मराठी मागे का पडत चालली?
त्याला जबाबदार कोण किंवा कारणे काय असावीत?
एका दिवसात काही भाषा पसरत नाही, प्रचलीत होत नाही. सामान्यांची बोली वेगळी असते आणि नाटक, साहित्याची भाषा जड आणि प्रासादिक, किंवा क्लिष्टही असते. प्रचलीत भाषेतून व्यवहार होतात, भाषेच्या व्याकरणाची मोडतोडही होते तरीही तीच बोलली जाते.
मराठीला मागे सारून मुंबईत हिंदीच पुढे गेली. व्यवहारात आणि कागदोपत्रांत, परिवहनात.
१. चाळीस पन्नास वर्षे मागे जाऊ. मराठी शाळा खूप होत्या. त्यातूनच विज्ञान गणित शिकलेले काही विद्यार्थी पुढे नावारूपासही आले. शाळेतून कॉलेजच्या इंग्रजी माध्यमात गेल्यावर खूप जणांना जड जाऊ लागले. साधे संभाषण नाही तर अभ्यासही कठीणच. श्रीमंत मुलांनी 'क्लासेस' मध्ये जाऊन अभ्यास भरून काढला. पण त्याच वेळी इंग्रजी शाळांतून आलेली सामान्य मुलेही चमकू लागली कारण संभाषण ही अडचण मुळीच येत नव्हती. मराठी शाळेप्रमाणेच गुजराती शाळांतील मुलेही असतं. पण त्यांचा सर्व भार फक्त थोडेफार कॉलेज करणे आणि 'धंध्याला' लागणे असे. शिक्षणाधारित नोकऱ्या पकडणे हा नसे. मराठी मुलांना आणि पालकांना हे चांगलेच जाणवू लागले. पुढे स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा नडू लागल्या. त्यांत इंग्रजी संभाषण, संवाद, गट चर्चा अवघड जात. पालकांचा कल इंग्रजी शाळेत मुलांना पाठवणे हा वाढला. तिकडे मराठी गौण दुय्यम भाषा झाली. मग काही मराठी शाळांनी तर ' सेमी इंग्लिश' सुरू केले. मराठी शाळांचे प्रवेश कमी होत जात शेवटी बंद पडल्या. तर मराठीची ही मागे पडण्याची सुरुवात. इकडे समाजातील मान्यवर, राजकारणी यांनी लक्ष दिले नाही. मराठी शाळांसाठी एक विशेष इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केला असता तर मराठी शाळाही टिकल्या असत्या, मराठी टिकली असती, काळानुरूप इंग्रजीचीही हेळसांड झाली नसती.
२. मुंबई कशी झाली वाढली हेसुद्धा पाहाणे गरजेचे आहे. मुंबई हे मुख्य बेट धरून सात बेटे ही इंग्रजांना पोर्तुगीजांकडून मिळाली त्याचं पोर्तुगीज नाव त्यांनी Bom bay ठेवलं होतं म्हणजे good harbour. चांगले बंदर. मूळ रहिवासी कोळी आणि सीकेपी सावकार. त्या सात बेटांचा विकास करून जोडून एक मोठं मुंबई बेट इंग्रजांनी बनवून बंदरातून व्यापार सुरू केल्यावर इकडे प्रथम पारशी, बोहरी, गुजराती, राजस्थानी( मारवाडी म्हणत) आले आणि व्यापारात घुसले. अगोदरचा व्यापार अफूचा ( बिहार, बंगाल, मध्यप्रदेशात पिकलेली अफू चीनला पाठवणे), कापसाचा ( इंग्लंडला पाठवणे )होता. तिकडून कापड येत असे. मग इकडेच कापड गिरण्या सुरू करायची कल्पना निघाली. स्वदेशी मिल पहिली. मग पंचवीस वर्षांत पन्नासएक गिरण्या सुरू झाल्या. मालक पारशी किंवा गुजराती. कामगार आणि बाबू कोकणातले आले. तर यावेळी मराठी माणूस मुंबईत आला. त्यांच्या राहण्यासाठी गिरगाव ते दादर भागांत मिल मालकांनी मोठ्या इमारती ( चाळी) बांधून दिल्या. नोकऱ्या वाढल्या तशी वस्ती वाढली. सर्व राज्यांतून हुन्नरी लोक मुंबईत आले. गुजराती, कच्छी छोटे मोठे दुकानदार कापड आणि वाणी सामानाची दुकाने उघडून बसले. मुंबई ठाणे परिसरात स्टील, केमिकल, औषधे यांचे कारखाने उभे राहिल्यावर विविध स्तरातील कर्मचारी वर्ग विविध राज्यांतून मुंबईत आला. त्यांची भाषा मराठी नव्हती. इमारती उभारणारे सिंधी पंजाबी राजस्थानी ' बिल्डर' आले. पण बांधकाम मजूर आंध्र, राजस्थान आणि बिहारचे आले. मुंबईतील रेल्वे, वीज आणि पाणी व्यवस्थेमुळे आणि पोटाचा व्यवसाय मिळण्याच्या खात्रीने वस्ती अफाट वाढत विरार, कल्याण व्यापून टाकले. एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के मराठी माणूस राहिला. मुंबईत जन्म झालेले कित्येक लोक मराठीचा 'म' न बोलताही चाळीस वर्षे राहात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे व्यवहार सुरळीत चालत आहेत.
३. एकजूट करा, आपली अस्मिता टिकवा, मिळून मिसळून राहा एवढेच सांगतो.