एआय आणि उत्पादकता

आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता

-- राजीव उपाध्ये

माझी कन्या शाळेत असताना बर्‍याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्‍यापैकी पुढे होती. बौद्धिक आणि शारीरिक चापल्याचा घनिष्ट संबंध असल्याचे विज्ञानाने आता मान्य केला असल्याने माझ्या या जुजबी निरिक्षणांमध्ये शास्त्रीय तथ्य असल्याचे नंतर लक्षात आले.

हा गंमतीदार ’अभ्यास’ सांगायचा उद्देश असा की नवे तंत्रज्ञान आल्यावर जे अगोदर धावत सुटतात, ते त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. चॅटजीपीटीचे लोकार्पण झाल्यापासून मी रोज या तंत्रज्ञानाविषयी येणार्‍या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. जवळजवळ ३ महिने गेल्यानंतर भारतीय ब्लॉगर्सनी ए०आय०ची दखल घ्यायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा, आपण याही खेपेला नव्या तंत्रज्ञानाला संगणकाच्या आगमनाच्या वेळी दिला तसा थंडा प्रतिसाद दिला (हे अर्थात माझे वैयक्तिक मत आहे).

ए०आय० किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता हे असे तंत्रज्ञान आहे की ज्याने आजवर निर्माण झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात जास्त गुंतागुंतीचा प्रभाव मानवी जीवनावर टाकला आहे. ’बृह्त्भाषा प्रतिकृती’ (लार्ज लॅंग्वेज मॉडेल) अवतीर्ण होण्यापूर्वीच अनेक जणांनी धोक्याच्या घंटा वाजवायला सुरुवात केली होती. पण "मग सावकाश बघू" या धारणेमुळे बहुसंख्य लोकांनी या इशार्‍यांकडे दूर्लक्ष केले.

आज भारतीय माध्यमातून ए०आय० बद्दल जे लिहीले किंवा दाखवले जाते, त्यात मला नकारात्मक सूर जास्त सापडतो. मराठीत पण ए०आय० बद्दल बोलणारे अनेक मातब्बर तज्‍ज्ञ ए०आय० कसा वापरावा याबद्दल अवाक्षर न काढता धोक्यांबद्दलच जास्त बोलताना दिसतात. विशेषत: अलिकडे अमेरीकेतील एम०आय०टी०ने मेंदू निष्क्रिय होण्याबद्दल इशारा देणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते. कारण प्रत्यक्षात अनेक लोकोत्तर तंत्रज्ञानांच्या आगमनावेळी असे इशारे देण्यात आले होते. उदा० इमेल तंत्रज्ञन आले तेव्हा लोकांना हाताने पत्र लिहीणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व वाटू लागले होते. तसेच इमेलमध्ये भावनिक ओलावा नाही म्हणून नाक मुरडले जायचे. अनेकजण मी इमेल बघत नाही, इंटरनेट वापरत असे अभिमानाने सांगायचे. पण नंतर इमेलने आणि संदेशनातील नंतरच्या प्रगतीने मानवी आयुष्य किती व्यापले हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही नकारात्मता जर अशीच कुरवाळली गेली तर तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणून पण भारत मागे पडेल अशी मला भीति वाटते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अस्तित्त्वाला धक्का देणार्‍या, सर्व उपकारक आणि अपकारक तंत्रज्ञानांशी शेवटी मनुष्यप्राण्याने असे ना तसे जुळवून घेतले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांचे अस्तित्व अर्थातच धोक्यात आले.

मी ए०आय० कडे कसे बघतो?

"उत्पादकता वाढवणारा एक जीवलग सखा" अशी माझी ए०आय० बद्दलची धारणा आहे. असा किंवा अशासारखा सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच ए०आय०चा जास्तीत लाभ मिळवून उत्कर्ष साधता येईल असे माझे स्पष्ट मत आहे.

समजा तुम्हाला अल्पमोली, आखुडशिंगी, बहुदुधी अशी गाय एखाद्याने आणून दिली तर ती तशी खरोखर आहे का हे अधूनमधून तपासणे ही किमान जबाबदारी मालक म्हणून तुम्ही पार पडणे आवश्यक आहे. तात्पर्य, नोकर कितीही विश्वासू असला तरी किमान देखरेख ही ठेवावीच लागते. ए०आय० बाबत पण नेमके तसेच आहे.

