा अपवाद असतात काही ज्याच्या काही उपशाखा असतात ज्या अनधिकृत असतात). तर असो. भावना म्हटले कि अवांतर आलेच. तर फेब्रुवारी आला आहे, प्रेमाचा महिना आहे, बायकोला कचेरीत काही काम नसते, नवऱ्याच्या सोबत घालवलेले काही प्रेमळ क्षण आठवून नवऱ्याशी काही प्रेमयुक्त गुंज मनीचे करण्यासाठी ती नवऱ्याच्या कचेरीत त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क न करता त्यांच्या कचेरीच्या दुरध्वनीवर संपर्क करते.
अनायासे नवऱ्याची जेवणाची वेळ झालेली असते. तर पलीकडे नवरा नुकतेच आपल्या सहकारी मंडळी बरोबर जेवण उरकून आलेला असतो व त्याच्या सहकर्मचारी मुळे बाईशी वार्तालाप चालू असतो इतक्यात तो फोन उचलतो. पण फोन उचलता उचलता त्यांच्या तोंडुन मुळे बाईनी आणलेल्या मुळ्याच्या भाजीची स्तुती करत असतो. "पण काही म्हणा हा मुळे म्याडम, तुमच्या हातच्या मुळ्याच्या भाजीला तोड नाही" असे म्हणत रिसीवर कानाला लावून २-३ वेळा हेलो, हेलो म्हणतो. पण समोरून फोन ठेवला गेलेला असतो.
दिवसभराचे काम धाम उरकून छान मनाने नवरा घरी जाण्यास निघतो. निघताना पत्नीस फोन करतो. पण त्याचा फोन कट करून बायको एक निरोप पाठवते कि मी सध्या व्यस्त आहे, तुम्हास नंतर फोन करते. असेल काही कामात असा विचार करून नवरा घरी निघतो. घरी येउन पाहतो तर घराचे कुलूप उघडलेले असते. नवरा साशंक मनाने घरात शिरतो तर बायको घरी आलेली असते. एक उग्र वासाने घर भरून निघालेले असते.
नवरा स्वगत करत "अरे नेहमी माझ्या पेक्षा हि उशिरा घरी येणारी हि आज लवकर घरी आणि तीही स्वयंपाक घरात". आज असे काही विशेष आहे का जे मी विसरलो आहे. घरात येऊनही याच्याशी स्मितहास्य नाही कि संबोधन नाही. एक विचित्र शांतता. नवरा अभ्यासासाठी निमुट बसलेल्या आपल्या मुलाकडे डोळ्याने प्रश्नाथर्क हावभाव करतो. मुलगाही आपले दोन्ही खांदे उडवून त्याच अंदाजात उत्तर देतो. एक विचित्र शांतता जसे काही वादळ येणार आहे. (नवऱ्याना घरातला किलबिलाट परवडतो पण शांतता हि त्यांना खूप मारक असते).
हातपाय धुवुन येइतोस्तर चहाचा कप समोर आदलेला असतो. आदळण्याचा आवाजाच्या तीव्रते वरून नवरा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. इथुन खरी दहशतवादाची प्राथमिकता सुरु होते. जेवणघरात कधी नव्हे इतका भांड्याचा आवाज येत असतो. नवरा अजूनही साशंक. कारण आपण असा काय गुन्हा केला आहे हे त्याचे त्याला अजून उमगले नसते आणि न उमगलेल्या गुन्ह्याची काय शिक्षा भोगावी लागणार आहे या प्रचंड दबावाखाली तो टीवी वरचे च्यानल चाळत असतो. पण अधूनमधून डोळे, मन पुर्णत्वे, ध्यास आणि कान हे सर्वं स्वयंपाक घराच्या दिशेने असते. याला दहशतवादाची कुटनीती म्हणतात. या मध्ये आपल्या भक्ष्याला एवढे मानसिक रित्या आपल्या खेळीत गुंतवून ठेवायचे कि त्याला पुढची रणनीती करण्यास काही वेळच मिळणार नाही.
