२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती. त्यामागचे कारणही अर्थातच तसे गंभीर होते!
गेल्या दोनेक वर्षांत AI सुविधा पुरवणारे ChatGPT, Gemini, Copilot, Meta, Cloude, DeepSeek, Grok असे कित्येक पर्याय वापरकर्त्यांसाठी सहज उपलब्ध झाले होते आणि त्यांचा वापर करून अनेकांनी लेख, कविता वगैरे 'पाडायला' सुरुवातही करून झाली होती. त्यामुळे ही 'थीम' आहे म्हंटल्यावर दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनात अशा 'यांत्रिक साहित्याचे' प्रमाण खूप जास्त असेल अशी रास्त भीती त्यामागे होती.
दिवाळी अंकासाठी लेखन पाठवण्याचे आवाहन करणारा धागा नेहमीपेक्षा बराच आधी म्हणजे, १ ऑगस्ट रोजीच आला होता. त्यामुळे लेखकांना लेखन पाठवण्यासाठी बऱ्यापैकी वेळ उपलब्ध होता म्हणून असे 'यांत्रिक लेखन' येण्याचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी नवोदित लेखकांना उपयोगी ठरेल असा विचार करून 'लेख, कथा, कविता आणि चित्रनिर्मिती साठी AI चा वापर कसा करता येईल' ह्या विषयावर एक सोदाहरण लेखमालिका लिहिण्याची कल्पना सुचल्याचे 'प्रशांत' शेठना कळवले.
त्यांना ही कल्पना आवडल्याचे सांगणारा संदेश आल्यावर लगेच उत्साहात ही लेखमालिका लिहायला घेतली आणि तिचे चार भाग लिहूनही झाले. आधीच्या मालिका अर्धवट राहिल्याचा अनुभव गाठीशी असल्याने सदर मालिकेचे सर्व भाग लिहून झाल्याशिवाय ती प्रकाशित करायची नाही अशी खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होती ते एकप्रकारे बरेच झाले, कारण स्वतःलाच आखून दिलेल्या 'कालमर्यादेत' चारच्या पुढचे भाग नेहमीप्रमाणेच रखडले!
सध्या पुन्हा हा विषय ऐरणीवर आला असल्याने आणि कालमर्यादेचे बंधनही उरले नसल्याने आता ही अर्धवट लिहून तयार असलेली मालिका शक्य तितक्या लवकर पूर्ण करत प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.
*****
तंत्रज्ञानात झालेल्या जवळपास प्रत्येक क्रांतीनंतर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला आहे, तो म्हणजे "ह्यामुळे माणूस निरुपयोगी होणार का?"
यांत्रिक छपाईचे तंत्रज्ञान आल्यावर 'आता हस्तलेखनाच्या परंपरेला धोका निर्माण झाला' असे वाटले, कॅमेरा आला तेव्हा चित्रकार अस्वस्थ झाले, संगणक आल्यावर 'आता लेखन, गणित, नोंदवही सगळंच संपेल' अशी भीती निर्माण झाली. परंतु प्रत्येक वेळी तंत्रज्ञानाने माणसाला निरुपयोगी न करता उलट त्याच्या क्षमतेला नवी दिशा दिली, त्याची कार्यक्षमता वाढवली आणि कौशल्यगुणांचा विकास होण्यास हातभार लावला.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) अशा नावाने आपल्याला परिचित असलेली क्रांती देखील त्याला अपवाद नाही. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे साहित्य / कला विश्वातही AI च्या वापरामुळे बऱ्यापैकी अस्वस्थता दिसून येते. पण इथे प्रश्न केवळ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या साधनांचा नसून तो विचारांचा आहे!
लेखन, कथा, कविता, चित्रनिर्मिती, संगीत ही सगळी क्षेत्रे जी खास मानवी सर्जनशीलतेची मानली जात होती, आता तीच क्षेत्रे AI सहजरित्या हाताळताना दिसत आहे. त्यामुळे लेखक / कवी / चित्रकार / संगीतकार अशांच्या मनात “आता माझी गरजच काय?” असा प्रश्न उभा राहणे जितके स्वाभाविक आहे तितकेच वाचक / प्रेक्षक आणि श्रोत्यांना "आता आपल्याला नको नको ते वाचायला / बघायला /ऐकायला मिळेल" अशी धास्ती वाटणेही स्वाभाविक आहे, कारण आज अनेक नवोदित लेखक, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स AI कडे एका जादुच्या छडीसारखे पाहतात,
'दोन ओळींचा प्रॉम्प्ट दिला की झाला लेख तयार' पण AI ची ही सुलभता जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती धोकादायकही आहे. कारण लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो.
मराठी भाषेच्या संदर्भात हा संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण आपल्या भाषेची परंपरा केवळ साहित्यिक नसून ती सांस्कृतिक आहे. AI हे मुख्यतः 'इंग्रजीला प्राधान्य देणारे' साधन असल्याने इंग्रजीत मजकूर निर्माण करण्यासाठी ते जेवढे प्रभावी ठरते, तेवढे ते मराठीत मजकूर निर्मितीसाठी प्रभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे मराठीत लेखन करण्यासाठी AI चा वापर करताना 'मराठी भाषा, तिची लय, भाव आणि संदर्भ' जपण्याची जबाबदारी ही पूर्णपणे लेखकावर येते.
मला स्वतःला AI ला प्रॉम्प्ट देऊन त्याच्याकडून लिहून घेतलेले आणि त्यावर वापरकर्त्याने मानवी सर्जनशीलतेचे कुठलेही 'संस्कार' न करता जसे च्या तसे प्रकाशित केलेले 'यांत्रिक' लेखन वाचायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सदर लेख मालिकेचा उद्देश AI चे कौतुकगीत गात त्याला 'नायक' ठरवणे किंवा त्याची निंदानालस्ती करत त्याला 'खलनायक' ठरवणे हा नसून, तंत्रज्ञानापेक्षा विचारप्रक्रियेला प्राधान्य देत नवोदित लेखक लेखक / कवींना आपल्या मनातील कल्पना कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात उतरवण्यासाठी ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे सदूपयोग होऊ शकतो हे सांगण्याचा आणि 'AI म्हणजे लेखकाचा शत्रू आहे की तो एक सहकारी आहे? AI मुळे लेखन सुलभ होते की साचेबद्ध? AI कल्पना देतो की कल्पनाशक्ती कुंठित करतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI वापरताना लेखकाने स्वतःला कुठे थांबवायचे?' अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करत आहे.
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते. पण आधीच्या मजकुरावरून पुढचा शब्द काय असू शकतो ही संभाव्यता ओळखण्याची विलक्षण क्षमता AI कडे असते. त्यामुळे AI चा वापर आपण लेखनासाठी किती जवाबदारीपूर्वक करतो ह्यावर तो आपल्या वैभवशाली लेखन / वाचन संस्कृतीला समृद्ध करेल की दरिद्री करेल हे अवलंबून असेल.
मालिकेतल्या पुढील भागांमध्ये आपण AI कडे मानवी सर्जनशीलतेला पर्याय म्हणून मिळालेला तांत्रिक/यांत्रिक गुलाम म्हणून पाहणार नसून, लेखनासाठी त्याचा वापर करणाऱ्या लेखकाचा 'मदतनीस' म्हणून पाहणार आहोत. हा मदतनीस कधी आपल्याला वेगाने लिहायला मदत करेल, कधी आपल्याला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव करून देईल, तर कधी आपल्या विचारातील उणिवा ठळक करून दाखवेल.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
क्रमश: