महाराष्ट्रातलं राजकारण!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)

सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.

- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.

महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.

बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.

मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!

अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.

इत्यलम्