आले अंबानीच्या मना

नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती.

2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता.
नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही.

नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे.

आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.

नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच
https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन
https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s
https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s
नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA