वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
======================
- राजीव उपाध्ये
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे. कुणीतरी हूशार वकीलाने हे विज्ञान कोर्टाला समजावून सांगण्याची गरज आहे.
तसेच जोडीदार निवडणे हा अधिकार निसर्गाने मूलतः स्त्रिला दिला आहे, असे मानववंश शास्त्र सांगते. त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत, हा त्यांचा दोष ठरतो. मानवाने स्त्रिला पण्य-वस्तू बनवले, हा मानवी अधुनिक संस्कृतीचा पराभव आहे.
आपल्याला वडीलांच्या कडून जो जनुकीय वारसा मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त जनुकीय वारसा आई कडून मिळतो. उदा० अर्धे केंद्रकाम्ल, मायटोकॉण्ड्रीया, हिस्टोन, पेशीजलात तरंगणार्या इथेर गोष्टी. आपले आईमुळे अस्तित्व आपल्या जन्माच्या अगोदर पासून, खरं तर आईच्या जन्मापासून अस्तित्वात असते. त्यामुळे एका अर्थाने आईची आई ही आपली आई ठरते. शिवाय आईच्या पेशी आपल्या सर्वांच्या शरीरात निपचित पडून अनंत काळ वास्तव्य करतात. शिवाय प्रजनानासाठी अनेक जीवांमध्ये नराची आवश्यकता नसते. प्रयोगशाळेत बीजांडाचे फलन पण आता शूक्रजंतू शिवाय करता येते. पण बीजांडाशिवाय गर्भ राहू शकत नाही म्हणून वंश स्त्रिचा असतो.
समाजाची निर्मिती झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे समाजाची रचना अनेक वेडगळ आणि चुकीच्या (धार्मिक) संकल्पनांच्या आधारे झाली. त्या टाकून देणे काळाच्या ओघात अधि्काधिक कठीण बनले आहे.