मराठी भाषेतील सर्वात भंगार ( सुविचार) वाक्य कोणते?

मराठी भाषेत अनेक चांगली वचने आहेत.
त्या पैकी काही आपल्याला प्रगती करायला प्रोत्साहन देतात तर काही मात्र सुविचार असूनही आपल्याला संकुचित करून ठेवतात.
उदा :
१) ठेवीले अनंते तैसेची रहावे , चित्ती असू द्यावे समाधान
वर वर दिसायला हे वाक्य चांगले वाटले तरी ते परिस्थितीशी झगडून बाहेर येण्याची इच्छा मारून टाकते. आपल्या हातात काहिही नाहिय्ये. जे काही आहे ते देवाने विचारपूर्वक दिलेले आहे. त्यात बदल करायचा नाही. आणि निष्क्रीय वागायचे असाच संदेश हे वाक्य देते. त्यामुळे माझ्या लेखी हा एक भंगार सुविचार आहे.

२) लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरीबी चांगली: - हे वाक्यही वरच्या सारखेच भंगार सुविचार. लहानपणी हे वाक्य ऐकले की वाटायचे श्रीमंती आली की माणूस लुळापांगळा होतो. त्यामुळे आपल्याला श्रीमंत व्हायचे नाही हे कुठेतरी मनात ठसते

३) साधी रहाणी उच्च विचारसरणी : - या वाक्यामुळे आपण आपल्या साध्या ( दरिद्री ) रहाणीला नसलेल्या उच्च विचारसरणीच्या आड दडवतो. शंतनुराव किर्लोस्कर म्हणतात एखाद्या उत्तम विणकराने विणलेल्या वस्त्राला जर विकत घेणारा ग्राहकच नसेल तर त्या विणकराचे पोट कसे चालेल त्याची विणकाम कला बंद पडेल. पर्यायाने अर्थव्यस्थेला खीळ बसेल.
दुसरे म्हणजे जर तुमच्याकडे सधनता नसेल तर गरजा भागविण्या शिवाय इतर विचारसरणी डोक्यात येवूच शकत नाही.( भुकेलेल्याला खाण्याशिवाय दुसरा कोणताच विचार सुचत नाही )

४) शरण आलेल्या शत्रुवरही दया दाखवावी : मुहम्मद गझनवी वर दया दाखवून त्याला १५ वेळा सोडले. त्याने सोमनाथवर १६ व्या वेळेलाही हल्ला केला. जर त्याला पहिल्यावेळीच ठेवला असता तर पुढचे पंधरा हल्ले झालेच नसते.

५) केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हावे: हे वाक्य सुविचार म्हणून शाळेत नेहमी फल्यावर लिहीलेले असाय्चे. हे असले वाक्य कोणी आणि का लिहीले तेच कधी समजले नाही. वाढलेले केस असण्याचा आणि बुद्धी असण्याचा काय संबन्ध? असे प्रश्नही कधी पडले नाहीत.
विवेकानंदांचे जे काही फोटो वारंवार समोर येतात त्यात ते फेटा बांधलेलेच आहेत. त्यामुळे केस दिसण्याचा प्रश्न येत नाही.
आईनस्टाईनचे विस्कटलेले केस तसे वाढलेलेच होते की.

६) नेहमी खरे बोलावे : या सुविचाराबद्दल काय बोलू???????

तुम्हाला अशी काही वाक्ये आठवत असतील तर इथे त्यावर चर्चा होऊन जाऊ दे.