(प्रणयासक्ती)
प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).
पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.
सॅडिझम, मेसोचिझम, कुंटणखाने, मनुष्य देह व्यापार, पेडोफिलिया असल्या सगळ्या विकृती आणि गरमी, परमा ते एच आय व्ही पर्यंतचे घातक आजार ते लोकसंख्येचा विस्फोट हे सगळे नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रणयाराधन मुळातून थांबले पाहिजे. मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाला बळी पडणारे भोळेभाळे रोमँटिक लोक शहाणे होतील तो सुदिन. किरकोळ केमिकल लोच्याच्या प्रभावाला मर्दानगी, पुरूषार्थ वगैरे समजणे किंवा मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करणे थांबले पाहिजे. साचेबद्ध प्रक्रिया न करता पुनरूत्पादन करता येण्याची सोय आधुनिक विज्ञानाने करून दिलेलीच आहे. ती प्रणयाराधनाला सशक्त पर्याय देणारी व्यवस्था ठरेल अशी सोय करता येईल का?
बरे प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?
खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेच्या (मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे प्रणयासक्त लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)
टीपः अखंड मानवतेचे ब्रह्मचारी, समलिंगी, विषमलिंगी, तृतीयपंथी वगैरे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन होणे, आणि त्यांनी एकमेकांकडे तिरस्काराने बघणे हे सगळे प्रकार थांबवणे आपल्याच हातात नाही का?
मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला???????? तुमचा सूर औपहासिक आहे का? अन्यथा वरिल विधाने आक्षेपार्ह आहेत मूकवाचक साहेब !