छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.
तो-आई,तांदळाची खीर कर ना!
"हात मेल्या दळभद्री कुठला!"
वडील दुसर्या गावी नोकरीवर होते.सुट्टीवर येताना रातराणीचा अपघात झाला.
मोठा मुलगा म्हणून जे काही सांगितलं ते करत गेला.
"बाई,आज आमच्या घरी चौदावा आहे,मी शाळेत येवू शकणार नाही".
न सांगता घरी राहीला असता तरी कुणी काही म्हणले नसते.
तांदळाची खीर वाढताना आईचा बांध फुटला. भर पंक्तीत त्याला बदडला.
लहान होता तरी मोठे व्हावे लागले.
उद्ध्वस्त घडी बसवायला अर्धे आयुष्य गेले.
अचानक,म्हातारी आई गेली.
तेरावा झाला,कोपर्यात बसून होता.
बाजुलाच खेळत असलेला त्याचा छोटा मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला उद्या आई तांदळाची खीर करणार आहे.
ते त्याने ऐकले,तिरीमिरीत उठला,पोराला बदड बदड बदडले...
छोटाच होता,काही कळायचं वय नव्हते.....