ए० आय० कडून १०० टक्के अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक जण ओशाळताना दिसतात. पण ए०आय०ची थापेबाजी आता खुपच कमी/नगण्य झाली आहे. पण तरीही शंका आल्यास किंवा पुरेशी काळजी घेण्यासाठी एकच प्रश्न एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला, भाषा बदलून एकापेक्षा अधिक ए०आय० ना विचारल्याने विश्वासार्ह उत्तरे मिळायची शक्यता वाढते. तसेच एका ए०आय०ने दिलेले उत्तर दुसर्‍या ए०आय०कडुन तपासून घेता येते.

बर्‍याच ए०आय० सेवा देणार्‍या कंपन्यांनी माफक सेवाशुल्कात भारतात सेवा देणे चालू केले आहे. ज्याना शक्य आहे त्यांनी अशा सशुल्क सेवांचा अवश्य फायदा उठवला पाहिजे. हे पैसे आपली "उत्पादकता" वाढल्याने नंतर लगेच वसूल होतात.

एक ताजे उदाहरण-

मी शेअर बाजारातला एक छोटा गुंतवणूकदार आहे. मला कुणाचे सल्ले न घेता गुंतवणूक करायला आवडते. पूर्णपणे स्वत:च्या भरवशावर शेअरबाजारात गुंतवणूक करताना दोन गोष्टींचे पथ्य पाळावे पाळावे लागते - एक म्हणजे समभागाचे तांत्रिक विश्लेषण (technical analysis) आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या उद्योगाचे पायाभूत विश्लेषण (fundamental analysis).

नैसर्गिक देणग्यांमुळे (पॅटर्न शोधणे) आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे तांत्रिक विश्लेषणामध्ये मी ए०आय०च्या मदतीने अभ्यास करून बर्‍यापैकी प्रावीण्य मिळवले, पण पायाभूत विश्लेषण करण्यात मी कमी पडत होतो. ही उणीव भरून काढायला मला ए०आय० ची होत असलेली मदत अनन्यसाधारण आहे.

वेगाने व्यवसायात प्रगती करणार्‍या कंपन्या ओळखणे हे माझ्यासारख्या अनेकांना आह्वानात्मक असते. सर्वच लोकाना कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यावरुन योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा कंपनीच्या भविष्याविषयी अंदाज बांधणे जमत नाही. साहजिकच या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मी ए० आय० लाच प्रश्न विचारला -

"Help me to find good low valued stocks which have promising future in Indian markets. Suggest some strategies."

मला त्याने समभागांचे संख्यात्मक (ऐतिहासिक कामगिरी) आणि गुणात्मक विश्लेषण कसे करायचे याबद्दल काही सूचना केल्या. यातील संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आज असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. पण समभागाच्या गुणात्मक विश्लेषणात त्याने - व्यवस्थापनाची गुणवत्ता (Management Quality), कंपनीची व्यवसायात स्पर्धात्मक आघाडी (Competitive Advantage), व्यवसायाचे भवितव्य (Growth Prospects) हे निकष तपासण्यास सांगितले. आता मुख्य समस्या अशी की माझ्या वैयक्तीक मर्यादांमुळे मला एखाद्या कंपनीचे असे ’गुणात्मक विश्लेषण’ अजुनही जमत नाही. त्यामुळे मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला -

"How to find out about management quality of a company?"

यावर जेमिनी या ए०आय०ने मला एक लांबलचक निकषांची यादी दिली. ती बघितल्यावर यात थापा नाहीत याची खात्री करण्यासाठी एका दुसर्‍या (डीपसिक) ए०आय०ला ही यादी तपासायला सांगितले आणि आवश्यक असेल तर भर टाकायला सांगितले. मला तात्काळ कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा ठरवणार्‍या निकषांची सुधारित आणि अंतिम यादी तयार करून मिळाली.

मी ग्रोक या ए०आय० ची सशुल्क सेवा वापरतो. वरील यादीतील निकष वापरून कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, तसेच व्यवसायाचे भवितव्य यावर पुन:पुन: माहिती मिळावी यासाठी ग्रोकमध्ये कायम स्वरूपी सूचना देता येतात. हा सर्व उद्योग केल्यावर मग प्रत्यक्ष चाचणीसाठी माझ्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ गडगडलेले आणि चांगली कामगिरी करत असलेले समभाग तपासले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. ग्रोकने दिलेली उत्तरे ~१००% अचूक होती.

माझ्या ऐकीव माहीतीनुसार प्रसिद्ध तत्त्वज्ञ विट्जेन्स्टाइन असे म्हणत असे - माणसाचे जग किती मोठे तर त्याच्या भाषेच्या वापरा एव्हढे. तसेच कितीही नाही म्हटले तरी माणसाची सुबत्ता त्याच्या घरातील नोकरचाकरांच्या संख्येवर, दारातील गाड्यांच्या संख्येवर ठरते. लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.