शाप की आशीर्वाद?

शाप की आशीर्वाद?
==========

-राजीव उपाध्ये

...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत.

मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले. मग ते मला कै० इंदिराबाई गुर्जरांचा (वि०सी० गुर्जरांच्या पत्नी) पत्त्ता शोधून त्यांच्याकडे घेऊन इंदिराबाई गुर्जरांनी त्यांच्याकडचे सर्व साहित्य मला दिले. गुर्जरांचे उपलब्ध साहित्य अगोदरच वाचून संपवले होते. आमच्या शाळेचे ग्रंथालय खुप भारी होते.

मग मी २-३ महिने खपून एक दीर्घ लेख लिहीला आणि उत्साहाने तो मांडकेसरांना (ते ’नूमविय’चे संपादक होते) नेऊन दिला आणि विसरून गेलो. मग एक दिवस अचानक वर्गावर आले आणि "राजीव उपाध्ये कोण आहे?" अशी विचारणा केली. मी हात वर केल्यावर मला म्हणाले, "जरा बाहेर ये बघू"

लेखाचे विसरून गेल्यामुळे मी घाबरतच बाहेर गेलो. मांडकेसर माझा लेख फाईलमधून बाहेर काढत म्हणाले,

"हा लेख तू लिहीला नाहीयेस. तुझ्या घरात कुणी (आई-बहीण-भाऊ) मराठीत एम०ए० करत आहे का? हा लेख एम०ए० च्या विज्ञार्थाने लिहीलेला वाटतोय. खरं खरं सांग..."

नंतर बराच वेळ मी सरांना माझ्या क्षमतेनुसार लेख मीच लिहीला आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. सरांनी मला उलटे-सुलटे प्रश्न विचारले आणि मग तो मला काटछाट करून आणायला सांगितले. मी (नाराजीने) काटछाट केली आणि त्यांनी तो अंकासाठी स्वीकारल्याचे सांगितले आणि मी खुषीत घरी येऊन सर्वाना सांगितले.

मग नववीचे वर्ष संपले, निकाल लागला आणि नूमवीयचे सगळ्या वर्गात वाटप झाले तेव्हा माझा लेख छापून आला होता. तेव्हा मी आणि एक दोन मित्र उन्हाळ्याच्या सुटीत कवठेकरसरांच्या घरी पडीक असू. कवठेकर सरांचे वडील म्ह० दत्त रघुनाथ कवठेकर! तेव्हाचे मराठीतले नामवंत आणि वजनदार कादंबरीकार. त्यांना पण विठ्ठल सीताराम गुर्जरांबद्दल भयानक आदर होता. साहजिक कवठेकरसरांनी माझा लेख वडिलांना कौतूकाने वाचायला दिला. त्या दिवशी नेमका योगायोग असा की कवठेकरसरांच्या वडीलांना भेटायला प्रा० म० ना० अदवंत आले होते. कवठेकरसरांनी माझी प्रा० अदवंतांशी हा "गुर्जरांचा पणतू" अशी ओळख करून दिली आणि मी लिहीलेला लेख त्यांना वाचायला दिला.

प्रा० म० ना० अदवंतांनी मी लिहीलेला लेख बारकाईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचला आणि म्हणाले,

"छान अभ्यास करून लिहीला आहेस, एम०ए०चे विज्ञार्थी पण असं लिखाण करत नाहीत."

त्या शब्दांनी एकदम उडालोच.

नंतर हा अनुभव आयुष्यात अनेक महत्त्वाच्या टप्प्यावर परत-परत आला. पुण्याच्या ’सकाळ’ने मला सदर लिहायची संधी दिली तेव्हा एक श्रेयलंपट गुरुवर्य अतिशय नाराज होते. असे अनुभव आज ६२ व्यावर्षी पण येत आहेत.

आज मागे वळून बघतांना एक लक्षात येते आपल्या क्षमता ओळखून दु;खी न होता त्या क्षमतांना न्याय देणारे भेटणे प्रगतीसाठी आवश्यक ठरते.

भारतासारख्या देशात समाजाकडून व्यक्तीच्या आयुष्या्मध्ये समाज अनावश्यक लुडबूड खुप करतो. कुणी काय करायचे आणि काय करायचे नाही, याच्या प्रतिगामी आणि साचेबद्ध कल्पना त्या व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे नुकसान खुप करतात. खरं तर जेव्हा आर्थिक आणि जिवाला धोका नसेल तर कुणीही काहीही करायला मुक्त असतो...

पण हे कोण कुणाला समजावणार?