कधी निसटले धागे
मज कळलेच नाही
कशी उसवली वीण
मज कळलेच नाही
त्या निवांत भेटी
त्या एकांत गाठी
डोळ्यांत हर्षाचे झरे
अन देहांची मिठी
क्षण ते सरले जरी
मन ते भरलेच नाही
ती मधाहूनी गोड
कुठे हरवली ओढ ?
अशी कशी मुक्याने
मोडली माझी खोड
माणसाचे मन ते
मज उमगलेच नाही
येते रात सजुनी
येतो पाऊस अजुनी
शालीन थंडी गुलाबी
मारते मिठी बाजूनी
मग कसा प्रेमाचा
ग्रीष्म गेला विझुनी ?
काय खरं नि खोटं
तू मज वरलेच नाही ?