
इतिहासाची दुरुस्ती
==========
- राजीव उपाध्ये
इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो.
एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला.
एक उदा० देतो. माझ्या वडीलांचे शिक्षण युरोपात (तेव्हाच्या झेकोस्क्लोव्हाकीयामध्ये) नेहेरूंनी आणलेल्या काही शिष्यवृत्त्यांमुळे झाले होते. ते त्याबद्दल बोलत असत आणि मी पण युरोपमध्ये जावे म्हणून आग्रही होते. माझे वडील १९८६ गेले, त्यानंतर त्यांच्या एका बॅगेत त्यांचा पासपोर्ट सापडला. त्या पासपोर्टमध्ये माझ्या वडीलांनी युरोपात कोणता प्रवास केला याच्या नोंदी सापडल्या. त्यात मला स्वित्झर्लँडच्या व्हिसाचा शिक्का सापडला. तो बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी स्वित्झर्लँडला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला.
१९५८-५९ मध्ये जग काय करत होतं माहित नाही पण आपले वडील तेव्हा युरोपात बर्फ तुडवत होते याचं अधूनमधून भारी वाटतं, पण "उत्खननात सापडलेल्या स्वित्झर्लँडच्या व्हिसाच्या" पुराव्याचा नंतर पुढे काहीच उपयोग झाला नाही.
देशाचा इतिहास बदलून तरी काय साधणार?