आधुनिक अंधश्रद्धा
काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही.
१. घटना. आपल्याला 'घटनेने' अधिकार दिलेले आहेत असे मानणे. मग एका राजामधे आणि घटनेत फरक काय? राजाच्या बोलण्यात किमान थोडी फ्लेक्सिबिलिटी असू शकते, घटना एकादा लिहिली कि फिक्स. घटना नव्हती तेव्हा बोलण्या-चालण्यावर पूर्ण बंदी होती का? राष्ट्राच्या १२० कोटी लोकांच्या (सरकारचा नव्हे) जीवनात काय योग्य आणि काय अयोग्य हे एका पुस्तकात शोधणे किती योग्य म्हणावे? हे नवे ग्रंथप्रामाण्य नव्हे काय? वेदांचे अर्थ लावणारे ब्राह्मण आणि घटनेचे अर्थ लावणारे वकिल यांत अर्थाअर्थी फरक नसावा.
२. राष्ट्रपिता. एखाद्या व्यक्तिस राष्ट्राचा पिता मानणे. हे नाव बदलावे (राष्ट्रनेता करावे, इ) असे कोणास वाटत नाही का? मागच्या काळी माता, पिता, गुरु यांना इश्वर मानत (कशाला काहीही मानत)तसे आजही कशाला काही म्हणणे, मानणे चालूच आहे.
३. शपथविधी. माणसाने शपथ घेतली म्हणजे तो पुढे नीट वागेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. कितीतरी मंत्री, शिपाई, पोलिस असे शपथेप्रमाणे प्रत्यक्ष चांगले वागत नाहित हे माहित असूनही त्यांना शपथ दिली जाते.
४. रिबन. एखादा प्रकल्प चालू करताना रिबन का कापावी? कोणी पुरोगामी तिथे आरडाओरडा करताना का दिसत नाही? रिबनचे ते काय मूल्य असे म्हणता येणार नाही. तो समारंभ खर्चिक असतो. कधीकधी तर एवढ्याच कारणासाठी (उद्घाटनासाठी) पूर्णत्वास गेलेला प्रकल्प कितीतरी दिवस तसाच ठेवतात.
५. पदांचा क्रम. सगळ्या लोकांचे समान महत्त्व असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, इ इ असा क्रम लावायची काय गरज आहे. हे पद आणि ही कामे. माझ्या शहरातल्या एका माणसाला महापौर म्हणणे आणि मला साधा पौर म्हणणे अपमानास्पद नाही का?
६. राष्ट्रगीत. देशाला निवडलेल्या एका गीताची काय गरज आहे? सर्वांना तेच गाणे का आवडावे? त्याचा गुणात्मक दर्जा काय? त्याला उभे राहून का ऐकावे? आपल्या देशाच्या लोकांवर, इ प्रेम व्यक्त करणारे अजून कोणते गाणे सरस वाटले तर?
७. राष्ट्रध्वज. एका कापडी डिझाईनला सूल्यूट करणे, सर्वोच्च स्थानी मानणे, खाली न पडू देणे, सर्वात उंच जागीच फडकावणे याला काही तांत्रिक अर्थ नाही. देशाच्या लोकांचा सन्मान कापडी फडक्यात गोळा झालेला नसतो. शिवाय राष्ट्रध्वजाची थिम फार सर्वसुयोग्य आहे का?
८. ब्रीदवाक्य - सत्यमेव जयते हे वाक्य तांत्रिक दृष्ट्या चूक आहे. सत्य आणि असत्य यांचीच लढाई असेल असे नाही आणि असलीच तर सत्यच जिंकते असा अनुभव नाही. हे वाक्य नक्की कोणत्या संघर्षाच्या संदर्भात आहे हे ही नीट कळत नाही. असो. कर्माचे फळ आपल्या हातात नसते हे जसे गीतेत अर्थहिन वाक्य आहे किमान तितकेच हे ब्रीदवाक्य देखिल आहे.
९. राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल, फळ - बाकीच्या पक्षांनी, प्राण्यांनी, फूलांनी, फळांनी कोणाचे घोडे मारलेत? ही निव्वळ विकारण (random) चयने आहेत. तरीही ती श्रेष्ठ मानायची?
