ए. आय. वापरून केलेले मराठी लेखन कसे ओळखावे?

इंग्रजी आणि युरोपियन भाषांमधे लेखन करण्यात ए. आय. पटाईत आहे. (विवेकी आहे का ते अजून माहित नाही पण पटाईत मात्र आहे, अजिबात विवेक नसलेले पटाईत लेखक माणसांत देखील असतात त्यामुळे ए. आय. तर आपल्याच डेटावरचा पोपट आहे), मात्र भारतीय भाषांमधे लेखन करताना खूपदा ए. आय. बेसिक चुका करतो. आताशा त्या चुका बर्‍याच कमी झाल्या असल्या आणि उत्तरोत्तर या चुका कमीच होत जाऊन अनकॅनी असे लेखन तो करेल. तोवर आपण काही आडाखे बांधून असे लेखन पटकन ओळखू शकतो.

माझ्यासाठी ए.आय वापरून केलेले लेखन (म्हणजे संसोधन नव्हे तर लेखन) हे इन्स्टंट टर्न ऑफ असल्याने तसेच तुमचे देखील होत असल्यस तुम्हाला देखील या चाचण्यांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे
याबद्दल मी माझे आडाखे सांगतो.

१. डॅशेस, विषेशतः मोठा डॅश — (एम डॅशेस) ही चाचणी सर्व साधारण सगळ्याच AI कृत कंटेंट ला उपयोगी आहे. आपण आपल्या कीबोर्ड वरचा साधा हायफन टाईप करताना वापरतो. हायफन आणि एम डॅश मधला फरक म्हणजे हायफन हा लहान लांबीचा असतो. त्यांचे युनिकोड वेगळे आहेत.

— U+2014
- U+002D

२. व्यत्यासी वाक्यरचना: मराठीत ललित किंवा अललित दोन्ही लिहिताना AI बऱ्याचदा व्यत्यासी वाक्यरचना करतो. म्हणजे सुरुवातीला एखादी गोष्ट तीच कशी नाही हे सांगून तीच गोष्ट कशी आहे हे सांगायचे.

खालील उदाहरणे :

प्रॉम्प्ट: घर या विषयावर एक ललित निबंध लिही

उत्तर:

घर ही केवळ चार भिंती आणि छप्पर असलेली जागा नाही; घर म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सर्वांत जिव्हाळ्याचा, सुरक्षित आणि भावनिक आधार देणारा अवकाश आहे.

आधी घर म्हणजे काय नाही हे सांगायचे नंतर ते काय आहे हे सांगायचे. अशा प्रकारची वाक्यरचना सर्रास आढळते.

३. उभयान्वयी अव्ययांचा अतिवापर:
वरील प्रकारच्या वाक्य रचनेमुळे 'तर', जो, जे, जर अशा दोन वाक्ये जोडणारी अव्यये भरपूर वापरतो. अशी वाक्ये आपण नैसर्गिकरित्या लिहिताना खूप कमी वापरतो. कारण प्रत्येकवेळेस आपल्याला उलटा विचार आधी येत नाही. केवळ हे नाही, तर ते. अशा पद्धतीची वाक्ये.

प्रॉम्प्ट: मौन या विषयावर मोठा निबंध लिही

उत्तर :

मानवी जीवन हे शब्दांनी भरलेले आहे. बोलणे, लिहिणे, व्यक्त होणे—या सगळ्यांतून माणूस स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण या शब्दांच्या गर्दीत एक अशी अवस्था आहे, जी शब्दांशिवायही खूप काही सांगून जातेती म्हणजे मौन. मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे; तर ती एक भावनिक, मानसिक आणि तात्त्विक स्थिती आहे. कधी ते शांती देणारे असते, कधी अस्वस्थ करणारे, तर कधी अत्यंत अर्थपूर्ण.
मौनाची सुरुवात माणसाच्या आतून होते. जेव्हा शब्द अपुरे पडतात, तेव्हा मौन जन्माला येते. दुःखाच्या क्षणी, मोठ्या आघातानंतर, किंवा खोल आनंदाच्या वेळीही माणूस शांत होतो. त्या क्षणी शब्दांची गरज नसते, कारण भावना इतक्या तीव्र असतात की त्यांना व्यक्त करण्यासाठी भाषा तोकडी ठरते. अशा वेळी मौन हेच सर्वात प्रामाणिक उत्तर ठरते.

४. तुटक आणि जलद लेखनप्रवाह:

एखादे मराठी ललित जर AI ला लिहायला लावले तर ते खुपदा जलद आणि तुटक वाक्ये एका मागून एक मुक्तछंद असल्या सारखे लिहितो. ललित लेखनातली AI ची लुडबुड पाहायची असेल तर खालील नमुना पाहा.

प्रॉम्प्ट : write me a futuristic dystopian story where a child discovers a pen drive which has songs of honey sing. write in lucid marathi.

उत्तर :

शहरात आता गाणी वाजत नव्हती.
खरं तर, आवाजच उरले नव्हते.

इमारती उंच होत्या, पण खिडक्या उघडत नसत. रस्त्यांवर माणसं चालत होती, पण बोलत नव्हती. कानात सगळ्यांच्या न्यूरल प्लग लावलेले—सरकारकडून मंजूर केलेले “साउंड पॅटर्न्स” थेट मेंदूत जात. ताल नव्हता, सूर नव्हता, फक्त उत्पादकता वाढवणारा एकसुरी आवाज.