एवढ्यात एक फोडणीचा खमंग सुगंध नवऱ्याला सुखावून जातो. तरी पण मघासचा तो उग्र वास अजूनही येत असतो. पण त्याबद्दल विचारण्याचे धाडस होत नसते. आता नवरा मनातल्या मनात म्हणतो काही तरी विशेष दिवस असेल आणि मी विसरलो असेल म्हणुन तर पंच पक्वान्नाचा बेत दिसतोय. जेवण झाले कि काढेन रुसवा तिचा. एव्हाना नवरा थोडा रीलॅक्स झालेला असतो. जेवणाची वेळ होते. पाने घेतली जातात. मुले आणि नवरा आपल्या जागी येउन बसतात. पक्वान्नाची भांडी स्थानापन्न होतात. नवरा आपले ताट स्वतःच्या हाताने घेणार इतक्यात बायको स्वतः त्याचे ताट वाढते.
तर पुढच्या दोन सेकंदात त्याच्या पुढ्यात मुळ्याचे पराठे, मुळ्याची पचडी, मुळ्याची कोशिंबीर आणि कधी न खालेली मुळ्याची खिचडीही असते. हे पदार्थ पाहून नवऱ्याचा पारा चढलेला असतो. "अग, एवढे सगळे मुळ्याचे पदार्थ एकत्र, आज काय मुळा डे आहे का? कोणी करते का असे जेवण?" समोरून शांतपणे एकच उत्तर येते, "नसेल जेवायचे तर नका जेवु, पण मग उद्या पासुन मुळे बाईकडेच खानावळी रहा." आता नवऱ्याला सगळा उलगडा झालेला असतो, पण आता त्याच्या हाती काही उरलेलं नसते.
उर्वरीत आयुष्य दोन वेळचे जेवण नीट मिळावे या उद्देशाने त्याने समोर वाढलेले अन्न गुपचुप खाण्यास सुरवात केलेली असते. पण मनात तो एक प्रकारे खुश असतो कि हे सर्वं भोगणारा मी एकटा नाही, तुम्हीही तेच खाणार आहात, असे स्वगत करत असतानाच बायको आणि मुलाच्या ताटात वाढल्या गेलेल्या गरमा गरम वेज बिर्याणीच्या सुगंधाने त्याचा घास घश्यातच अडकतो. पण त्या अडकलेल्या घशातून तो घास काय आवाज सुद्धा बाहेर काढू शकत नसतो. शेवटी आलिया भोगासी असावे सादर हे मनासी समजवून जेवण उरकतो. रात्री हिची समजूत काढूया या हिशोबाने पुढचे मनसुबे बांधले जातात पण गुन्हेगाराची झोपण्याची तरतूद मुळे अति खाल्यामुळे हॉल मध्ये करण्यात आलेली असते. शेवटी काही करू शकत नाही हे उमगल्यामुळे नवरा झोपी गेलेला असतो.
दुसरे दिवशी रोजच्या सारखी कामे सुरु होतात. नवरा हाफिसात येतो. हाफिसात येताना मुळे बाई दिसतात. तर नेहमी मुळे बाईना पाहुन नवऱ्याचा खुलणारा चेहरा आज भीतीने पांढरा फटक होतो. कसे बसे मुळे बाईना मुळातच आपण दिसणार नाही याची काळजी घेत आपल्या जागेवर बसत आपले मळमळीत झालेलं पोट घेऊन समोरून हास्य विखरत आलेल्या मुळे बाईना काहीतरी मुळमुळीत उत्तर देऊन कटवतो. तेवढ्यात त्याच्या टेबलावरचा दूरध्वनी वाजतो, पण एक चुकारही शब्द न काढता पहिला पलिकडचा अंदाज घेऊन नवरा वदतो " हेलो"
या तऱ्हेने आमची दहशतवादाची मुळाभाजी सुफळ स(भाजी) फळ संपुर्ण.
हा लेख केवळ त्याच्या शीर्षकामुळे उघडला नव्हता.
जे पी धन्यवाद प्रतिसाद मात्र नाखु