१० स्वातंत्र्य, समता, बंधुता - हे लोकगुण आहेत कि शासनगुण हेच कळणे मुळी अवघड आहे (म्हणजे लोकांना सरकार समान मानणार आहे कि लोक एकमेकांना समान मानणार आहेत?). जर हे घटनेप्रमाणे लोकगुण आहेत तर ते पहिल्या 'स्वातंत्र्य' शब्दाच्याच आड येतात. म्हणजे या व्यवस्थेत मला स्त्री पुरुष 'समान' नाहीत असे मानण्याचे 'स्वातंत्र्य' कसे असेल? नक्की काय कसे समान मानायचे आणि कशाचे स्वातंत्र्य आहे कळण्यासाठी नवब्राह्मण वकील लागतातच. घटनेने दिलेले स्वातंत्र्य, आदर्श अंमलबजावणी आहे काय हे पाहिले तर, फारच कमी आहे. जमिन माझी पण तिच्यावर मी घर बांधायचं का फॅक्टरी हे सरकार सांगणार.
११. युनिफॉर्म - काळा डगला घातल्याशिवाय वकिल ओळखताच येत नाहीत असे मानले तरी पदवी स्वीकारताना विचित्र आकाराची टोपी घालणे गरजेचे नसावे. शोक करण्यासाठी पांढरेच कपडे गरजेचे नसावेत.
१२. रविवार - ज्या देशात रविवारी खूप कमी लोक चर्चमधे जातात तिथे रविवारी सुट्टी असणे अनुचित वाटते. दुसरा कोणता वार बरा वाटला असता.
१३. टाय - मुंबईत टाय घालावा असे वातावरण कदाचित वर्षात एखादा दिवसच असेल. तरी भर उन्हाचे किती लोक टाय आणि ब्लेझर घालतात, दुसरीकडे घामाच्या धारा गाळत असतात.
१४. इंग्रजी - जी भाषा खूपच कमी लोकांना येते (आणि त्यांनाही ती सहजतेने येत नाही)अशी साता समुद्रापलिकडील भाषा, लोक आपली भाषा निवडायला स्वतंत्र असूनही, प्रशासकिय व वाणिज्यिक व माध्यमांची व प्रतिष्ठीत भाषा म्हणून वापरली जाते. या गाढवपणावर गाढवपणा म्हणून कधी टिका होत नाही.
१५. न्यायालय. हाय कोर्ट एक निर्णय देते, सुप्रिम कोर्ट त्याच्या विरुद्ध देऊ शकते. वा रे न्याय!
१६. नोटरी. एखादा कागद ज्या प्रकारे नोटराईज केला जातो त्याने त्याच्या विश्वसनीयतेत फरक पडतो.
१७. न्यायदेवता. ही 'आजही' आंधळी आहे. अगदी मूर्तीरुप पाहिली आहे.
१८. बुके. पाच सेकंद हातात ठेवण्यासाठी बुके द्यायचा. स्वागत स्वीकारणारा मग तो लगेच मागे देतो.
१९. फॅशन. मॅचिंग सेट्स ठेवण्याच्या नादात अलमार्या भरून टाकायच्या. मूलतः कपडे घालणे ही कशाची गरज आहे हे इथे विसरायलाच होते. मग जुन्या कपड्यांच्या शैलीला ओंगळ म्हणायचे.
२०. ईश्वर - ईश्वर नाहीच हे छातीठोकपणे सांगणे. मग जगाचे सुसुत्र (आणि संपूर्ण) स्पष्टीकरण देताना काहीच्या काही विधाने करणे. बिग बँग पार्टिकल कसे निर्माण झाले आणि इश्वराने जग कसे निर्माण केले यात काहीच फरक न ठेवणे.
२१. निसर्ग - निसर्ग सम्यक (चांगले वा वाईट हे जाणणारा) नाही असे म्हणणे. हे लोक स्वतःच निसर्गाचा १००% भाग असतात. यातून जो circular reference बनतो तो फार गंमतशीर असतो.
२२. उत्क्रांती - उत्क्रांतीला दिशा असते असे मानणे. उत्क्रांतीतून काहीही शक्य आहे असे मानणे. उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या मर्यादा झाट माहित नसणे.
२३. विज्ञान - विज्ञानाला उद्या सगळे माहित होणार आहे, ते सगळ्या समस्यांमधून मानवतेला बाहेर काढणार आहे असे जणू माहित असणे. विज्ञानाचा आणि समाजशास्त्राचा अव्वाच्या सव्वा संबंध लावणे.
२४. पाश्चिमात्य विद्वान - पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा कोट खराच असतो असे मानणे.
ईश्वर, निसर्ग, उत्क्रांती, विज्ञान आणि मॉस्लो यांच्याबद्दलची विचारसरणी अर्ध्या पुरोगामीत्वाचा मूलाधार आहे. असो
२४. पाश्चिमात्य विद्वान - पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा कोट खराच असतो असे मानणे.एक शंका - अगदी प्रामाणिक शंका. आंतरजालावर या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं तुम्हाला वाटतं काय? 'असं लोकांना कसं काय वाटतं?' हा २६ वा मुद्दा म्हणून जोडत येईल :-)