आर्यन दहा वर्षांचा होता.
त्याला गाणी म्हणजे काय, हे माहीत नव्हतं.
त्याला फक्त “ऑडिओ-स्टिम्युलस” माहीत होता.

एक दिवस, जुन्या मेट्रो लाईनखाली तो खेळत होता. तिथे कोणी जात नव्हतं. अचानक त्याच्या पायाला काहीतरी लागलं—धूळ, गंज आणि तुटलेल्या तारांखाली लपलेली एक छोटी काळी वस्तू.

पेन ड्राइव्ह.

आर्यनने ती हातात घेतली. त्यावर कुठलाही QR कोड नव्हता. सीरियल नंबर नव्हता.
फक्त हाताने कोरलेलं एक शब्द—

HONEY

तो शब्द त्याला माहीत नव्हता.
पण काहीतरी वेगळं वाटलं.

तो हसला.

पहिल्यांदाच.

गाण्यात पैसा, रस्ते, स्वप्नं, बंड—सगळं होतं.
सरकारने कधीच शिकवलेलं नव्हतं असं काहीतरी.

पुढचं गाणं.
आणखी एक.

आर्यनला जाणवलं—हे “डेटा” नव्हतं.
हे स्वातंत्र्य होतं.

दुसऱ्या दिवशी त्याने शाळेत मित्रांना ऐकवलं. एक मुलगी रडायला लागली—तिला का रडतेय हेच कळत नव्हतं. एक मुलगा पहिल्यांदाच टेबलावर बोटांनी ठेका धरत होता.

आठवड्याभरात, पेन ड्राइव्ह हातोहात फिरू लागली.

वरील लेखनात आपल्याला सगळी लक्षणे दिसतात. व्यत्यासी वाक्यरचना, एम डॅशेस, जर तर, इत्यादी इत्यादी.

५. प्रतिशब्द आणि कंसात त्यांचे इंग्रजी शब्द :

अललित लेखन करताना ए. आय. बहुतेकदा निर्बुद्ध मराठी तद्भव शब्द न वापरता तत्सम शब्द वापरतो आणि त्यांचे इंग्रजी शब्द तो कंसात वापरतो. मात्र त्या इंग्रजी शब्दांवरुन आपल्याला कळतं की बाब्या जरा जास्तच अकादमिक व्ह्ययला लाग्ला आहे. असे लेखन लगेच ओळखू येते.

या विचारात ‘नकारात्मक स्वातंत्र्य’ (negative liberty)—म्हणजे इतरांपासून किंवा राज्यापासून हस्तक्षेप नसणे—हा मुख्य आधार आहे. या चौकटीत राज्याची भूमिका किमान कार्यांपुरती मर्यादित मानली जाते: नागरिकांचे संरक्षण, करारांची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय सुरक्षा. याच काळात ‘औपचारिक/कायदेशीर समता’ ही संकल्पना विकसित झाली, जरी प्रारंभी ती प्रामुख्याने मालमत्ताधारक पुरुषांपुरती मर्यादित होती.

राजकीय अर्थाने स्वातंत्र्याचा ‘अधिकार’ आधुनिक असला तरी ख्रिस्ती तत्त्वज्ञानात ‘स्वेच्छाशक्ती’ (free will / liberum arbitrium)

५. स्मायलींचा आणि हेडिंगचा/ शीर्षकांचा आणि उपशीर्षकांचा वापर:

AI कृत लेखन हे साधा मुद्दा मांडताना देखील मोठा आव आणते. त्यासाठी वेगवेगळी हेडिंग आणि शीर्षकांचा आणि उपशीर्षकांचा वापर केलेला असतो. थोडक्यात पूर्वी बोर्डांच्या परीक्षांत एखादा लईच हुशार मुलगा परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणारा असला की पेपर तपासणाऱ्याचा मॉडरेटर त्याचा पेपर पुन्हा तपासून कुठे एखादा मार्क कमी करता येईल का ते तपासत असे. अशा वेळेस ते वेगवेगळे निकष लावत. उदा. मुलाने उत्तर मुद्देसूद म्हणजे मुद्दे मांडून लिहिले आहे का, वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे का, सुशोभीकरण केलेलं आहे का असले काहीतरी पांचट निकष लावून एखादा अर्धा मार्क वगैरे कमी करायचा आटोकाट प्रयत्न करत.
AI अशी उत्तरे अगदी सहज लिहितो. एखादा बोर्डात येणारे कार्टे असावे तसे त्याचे सुशोभीकरण करतो.

६. अतिशयोक्ती :

एखादी लहान कल्पना घेऊन त्यावर मोठे लेखन करताना ए. आय अनेकदा अतिशयोक्ती करताना ती गोष्ट जास्तच फुलवायला जातो. तिच्यात तेवढा जीव नसतो.

७. लेखकाची पूर्वीची गुणवत्ता
एखादा लेखक एखादे लेखन AI ला श्रेय न देता स्व:तच्या नावावर खपवत असेल तर २०२२ पूर्वीचे त्या लेखकाचे लेखन तपासून पाहावे. त्यात जर कोणताच स्पार्क नसेल आणि वरील ल़क्षणे दिसत असतील तर संबंधित लेखन हे AI चे असावे असे गृहीत धरावे. तीन चार वर्षांत कुणाला दृष्टांत वगैरे मिळून त्याच्या प्रतिभेत ३०० टक्के वाढ होत नाही. असा हा प्रतिभेचा स्पार्क आणि चमत्कार AIचा आहे असे गृहीत धरावे.