#नवरात्री निमित्ताने
परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बदलले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या. व्याख्यान जरी घाईत ऐकले तरी काही मुद्दे लक्षवेधक, नवीन होते.
'घट' हा मृत्तिकेपासून बनवलेला विविध हेतूसाठी धार्मिक विधी, साठवणूक, सामाजिक प्रथांसाठी वापरला जात असे.

सिंधू संस्कृतीत व त्या नंतरच्या काळातही दफनविधी साठी घटाचा वापर होत असे.जे जन्म ,मृत्यू, पुनर्जन्म यांचे प्रतिक आहे.घट हा माती, पाणी यांनी तयार होतो. आणि हीच तत्त्वे नव्याने धान्य म्हणजेच सृजनासाठी आवश्यक आहेत. तसेच मानवी जन्म स्त्रीच्या उदरातून होतो तेव्हा स्त्रीचे उदर घटाप्रमाणेच गोलाकार दिसते. 'स्त्री ही सृजनकर्ता, घटरूपी सृजन मानली गेली. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळावा यासाठी मग दफनविधीसाठी घटांचा वापर होत गेला. घटरूपी आकारातून सृजन होते. अशावेळी कुंभाराकडून मृत्य व्यक्तीसाठी शरीर आकारानुसार घटरचना होत. लहान मुलांसाठी मध्यम आकाराचे मडके पुरेसे असत. तर मोठ्या माणसांसाठी मोठ्या आकाराचे चार-पाच मडके एकावर एक अशी आतून पोकळ बनवली जात. त्यात देह ठेवतांनाही त्याचे हात पाय छाती-पोटाजवळ ठेवले जात जे गर्भात असतानाही असेच असतात. अशाप्रकारे दफन केल्यामुळे ज्यातून सृजन होणार कशा गर्भासारख्या घटातून मृत्यूनंतर जीवनात योग्य जागी मृत व्यक्तीचे सृजन सहज व्हावे
ही श्रद्धा! अशाप्रकारचा दफनविधी कमी झाल्यानंतर #पुनर्जन्माचे प्रतिक म्हणून केवळ एखादेच #मडके शवाजवळ दफन करतांना ठेवले जाऊ लागले.
हळूहळू या 'स्त्री शक्तीची सश्रद्ध आराधना #घटस्थापना या रीतीरिवाजात झाली. घट ज्या आत पाण्यातून, मृत्तिकेच्या संपर्कातून बीजारोपण होऊन सृजन धान्यरूपातून उगवते. हा सर्व जागरही नऊ रात्री- गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचे प्रतिक दर्शवितो.
पुढे या घटाभोवती आनंदोत्सव गरबा गोलाकार आकारात खेळला जाऊ लागला. नंतर अनेक विधींमध्ये धातूचा कलश पाणी नारळ पाने सृजनाचे प्रतिक /देवीरूप म्हणून मांडले गेले. तत्कालीन जीवनातील जन्म- नश्वरतेचा विचार प्रत्येक कामात होत असे. मग तो सुतार लोहार, कुंभार कोणीही असे. सृजन आणि नाश चक्र प्रत्येक ठिकाणी असतेच.घट घडवणाऱ्या कुंभारांनीही या सृजनाचा जागर समाज घडीत रचला.

तुकारामांनी थेट विठ्ठलालाच 'वेडा कुंभार' म्हटले आहे तर माणसाच्या जीवनाला मडक्याची उपमा दिली आहे.
माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळचि मग ये आकारा। तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार||
पहिल्या ओळीचा अर्थ सरळ आहे माती , पाणी, उजेड, वारा या चार तत्त्वांचा उल्लेख पंचमहाभूतांशी पृथ्वी, जल, तेज, वायू यांच्याशी जोडता येतो. मानवी शरीरही याच पंचमहाभूतांनी बनले ही धारणा आहे. विठ्ठल हे सर्व एकत्र करतो अक्षरशः या पसाऱ्याशी खेळतो. माती पाणी सृजनासाठी तर उजेड, वारा जीवनाला गती देतो, हीच गोष्ट कुंभार मडकी-घट बनवताना करतो. आभाळ आकाराला येते- आकाश विश्व जे विशाल आहे ते साकारले सजीवांसह जाते.तुझ्या घटांच्या 'उतरंडी म्हणजे माणसांच्या, सजीवांच्या लहान मोठ्या प्रजाती उदयाला येतात. कुंभारही लहान ते मोठ्या आकाराची मडक्यांची उतरंडच बनवत असतो. अशा या मडकं बनवण्याच्या, सृष्टीच्या जीवांच्या जन्म मृत्यूच्या चक्राला, सीमेला कोणतीच सीमा नाही.
घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे देव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा न कळे। मुखी कुणाच्या पडले लोणी कुणामुखी अंगार||
आता घट म्हणजे मानव ठरले!
या घटामध्ये मानवामध्ये किती ते दिसण्यात,व्यक्तिमत्वात,विचारात वैविध्य आहे. तर प्रत्येक 'घट' इतरांपासून निराळा आहे. प्रत्येकाचे व्यक्तीमत्त्व निराळे आहे.अशा प्रत्येक मनुष्याचे कर्म व दैव यांचा समतोल कसा साधता येतो की नाही हे ईश्वरालाच ठाऊक असते.त्यामुळे समतोल साधला असेल तर लोणी(आनंद) नाहीतर जीवनभर अंगार (दु:ख)!
-भक्ती