....तसं नाहीये
समुद्राच्या अंगी आवेग भिनायला
भरतीची जोड लागते
.
संध्येला कातर व्हायला
सूर्यास्ताची वेळ लागते
.
चातकाच्या आतुरतेला
वसंताची ओढ लागते
.
पाण्याला नितळ व्हायला
स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो
.
मातीला गंधाळायला
पहिल्या पावसाची सर लागते
.
प्राजक्त ओघळायला
पहाटेची साथ लागते
.
मोगर्याला गजरा व्हायला
धाग्याची गाठ लागते
.
मऊ साय धरायला
दुधाला धग लागते
.
साध्या पाण्याचे थंडगार तुषार
व्हायला कड्यावरुन कोसळावे लागते
.
हवेला कुंद व्हायला
धुक्याची हाक लागते
.
इतकचं काय,
चंद्र उठून दिसायलासुद्धा
रात्रीचे आंगण अन्
चांदण्यांचे कोंदण लागते
.
पण तुझं तसं नाहीये गं
तुझं... तसं नाहीये
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०५/२०१३)
मोगर्याला गजरा व्हायला धाग्याची गाठ लागतेह्या ओळी सर्वात आवडल्या.